गुरुवार, 30 अप्रैल 2020

रोज एक लेख :- दिवस तेरावा श्रम / कष्ट

साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- तेरावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 01 मे 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- श्रम / कष्ट*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
01) कष्टाविना नाही फळ

"जिवनात मेहनत करा
मिळेल निश्चित फळ
कष्टाने मिळविलेल्या भाकरी
हेच देते जगण्याचे बळ"

       प्रत्येक मनुष्य जीवनात यशस्वी होण्याकरिता आपापल्या परीने मेहनत करीत असतो.शेतकरी शेतात राबराब राबत असतो तर कर्मचारी/शासकीय नोकर पुढील पिढी घडविण्याचे कार्य सदोदित करीत असतो यावरून आपल्याला कष्टाचे दोन प्रकार बघावयास मिळतील.शारीरिक श्रम व बौद्धिक श्रम असे दोन प्रकार प्रामुख्याने कष्टात गणल्या जातात.शारीरिक श्रम करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता नसली तरी जीवनात कौशल्यावर आधारित जीवन जगण्यासाठी आवश्यक असते त्याचसोबत बौद्धिक श्रमाकरिता शिक्षणाची अधिक गरज असून पुढील पिढी घडविण्याचे कार्य करावे लागते त्याचप्रमाणे शेतकरी हा 'जगाचा पोशिंदा' आहे.विनोबा भावे म्हणत असत की,'शेतकरी जगला तर देश जगेल' यावरून आपल्याही लक्षात येईल की,शेतकऱ्याची महती खूप आहे तसेच देशात वेगवेगळे कार्य करून आपली उपजीविका भागविण्यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो यात शंका नाहीच.उद्योग जगत,कारखानदारी,चित्रपट उद्योग,शेतमजूर,कामगार,तंत्रज्ञानी व्यवहार इत्यादी अनेक व्यवहारातून कष्ट करीत असतात आणि आपला प्रपंच सुरळीत चालवीत असतात यात प्रामुख्याने म्हणावे लागेल की,कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही.

         आज शेतकरी देखील शेतात दिवसरात्र मेहनत घेत असतो त्यांच्याही खूप अपेक्षा असते. प्रत्येकाला आकाशात उंच भरारी मारावी वाटते त्यासाठी मेहनत ही एकच गोष्ट त्यांच्याकडे असते.त्या मेहनतीच्या बळावर घरसंसार चालवीत असतात.मुलांचे शिक्षण,कपडे,आई वडिलांची काळजी व इतर घर संसारासाठी आवश्यक असलेल्या गरजा भागविण्यासाठी पैशाची गरज असते आणि पैसा कमविण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. कठोर मेहनत करीत असतांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत असते.'कुछ किये बिना जयजयकार नही होती,कोशिस करने वालो की हार नही होती' त्यामुळे मेहनतीला सातत्याची जोड हवी असल्यास आपल्याला इच्छित असलेल्या सर्व बाबीवर विजय मिळवू शकतो यासाठी मेहनत करण्याची इच्छाशक्ती केवळ शेतकऱ्यातच नाही तर इतर प्रत्येक मानवी जातीत असायला हवी तेव्हाच प्रगती होईल.व्यक्तीची प्रगती म्हणजेच समाजाचा,गावाचा,तालुक्याचा,जिल्ह्याचा,राज्याचा,देशाचा विकास होईल त्यामुळे मेहनत करणे गरजेचे आहे.

       आज प्रत्येक क्षेत्रात पोटाची भूक व इतर भौतिक सुविधेसाठी मानव अहोरात्र मेहनत करीत असतो.केवळ शरीरीकच नाही तर बौद्धिक मेहनत देखील तेवढीच महत्वाची आहे.आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन कष्ट करून पैसा कमवित असतो.आजचे युग हे तंत्रज्ञानी युग असल्याने आंतरजाळच्या मदतीने देखील उपजीवीका करीत असतो.व्यवसाय,उद्योग,कारखानदारी,व्यापार,चित्रपटात काम करणारे,नोकरी,चाकरी इ वेगवेगळ्या क्षेत्रात मेहनत करून आपली गुजराण करीत आहे.आज विद्यार्थी देखील उच्च शिक्षणासाठी देश-विदेशात जाऊन शिक्षण,नोकरी करीत आहे त्यांचा देखील मेहनतीवर विश्वास असून पुढील पिढीला मेहनतीचे धडे देत आहेत म्हणून मेहनतीची गोडी आजच्या तरुणाने चाखायला हवी तेव्हाच जीवनात समाधानाने जीवन व्यतीत करू शकतात.

           संपूर्ण दिवसाचा विचार केल्यास चोवीस तास मिळतात.शोषित,पीडित,वंचित,कामगार,शेतमजूर यांना सामाजिक समता मिळविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 'ग्रंथ हेच गुरू' समजून अठरा तास अभ्यास करायचे.'मेहनत हाच ध्यास,युवकाचा असावा अट्टाहास' तेव्हाच आपण प्रगतीच्या उंच शिखरावर पोहचू शकणार आहोत.डॉ.बाबासाहेबांच्या अभ्यासू वृतीमुळेच आज त्यांच्याकडून अधिक प्रेरणा घेऊन आजची युवक पिढी अभ्यास करून निरनिराळ्या चांगल्या पदावर कार्य करीत आहेत यासाठी मेहनत करतांनाही जिद्द,चिकाटी निर्माण झाली पाहिजे तेव्हाच जगण्याला बळ येईल आणि आपल्या मेहनतीला फळ येईल म्हणून मेहनतीचा ध्यास सदैव ठेवायला हवा.

✒श्री दुशांत बाबुराव निमकर
      चक फुटाणा, चंद्रपूर
      मो न 9765548949
dushantnimkar15@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
02) श्रम साफल्य
हातभर देहाला आणि टिचभर पोटाला जपण्यासाठी रात्रनं दिवस खपणारी माणसं आसपास आपण पाहत असतो. पण खपता खपता समाधान मिळविणारी माणसं विराळच दिसतात. कारण त्यांचं खपणं हे सरळ मार्गाचं नसतं.जीवनाचं सार्थक निव्वळ कष्ट करण्यातच आहे असं नाही. पण हरामाचं खाण्यापेक्षा श्रमातून मिळालेलं धन वा सुख नक्कीच समाधान देतं. भरलेल्या पोटात भर घालण्यात कसला आलाय आनंद. उपाशीपोटाला चटणी भाकरीचाही आधार समाधान देऊन तृप्त करतो. हेच समाधान आणि हिच तृप्ती श्रमातून मिळत असते. पण श्रम हे सरळ मार्गावरलं असलं पाहिजे.पैशाच्या मागं धावणारं श्रम धन देऊन जाईल पण समाधान नाही देणार. आणि या श्रमाला नैतिकता असेलच असंही सांगता येत नाही. परंतु जीवनात श्रमाला महत्व निश्चितच आहे. त्याचं महत्व केवळ सांगून कोणाच्या सहजच लक्षात येईल असं नाही. अनुभवातून श्रमाचं महत्व लक्षात येत असतं.
महात्मा गांधी यांच्या सहवासातील एक युवक गांधीजीना म्हणाला, " बापु, मी भुकेने मरत आहे. मला कोणी नोकरी देत नाही की माझ्या जवळ नोकरी साधनही नाही.. " बापु म्हणाले, " तु मला सांग बघु मुंगी, कातिन, मधमाशी तसेच जंगलातील  लाखो जीव कोणत्या कारखान्यांत नोकरी करतात? त्यांच्या जवळ नोकरीचे कोणते साधन आहे?तरीपण
ते काय उपाशी रहातात? "तरुणाला कळले की संपतीची कमतरता नाही, मनाची आहे. त्या दिवसापासून तो परिश्रम करू लागला. खरं पाहिलं तर संधी सर्वांनाच उपलब्ध असते पण ती संधीच आहे याची जाण असणे आवश्यक आहे. माणसं घडतात आणि बिघडतातही, आता तो काळ राहिला नाही की घरामध्ये एक व्यक्ती कमवती आणि बाकी त्याच्या जीवावर जगत असायचे. आनंदात राहत असायचे. दिवस बदलत गेले तद्वतच माणासांच्या उत्तुंग गरजाही वाढल्या आणि त्यातूनच आर्थिक संतुलन बिघडत जावून स्वतःचा खर्च स्वतःला भागवण्यासाठी दमछाक होवू लागली. आणि पैसा हाच भगवान समजून धावणाऱ्या जगात कांहीच्या वाट्याला तर अप्रामाणिकपणे वागल्याशिवाय जगणेच अवघड बनते. अशा परिस्थितीत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नव्या पद्धतीने विचार करून शांत चित्ताने उपाय शोधावे लागतील. त्यामुळेच अशांत परिस्थितीतून मार्ग निघेल. रोजच्या जगण्याच्या लढाईत महागाई होऊ शकत नाही.जेवण, आरोग्य, शिक्षण, आतिथ्य, सण समारंभ आदि खर्च कमी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एकच उपाय दिसतो की घरातील प्रत्येक समर्थ आणि वयस्कर व्यक्तिने कांही तरी कमाई करावी अर्थात श्रम करावे आणि आता खरं तर तशीच वेळ आली आहे की जेव्हा सर्व कमावतील, तेव्हाच सर्वांचे पोट भरेल.एकाची मिळकत येवढी नसते की सर्वाच्या आवश्यकता व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकतील. या संदर्भात श्रमाचे, कष्टाचे महत्व सांगणारी एक छोटी गोष्ट मला आठवतेय, आपल्या आळशी मुलाची वडिलांना सतत काळजी वाटायची की हा कांही कमवत नाही कष्ट करत नाही, कांही श्रम करत नाही. तेव्हा त्यांनी एक शक्कल लढवली की किमान एक रुपया तरी तूला रोज दयावा लागेल. तेव्हाच तुला जेवायला मिळेल. तेव्हा त्या मुलांने काका, मामा मावशी यांच्याकडून एक रुपया आणून वडिलांना दयायचा. वडिल तो रुपया घ्यायचे नि अंगणातील विहिरीत टाकायला लावायचे.असे करत तो मुलगा नातलगाकडून रोज एक रुपया आणायचा, एक दिवस सर्वानीच रुपया देण्यास नकार दिला तेव्हा त्याने मजूरी करुन एक रुपया मिळवला. वडिलांनी नेहमीप्रमाणे तो विहिरीत टाकायला सांगितला. तेव्हा तो चिडून म्हणाला, ' "माझ्या कष्टाचा तो रुपया आहे. मी आज तो मुळीच फेकणार नाही.वाया घालवणार नाही. " वडील आनंदित होऊन म्हणाले, " आज स्वतःच्या कष्टाची कमाई म्हणून तू ती टाकून देत नाहीस. हीच आत्मीयता तुला वाडवडिलांच्या पैशाबद्दल वाटली तर तुझे जीवन सफल होईल. मी पण घाम गाळून तुझ्यासाठी पैसा जमवतो व तू कांही न करता नुसता उडवून टाकत आहेस. त्याचा चाbय उपयोग करुन
स्वतःच्या पायावर उभा रहा. " मुलाला काय समजायचे ते समजले. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कष्टाला, श्रमाला खरेच किती महत्व आहे.केवळ स्वावलंबनासाठी महत्व नाही तर आपले स्वस्थ्य आणि आरोग्य योग्य राखण्यासाठी सुध्दा श्रमाचे महत्व आहे. पण आजकाल 'दे रे हरि पलंगावरी ' ही ऐतखाऊ प्रवृती स्वतःसाठी, घरासाठी, परिसर समाज व पर्यायाने देशासाठी घातक अशीच आहे. तेव्हा आपण रमावे कष्टात कारण तेथेच देव, तेथेच शांती आणि तेथेच समाधान आहे. म्हणून कष्टाचे महत्त्व ज्यानी ओळखले त्यांनी म्हंटले आहेच की, " कार्यमग्न हे जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. "

           हणमंत पडवळ
           उस्मानाबाद.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
03) आराम हराम है

मुलांनो खुप काम किंवा अभ्यास केल्यानंतर थकवा येतो आणि थकवा घालविण्यासाठी आपण आपल्या मनाला कोणत्या तरी विरंगुळ्यात टाकतो, लगेच मन प्रसन्न होते. जे काहीच काम करीत नाहीत त्यांना थकवा कसा येईल ? थकवा आलाच नाही तर विरंगुळ्याचा प्रश्नच नसतो. काम न करणाऱ्या माणसाला आळशी म्हटले जाते. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे गौतम बुध्दांनी म्हटले आहे. त्यास्तव नेहमी कामात व्यस्त रहावे व त्यास परममित्र करावे. प्रसिध्द विचारवंत रस्किन म्हणतो की, परिश्रमातून, कष्टातून आनंद निर्माण होत असतो, क्रोधातून किंवा आळसातून नव्हे. सतत कामात राहिल्याने मनुष्या चे जीवन सुखी बनते. कधीकधी आपणास शाळेला जाण्याचा, अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. म्हणजे थोडक्यात आपण त्या बाबतीत आळस करतो आणि तसा आळस केला की त्या दिवशीचा सर्व भार दुसऱ्या दिवसावर येऊन पडतो. मग आपले काम दुप्पटीने वाढते. म्हणूनच संत कबीर म्हणतात की," कल करे सो आज कर और आज करे सो अब " त्यांचे काव्य ध्यानीमनी ठेवल्यास आपल्या मनात कधीच आळस येणार नाही. आळस घालविण्यासाठी आपल्याकडे विरंगुळ्याची भरपूर साधने उपलब्ध आहेत. त्याचा यथायोग्य वापर करता येणे महत्वाचे आहे. गोष्टीचे पुस्तक वाचणे, शब्दकोडी सोडविणे, चित्रे रंगविणे, मित्रांसोबत खेळणे, व गप्पा मारणे, इत्यादी क्रियाद्वारे आपण आपला आळस घालवू शकतो. मात्र मुख्य काम बाजूला ठेवून विरंगुळ्याचेच काम करीत बसलो तर ते डोईजड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केला की, तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा असे कोकिवल यांनी म्हटले आहे.त्यामुळे ' दे रे हरी पलंगावरी ' अशी अवस्था आपली कधीच होणार नाही, याची काळजी घ्यावी. सतत कामात व्यस्त राहिल्यामुळे आपणाला नवनवीन कामे, कल्पना सुचतात. नविन गोष्टी कळत राहतात आणि प्रगती होत राहते. आळस केला तर मात्र जेथे आहोत त्यापेक्षाही अधोगतीला जातो. वाहत्या नदीचे पाणी स्वच्छ, निर्मळ व छान वाटते, तर साचलेले किंवा थांबलेले पाणी अस्वच्छ आणि घाण वाटते तसेच त्या पाण्याची दुर्गंधी देखील येते. नित्य कामात राहणे म्हणजे नदीच्या वाहत्या पाण्यासारखे आहे, तर आळस म्हणजे साचलेले पाणी होय. त्यामुळेच आपण मुलांनी पंडीत जवाहरलाल नेहरू म्हणजेच आपल्या मुलांचे चाचा नेहरू यांचे ' आराम हराम है ' हे वाक्य नेहमी लक्षात ठेवावे
- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769
( माझ्या पाऊलवाट या पुस्तकातून साभार पोस्ट )
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
04) *श्रमाचे महात्म्य*
         आजचे दिवस आहेत, *वैश्विक महामारीचे ,लाँकडाऊन* चे .यावेळी प्रत्येक व्यक्ती घरी जमेल ते काम करून घरीच राहून शाषनाला साथ देत आहे.ही आजची गरज लक्षात घेता घरातच राहून कष्ट करून श्रम करून दिवस  काढणे आवश्यक आहे.
      श्रम म्हणजे काय? जेव्हा एखादा  व्यक्ती आपले ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यासाठी शारीरिक किंवा बौद्धिक कष्ट करतो,मेहनत करतो  त्याला एका अर्थाने काम वा कष्ट  करणे  असे म्हटले जाते, श्रम करण्यामागे ध्येय मिळविण्याचा विचार असतो.
     कोणतीही व्यक्ती जे श्रम करते त्यात वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की शारीरिक श्रम ,बौद्धिक श्रम .शारीरिक  करणारा माणूस बांधकाम करणे म्हणजे विटा उचलणे सिमेंट लावणे किंवा माती मिळवणे मिसळणे , स्वच्छता करणे,शरीर  अवयव यांचा उपयोग करून काम  करतो .त्याला शारीरिक श्रम असे म्हटले जाते.
     आता दुसरा प्रकार आहे बौद्धिक श्रम एखादी  व्यक्ती शिकविण्याचे,मार्गदर्शनाचे किंवा विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापनाचे 
 कामे करतात.वैचारिक  बाजू मांडणे.याप्रसंगी  त्याला बौद्धिक श्रम असे म्हटले जाते. हे दोघेही आपल्या परीने बुद्धीला कष्ट देत असतात, आणि कार्य करीत असतात . कोणतीही गोष्ट असली तरी ,विचार करणे त्याला  भाग असते.विचार करण्याला सुद्धा आपण म्हणू शकतो बौद्धिकश्रम. कारण त्यामध्ये माणूस आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून कार्य करीत असते.
         काही व्यक्ती रोजगार हमीचे काम सुद्धा करतात .रोजगार हमीच्या कामावर जाऊन पोटापाण्याचा प्रश्न मिटवीत असतात .जेव्हा हे रोजंदारीचे काम करीत असतात तेव्हा त्यांना श्रम करावा लागतो. श्रमाच्या मोबदल्यात  त्यांना आर्थिक मदत होत असते. 
          प्रत्येकाच्या  जीवनामध्ये श्रमाला खूप महत्त्व असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी   श्रमाला खूप महत्त्व आहे.
*मानव पशुयोनीतून आला !
नराचा नारायण होणे त्याला !
यासाठी कष्टोनी सावरिला क्रमाक्रमाने* !*
         श्रमही मूलभूत गोष्ट आहे. श्रम केल्याशिवाय जीवनात यश आणि यशाची कल्पना करू शकत. मानवाने  जर शारीरिक  श्रम केले तर, त्याला शरीर सौष्ठव लाभू शकते.
           *समर्थ रामदास स्वामी* यांनी , कष्टाची  महती सांगताना असे म्हटले आहे की , “ कष्टविना फळ नाही ”आज घाम काढणाऱ्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. परंतु कष्ट केल्यावरच आपल्याला फळ मिळू शकतो. आपल्या जीवनात बौद्धिक श्रमा बरोबर थोडे फार शारीरिक श्रम करणे फार गरजेचे असते. आपण सगळ्यांनी सुरुवातीच्या काळापासून श्रमाची सवय लावून घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने श्रमाबद्दल ठाम आणि सुसंगत असले पाहिजे. 
    आजचा दिवस एक मे "महाराष्ट्र दिन", "कामगार दिवस "म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्याला जमेल ते काम करून श्रम आणि काम करणार्‍या लोकांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे .आज आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे.

लेखिका 
सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया 
9420516306
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
05) *कष्टाचे फळ*

          कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हे जगजाहीर सत्य आहे. जेवढे लोक मोठे झाले ते पैशांनी असो किंवा शिक्षनांनी असो त्यांनी आपल्या जीवनात खूब कष्ट केले आहेत. हा एक इतिहास आहे.
 तुम्हालाया जगात पाहिजे ते मिळते पण ते मिळवण्या साठी तुम्हाला कष्ट करावे लागतात, तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला परमेश्वर सुद्धा मिळेल म्हणूनच तर सांगतात कष्टाचे फळ नेहमी गोड असते व प्रयत्नान्ती परमेश्वर. प्रयत्नांती परमेश्वर ! म्हणजेच प्रयत्न हाच परमेश्वर असतो, असा ह्या म्हणीचा अर्थ आहे. कारण प्रयत्नाने कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते म्हणून वरील विधान सत्य आहे. याची सत्यता पटवणारी अनेक उधारने आहेत. फ्रेंच सेनापती नेपोलियन बोनापार्ट हा एक साधा शिपाई होता त्याने आपल्या प्रयत्नाच्या बळावर अजिंक्यपद प्राप्त केले. ह्याच्या मते तर जगात अशक्य असे काही नाही, मात्र ते शक्य करून घेण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत.
 असाध्य साध्य, करिता सायास | कारण अभ्यास तुका म्हणे || 
मात्र इच्छीत हेतू साध्य करून घेण्यासाठी खूप कष्ट केले पाहिजेत असे संत शिरोमणी तुकाराम महाराज देखील सांगतात "देरे हरी पलंगावरी" अशी इच्छा करीत बसणार्याला कधीच काही साध्य होणार नाही. म्हणून मनुष्याने सतत कष्ट करून इच्छीत फळ प्राप्त करून घेतले पाहिजे. एक आटपाट नगर होतं. त्या नगराचे नाव स्वप्ननगरी. या स्वप्नगरीवर राज्य करत होता. राजा स्वप्निल आणि त्या राजाची लाडकी राजकन्या स्वप्नाली. या नगरात अनेक स्वप्न वास्तव्याला होती. काही शूर, काही शांत, काही हसरी, काही रडवी, काही चांगली, काही वाईट, काही स्वप्न झोपेत हळूच खुदकन हसवणारी, काही दचकून जागं करणारी, चॉकलेटपासून खेळण्यांपर्यंत सगळे हट्ट पुरवायची, जिथे जायची इच्छा आहे तिथे फिरायला न्यायची, जे हवंय ते मिळाल्यावर चेहऱ्यावर एक समाधानाचा आनंद द्यायची. राजकन्या या सगळ्या स्वप्नसुखापासून वंचित होती. राजकान्येला स्वप्नच पडायची नाहीत. कारण मुळात तिला शांत झोपच यायची नाही. राजमहालात तिच्या दिमतीला सतत तिच्यासोबत नोकर-चाकर असंत. सगळ्याच गोष्टी हातात मिळत गेल्यामुळे तिचा स्वभाव आळशी बनला, तिने कधीही कोणतंच काम केलं नाही की, इकडची काडी तिकडे केली नाही.

थोडी मोठी झाल्यावर राजाने राजकन्येला ज्ञान प्राप्त करण्यासाठी राजगुरूंना आमंत्रण दिलं. राजगुरूंना राजकन्येच्या या आळशी स्वभावाबद्दल चांगलीच माहिती होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी ते आमंत्रण न स्वीकारता राजकन्येलाच गुरुकुलात येऊन राहावं लागेल अशी अट घातली. राजापुढे अट मान्य करण्यावाचून काहीच पर्याय नसल्यामुळे त्याला राजकन्येला राजमहालापासून दूर पाठवणं भाग पडलं. गुरुकुलाची दिनचर्या ठरलेली होती त्यामुळे तिथे स्वतःला बदलणं राजकन्येला खूप कठीण गेलं.
गुरुकुलमध्ये तिला सगळी लवकर उठावं लागे. झाडलोट, सडा सारवण, प्राण्याची निगा राखणं, झाडांना पाणी देणं, स्वयंपाकात मदत करणं अशी अनेक कामं आटपेपर्यंत रात्र व्हायची आणि राजकन्या दमून जायची. दिवसभर शीण आल्याने रात्री एका छोट्याशा चटईवरही तिला शांत झोप लागायची. राजकन्या झोपल्यावर स्वप्न हळूवार तिच्या अंतरमनात शिरायची, तिला खूप हसवायची, स्वप्नसुखाचा आनंद द्यायची. झोप पूर्ण झाल्याने राजकन्येची गुरुकुलात दररोज सुंदर आणि उत्साही सकाळ व्हायची.
हळुहळू राजकन्येला कष्टाचं महत्त्व पटलं. गुरुकुल संपवून राजमहालात आल्यावर राजकन्या सगळी कामं स्वतःची स्वतः करायची आणि सुंदर स्वप्नांची वाट पाहत शांत झोपी जायची. राजाने राजकन्येच्या आळशी स्वभावावर उपाय शोधून काढल्यामुळे राजगुरूंचे आभार मानले आणि काही वर्षाने लाडक्या राजकन्येचा एका शूर राजकुमाराशी लग्न लावून दिलं. म्हणूनच मित्रहो शक्यतो स्वतःची कामं स्वतः करा, शांत झोपा, सुंदर स्वप्न पाहा. कारण आपली स्वप्नं आपल्या आयुष्याला योग्य दिशा देतात.
एक म्हातारा शेतकरी होता. त्याला पाच तरूण मुलं होती. पण ती आळशी होती. कष्ट करणे त्यांना अजिबात माहिती नव्हते. फक्त वडिलांच्या पैशांवर मजा मारणे एवढेच त्यांचे काम.

त्यांचे वडील मात्र फार कष्ट करत. मुलांच्या आळशीपणामुळे त्यांच्या मनात विचार यायचा, की आपण गेल्यानंतर यांचे काय होणार. त्यांचा संसार कसा उभा रहाणार ?

शेवटी त्यांना एक कल्पना सुचते. ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना बोलावतात व सांगतात की आपल्या पूर्वजांनी या शेतात सोन्यांच्या नाण्यांचा हंडा पुरला आहे. मी उद्या गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व ते धन काढून पाचही जणांत वाटून घ्या. दुसर्या दिवशी तो शेतकरी गावी गेल्यानंतर या पाच जणांनी सोन्याच्या हंड्यासाठी सर्व शेत खणून काढले.
पण त्यांना काही तो हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे खणले आहे तर येथे धांन्य पेरावे. म्हणून त्यांनी तेथे धांन्य पेरले. त्या हंगामात चांगला पाऊस पडला. त्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. ते त्यांनी बाजारात विकले. त्यांना भरपूर धन मिळाले. परगावाहून जेव्हा त्यांचे वडील आले, तेव्हा या पाच मुलांनी ते गेल्यानंतर काय झाले ते सांगितले.
तेव्हा ते म्हणाले, 'मी तुम्हाला ज्या धनाची गोष्ट करत होतो ते हेच धन. जर तुम्ही अशीच मेहनत दररोज केलीत, तर तुम्हाल दरवर्षी असे धन मिळेल.

उपदेश- कष्टाचे फळ गोड असते.
---------------------------------
*महेंद्र सोनेवाने, गोन्दिया*
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
06) कष्टाची परिकल्पना
 प्रत्येकालाच घ्यावे लागतात जगण्यासाठी कष्ट. जो तो झगडतोय मिळवण्यासाठी भाकर. कष्टाशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. कोणी शारीरिक कष्ट खूप घेतो तर कोणी बौद्धिक कष्ट करून उपजीविका करतो. दोन व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही. जो कष्ट करतो तो नेहमी पुढे जातो. कष्ट घेत असताना फळाची अपेक्षा करू नका. काळजी पण करू नका. आपोआपच मिळेल फळ. प्रत्येकालाच वाटते आपण सगळ्यात जास्त कष्ट करतो. कधीकधी अहंकारात पण रूपांतर होते. मी एवढं कमवतो.  तू किती कमवतो? कधी कधी  कौटुंबिक वादही होतात. ऐकतो आपण बऱ्याचदा मी हे सारे कष्टाने उभे केले आहे. ते तू नीट जप, असे आईवडील नेहमी मुलाला बजावत असतात. पण खरं सांगू कष्टाने एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते. हो मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करत आहे याचे समाधान. भलेही मग ते एखादे घरातील काम का असेना. कष्ट म्हणजे नुसते पैसा कमवणे नाही. एखादी गोष्ट पूर्णत्वाला नेणे म्हणजे घेतलेले कष्ट होय. एखादी कामवाली तिचं सारं काम आटोपते म्हणजेच कष्ट घेते. शेतकरी शेतात राबतो हे झाले त्याचे कष्ट. शालेय विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळवण्यासाठी केलेले काम म्हणजे  त्यांचा अभ्यास. हे झाले त्यांचे कष्ट.आईने घरातील लोकांसाठी केलेला स्वयंपाक सुद्धा कष्टच आहेत. कामचुकारपणा माहितीच नसतो श्रम करणाऱ्या व्यक्तीला. तिला फक्त ध्यास असतो आपले काम पूर्ण करण्याचा.
 आता हा लेख लिहिताना मी सुध्दा कष्टच घेत आहे.

प्रिती दबडे,पुणे
9326822998
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
07) श्रम  / कष्ट.                                  जीवन म्हटल कि कष्ट पाहिजे . कष्टा शिवाय प्रत्येकाचे जीवन व्यर्थ होय .                              साधे  माणसाला निरोगी जीवन जगायचे असेल तर व्यायाम अवश्यक आहे . व्यायाम जर नसेल .तर शरीर सुडोल होणार नाही. शरीरा कडून पूर्ण क. क्षमतेने काम घडणार नाही म्हणून श्रम महत्त्वाचे आहेत .               धरणीमाता ही सर्व लेकरांची माय असते. ती सर्वाचे पालन पोषण करते. पण ती च्या मध्ये काबाडकष्ट करावे लागतात . विना कष्ट कोणत्याही घटकांना फल मिळत नाही .                   अगदी  विद्यार्थीचा जरी आपण विचार केला तरी आपल्या असे लक्षात येते की विना अभ्यास , विना मेहनत एखादा विद्यार्थी चमकलेला आपण पाहीला नाही .   एखादा मल्ल पहा विना मेहनत तो शरीर कमाऊ शकत नाही आणि मैदान ही गाजवू शकत नाही .                                          कष्टाविन फल मिळत नाही एखाद्या भक्ताला सुद्धा खडतर तपश्चर्या केल्याशिवाय देव भेटत नाही तपश्चर्या म्हणजेच श्रम किंवा कष्ट होय.                             याचे सुंदर उदा महणजे ध्रुव बालाचे होय .                           पौराणिक उदा असे की उत्थानपाद नावाचा राजा होता त्याला दोन पत्न्या होत्या सुनिती आणि सुरूची , सुनिती ला एक मुलगा होता आणि सुरूची ला पण एक मुलगा होता ध्रुव आणि उत्तम अशी त्यांची नावे होती .          एक दिवस सुनिती जी राजाची नावडती राणी होती तिचा मुलगा ध्रुव हा राज्याच्या मांडीवर बसलेला होता. तो प्रसंग सुरूची पाहते आणि लगेच ध्रुवाला बाजूला खेचते आणि सांगते येथे बसण्याचा तुला आधिकार नाही. ध्रुव तसाच उठला आणि आपल्या आईला विचारतो आणि घडलेला सर्व प्रकार सांगतो आई त्याला बसण्यासाठी देवाला जागा मागण्याचा मार्ग सांगते . ध्रुव तसाच निघून जंगलात जातो खरतर तप करतो कितीही वाईट प्रसंग येतात तरीही तो आपले कष्ट सोडत नाही . एक दिवस त्याला देव भेटतात आणि त्याच्या श्रमाचे , कष्टाचे , तपश्चर्येचे चिज झाले आणि ध्रुव अशा जागेवर बसला त्याला कोणीही सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत उठू शकत नाही हे केवळ श्रमाचे उत्तम उदाहरण आहे                      भागवत लक्ष्मण गर्कळ ( बीड)
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
08) मानवी जीवन कष्टमय

आईच्या गर्भातून मूल जन्माला येते.एक निरागस हास्य घेऊन या जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होते.जन्मानंतर आनंदात स्वतःच्या विश्वात हरवून जाते.हळूहळू जसजसे मोठे होऊ लागते.तसेतसे त्याला प्राप्त परिस्थितीचा अनुभव येत जातो. स्वतःच्या कुटुंबातून,परिसरातून ते अनेक गोष्टी शिकत जाते.स्वतःच्या कौटुंबिक परिस्थितीनुसार आलेल्या समस्यांना तोंड देत राहते.ताठ मानेने उभे राहण्याचा प्रयत्न करत असते. अशा जडणघडणीत ते घडत असताना स्वतःच्या वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्या स्वीकारत राहते.प्राप्त परिस्थितीनुसार मुलांना शिक्षण व संस्कार दिले जाते.मोठेपणी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी,काम धंदा करण्यासाठी,नोकरी मिळवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी ते सतत धडपडत असते.आपण पाहतो आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतात सर्वात जास्त शेती हा व्यवसाय केल्या जातो.अर्थात लहानपणापासूनच मुलांना शेतीविषयी कामे करण्याची,कष्ट करण्याची सवय लागलेली असते.वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे विभाजन होत चालले आहे.पृथ्वीवर पाणी,जमीन यांचे क्षेत्रफळ आहे तेवढेच आहे.परंतु वाढती लोकसंख्या,शहरीकरण, व्यवसाय,उद्योग धंदे,धरण,रस्ते यामुळे जमिनीचे विभाजन होत चालले आहे. यातून शेतीचे क्षेत्रफळ कमी होत आहे. अनेकांना शेती नाही.अनेकांना स्वतःचा व्यवसाय नाही.त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नोकरी किंवा मजुरी करावी लागते.पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम करावे लागते.कष्ट केल्याशिवाय संसाराचा रथ गाडा चालत नाही.आज देशात सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे अनेकांना काम मिळत नाही.कामासाठी वणवण फिरावे लागते.शिक्षण घेणाऱ्या युवकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. तर एकीकडे शिक्षण नाही म्हणून काम मिळत नाही.अशी अवस्था आधुनिक युगात झाली आहे.आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक यंत्रसामुग्री मुळे मानवांना मिळणारी काम बंद झाली.याचे कारण म्हणजे यंत्रसामुग्री मुळे कमी वेळेत जास्त काम होते.कामासाठी पैसा ही कमी लागतो.कामाचा दर्जा सुधारला. यामध्ये गोरगरीब मजुरांच्या हाताला मिळणारी कामे नाहीसे होत चालले आहे.ग्रामीण भागात व शहरी भागात काम मिळाले नाही.तर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो.काम मिळाल्याशिवाय घाम घाळता येत नाही.घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाही.व दाम मिळाल्याशिवाय चूल भेटत नाही.ही  वास्तव परिस्थिती आज देशात आहे.खेड्यापाड्यात काम मिळत नाही.म्हणून दरवर्षी लोक कामाच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करत आहे.शहर हे आर्थिक गतिमानतेचे चक्र फिरवणारे ठिकाण. या ठिकाणी निश्चितच काम मिळते.या आशेवर लोक शहरात येऊन राहतात. मिळेल ते काम दिवसभर करायचे. सायंकाळी दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला घ्यायचा.मिळालेल्या रोजगारातून संध्याकाळच्या पोटा साठी लागणारे अन्नधान्य घ्यायचे. व पोटाची खळगी भरायची.ही कामगाराची वास्तविक परिस्थिती आहे.जी आपण नाकारू शकत नाही.परंतु बदल मात्र निश्चित करु शकतो.सरकारने प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल.असे धोरण ठरवावे.उद्योग,व्यवसाय उभारुन प्रत्येकालाच काम मिळावे असे धोरण ठरवले पाहिजे. १ मे हा कामगार दिन आहे.महाराष्ट्रात आज कामगारांच्या समस्या अनेक आहेत.वेळोवेळी कामगार आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात.कामगारांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे.वेळेवर वेतन मिळाले पाहिजे.कामगारांना कामावर मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. कामगार हा एक महत्त्वाचा घटक आहे.ही जाणीव सर्वात आधी समजून घेतली पाहिजे.कामगार टिकला तर काम पूर्ण होईल.मनुष्याला जन्माबरोबरच परिस्थितीशी झगडावे लागते.आपला जन्म कुठे व्हावा हे विध्यात्याने आपल्या हातात ठेवले नाही.कोण नोकर होणार आणि कोण मालक हे आपल्या हातात नाही. परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द मात्र प्रत्येक आहे.कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही.प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात उत्तम कष्ट करत असतो.कष्टाची फळे गोड असतात. जीवनात कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही.या जगात सहज काही मिळत नाही.अपार कष्ट व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते.माणूस जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत कष्ट करत असतो.मुळात मनुष्य जीवन फार कष्टमय आहे.इतर प्राणी,पक्षी यांच्या पेक्षा माणूस खूप कष्टाळू आहे.कारण माणसाच्या आशा-आकांक्षा खूप आहे. तो बुद्धिमान आहे.त्यामुळे त्याला या जगाच्या स्पर्धेत यशाचे अनेक उत्तुंग शिखरे चढावी वाटते.यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करत असतो.स्वतः झिजत राहतो.जीवन जगणे एवढेच माणसाचे आयुष्य नाही.त्या पलीकडे काहीतरी नवीन येणाऱ्या पिढीसाठी करून ठेवण्याचे वेड त्याच्या अंगी असते.अपार कष्ट,जिद्द यांच्या जोरावर प्रत्येक मनुष्य स्वतःचे जीवन फुलवत असतो. 

राजेंद्र प्रल्हाद शेळके, सहशिक्षक
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलडाणा
9823425852
rajendrashelke2018@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
09) श्रम

        ज्यावेळी आपल्याला दिवसभराच्या कामानंतर रात्रीची शांत झोप लागते, तेव्हा लक्षात येते की आपण दिवसभर खूप श्रम केलेले आहे. त्यावेळी थोडीशी देखील विश्रांती आपल्या शरीराला पुरते. श्रम प्रत्येकजण करत असतो. पूर्वी ऋषीमुनी आश्रमातच अध्ययन शाळा चालवत. विद्यार्थी, शिष्य त्यांच्या घरीच राहून सर्व कामे उदाहरणार्थ- सरपण गोळा करणे, कपडे धुणे, गुरुमाऊलीला स्वयंपाकात मदत करणे,पुजेची कामे करणे ते करत असत. त्यामुळे फार पूर्वीपासुनच श्रमाचे महत्व लोकांना पटलेले आहे.
     आजही सीमेवरचा जवान ही श्रम करतो आणि शेतात कष्ट करणारा शेतकरी ही खूप कष्ट करत असतो.  आपण जवानांमुळे सुरक्षित राहू शकतो आणि शेतकऱ्यांमुळे आपल्याला सर्व प्रकारचे धान्य, भाज्या, फळे फुले प्राप्त होत असतात. परंतु साक्षर वर्गाला मात्र श्रम करण्यासाठी अंग मेहनत करावी लागत नाही. त्यांचे श्रम डोक्याचे असते, बुद्धीचे असते .शारीरिक श्रमाला जास्त प्रतिष्ठा नसते पण बुद्धीच्या कामाला मात्र प्रतिष्ठा आणि पगारही भरपूर असतो. ब्रिटिशांनी जेव्हा भारतात राज्य केले तेव्हा त्यांनी श्रमाचे महत्त्व भारतीयांनाही पटवून दिले. महात्मा गांधी स्वावलंबनाचा मार्ग पत्करत असत. ते स्वतःचे कपडे चरख्यावर स्वतः विणत असत. त्याप्रमाणे विनोबा भावे ,सेनापती बापट, सानेगुरुजी  यांनी शिक्षणासोबत स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले आहे ‌.श्रम करण्यासाठी कमीपणा वाटण्याची काही गरज नाही असे सर्व समाजसुधारकांनी पटवून दिले आहे. श्रम म्हणजे फक्त कपडे, भांडी धुणे नव्हे तर चालणे, योगासने करणे ,व्यायाम करणे यातून देखील श्रम होत असते. शरीर सुदृढ राहण्यासाठी श्रमाची फार गरज असते .त्यामुळेच बरेच पांढरपेशी लोक किंवा कार्यालयीन काम करणारे लोक आज बागकाम करताना दिसत आहेत. शिवाय जिममध्ये देखील गर्दी दिसत असते.श्रम केल्यामुळे आरोग्य सुधारतेच. परंतु तंदुरुस्तही राहते आणि आपल्या शरीराचा आकार बेडौल होत नाही. पूर्वी लोकं विशेषत: स्त्रियां घरात रांधणे, दळणकांडण, सडा-सारवण, पाणी आणणे, विहिरीतून पाणी काढणे किंवा गाईगुरांची जोपासना करणे या शारिरीक कामात व्यस्त असत. या प्रकारामुळे स्त्रियांना आपोआप व्यायाम होत असे. हल्ली मात्र सर्व प्रकारची उपकरणे उपलब्ध असल्यामुळे स्त्रियांना फारसे शारीरिक कष्ट नसते.
         हल्ली स्त्रियां नि पुरूषांनाच नव्हे तर लहान मुलांनाही  बऱ्याच रोगांना बळी पडावे लागत आहे. सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह ,लठ्ठपणा याही रोगांना बळी पडावे लागते.त्या बरोबर आहारावर देखील नियंत्रण असेल तर आरोग्य किंवा रोगावर नियंत्रण होत असते.परंतू फास्ट फुडच्या जमान्यात अन्नातील आवश्यक घटक मिळण्याऐवजी ही पिढी पिझ्झा, बर्गर, चायनीज असे पदार्थ खाते.तसेच शारिरीक  श्रमही करत नाही आणि लहान वयातच लठ्ठ होतात. त्यामुळेच फार पूर्वीपासून श्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे.श्रमाने शारिरीक,मानसिक फायदेच होतात.

सौ.भारती सावंत, मुंबई
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
10) श्रम........                                       जवळपास सर्वांनाच एक कथा माहित असते.एक मुलगा असतो खूप आळशी,मग त्याचे वडील त्याला कष्टाचा एक रुपया कमावून आणावयास सांगतात.पहिल्या दिवशी त्याची आई त्याला एक रुपया देते मग तो त्याची कमाई असल्याची बतावणी करतो.वडील तो रुपया चुलीत टाकतात.परत दुसऱ्या दिवशी सुद्धा हाच प्रकार.असे तीन ते चार दिवस चालते मग पाचव्या दिवशी तो मुलगा खरोखर एके ठिकाणी लाकडं फोडून एक रुपया कमावतो.आणि आनंदाने तो रुपया वडिलांना देतो वडील तोही रुपया चुलीत टाकून देतात आता मात्र जिवाच्या आकांताने अगदी हात भाजत असतांना सुद्धा तो मुलगा तो रुपया चुलीतून बाहेर काढतो.तेव्हा त्याचे वडील ओळखतात की हा रुपया त्याचा कष्टाने कमावलेला आहे.ही गोष्ट इथे सांगायचे तात्पर्य असे की जोपर्यन्त व्यक्ती कष्ट करणार नाही तोपर्यंत त्याला आलेल्या पैशाची किंमत समजणार नाही आणि त्याची प्रगतीही होणार नाही.खरे पाहता श्रम,ते मग कोणाचेही असो आदरणीय असते त्याला समाजात प्रतिष्ठा असावी लागते तेव्हाच तो समाज प्रगत  होत असतो आणि देशसुद्धा.जेव्हा एखाद्या देशात श्रमाला प्रतिष्ठा असते तेव्हा तेथे विकासाची फळं कष्टकरी समाजापर्यंत पोहोचत असते.दुर्दवाने आपल्या इथं असे आहे असे म्हणवत नाही.कष्टाचे महत्त्व सांगताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात            मंदिरी बैसोनि नाक दाबावे|त्यापेक्षा मार्गिचे काटे उचलावे|  दुःखीतासी प्रेमे पाणी पाजावे| हे श्रेष्ठ तिर्थस्थानाहूनी!||१||              एक हात खोदावी जमीन|हे पूजनाहूनी पूजन|परिणाम शेकडो व्याख्यानांहून| अधिक त्याचा||2||       काही व्यक्ती असे असतात ज्यांना श्रमाचे महत्त्व लक्षात आले नसते असे मग उंटातून शेळ्या हाकत असतात.अमेरिकेमध्ये एकदा एके ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते काही मजूर एक दगड हलवत होते ठेकेदार मात्र फक्त पाहत होता,हातभार लावत नव्हता.तेवढ्यात एक घोडेस्वार तेथून जात होता तेव्हा त्याने म्हटले की तू का बरं मदत करत नाहीस आहे? तेव्हा त्याने उत्तर दिले की मी वरिष्ठ आहे तेव्हा मी का दगड हलवू ?तेव्हा तो घोडेस्वार स्वतः घोड्यावरून खाली उतरला व त्याने त्या मजुरांना मदत केली व तो दगड सरकवला.तो घोडेस्वार दुसरा तिसरा कोणी नसून जॉर्ज वाशीग्टन होते.अमेरिकेचे प्रथम राष्ट्राध्यक्ष.त्यांनी श्रमाचे महत्त्व ओळखले होते म्हणून तर राष्ट्राध्यक्ष होते आणि श्रमाचे महत्व न ओळखणारा ठेकेदार.म्हणजे ज्या व्यक्तीने श्रमाचे महत्व ओळखले तो नेहमीच उच्च स्थानी असतो आणि उचस्थानी  गेल्यावर सुध्दा तो श्रम करणे सोडत नसतो.नाही तर आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी काहीही न करता बसून राहिले असते.फक्त श्रम करूनच व्यक्ती जर उच्चस्थानी पोहोचत असते तर मग अतिशय श्रम करणारे हमाल उच्चस्थानी पोहोचले असते.त्यांचे श्रम निश्चितच अतिशय श्रेष्ठ आहे.दुर्दवाने आपल्याकडे त्यांना प्रतिष्ठा आहे असे म्हणवत नाही.शारीरिक श्रम हे नेहमीच उपेक्षित राहीले आहे.काहीजण निष्कारण श्रम वायासुद्धा घालवत असतात.जगतगुरु तुकाराम महाराज म्हणतात.शिजल्यावरी जाळ|वाया जायाचे ते मूळ||१|| ऐसा वारावा तो श्रम|अतिषयी नाही काम||२|| सांभाळावे वर्म| उचिताच्या काळे धर्म ||3|| तुका म्हणे कळे| ऐसें कारणाचे वेळे||४||                          पदार्थ शिजल्यानंतर जाळ चालू ठेवणे, ही गोष्ट केलेलं सर्व काही वाया घालवण्याला कारणीभूत होते.अशा प्रकारचे वाया जाणारे श्रम टाळावेत.केलेलं काम निश्फळ बनविणारा अतिरेक काही कामाचा नाही.हे यशस्वी जीवनाचं रहस्य सांभाळावे.योग्य वेळी योग्य गोष्ट करणं,हा खरा धर्म होय,खरं कर्तव्य होय.काम करण्याच्या वेळी हे नीट कळतं. अर्थात ,ज्यांना ते कळतं, त्याचंचं जीवन सफल होतं.                        ✍हेमंत साहेबराव पापळे ,कारंजा 9422762278, hemantpapale@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
11)          कष्टाविना फळ नाही 


        ' नसे राउळी वा नसे मंदिरी 

          जिथे राबती हात तिथे हरी ' 

         ह्या आपल्या लाडक्या ग. दि. मा . ह्यांच्या ओळी .  ते अगदी खरं हि आहे . आपण देव कष्टकऱ्याच्या हातात पहावा . शेतकऱ्यांत पाहावा. बाबा आमटे , बंग दांपत्य , मदर तेरेसा ह्यांच्यात पहावा . 

         आपण म्हणतो, ' जुने ते सोने ' . आपली वेदकालीन गुरुकुल पद्धती पहा .तेथे गुरु, शिष्यांकडून खूप काबाडकष्ट करून घेत . गरीब - श्रीमंत असा भेदभाव नसायचा .कष्ट केल्या नंतरच शिष्याला विद्येचा मार्ग मोकळा असे . पण आज परिस्थिती बदलली आहे .आज थोडे जरी कष्ट विद्यार्थ्याला करायला लावले तर पालकांच्या ते पचनी पडेल का? 

       मानव सभ्यतेत श्रमाचे महत्व खूप आहे. श्रम केल्यामुळे जे फळ मिळते, त्यामुळे आंतरिक आनंद मिळतो. आत्मविश्वास वाढतो.

          आपल्या शिक्षण आयोगानेही शिक्षण क्रमात श्रमाचे महत्व मुलांवर बिंबवले आहे . पं. नेहरू , स्वा . सावरकर , स्वामी विवेकानंद ह्या सर्वांनीच कठोर परिश्रमाला पर्याय नाही असे म्हटले आहे . 'आराम है हराम हैl' तर ब्रीदवाक्यच ! सर्व मोठ्या लोकांनी गाळलेल्या घामाला श्रमाचा सुगंध आहे.

          श्रम म्हणजे आपले ध्येय किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेले शारीरिक किंवा बौद्धिक काम.

         श्रम दोन प्रकारचे असतात. शारीरिक श्रम आणि दुसरे बौद्धिक श्रम. शारीरिक श्रमाला निकृष्ट मानले जाते.

खरेतर असे व्हायला नको. प्रत्येक  कामाला आपले आपले मोल असते.

           मध्ययुगीन काळात तंत्रज्ञान विकसित होऊ लागले .त्या विकासाचा परिणाम औद्योगिकीकरणावर झाला . माणसाच्या जीवनावरहि त्याचा खोल परिणाम झाला . माणसाची बरीच कष्टाची कामे यंत्र कारू लागला . आता माणसाला शारीरिक थकव्या ऐवजी मानसिक थकवा जाणवू लागला . लोक त्याला ' white collar job ' असे म्हणू लागले . बैठे काम वाढले . त्यामुळे आपण बऱ्याच रोगांना आमंत्रण दिले . राक्तदाब , मधुमेह , स्थूलता हे बऱ्याच जणांचे साथीदार झाले . 

            उद्यमेन हि सिद्धयंती कार्याणि न मनोरथै:

            न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशंति मुखे मृगा:।

         परिश्रमाने सगळी कामे पूर्ण होतात . नुसत्या मनोरथांनी नव्हे . जसे , सिंहाच्या तोंडात हरीण पडेल जेव्हा तो शिकार करेल , परिश्रम करेल .

             शारीरिक श्रमाला पर्याय नाही . कष्ट ही माणसाची प्रेरक शक्ती आहे . जी माणसाची क्षमता ओळखते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते .

             ' मूकं करोति वाचालं , पंगूम लंघयते गिरीम '  हेच खरं . जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ,ज्या गोष्टीला लोकं म्हणतात कि , तुला हे जमणार नाही . 

               मोठी स्वप्ने पाहणे हा मुळीच दोष नाही . आपली स्वप्ने नक्कीच प्रत्यक्षात उतरतील जर आपण हिमतीने त्यांचा पाठपुरावा केला तर . म्हणतात ना 'practice makes man perfect ' . कष्टाशिवाय , प्रयत्नांशिवाय यशाचे शिखर कसे गाठणार ? जाळं विणणारा कोळी दहा वेळा खाली पडला तरी तो जाळे विणण्याचे सोडत नाही . 

               Man is an architect of his life . जीवनात दुसऱ्यांकडून प्रेरणा घेऊ शकता. पण जीवनात काय साध्य करायचे ते आपणच ठरविले पाहिजे . ते साध्य करण्यास आपलेच हात आपणास मदत करतात. कष्टाशिवाय फळ नाही .  माणूस स्वतः स्वतःच्या जीवनाला उत्तम आकार देऊ शकतो. 

                आजकाल तरुण वर्ग बरेचदा easy money च्या मागे लागतो . कष्ट करण्याची त्याची बिलकुल तयारी नसते . त्यामुळे त्यांचा मार्ग चुकतो. वाईट मार्ग अनुसरला जातो . त्यामुळे पूर्ण आयुष्यच नासून जाते . तुम्ही तुमची ध्येये कमी करा ,असे मुळीच कुणाचे म्हणणे नाही . तुमचे प्रयास वाढवा . जीवन अनमोल आहे .ते वाया घालवू नका . तुमचा रस्ता चुकला आहे-आयुष्य नाही .                  घाव सोसल्याशिवाय हिऱ्याला पैलू पडत नाही . हिरा चमकत नाही . तसंच कष्टाशिवाय आपले गुण चमकत नाहीत . गायक- वादक रोज रियाज करतात.  म्हणूनच ते मैफिलीत रंग भरू शकतात . तास न तास गाणे ऐकले तरी कान तृप्त होत नाहीत .  

                  एवढे खरे की ,जेवढे पेलतील तेवढेच कष्ट करावेत . नाही तर शरीर स्वास्थ्य जाते . दमायला खूप होते . निरुत्साह वाटतो . पण हे कशामुळे होते आहे त्याचा खोलात जाऊन शोध घ्यावा . काही वेळा थोडी विश्रांती हाही उपाय त्यावर असू शकतो . 

            आज एक मे. कामगार दिन. सगळ्या कामगारांच्या कामाला आज आपण सगळे मिळून दाद देऊ. त्यांचे हात कष्टाने राबत आहेत म्हणून आपले जीवन सुखी आहे.

            आळस हा माणसाचा महा शत्रू आहे. ' येरे हरी अन् दे रे खाटल्यावरी ' हे म्हणायला सोपे असले तरी आयुष्यात असे कधीच घडत नसते . कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नसते . त्यामुळे 'थांबला तो संपला ' 'कष्टाविना फळ नाही' हे लक्षात ठेवायला हवे . अध्यात्माच्या वाटेत ऐहिक सुख हा मोठा अडसर आहे . पण आज आपण त्याच्याच मागे लागलो आहोत .पण मग ऐहिक सुखाचा एक मंत्र मात्र लक्षात ठेवू या , ' पिके श्रमात श्रीमंती , श्रम माणसाच्या हाती ..... 

शुभदा दीक्षित 
पुणे
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
12) जिथे श्रमाने गळतो घाम....
____________________________
जिथे श्रमाने गळतो घाम
तिथे नांदतो माझा राम ...
      सतत उद्योगी राहावे . जो दिर्घोद्योगी अस तो तोच आपले आयुष्य निरोगी पणाने जगू शकतो .  त्याचा दिवस आनंदात जातो .   लहानपणा पासूनच काम करण्याची सवय असायला हवी . आई ला घरकामात मदत करावी ,  अभ्यास वेळचे वेळी करावा . कंटाळा आणि आळस हे आपले शत्रू आहेत . राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ही सांगितले आहे .  "आराम हराम  है "!    
 आपले पंतप्रधान  दिवसांचे  १८/२० तास काम करतात . शास्त्रज्ञ ही देशासाठी  अविश्रांत काम करत आहेत .     शेतकरी , शेतमजूर शेतात राबतात म्हणून आपल्याला पोटभर खायला मिळत आहे .  
  आज काल ची पिढी ही ऐषआरामी , चैन करणारी झाली आहे .दुर्दैवाने आज श्रमाला प्रतिष्ठा राहिली नाही . तरुण पिढी झटपट श्रीमंत होण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब करत आहेत .  विनाश्रम भरपूर पैसा मिळवून तो व्यसनामधे उडवत आहेत . सिनेमा , हाॅटेलिंग  , पार्ट्या , जुगार अशा वाममार्गाला लागत आहे. विलासी जीवन जगण्यातच धंन्यता मानत आहेत .     पुण्या मुंबई सारख्या शहरात उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतलेले  बड्या घरची मुले मुली    मद्यधुंद होऊन , सिगारेटचे कश घेत  हाॅटेल मधे  लेट नाइट पार्ट्या झोडताना दिसत आहेत . आई वडील बिचारे पोटाला चिमटा घेऊन पैशाची जमवाजमव करुन आपल्या मुला मुलींना पैसे पाठवत असतात . .
      त्या उलट गरीबांच्या घरच्या लहानग्यांना काम करणार्या शिवाय गत्यंतर नसते . आई आपल्या लहान लेकराला पाठीशी बांधून  मंजूरी करते  .
 दिवसभर काम केले तरच संध्याकाळी चूल पेटत असते .  
  आपण राहातो त्या एकाच समाजात अशा दोन भिन्न संस्कृती पहायला मिळतात . 
  सध्या श्रम करणार्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही . ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्यालाच समाजात मान मिळतो . मग तो पैसा नितीचा असो अथवा अनितिचा ! त्यालाच जग रामराम करते . पण राम तिथे नसतो . मोठमोठ्या मंदिरात त्याला आम्ही बंदिस्त करुन ठेवले आहे . खरचं का तो तिथे राहिला असेल ? 
 मला तर वाटते राम मोठमोठ्या महालात राहातं नाही , तो राहातो गरीबांच्या झोपडीत . त्याला ही श्रमाने कमावलेल्या पैशात सुख मानणारा गरीबच आवडतो .
 कोणीतरी सांगूनही गेले आहे .

      जिथे श्रमाने गळतो घाम 
      तिथे नांदतो माझा राम 

                 अरविंद कुलकर्णी पुणे
                9422613664
    arkulkarni.1955@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
13) ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

लेख....

श्रमाचे महत्व
“ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे " 
कोणतीही गोष्ट आपण स्वतः आधी केली पाहिजे आपल्या अनेक प्रयत्नात आपला देव असतो आपले यश असते.हेच भाव आपण आपल्या अंतर्मनात ठेवावा अंतरीचा देव तेथेच जाणावा.
' प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे' आपण मनापासून प्रयत्न केले असता सर्व साध्य आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला श्रम करणे गरजेचे आहे. प्रयत्नाने आपल्या श्रमाचे सार्थक होते. कोणतीही गोष्ट करण्यासाठी श्रम हे करावेच लागते. 'दे गा हरी पलंगावरी असे कधीच घडत नाही'.
आपण करीत असलेल्या श्रमात तल्लीनता असावी, त्यामध्ये एकरूप होता येईल अशी एकाग्रता असावी. श्रमाच्या पाठीमागे  असलेल्या प्रेममय विचार केला असता जिथे प्रेममय  श्रमान जीवन नटलेल  असतं तिथं आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण होत असतात.
आपलं जीवन हे जगण्यासाठी असतं. प्रेममय असतं. सुखमय असतं. श्रमाच्या माध्यमातून जीवनावर प्रेम करणं म्हणजेच जगण्याच्या गूढ अर्थाचा परिचय करून घेणे होय. आपण जेव्हा प्रेमान श्रम करतो तेव्हा आपल्या स्वतःशी आपण बांधील असतो.
 परंतु
' श्रमिक जीवन हे आरोग्यपूर्ण जीवन आहे'. ही कल्पना आज आपण हळूहळू विसरत चाललो आहे.' मानवाने शारीरिक श्रम हे करायलाच पाहिजे. श्रमातून सुख समृद्धी व समाधान लाभते. मानसिक श्रमातून क्रांती घडून येते. श्रमाने मानवाच्या जीवनात आनंदाची निर्मिती होते. श्रमाने मिळवलेल्या भाकरीची चव ही अमृतापेक्षा ही मधुर  असते. कष्टाच्या भाकरीची गोडी न्यारीच असते. म्हणून श्रमाचे महात्म्य अतिशय पूजनीय आहे. ही सारी सृष्टी श्रमाच्या चैतन्याने भारावलेली आहे. प्रेमाचा मूर्त स्वरूप म्हणजे श्रम होय. प्रेमानं श्रम करणे म्हणजे  जीव ओतून  काहीतरी नवनिर्मितीचे  काम करण होय. आणि हे नवनिर्मितीचे काम करायचे असेल तर आपल्याला श्रमाची सतार ही वाजवीच लागेल. सतारीच्या या  स्वरातून श्रमाच्या माध्यमातून सारा आसमंत फुलवावा लागेल. श्रमाच्या या माध्यमातूनच आपण आपल्या जीवनाचा गुढ असा परिचय करून घेतला असाच अर्थ सार्थ  होईल.
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
14) श्रम हिच पुजा आहे.
      श्रम म्हटल्या बरोबर ती माऊली आठवलीजिचे नाव बहिणाबाई चौधरी आहे. आणि त्यांच्या कवितेचे स्मरण झाले. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. खरंच आहे हाताला जिथपर्यंत चटके मिळत नाही तिथपर्यंत भाकरी मिळत नाही.श्रम केल्यानी माणसाचे शरीर स्वस्थ आणि निरोगी राहते. त्याचा दिवस अगदी आनंदात जातो. आणि रात्री सुखाने झोप लागते. श्रम व सदैव उघोगी राहणाऱ्या लोकांच्या घरी जनु लक्ष्मी पाणी भरते. याचाच अर्थ श्रम करणारे लोक कधीहि उपाशी राहात नाही.मित्रांनो श्रम करतांना लाज बाळगु नयेकारण या समाजात प्रत्येक काम महत्त्वाचे आहे.पण लोकांनी त्या कामाला दर्जा देऊन उच्च व निच असे ठरविले. पण ते चुकीचे आहे.कारण एक रस्ता तयार करणारा सिव्हिलइंजिनिअर कागदावर नकाशा काढतो पण तो नकाशा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मातीगोट्याचे काम करणाऱ्या मजुरांची च गरज असते.जर मजुर मिळाले नाही तर रस्त्याचे काम पूर्ण होत नाही.याचाच अर्थ सिव्हिल इंजिनिअर व मजुर हे दोन्ही घटक सारखेच महत्त्वाचे आहे.‌पण  शिक्षणाचा अभाव, राहणीमान,या मुळे काही लोकांना पुर्विच्या काळी कमी लेखत होते. पण बरयाच प्रमाणात समाजात वैचारिक क्रांती घडवून आणली आहे. आणि त्यामुळे समाजातील असमानतेची दरी कमी झालेली बघायला मिळते. शाळेत सुध्दा खुप मोठ्या प्रमाणात मुल्यशि‌क्षणात श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व शिकवले जाते.कीतीही मोठा राजा असला तरी त्याला नाव्ह्यासमोर  आपली मान खाली घालाविच लागते.आम्ही लहान असतांना कचरा वेचनारा आला तर आम्ही त्याला कचरेवाला म्हणायचो पण अलीकडे मुलं त्याला स्वछता कामगार म्हणतात. म्हणजे भरपुर विचारांमध्ये बदल घडवून आला आहे.दे गा हरी पंलगावरी म्हटल्या ने हरी काही आपल्याला पलंगावर आनून देणारनाही. ताटात अन्न वाढुन आपल्या समोर ठेवले तरी जिथपर्यंत आपण हाताने घास मुखात टाकनार नाही. तोपर्यंत आपले पोट भरणार नाही.म्हणजे श्रम करने आलेच.आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले.पण त्या संतांचा असल्यास केला तर असं लक्षात येईल की प्रत्येक संत हे कुठले ना कुठले तरी श्रम करून आपला प्रपंच चालवत असे.आणि त्या श्रमातच ईश्र्वराला बघत असे. सावता माळी हे विठ्ठलाचे भक्त होते. पण ते कधीच पंढरपूरला गेले नाही. तर ते आपल्या मळ्यातील प्रत्येक फुलात,फळात ,वृक्ष,वेलित त्यांनि विठ्ठलाला बघितले. विठ्ठलाची सेवा म्हनुन त्यांनी मळ्याची सेवा केली. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. हे त्यांचे भजन आजही वारकरी गातात.संत गोरा कुंभार हे सुद्धा विठ्ठलाचे भक्त होते .ते मातीचे मडके घडविताना  विठ्ठलाचे नामस्मरण करीत असे.सांगायचे तात्पर्य हे श्रम हिच पुजा आहे. आपण जो हि श्रम करतो त्याला जर ईश्र्वराची सेवा समजलो तर नक्कीच आपल्या कोर्टाचा ताण कमी झाल्यासारखा वाटेल.मित्रांनो जो व्यक्ती श्रम करून ईमानदारीने पैसा कमवितो त्याच्या घरी सुख आणि समृद्धी नांदते. कधीं कधीं त्याला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते पण त्यातून तो बाहेर पडतो. त्याच्या श्रमाची कींम्मत त्याच्या कुटुंबातले सदस्य,समाज करतो आणि एकंदरीत त्याला सन्मानाची वागणूक मिळते. पण श्रम न करता वाईट मार्गाने मिळविलेला पैसा कुटुंबातील लोकांना समाधान मिळु देत नाही. मुलांनाही माहीत असतं आपल्या वडिलांच्या जवळ खुप वाईट मार्गाने कमविलेला पैसा आहे. ते सुद्धा खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात.समाजात कोणहि चांगलं म्हणत नाही.आणि म्हनुनच कुठल्याच चांगल्या कामाची लाज बाळगुन नये . नेहमी श्रम करतच राहिले पाहिजे. आणि श्रमालाच पुजा समजावि. आज १मे कामगार दिवस. त्या तमाम श्रम करणार्या श्रमिकांना, कामगारांना  कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सौ मेघा विनोद हिंगमिरे. शिक्षिका भारत विघालय वेळा .त . हिंगणघाट जि. वर्धा.
7798159828
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
15) *जीवनात श्रम*
आज 1 मे जागतिक कामगार दिन. आज श्रम ह्या विषयावर  लिहणे म्हणजे जगभरातील सर्व  कामगारांना सलामी आणि
श्रमशक्तिचा आदर आहे.
  *महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* 
     जीवनात श्रमाचे आत्यंतिक महत्व आहे .ह्या संपूर्ण सृष्टीत सर्व जीव श्रमरत आहे. कोणालाही कष्टा शिवाय जीवन यापन करता येत नाही. अगदी किडे मुंगी पासून माणसा पर्यंत. एवढेच काय ही बहुरत्ना वसुंधरा सुद्धा सतत श्रमरत आहे. मानवाच्या तथाकथित विकासाच्या वेडा ने निसर्गाचे अपरीमीत नुकसान होत आहे , प्रकृती दिन प्रतिदिन  विनाशाच्या गर्तेत लोटली जात आहे. ही धरणी माय तरीही ऋतुचक्र अबाधित ठेवण्यासाठी झटत आहे. जमिन सुपीक राहवी ह्या करीता झटत आहे. मग माणसाला श्रम करणे कष्ट करणे भागच आहे.
        श्रम मेहनत हे फक्त शारीरिक नसते. तर मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक श्रम पण असतात मात्र इथे कष्ट   शब्द वापरला जात नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी श्रम करणे अत्यावश्यक आहे. बौद्धिक रित्या आपण कितीही सक्षम असलो तरी त्याला मेहनतीची जोड दिल्या विना यश हाती लागत नाही. इंग्रजी मधे म्हणतात ना *1%aspiration and 99%perspiration*. आयुष्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यात करीता कर्म,विचार आणि भावनांचे ध्रुवीकरण नितांत आवश्यक आहे. तुमच्या यशाचे शिल्पकार तुम्हीच आहात, _तुम्हीच आहात तो ओबडधोबड दगड,तुम्हीच आहात तो घणाघाती हातोडा आणि तुम्हीच आहात ती अणकुचीदार छेणी_. घणाचे घाव ही तुम्हाला घालायचे आहेत,आणि त्या घावांची वेदनाही तुम्हालाच सोसायची आहे. एकदा आकार आला की मग त्या छेणीने अतिशय धीराने सुरेख शिल्पाचे कोरीव काम करायचे  आहे. तुमचे श्रम जितके जास्त, तुमचा धीर जेवढा जास्त जीवनाची कलाकृती तेवढीच सुंदर. जेवढ्या धीरोदात्त पणे तुम्ही श्रम कराल, मेहनत कराल तेवढीच उंच तुमच्या यशाची गगनभरारी असेल. 
            जो कोणी कार्या प्रति पूर्णपणे  समर्पित  भावनेने यशा अपयशाची पर्वा न करता निष्काम पणे कर्म करत राहतो,तो च अर्जुना सारखे अचुक लक्षवेध करु शकतो. हे सर्वविदित आहे की जगातील अत्यंत यशस्वी लोकांच्या वाटेला ही सुरुवातीला  अपयश आले आहे परंतु त्या सर्वांनी अपयशाने खचून न जाता दुप्पट जोमाने आपले प्रयत्न चालू ठेवले, सरत शेवटी त्यानी इतिहास घडवला. यशस्वी आणि अयशस्वी व्यक्ती मधला फरक एवढाच असतो की यशस्वी व्यक्ति अपयशातुन  शिकून परत आपले श्रम चालू ठेवतो यशाचे शिखर सर केल्या शिवाय थांबत नाही. तर अयशस्वी व्यक्ती पहिल्याच अपयशाने गर्भगळीत होतो, मेहनत करणे सोडतो आणि एखाद्या सोप्पा मार्ग चोखाळतो. अपयशाचे कारण व्यक्तीची अक्षमता नसते,  पण श्रमा वरची त्याची निष्ठा कमी पडते. जीवनात सफलता मिळवण्यासाठी अथक परीश्रम करावे लागतात,पावलो गणिक संघर्ष करावा लागतो,अनेक कठीण कसोटीतून पार पडावे लागते. जगात इतिहास घडवायचा असेल,नाव कमवायचे असेल तर प्रबळ पुरुषार्थाला पर्याय नाही. हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की उथळ पाण्यात फक्त मासोळी मिळेल मोती नाही. मोती मिळवण्यासाठी  खोल समुद्रात उडी घ्यावी लागते.
       जितके महान राजनेता, शिक्षाविद्, उद्योगपति, वैज्ञानिक, चिकित्सक तथा समाजसुधारक झालेत त्यानी अपरीमीत परीश्रम केले, कैक वादळावर आरूढ होऊन
कठोर साधनेने जीवनाचा प्रवास केला आहे. ह्या सर्वांनी श्रमसाधना, श्रमशक्ति आणि आपल्या कामा प्रति अतूट श्रद्धेच्या त्रिविध तपाने दृढ इच्छाशक्तीने आपले गंतव्यस्थान गाठले आहे. छोटी मोठी टेकडी चढणे सोपे आहे. पण एवरेस्ट सर करायचा असेल तर फक्त इच्छा असून भागत नाही, जिवावर उदार होउन लढावे लागते. वेळी प्रसंगी मृत्यूला ही आव्हान द्यावे लागते. इतिहास आणि पुराण साक्षी आहे की मानवाच्या  दृढ संकल्प शक्ती आणि भगीरथ परिश्रमाने स्वर्गातील गंगा सुद्धा ह्या धरणी वर अवतरली. मनुष्याच्या संकल्प आणि परिश्रमाने देव आणि दानव सुद्धा पराजित झाले आहे. जिथे संकल्प शक्ती प्रबळ,तिथे मुश्केली दुर्बळ,हा जीवनाचा अलिखित नियम आहे. 
      जीवनाचे उद्दिष्ट आराम नाही संघर्ष आहे,जिंकणे नव्हे तर झुंजणे आहे. पुरुषार्थाचे संपुष्टात येणे अपयशाची पहिली पायरी आहे. आयुष्यात खाली पडण्याची भिती बाळगू नका, कोळी सारखे शंभर वेळा उठून परीश्रम करायची जिद्द ठेवा.  जीवन एक क्षीर सागर आहे,जेवढे जास्त मंथन तेवढे जास्त नवनीत. श्रम,कष्ट, मेहनत प्रगति चे स्त्रोत आहे. प्रत्येक क्षेत्रात मेहनत करायची तयारी असेल तर यश आहे. नाहीतर कंटाळवाणे जगणे आणि रोज बाह्य गोष्टीत आनंद शोधण्याची वृथा वंचना आणि जन्म वाया घालवणे.
   अजून वेळ गेली नाही ऊतिष्ठ, जागृत आणि जो पर्यंत तुमचे इप्सित गाठले जात नाही अविराम चालतच रहा.

डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
16) प्रामाणिक कष्टाला परिश्रमाला पर्याय नाही


  एके दिवशी सकाळी भाजीवालीकडून 15रुपयांची मेथीची जुडी घेतली माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून 20रुपये दिले तशी भाजीवाली म्हणाली  ताई तुमच्या हातची पहिली बोहनी आहे सुट्टे पैसे द्या
मी म्हणाले अहो माझ्याकडेही सुट्टे पैसे नाहीत मी म्हणाले नंतर द्या मग तशी भाजीवली म्हणाली ठीक आहे नंतर आल्यावर देईल आता येते मग या गोष्टीला आठ दिवस झाले असतील मीही पाच रुपये भाजीवालीकडे आहेत हे विसरून गेले आठ दिवसांनी पुन्हा भाजीवाली भाजी विकण्यासाठी पुन्हा दारात आली  मी तिच्याकडून पुन्हा भाजी घेतली यावेळी मला तीने थोडी जास्त भाजी दिली व म्हणाली ताई तुमचे पाच रुपये मी आठवडाभर वापरले त्याच्या बदल्यात ही जास्तीची भाजी आणि हे पाच रुपये राहिलेले परत अहो ताई कुणाचेच पैसे जास्तीचे माझ्याकडे नको कष्टाचंच खावं फुकटच नको आणि फुकटच ते कधी कुणाला पचलय बरोबर ना ताई? तुमच्या माझ्यासाठी पाच रुपये काही महत्वाचे असो वा नसो पण त्या पाच रुपयाच्या निमित्ताने आयुष्याचा महत्वाचा धडा मात्र या निमित्ताने शिकायला मिळाला.
आज संपत्ती, यश, कीर्ती ,आनंद अशा गोष्टी मिळवण्यासाठी अनेक जण परिश्रम करत आहेत कुणी शारीरीक कष्ट करत आहे तर कुणी बौद्धीक कष्ट करीत आहेत.शेतकरी पीक चांगले यावे म्हणून शेतात कष्ट करत आहे . विजेच्या भारनियमनाला ग्रामीण भागात सामोरे जावे लागत आहे
दिवसा वीज नसते म्हणून रात्री जागरण करून उसाला पाणी भरावे लागते शेतकरी व त्याचे कुटुंबातील सर्व कष्ट करतात 
व उदरनिर्वाह करतात.
कारखानदार, व्यवसायिक, दुकानं दार, नोकरदार प्रत्येकजण कष्ट करतात यश व पैसे मिळवतात.
विद्यार्थी परिक्षेत यश  मिळवण्यासाठी वर्षभरअभ्यासाचे  कष्ट घेतात .
परिश्रमशिवाय मिळालेले यश दीर्घकाळ टीकत नाही यश मिळवन्यासाठी कोणतेही शॉर्टकट्स वापरले तर यशाची किंमत राहत नाही .परीक्षेत यश मिळवण्यासाठी काही विद्यार्थी कॉपी म्हणजे नक्कल करतात 
काहीजण ही नक्कल करताना पकडले जातात तर काही पकडले जात नाही आणि त्यांना अधिक गुणही मिळतात या गुणांच्या आधारे ते उच्च शिक्षण घेतात नोकरी किंवा व्यवसाय सुरू करतात आता खरी त्यांची परिक्षा सुरू होते ज्या ज्ञानासाठी त्यांनी कष्ठ घेतले नाहीत ते ज्ञान त्यांच्याकडे नसतेच मग नोकरी किंवा व्यवसायासाठी ते ज्ञान वापरुच शकत नाही पर्यायाने
स्वतः चे व समाजाचेही नुकसान होते.
असे म्हणतात प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या व्यक्तीला रात्री शांत झोप लागते चोरी करणाऱ्या व्यक्तीला शांत झोप लागत नाही 
याचे कारण काय? शेतकरी रात्री शेतीला पाणी भरण्यासाठी जागतो
आणि चोरही रात्री जागून चोरी करतो दोघेही रात्री जगतात मग शेतकऱ्याचे कष्ट आणि चोराचे कष्ट यात काय फरक?तर शेतकरी इतर कोणाचे कष्ट फुकटात घेत नाही आणि चोर इतरांनी केलेले कष्ट फुकटात
मिळवतो हा फरक आहे.
म्हणून शेतकऱ्याचे कष्ट प्रामाणिक आहेत आणि चोर हा  प्रामाणिक कष्टाला चोरी हा शॉर्टकट शोधतो म्हणून त्याचे पारिश्रम उपयोगी नाहीत तसेच
नक्कल करणाऱ्या विद्यार्थ्यांचेही
शॉर्टकट परिश्रम उपयोगी नाहित.
अधिक यश, पैसे मिळवण्यासाठी काहीजण अन्न, औषधे,सौंदर्य प्रसाधने इतर जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ करतात जसे दुधात पाणी, युरिया मिसळणे, नकली औषधे, धान्यात खडे मिसळणे ,फळे अनैसर्गिक पद्धतीने पिकवणे या पद्धतीला प्रामाणिक परिश्रम कसे म्हणता येईल?अशा परिश्रमाने सर्वांचे नुकसान होते, समाजापुढे कोणताच आदर्श निर्माण होत नाही आणि म्हणूनच
प्रामाणिक कष्ट ,परिश्रमाला पर्याय नाही.
कष्ट शारीरिक असो व मानसिक
कष्टाने थकवा हा येतोच हा थकवा दूर करण्यासाठी काही छंद जोपासू शकतो जसे वाचन, लेखन, गायन, बागकाम, खेळ, भटकंती ,रंगकाम.चला तर मग हे प्रामाणिक श्रमाचे संस्कार आपल्या कुटुंबाला , समाजाला देऊन सर्वांचे आयुष्य सुंदर बनवूया.

 सविता वि साळुंके
9604231747
salunkesavita42@gmail. com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
17) "कष्ट आणि जीवन"
      जीवन हे जगण्यासाठी आहे ,जगायचे असेल तर खावे, प्यावे व राहावे ही लागतेच. त्यासाठी काम करणे हे आलेच .काम करणे अपरिहार्य ठरते काम करण्यासाठी कष्ट पडतात .यातायात करावी लागते .जगण्यासाठी जे काम करावे लागते ,ते पाहून जर आपणास वाईट वाटत असेल किंवा मरण दिसू लागले असेल तर जीवन जगणे शाप वाटू लागते. काम करायचा कंटाळा असेल तर जगणे आपल्याला दुःखी कारक नाही का वाटणार ?कामाचा कंटाळा आला वाटतो, त्याला जगण्याचाही कंटाळा वाढतो व तो जीवनात उदासी दुःखी व दिन राहतो. जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामातच समाधान झाले नाही, तर तो जगण्याचा तरी आनंद कसा घेऊ शकेल? जगण्याचा आनंद तरी कोणता? तर जगण्‍यासाठी जे कष्ट करावे लागतात,त्यातला आनंद हाच जगण्याचा आनंद आहे .मग कशाला घ्यायचे ?कशासाठी? असा विचार मनात आला की जीवनातील आनंद गेला. उलट करावे लागणारे कष्ट आणि आपले काम प्रसन्न मनाने केले ,तर आपण आपल्या कामात यशस्वी होऊन आपले जीवन सार्थकी लागते. जीवन अभिनिवेश वाढतो .जीवन रसपूर्ण वाटते .आपण आयुष्यात यशस्वी होतो. जीवनात सुख ,शांती ,स्वास्थ्य ,समृद्धी ,ऐश्वर्य, प्रसिद्धी निर्माण करण्यासाठी काही विचार, आचार ,गुण ,ज्ञान ,कौशल्य संपादन करावे लागते .याची जाणीव आपल्या ठिकाणी असली तर कष्ट करण्यास पर्याय नाही.  त्यासाठी प्रयत्नाने पात्रता कार्यक्षमता वाढवावी व टिकवावी लागते आणि यासाठी कष्टाची अत्यंत आवश्यकता आहे किंवा कष्ट शिवाय हे शक्यच नाही याचे भान आपल्याला असले पाहिजे.
      आपल्या जगण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात .आपल्या इच्छेमुळे ची गोष्ट हवीशी वाटते ती मिळवण्यासाठी आपण किती कष्ट घेऊन प्रयत्नशील असतो ?हवी ती गोष्ट, आवश्यक ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी कार्यक्षमता वाढवावी लागते .आपली कार्यशक्ती वाढवण्यासाठी आपण किती कष्ट घेतो किती प्रयत्न करतो. बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या काव्यपंक्तीतील शब्दात जीवनाचा जगण्याचा आणि कष्ट करण्याचा संदेश दिलेला आहे.
" असं जगणं मोलाच ,जग जग माझ्या जीवा!"
यशस्वी जीवन जगणे निर्वेध आणि सोपे नाही. जीवनात अनेक अडथळे असतात, समस्या निर्माण होतात त्यासाठी अनेक वेळा अनेक ठिकाणी ,अनेक प्रसंगी  संघर्ष करावा लागतो . संघर्षाला तोंड द्यावे लागते .जीवन यशस्वी जगण्यासाठी आणि जीवन उन्नत करण्यासाठी उदंड कष्ट उपसावे लागतात. म्हणून सतत विवेक जागृत ठेवून, कष्ट करून प्रयत्नशील राहावे लागते ,ही जीवनाची वास्तवता आहे. जीवनात शहाणपणा अंगी बाळगून केवळ प्रारब्ध किंवा नियतीवर विश्वास न ठेवता प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर जीवनावर प्रभुत्व मिळवता येते , आपले जीवन उन्नत करता येते व जीवनात समाधान प्राप्त होते म्हणून  
"कष्टाशिवाय फळ नाही,
 कष्टाला तोड नाही !
 कष्टाशिवाय समाधान नाही,
कष्टाशिवाय जीवन नाही!"
      
श्रीमती मेघा अनिल पाटील.
   उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
18) कष्टे विना फळ नाही...'
         
         डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         
  'कष्टे विना फळ नाही...'असं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे.खरोखरच मानवी जीवनातच नव्हे तर अखंड सजीव सृष्टीच्या यशाचं गमक हे कष्टात आहे. परिश्रमालाच दैवाची साथ लाभल्याची अनेक उदाहरणे आपण विविध कथांच्या माध्यमातून बघत असतो.इतकंच नाही तर परिश्रम करणाऱ्याला यश मिळतेच परंतु अनुभवांनी देखील माणूस समृद्ध होत असतो.
  तहान लागल्यानंतरच खऱ्या अर्थाने पाण्याचे महत्त्व, भूक लागल्यानंतर अन्नाचे महत्त्व आणि इतकेच कशाला श्रम केल्यावरच विश्रांतीचे महत्त्व कळते.'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी....' असे म्हणणाऱ्यांना सदैव दुसऱ्यावर अबलांबून राहावे लागते याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत .या जगात जी ज्या ज्या व्यक्ती यशाच्या शिखरावर गेलेल्या दिसतात त्यांचा जीवनपट जर उलगडून पहिला तर 'कष्ट आणि प्रयत्न' याचे महत्त्व पटल्या शिवाय राहत नाही.याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी राजे!!खरे  म्हणजे त्यांना कष्टाचा महा मेरुच म्हणावे लागेल.
   आजची पिढी आणि त्यांची जीवनशैली मेहनत आणि श्रम याबाबतच कुठं तरी कमी पडताना दिसत आहे.'आजची तरुणाई रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करते...'पण ती मोबाईल आणि संगणकावर 'पब्जी'सारखे खेळ खेळण्यासाठी,या तरुणाईला खूप श्रीमंत व्हायचं आहे पण ते कष्ट करून नाही तर 'शॉर्ट कट'वापरून विना सायास...!
  क्षेत्र कोणतेही असो पण त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी सतत कष्ट आणि मेहनत करण्याची वृत्ती अंगी असावी लागते.रात्रभर गेम खेळून,चित्रपट बघून दुपारी 12 वाजेपर्यंत झोपा काढणाऱ्या 'सूर्यवंशी' तरुणाई कडे पाहिल्यावर ....'मेरा देश बदल रहा है' म्हणावं ... की 'बिगड रहा है' असं म्हणावं असा प्रश्न पडतो.
  खरे तर समर्थानी आपल्या श्लोकातून
     यत्न तो देव जाणावा |
     यत्नेवीण दरिद्रता |
असं सांगून सर्वानाच आपल्या कृतीतून तसेच विचारातून प्रयत्नवादाचे महत्व सांगितलेलं आहे.... ’ समर्थांची वरील उक्ती सर्वांना अत्यंत उपयुक्त आहे. या बोधवाक्यामधून समर्थ आपल्याला प्रयत्नांना देव मानण्याची शिकवण देतात. कोणत्याही गोष्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘अचूक’ प्रयत्नांबरोबर कष्टाची तयारी असेल तर यशश्री नक्कीच प्राप्त होणार आहे. केवळ दैवावर हवाला ठेवून कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही हे जाणूनच समर्थांनी प्रयत्नवादाचा आणि श्रम प्रतिष्ठेचा पुरस्कार केला आहे. यासाठी आळस सोडून अविरत परिश्रम करून ध्येय गाठता आले पाहिजे. कष्ट न करता आलेल्या अपयशाच्या पायरीवर जर कोणी रडत बसला तर तो कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.

कष्टेविण फळ नाही | कष्टेविण राज्य नाही |
कष्टेविण होत नाही | साध्य जनी ||||
  अगदी परीक्षेतील यशापासून तर सांसारिक जीवनातील कोणतेही काम त्यात सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी कष्ट आणि मेहनतीची कास धारावीच लागते...! अगदी पुरातन काळापासून 
भारतीय शिक्षण परंपरेत विद्यार्थी  दहा-बारा वर्षे गुरुगृही राहत असे. गुरुकुलातले हे जीवन अत्यंत खडतर व कष्टमय असे. तिथे विद्यार्थ्यांना अध्ययनाबरोबरच आश्रमातील कामेदेखील करावी लागत. आणि विशेष म्हणजे अनेक राजकुमार,राजपुत्र हे सर्वसामान्य मुलांप्रमाणे कष्टमय स्वावलंबी जीवन जगत असत....आणि याचा मुख्य उद्देश असायचा .... भविष्यकालीन जीवनात त्यांना श्रमाची सवय लागावी...! 
 'ज्या देशात उद्योगशील तरुणाई आहे त्या देशाच्या प्रगतीचा स्तर हा सदैव उच्च स्थानी राहतो....या सिद्धांतानुसार श्रमाची सवय एकदा लागली की व्यक्ती वेगवेगळ्या विधायक कामात स्वतःला गुंतवून ठेऊन स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची पर्यायाने राष्ट्राची प्रगती करण्यासाठी सक्षम बनत असतो!!
म्हणूनच प्रत्येकाने तुकाराम महाराजांच्या 
'आधी कष्ट मग फळ
कष्टची नाही ते निर्फळ ' या ओळी लक्षात ठेवल्याच पाहिजेत...!!!

        डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
19) * कष्ट *

  मर्यादीत साधनसंपत्तीमध्ये अमर्यादीत मानवी गरजांची पुर्तता करणे हे अशक्य असले तरी मानवी जीवन याच उद्देशाने अापला जीव जगवत असते.प्रत्येकाला मी श्रीमंत व्हावं असचं वाटत राहतं.दुसर्‍याकडे पाहीले की नेहमी  हेवा वाटतो हा मानवाचा मुळातलाच स्वभाव.सगळ्याकडे सर्वच असत असही नाही कारण परिपूर्ण असचं कुणीच नाही.जे अाहे त्यात समाधान मानने याला सुख म्हणतात. पण माणूस हेच करत नाही.मृगजळाप्रमाणे त्यामागे धावत असतो..

  अापल्याला हव ते मिळवायच असेल,अापली स्वप्न पूर्ण करायची असतील तर अापण अापल्या कष्टाचा मार्ग सतत वाहत ठेवला पाहीजे.नुसते मला हे हवं,मला ते हवं अशी पोपटपंची एका जाग्यावर बसून करून चालणार का??? अरे  माणसा तुझ्याकडे सर्व अाहे ,इतर प्राण्यापेक्षा तू बुद्धिमान अाहेस.या बुद्धीचा व धडधाकट शशरीराचा योग्य वापर करून घे.जोपर्यंत जीवंत अाहेस तोपर्यंत तुला किंमत अाहे.या हाडामासाच्या देहाचा वापर कर अाणि अापली ध्येय पूर्ण कर.मनातून सार ठरवले अाणि कष्टाचे प्रयत्न अविरत चालू ठेवले तर यश सहज मिळतं.

अन्नासाठी भटकणारे कुञी असोत,वा कणकण चोचीत ,पिल्लांसाठी दाणा अाणणारी छोटीशी चिमणी असो की,जीव लहान असूनही तिच्या दुप्पट वजनापेक्षा जास्त वजनाचा साखरेचा दाणा वाहून नेणारी मुंगी असो की,पोटासाठी शिकारीच्या शोधात रानोमाळ भटकणारा वाघ असो ही सगळी प्राणी कष्ट करूनच जगतात ना?? मग यांचेही ती कष्टच ना?? हे सारे अापले जीवन कष्टाने जगतात मग अापणही त्यातलेच अाहोत ना. पण मला वाटते हल्ली कष्ट न करता सर्व  अायतं मिळावं ह्या तंद्रीत अाजची पिढी दिसत अाहे..कल्पवृक्षासारखं कुणीतरी असावं ही स्वप्न पहात असतात.अाणि मग अापल्या गरजा पुरविण्यासाठी वाईट मार्गाचा वापर करतात.यातून वाईटच घडत असतं..

कष्ट हे नेहमी प्रामाणिक असावे ,मग ते शरीराचे असो वा बुद्धीचे असो.यामुळे जे समाधान मिळते ना! ते खूप मौल्यवान असते.अती हव्यासापोटी वाईट कृत्य कधीच करू नये. "  कष्टाची बरी भाजीभाकरी   तुप
 साखरेची चोरी नको "" विद्यार्थी जीवनात जर मनापासून अभ्यास केला तर परिक्षेची चिंता वाटणार नाही.बुद्धीला सतत धारदार बनवले तर अभ्यासाची लढाई सहज जिंकू शकतात.जर का अभ्यास न करता काॅपी करून 99%गुण मिळवले असतील तर ते तकलादू ज्ञान सहज ओसरून जातं अाणि अापण जिथे महत्वाचे असतो तिथेच नेमकं हरून जातो.कारण ते चिरकाल टिकणार नसतं.जे चिरकाल टिकतं ते जिद्दीने व बुद्धीच्या कष्टाने अालेल असतं..म्हणून तर शास्ञज्ञाचे नियम अाजही तसेच ठाम अाहेत.हे त्यांच्या अंगातील कौशल्य व त्यांच्या मेहनतीचे चीज अाहे..

शेतकरी,मजजूरदार शेतात राबताना काळ्या अाईशी प्रामाणिक कष्ट करतो त्यामुळे तो सुखी असतो.नौकरदार असो किंवा कुणीही असो जो अापली कर्तव्य प्रामाणिकपणे करतो त्याचे जीवन सुखी व समाधानी असते.म्हणून कष्ट असे असावे की ज्याची लाज कधी वाटू नये.मग ते क्षेञ कोणतेही असो.चोरी मारी,लुबाडी,फसवणूक यातून मिळालेला उपभोग हा शेवटी यातनाच देतो,म्हणून प्रामाणिकपणाने कष्ट करून आपले क्षणभंगूर जीवन अानंदाने जगावे.ना चिंता ना भिती असे जीवन असावे.

श्रीम .ज्योती रावते
     नांदेड
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
20) 'आयुष्यात कष्टाला पर्याय नाही'

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यात आरोग्य, शिक्षण यांचा सुद्धा समावेश आपण करू शकतो. हे सांगण्याचे तात्पर्य हेच की, या सर्व मूलभूत गरजा भागविण्यासाठी गरज असते ती पैशांची. पैसे कमविण्यासाठी श्रम करावे लागतात. "दे रे हरी पलंगावरी" असं म्हणून आयुष्य जगता येत नसतं. त्यासाठी कष्ट करणे, श्रम करणे क्रमप्राप्त ठरते. 

आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. आपला जन्म कुठल्या कुळात होईल हे मानवाच्या हातात नसले तरी कष्टाने कर्तृत्व गाजवणं हे मात्र त्याच्या हातात असतं. तुम्ही कितीही बिकट परिस्थितीत जन्मले, वाढले असाल, पण तुम्हाला आपल्या आयुष्यात बदल करायचा असेल तर ते केवळ तुमच्याच हाती असतं. इतरांना दोष देत बसण्यापेक्षा आपला उत्कर्ष कसा होईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

शिक्षण हा उत्कर्षाचा एक महत्वाचा मार्ग आहे हे खरं असलं तरी ते अर्धसत्य आहे असं मला वाटतं. कुठलाही व्यवसाय करायला मोठमोठाल्या पदव्या हव्याच असतात असंही काही नाही. तुमच्यामध्ये काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असेल तर अशा पदव्या नसताना देखील उत्तम व्यवसाय तुम्ही करू शकता. त्यामुळे मोठं व्हायचं असेल तर प्रामाणिक राहा, कष्टाला घाबरू नका, आपल्या कामात सातत्य ठेवा एवढंच माझं सांगणं आहे.
"कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!"

गणेश सोळुंके (जालना)
8390132085
gnsolunke0092@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
21) श्रमा विना फळ नाही 
     कोणतेही कार्य पुर्ण करण्यासाठी श्रम करावेच लागते. श्रम(कष्टा)विना फळ नाही. जो  सतत कामात राहतो व प्रत्येक क्षणाचा उपयोग कार्या साठी घालतो  तो जिवनात कधीच मागे राहत नाही. म्हणून  कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. जिवनात कोणतेही काम भेटले तर ते करण्यासाठी हिचकू नये कारण कोणतेही काम कमी नसते. त्यात मन लावून केले की, ते काम उत्तम, दर्जेदार होतेच. कष्टाविना कोणतीही गोष्ट सहजा सहजी मिळत नाही. म्हणतात दे रे हरी पलंगावरी असे वागतात ते जिवनात काहीच करू शकत नाही. 
        देशाची प्रगती करायची असेल तर त्या देशातील तरूण पिढी ही कष्ट करणारी असेल तर त्या देशाला प्रगती पासून कोणीहीच रोखू शकत नाही. म्हणून मला एक म्हण सांगावी वाटते.' मनुष्य दिसत नाही हिराने तर तो शोभतो घामाच्या धाराने. ' 
     प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागते. विद्यार्थी जिवनात अभ्यास करणे. मेहनत केले तरच तो चांगले मार्क मिळवतो व जिवनात उच्च स्थानावर प्राप्त करतो.  कष्ट पासून मिळालेल्या यशामुळे जो आनंद होतो तो आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही.  
       शेतकरी शेतात कष्ट करतो म्हणून त्यास समाधान झोप लागते. जो मनापासून कष्ट करतो त्यास देव फळ देतो च. म्हणून म्हणतात जसे कर्म तसे फळ. 
    सध्या जगात कोरोना महामारी चालू आहे, यात भारत देश आपला बराच चांगल्या स्टेजवर आहे याचे कारण आपले सरकार, डाॅ.,सिस्टर, पोलीस यांची मेहणत आहे. याच बरोबर जे सफाई कामगार आहेत त्याच्या कष्टामुळे आपण बरच काही करू शकत आहोत म्हणून यांचे कष्टाचे मोल हे अनमोल आहे.  म्हणून आपणास म्हणता येईल की कष्ट हे अनमोल आहे. त्याची तुलना पैशात करू शकत नाही. म्हणून कोणतेही काम, कष्ट हे कमी समजायचे नाही. 
    मेहणतीने आपण अशक्य गोष्ट ही  शक्य करू शकतो.
 बोईनवाड गुणवंत किशनराव(होटाळकर) नांदेड
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
22) केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

        कोणतेही काम करीत असतांना एक श्लोक नेहमी आठवतो,त्या श्लोकात रामदास स्वामी म्हणतात.केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.बरोबर आहे.कोणतेही काम केल्याशिवाय फळ मिळत नाही.
         आम्ही काम करतो.नव्हे तर आम्हास ती कामे करावीच लागतात.अगदी बालवयापासून.पण काही काही लोकं अशीे असतात की त्यांना कामंच करायला आवडत नाही.कारण त्यांना कंटाळा येत असतो.काही काही लोकं मात्र भाग्यवानही असतात.त्यांना वाडवडीलोपार्जीत कमविलेल्या संपत्तीने त्यांना कामाला जावेच लागत नाही.नव्हे तर जास्त काम करावे लागत नाही.कारण त्यांच्या हाताखाली नोकर असतात.ते आळशी नसतात काही अपवाद सोडले तर.
           श्रम ही पुजा आहे.श्रम करावे.जो करीत नाही.त्याच्या मागे असंख्य आजार लागलेले असतात.त्या आजारातून सुटका नाही.ज्यांना आम्ही भाग्यवान समजतो.अशी माणसे स्वतःस मात्र भाग्यवान समजत नाही.कारण त्यांना वेगवेगळ्या असाध्य रोगानं छळलेलं असतं.कोणाला ह्रृदयविकाराचा त्रास असतो.तर कोणी शुगर.कोणी कँन्सरचेही शिकार असतात.
         कालपरवाला मरण पावलेले इमरान व ऋषी कपूर.काय कमी आहे त्यांच्या घरी.तरीही कँन्सर आणि ह्रृदयविकार.देशातले असे काही हिरो आहेत की ज्यांना रोगानं छळलं आहे. पण सोनाली बेंद्रे - कँसर
अजय देवगन - लिट्राल अपिकोंडिलितिस 
(खांद्याचा गंभीर आजार)
इरफान खान - कँसर
मनीषा कोइराला - कँसर
युवराज सिंह - कॅन्सर
सैफ अली खान - हृदय घात
रितिक रोशन - ब्रेन क्लोट
अनुराग बासु - खूनी कँसर
मुमताज - ब्रेस्ट कँसर
शाहरुख खान - 8 सर्जरी 
(गुडघा कोहनी, खांदा इत्यादी)
ताहिरा कश्यप (आयुष्मान खुराना ची पत्नी) - कँसर
राकेश रोशन - गळ्या चा कँसर
लीसा राय - कँसर
राजेश खन्ना - कँसर,
विनोद खन्ना - कँसर
नरगिस - कँसर
फिरोज खान - कँसर
टोम अल्टर - कँसर...
         ही सर्व मंडळी अशी आहेत की ज्यांचं जेवन सर्व आहार व जावनसत्वानं युक्त आहे..त्यांचा उपचारही वेळोवेळी होत असतो.तसेच त्यांच्या जवळ पैसाही भरपूर.तरीही ते स्वस्थ नाहीत.कारण श्रम.ते जास्त मेहनत करीत नाहीत.घरी नोकर चाकर असतात छोटी छोटी कामं करायला.मग असाध्य रोग होणार नाही तर काय?शिवाय खायला फास्टफुड असतं.ही मंडळी दूध पितात.तसेच एसीच्या हवेत राहतात.सगळं कुत्रीम.कारखान्यात काम करणारा मजूर आरोेग्याच्या दृष्टीनं कणखर असतो.तर शेतात काम करणारा शेतकरीही आरोग्याच्या दृष्टीनं सक्षम असतो.
          आम्ही आजही मेहनत करायचे सोडून या कुत्रीमतेच्या नादी लागलो.आम्हाला आज नोकर हवा.कामं करण्यासाठी यंत्र हवं.कपडे धुवायला वाँशिंगमशीन अन्न ठेवायला फ्रिज,हवा घ्यायला पंखा,कुलर,एसी.आता खाली सारवण करावं लागत नाही.नाही सडा टाकावं लागत.भांडे धुवायला मोलकरीणच असते.आजार होणार नाही तर काय?कारण शरीराची मेहनतच होत नाही.तसेच कामं करायला जास्त वाकावं लागत नसल्यानं शरीराच्या संपुर्ण भागाची मेहनत होत नाही.मग परीणामी आम्हाला कितीही चांगली खुराक मिळत असली तरी ती खुराक आमचं आरोग्य टिकवीत नाही.
         चांगलं आरोग्य हे चांगलं जिनस खाल्ल्यानं मिळत नाही,तर ते श्रमानं मिळत असतं.आम्ही श्रम जर करीत नसेल आणि जेवायला कितीही चांगलं जीवनसत्वयुक्त आहार वापरला तरीही आम्हाला चांगलं आरोग्य प्राप्त होणार नाही.त्यासाठी श्रमाची गरज असते.पण श्रमाबाबत आम्ही विचार करतांना आमची योजना चुकते.करुच्या चक्करमध्ये राहूनच जाते.कधी आळसपणा येतो.तर कधी आमची लाज आम्हाला खाते.कधी आमची श्रीमंती आमच्यात अहंकार उत्पन्न करते आणि तिथूनच मग आमच्या आरोग्याला आजाराचं खतपाणी मिळून आमचं आयुष्य समाप्त होतं.
       हं,कोणीही म्हणत असतील की श्रम करा अगर नका करु.मरण हे येणारच.मरणानं कोणाला सोडलेलं नाही.बरोबर आहे.पण त्यासाठी श्रम करु नये काय?अन् तुमचा आजार बरा नाही.तुम्ही तर आजारी असता.त्यात तुम्हाला इंजेक्शन,सलाईनचा,दुखणे याचा त्रास होत असतोच.पण तुमच्याबरोबर जो तुमची सेवा करणा-या तुमच्या नातेवाईक,शेजारी पाजारी यांना त्रास होतो ना.तो बरा नसतो.कधीकधी याच शेजारी माणसाच्या तोंडून शापवाणी ती शापवाणी बरी नसते.म्हणून श्रम करा.घरातील छोटी मोठी कामं करा.त्यासाठी लाजू नका.श्रीमंतीनं माजू नका.मग व्यायाम नाही केला तरी चालेल.तुमचं आरोग्य चांगलं राहिल.पण त्यासाठी केल्यानं होत आहे.आधी केलेची पाहिजे हे ब्रीदवाक्य आचरणात आणा.नाहीतर श्रम करु करु म्हणता म्हणता दिवसं निघून जातील आणि मग तुम्ही आजाराचे शिकार व्हाल आणि शेवटी पश्चाताप करावा लागेल.त्यासाठी आधीच श्रम करण्यासाठी सावध झालेले बरे.

 अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
23) कष्टाची साठवण ...
अरे संसार संसार ...हे बहिणाबाईंच्या लेखणीतून उमटलेले सुरेख काव्य‌ जणू मानवी जीवनाचा आरसाच आहे .
मानव हा कुटूंबप्रिय प्राणी आहे. त्याला एकटे रहायला आवडत नाही. आपल्या माणसांसोबत रहायला आवडते. कौटुंबिक जीवनात प्रत्येकजण आपल्या लेकरांसाठी कष्ट करुन पैसे कमवत असतो . पोटाला चिमटा देऊन घर बांधतो  घराचे हफ्फते फिटत नाही तेव्हड्यात दारासमोर गाडी उभी करायचे स्वप्न पाहतो. त्यात मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागेल म्हणून ठिकठिकाणी इनव्हेस्टमेंट करुन ठेवतो. ते झालं की मग अजून माझ्या नातू साठी थोडीफार शिल्लक म्हणून पैसे बाजूला काढतो. आपलाच मुलगा अजून दहावीला आहे . तरी एवढा पुढचा विचार करतो . ही आपल्या देशातील लोकांची मानसिकता असते जेणे करुन माझी येणारी पिढी सुखी राहील.  असे अति काटकसरीचे आयुष्य जगतात . जीवनातील लहान लहान आठवणी साजर्या करता न येणे .नेहमीच  मन मारुन जगणे प्रत्येक वेळी काटकसरीचाच विचार करणे आयुष्यातील मौजमजेचा त्याग करणे .यात कुठेतरी मनं नाराज होत असतं मनाला कुठंतरी दाबलं जातं . आणि एक उणीव निर्माण होते ती हरवलेल्या क्षणांची.‌हे कितीही आपण विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाही .पण परदेशात मात्र पक्षांप्रमाणे आपले मुलं मोठे झाले की त्याला त्याची भाकरी कमवायला सांगतात म्हणजे त्याला त्याचे आयुष्य पहायला सांगतात आणि मुलं आनंदाने वेगळे होऊन स्वतःच्या पायावर उभे राहतात . पण आपल्या कडे मुलांचे शिक्षण झाले तरी त्यांच्यातला मोह सुटत नाही कारण प्रत्येकाला वाटत असते मी यांच्या साठी एवढे कष्ट करून कमवले आहे . आता त्याने माझे ऐकावे आणि आपल्या मुलांसाठी त्यांच्या नातवंडांसाठी कमवावे आणि शिल्लक टाकावी उगाच पैशांची उधळपट्टी करु नये. पण आजची पिढी ची विचारसरणी बदललेली आहे आजच्या पिढीला आयुष्यात संघर्षा सोबत मौजमजेचा ही आनंद घ्यावासा वाटतो. आजच्या पिढीचे सुत्र आणि जून्या पिढी चे सुत्र काही मिळत नाही. घरात जर सुन आणि मुलानी जर नातवंडाचा साधा वाढदिवस मोठा साजरा करायचा ठरवले तर घरातील एक तरी वडीलधारी असे असतात त्याला त्यांचा विरोध होत असतो . त्यांचे वाक्य ठरलेले असते "आताच सगळं खाऊन टाकाल का पुढच्या पिढीला ठेवणार की नाही!" बहुतांश घरांमध्ये असेच प्रत्येक वेळी होत असणारे विरोधच कारणीभूत असतात घरातील वडीलधारी मंडळींच्या तिरस्काराला . त्यात दोष कोणाचाच नसतो दोष असतो तो प्रत्येकाच्या विचारसरणीचा. वडीलधारी मंडळी मन मारुन आतापर्यंत जगलेले असतात. त्यामुळे पैशांची उधळपट्टी त्यांच्या मनात घालमेल निर्माण करत असते. आजच्या पिढीचे सुत्र वेगळे आहे आज घरात नवरा बायको जोडीने कमवतात . किंवा एकजण  जरी कमवत असेल तरी प्रत्येक जण त्यातल्यात्यात आपली हौसमौज करण्याचा प्रयत्न करत असतो .जुन्या पिढीचे तसे नव्हते फक्त काटकसर करायची .आणि येणार्या पिढी साठी जमवून ठेवायचे .
काही ठिकाणी वेगळं चित्र ही पहायला मिळते आपण कमावलेले सर्व मुलांच्या नावे करून दिले आणि मुलाने त्यांना वृध्दाश्रमात ठेवले. 
प्रत्येकाला आपले आयुष्य आनंदात जगता आले पाहिजे जेव्हा मन आनंदाने भरलेले असते तेव्हा ते सर्व बदल आनंदाने सहज स्वीकार करते .
आणि प्रत्येकाने एक नेहमी लक्षात ठेवावे तुमचा तुमच्या मुलाबाळां मध्ये कितीही मोह असला तरीही मुलांच्या नावाने सर्व संपत्ती न करता एक हिस्सा स्वत: साठी राखून ठेवावा कारण शेवट पर्यंत आपली कष्टाची भाकरी आनंदाने खाता यावी. अनाथवृध्द बनून जगण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून. 
कष्ट करा , मुलांसाठी कमवा पण स्वत:साठी पण थोडं जगून घ्या .
'आयुष्य आनंदाने जगण्यासाठी आहे . चिंता कटकटी कायमच राहणार सोबत
त्यांना सोबत घेऊनच लहान लहान आठवणी साजर्या करुन घ्या  हीच आठवण आयुष्याच्या सांजवेळी हसवून जाईल .
सात पिढ्यांसाठी नाही स्वत:साठी जगा .
सुंदर जीवना कडे पहाण्याचा दृष्टीकोन बदला .
कष्ट करा पण स्वत:ला खूष ठेऊन .
🖋 सौ सुवर्णा सोनावणे 
चाळीसगाव 
७७४४८८००८७
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
24) .       कष्ट.                      जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कष्टाचे अनन्य महत्त्व आहे. कोणताही सजीव असो प्रत्येक सजीवाला श्रम करणे गरजेचे आहे. प्रत्येक सजीव जगण्यासाठी प्रयत्न करत असतो. आदी काळापासून ते आज पर्यंत मानवाने कष्टाच्या बळावर अनेक प्रगती घडून आणली आहे.अनेक शास्त्रज्ञांनी तर अथांग कष्ट करून विविध संशोधन करून मानव जीवनाला सुख मिळउन दिले आहे. काही लोक नशीब , अंधश्रद्धा,कर्मकांडाला बळी पडतात. सर्व करून बसतात आणि. शेवटी दैवावर दोष देतात .महान तत्व वादी अण्णाभाऊ साठे यांनी तर गैर समज असणाऱ्या लोकाविषयी सांगितले की , पृथ्वी ही शेष नागाच्या शिरावर नसून सतत मेहनत करणाऱ्या मजुरांच्या हातावर पृथ्वी आहे. प्रत्येक सजीव जन्मल्या पासून जगण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण काही लोक फक्त कष्ट करत असतात .पण त्यातला नफा तोटा काहीच न पाहता फक्त कष्ट करत असतात आणि त्यांच्या हातात फक्त अपयश येत असते. परंतु या धाव पळीच्य जीवनात तर प्रत्येक व्यक्तीला अतिशय मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागत आहे. काळ महागाई चा आहे. नवीन तंत्रज्ञान  कौशल्य निर्माण करून  मानव झपाट्याने प्रगती करायला  पाहत आहे स्वतःच्या प्रगती साठी मानव कोणत्याही स्तरावर जाण्यास तयार आहे वाढती लोकं संख्या,वाढती महागाई,लाकूड तोड,या मुळे पृथ्वीला नुकसान पोहचत आहे. काही महान व्यक्तींनी संगीत की "अच्छी करणी करेगा तो नर क नारायण बनजायेगा,, या उक्ती प्रमाणे माणसाला कोणी सलाम करणार नाही पण माणसाच्या कार्याला मात्र समाज सलाम करत असतो.. म्हणून प्रत्येक व्यकीने नवीन नवीन कौशल्य शिकायला हवे व मनापासून कोणतेही कष्ट करण्याची तयारी ठेवावी.कोणतेही काम लहान व कोणतेच काम मोठे नसते. लहान कामातच मोठे यश लपलेले असते.जॉर्ज वॉशिंग्टन  यांच्या कष्टाचं जिवंत उदाहरण घेतल्यास  असे लक्षात येते की एक लहान पणी अनाथ झालेला मुलगा अमेरिकेचा राष्ट्र अध्यक्ष झाला .असे अनेक उदाहरणे देता येतील .पंडित नेहरूंनी तर ,,आराम हआराम ,,है ह नारा दिला आणि प्रत्येकानी आपल्या लहान मुलांना सुध्धा प्रत्येक काम करण्याची सवय लावायला हवी .कारण ,आजच्या  वर्तमानात मुलांचे उद्याचे भविष्य आहे. महणुन प्रत्येकानी अखंड परिश्रम करायला हवे व सहकार्याची भावना जोपासायला हावी...         जीवन खसावात, भंडारा        9545246027      
Jeevansing khasawat@Gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
25) लेख 

श्रम 

श्रम म्हणजे आपले ईच्छीत ध्येय प्राप्त करण्यासाठी जे शारीरिक, बौद्धिक कष्ट किंवा मेहनत घेतो ते होय.

श्रम करणे म्हणजे कुठलं तरी ध्येय मिळवण्यासाठी केलेले कार्य होय.मग ते मोबदल्याची अपेक्षा ठेवून असेल कींवा नसेल त्यास श्रमच म्हणतात.

व्यक्तीच्या श्रमाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत

पहिला प्रकार आहे शारीरिक श्रम

यामध्ये शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्ती येतात.रस्ते तयार करणारे मजूर, शेतात,कारखान्यात राबणारे मजूर कींवा बांधकाम करणारा मनुष्य असो सर्वजण शारीरिक श्रम करतात . बांधकाम मग ते ईमारत बांधकाम असेल कींवा पूलाचे बांधकाम असूदे त्यात बौद्धिक श्रमापेक्षा शारीरिक श्रमच जास्त करावे लागतात

दुसरा प्रकार येतो तो आहे बौद्धिक श्रमाचा होय.यामध्ये शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक क्षमतांचा वापर होतो.शरीरापेक्षा मेंदू जास्त थकत असतो.यामध्ये शिक्षक,प्राध्यापक,आयटी क्षेत्रातील इंजिनिअर,इ.व्यक्ती होय.लोकांना वाटतं असतं की हे लोक ऑफिसमध्ये जाऊन छताखाली खुर्चीवर बसून येतात.यांना काय त्रास होतो? आम्ही बघा कीती उन्हातान्हात राबतो?पण त्यांना हे माहीत नसते की त्यांच्या श्रमाबरोबर हेही श्रमच करतात. ते आपली बुद्धी वापरून विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांना घडवता.साधा विचार जरी आपण केला तरी पण श्रम म्हणजेच उर्जा खर्च होते कारण त्यामध्ये व्यक्तीने त्याची बौद्धिक क्षमता खर्च केलेली असते

तिसरा प्रकार म्हणजे रोजगारी होय.याला रोजगारी म्हणतात कारण जेव्हा व्यक्ती श्रम करतो तेंव्हा त्याला त्याचा आर्थिक मोबदला मिळत असतो.

श्रमाचे कुशल, अर्धकुशल आणि अकुशल असे कौशल्यावर आधारित प्रकार करु शकतो.प्रत्येकाच्या कामाच्या प्रकारावरून व त्याला लागणारी कौशल्ये पाहून हे प्रकार ठरविले जातात.जीवनात प्रत्येक व्यक्ती काम करत असते.उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करावेच लागते.श्रम ही शक्ती आहे. श्रम केल्याने आरोग्य सुधारते.व्यक्ती निरोगी राहते." श्रम करने में ही सफलता है । " असे म्हटले जाते. 
" निरोगी शरीरात निरोगी मन वास करीत असते " अशी म्हण आहे.व ती बरोबरच आहे.म्हणून जेवढे शरीराला कष्ट देऊ तेवढे शरीर तंदुरुस्त बनते.म्हणून श्रमाला कमी न लेखता सतत कोणत्या ना कोणत्या कामात सक्रिय असले पाहिजे.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
26) " श्रम - सुखी जीवनाचा मूलमंत्र "

     मित्रांनो , ' सुखी जीवन ' ही संकल्पना प्रत्येक मानवी मनाला हवीहवीशी वाटत असते . मग तो या पृथ्वीवरील कोणताही जीव असोत . सृष्टीतील सर्व पशू - पक्षी , किटक , पाळीव - वन्य प्राणी , एवढंच काय निष्पाप अशा तरू - वेलींना देखील सुखी व आनंदी जीवन जगावेसे वाटते बरं का ! हे सुख जीवनात आपल्याला प्रत्यक्षात वास्तविक स्वरूपात आणण्यासाठी जो मूलमंत्र हवा असतो तो म्हणजेच एकमेव हा '' श्रमच '' होय !!

     " मनी न कुणाचा धरू हेवा
       नित्य स्मरू या 'श्रम ' देवा
       अंर्तमनी बाणवा हा ठेवा 
       मिळे खाण्यास यशाचा मेवा !! "

     आपण समाजात पाहतो की सर्व मानवांची आर्थिक स्थिती ही एकसमान नाहीये . कुणी गर्भश्रीमंत तर कुणी अठराविश्व दारिद्रयी ! कुणा घरी नोकर - चाकर तर कुणी इतरांच्या घरी चाकरी करून नोकर होऊन पोट भरतात . हे आर्थिक विषमतेचे चित्र बदलण्याचे एकमात्र साधन म्हणजे हाच ' श्रम ' होय !!

    " श्रम हा कानमंत्र ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात अंगीकारला त्याच व्यक्ती आपल्या आयुष्यात सुख - समृद्धीस प्राप्त होतात . " हे एक त्रिकालबाधित निर्विवाद असे कटूसत्य आहे , ते कुणीही नाकारू शकत नाही . 

     " बुद्धीच्या कॕमे-यात सात्त्विक विचारांचे रोल घालून प्रयत्नांची  बटण दाबल्यास यशांची सुंदर फोटो निघतील ! "
  
      कोणत्याही कामाची सुरूवात ही आधी वैचारिक स्वरूपात मनातूनच होत असते . नुसते विचार करून जमत नाही तर त्या काम सफलतेसाठी अंगातील आळस कोसोदूर लोटावा लागतो . नि हाती प्रयत्नांची घागर घेऊन श्रमदेवतेच्या घरी जाऊन  घामाच्या धारा त्यात भरून तिच्या चरणी अर्पित करावे लागतात . तेव्हा कुठं ही श्रमदेवी प्रसन्न होऊन आपल्याला सुख - समृद्धी , यश - किर्ती , मान - सन्मान , आरोग्य - मनःशांती , मनस्वी स्वानंद आदी गोष्टी आशीर्वाद स्वरूप प्रदान करते !! 

     " आलस्य कुतोः विद्या 
        विद्यास्य कुतोः धनंम्
        धनस्य कुतोः मित्रंम्
         मित्रस्य कुतोः सुखम् !! "

     या सुभाषिताप्रमाणे मानवाला आपल्या जीवनात सुखप्राप्ती करायची असेल तर प्रथम शारीरिक व मानसिक आळस दूर केला पाहिजे . कारण आळशी मानवाला कोणतीच विद्या प्राप्त होत नसते . अशा आळशी व अशिक्षित विद्याहीन व्यक्तीला धनही मिळविणे खूपच कठिण जाते . तेव्हा अशा आळशी , अविद्य , दरिद्री मानवाशी कुणीही मैत्री करणार नाही . समाज फक्त नि फक्त त्याची निंदाच करून त्यापासून सर्वच जन दूर जातील . मग अशी व्यक्ती आनंद व समाधानासारखी सुखापासून वंचित राहतील .....

     म्हणून आपण आजच्या 1 मे या कामगारदिनी मनी श्रमिक बांधवांप्रती आदरभाव व्यक्त करूया . श्रमाचा मान राखून फुल नाही फुलांची पाकळी बनून तरी त्यांचे काम एक दिवस आपण स्वतः करूया . त्यांना आनंद देऊन आपणही मनी स्वानंदाचा उपभोग घेऊया !

     अशाप्रकारे श्रम हाच सुखी जीवनाचा खराखुरा मुलमंत्र होय ! त्याची कास धरल्याशिवाय जीवन सार्थकी व साफल्य होणार नाही . चला तर मग सारे मिळून हा श्रमाचा मूलमंत्र अंगिकारूया !!

अर्चना दिगांबर गरूड 
मु. पो. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र . 9552954415
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
सर्व लेख वाचन केल्याबद्दल आभारी आहे. 

रोज एक लेख :- बारावा दिवस नशीब / दैव

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- बारावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 30 एप्रिल 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- नशीब किंवा दैव*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
01) *नशीब*
जीवनाचे रंग प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळया प्रकारे येतात..ज्याला जो रंग आवडतो तो त्याला 
निवडता आला पाहिजे नि आपलासा करता आला तर आपोआपच त्याच्या जीवनात सौख्याचं इंद्रधनुष्य निर्माण झाल्यावाचून राहत नाही.पण बऱ्याचवेळा आपल्या मनात असते एक, आपण करतो एक आणि घडते मात्र निराळेच कदाचीत यालाच लोक नशीब म्हणत असतील.आता आपलं नशीब फिरवण्याचं वा त्याच त्या गोष्टी गिरवण्याचं आपल्याच हातात असतं. बहुतेक वेळा जीवनात नैराश्य येतं आणि मग जीवनयात्रा संपवून टाकावी अशी भावना होते.तशा घटना जीवनात  खरंच पुन्हा पुन्हा घडतात आणि मग आपली धारणा पक्की होते की आता जगण्यात आर्थच नाही.पण समस्या या खरंच तुम्ही कोण आणि कसे आहात हे आजमवण्यासाठी आलेल्या असतात,ते आव्हान स्विकारुन जीवन जगले
पाहिजे.प्रवाहाबरोबर तर कचरासुद्धा सहज वाहून
जातो थोडं प्रवाहाच्या विरूद्ध उभं राहता आलं
पाहिजे.सदैव्य तुम्हाला अनुकूल अशी परिस्थिती
कशी राहिल आणि का राहावी.लढण्यात आणि
लढून उभं राहण्यात जी मजा आहे ती सहज आणि सुलभतेत नक्कीच नाही.म्हणून जीवनातील आव्हानांना स्विकारा आणि जगा.
संकटांना तुमचा ताबा घेऊ देऊ नका,संकटावर स्वार व्हा अन बघा कशी गंमत असते ती....पण 
आपण तिथं पर्यंत पोहचतच नाही. असे कांही क्षण जीवनात येतात आणि बदलून जातं सारं जीवन. टरनिंग पॉईंट त्याचंच तर नाव.पाणी मातीचा आधार नसतानाही भिंतीच्या फटीतून एखादे रोपटे आकाशाच्या दिशेने झेपावताना आपण पाहिले असेल कधीच नशीबाला दोष देत ते थांबत नाही. कित्येक वेळा त्याला संपवण्याचा प्रयत्न करा. कालांतराने पुन्हा उगवण्याच्या त्याचा प्रयत्न असतो. अन्न दुसऱ्याचे असले तरी किती खायचे हे आपल्याला कळले पाहिजे.आपले नशीब,दैवं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. त्याला कोणी दुरुस्त करेल किंवा त्याला कोणी उंचीवर नेईल याची वाट पाहात बसलो तर आपण निष्क्रीय व्हाल. तेव्हा तूच तूझ्या जीवनाचा शिल्पकार हे लक्षात ठेवुन जगा.

                  *हणमंत पडवळ*
                   *उस्मानाबाद*
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
02) नशिबाचे दुसरे नाव विचार

मित्रांनो, तुम्ही कधी विचार करता का ? बहुतांशजण या प्रश्नाचे उत्तर होय असे देतात. कारण विचार केला नसता तर आपली प्रगती झाली नसती. सजीवांमध्ये मानवाला वगळता अन्य कुण्या सजीवांना विचार करता येत नाही. कारण विचार करण्यासाठी ज्या बुद्धीची आवश्यकता आहे ती परमेश्वराने फक्त मानवालाच दिली आहे. त्याचमुळे इतरांपेक्षा मानवाने आपल्या बुद्धीच्या बळावर प्रगल्भ विचार करून लक्षणीय प्रगती केली. कुठे अश्मयुगीन काळातील मानव तर कुठे आधुनिक काळातील मानव ! आपली विचार करण्याची क्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मनुष्य जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याचे विचार प्रक्रिया चालूच राहते. विचाराचा चिराग विझला तर आचार आंधळा बनेल, असे विनोबा भावे म्हणतात. त्यामुळे नेहमी विचारात गढुन राहावे. विशेषकरून शालेय जीवनातील वयात विचारांची प्रक्रिया सतत चालू असावी. विचार न करणारी मुले मंदबुद्धी किंवा ढ समजली जातात. ऍझक टेलर यांनी फार सुंदर विवेचन केले आहे, ते म्हणत की मनुष्याची वाढ ही अवयवांनी होत नाही, तर विचारांनीच होते. विचारांना वाचनाने सहज सहकार्य मिळते. वाचन केले नाही तर आपल्या मनात नवनवीन विचार कसे निर्माण होतील ? त्यामुळे नित्य काहीतरी वाचन करण्याची सवय आपणाला असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाची पुस्तके तर वाचावीच लागतात याशिवाय वृत्तपत्रे, मासिके, गोष्टींची पुस्तके ही नियमित कशी वाचता येतील ? याचा विचार जरूर करावा. महात्मा गांधीजींची लिहिण्याच्या किंवा बोलण्याचा शक्तीपेक्षा वैचारिक शक्तीवर अधिक श्रद्धा होती. म्हणूनच वैचारिक पातळीवर गांधीजी खूप श्रेष्ठ महात्मा होते. खूप वाचन करून चिंतन व मनन केल्यानेच वैचारिक पातळीत काहीतरी सुधारणा होते, अन्यथा नाही. स्वामी विवेकानंद सांगतात की, वाईट संस्कारापासून दूर राहण्यासाठी पवित्र विचारांचे नेहमी चिंतन व मनन केले पाहिजे. जगात सर्वच सुंदर आहे तशी विचार करण्याची दृष्टी आपणाला मिळाली पाहिजे. आपले विचारच आपले भवितव्य ठरवतात. म्हणूनच स्वामी रामतीर्थ म्हणतात की, नशिबाचे दुसरे नाव विचार आहे. म्हणूनच आपल्या विचाराने आपले नशीब बदलून टाकू या. 

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

( माझ्या पाऊलवाट या पुस्तकातून साभार )
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
03) *खेळ नशिबाचा*
         दत्त मंदिराजवळ असलेल्या हॉलमध्ये आर्ट ऑफ लिविंग च्या सत्संग कार्यक्रमाला गेलेली असतांना ची घटणा झाली होती . आज बर्‍याच दिवसांनी सुमित्रा काकू कार्यक्रमाला दिसल्या. नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला त्या अगदी आवर्जून उपस्थित राहत होत्या. गेले दोन महिने त्या कोणत्याही कार्यक्रमात दिसल्या नाहीत. मला रहावले नाही .सत्संग  संपल्यावर मी त्यांना  विचारले ," काय काकू ,इतके दिवस कुठे गेला होतात ? गावाला वगैरे ?"
          सुमित्रा काकू "हूश्श ",करीत म्हणाल्या ,कशाची गावाला जाते ग .काय सांगू माझी सुन गेली. तिने जीव दिला  .तिसऱ्या खेपेस ही मुलगी झाली म्हणून तिने खूप जीवाचा त्रागा करुन घेतला होता. तिच्या बहिणीला मुलगा झाला व मला कशी तिसऱ्यांदा ही मुलगी झाली. सासूला सगळे मुलगेच मग, मलाच कसा मुलगा झाला नाही?माझे नशीब च फुटके; म्हणून संतापाच्या भरात तिने कुणाला न कळत अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेतले .व त्यातच ती गेली .लेकरांना पोरकं करून गेली. एवढा जंजाळ माझ्यामागे सोडून गेली . मनात सुमित्रा काकू रडू लागल्या. त्यांचे सांत्वन करीत विचारले, ” आता छोटी मुलगी बरी आहे का ?” त्या म्हणाल्या ."छोटीचे तर, नशीबच उजाळले. इकडे आई स्वर्गवासी झाली आणि तिसऱ्या दिवशीच तिला  अमेरिकेत राहणाऱ्या श्रीमंत दांमपत्यान दत्तक घेतले.
             तिचा किती थाट आहे .किती कपडे, खेळणी ,पाळणा काही काही कमी नाही.
            त्यांच्या शेजारी एक जोडपे राहत होते. त्यांना मूलबाळ होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते .विशेष म्हणजे त्यांना मुलगीच हवी होती .काकू म्हणाल्या ,कृष्णा जसा मथूरेत जन्माला आला.आणि गोकूळात लहानाचा मोठा झाला. तसेच ही मुलगी भारतात जन्माला आली आणि अमेरिकेत गेली.
       मी अंतर्मुख झाले .मुलीच्या योगाने (नशिबाने)एका आईचे जीवन दुःखाने होरपडून उद्ध्वस्त झाले .तिने मरणप्राय यातना सहन करून मृत्यूला कवटाळले .जगाचा निरोप घेतला .तर, दुसऱ्या आईचे जीवन फुलून उजळून निघाले. चंदनासारखे सुगंध दरवडू लागाले.  तिचे जीवन नंदनवनासारखे खुलू लागले .
             आजही आपल्या समाजाला प्रबोधनाची आवश्यकता आहे, मुलगा झाला की आनंद व्यक्त करणारे  आणि मुलगी झाली की दुःखीकष्टी होणारे लोक दिसून येतात , मुलीला गर्भातच कुस्करून टाकले जाते, समाजाला लागलेली ही कीड नष्ट करण्यासाठी ” शिक्षण ” हाच रामबाण  औषधोपचार  आहे  नशीब काय? कर्तव्याची जोड हवी. .
******************************
लेखिका       
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
(9420516306 )
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
04) *खेळ नशिबाचा*

कधी कधी आपण आयुष्याविषयी बोलत असताना किती सहजतेने बोलून टाकतो की आयुष्य किती सोपे आहे पण एखाद्याच्या आयुष्यात काय लिहिलेलं असतं हे कुणाला ठाऊक नसतं आणि तसेच एखाद्याच्या आयुष्यात किती सुखदुःखे लिहिलेली आहेत याची आपल्याला कधी कल्पना सुद्धा नसते.   आठवण  ही जीवनातील जणू एक दुर्लभ अशी गोष्ट आहे ज्यामुळेे कधीकधी आपण त्यांना आठवून खूप हसतो सुद्धा आणि कधी त्यांना आठवून आपल्याला खूप रडायला सुद्धा येते.
आज मी सुद्धा ज्या आठवणी तुम्हाला सांगणार आहे त्या जरी माझ्या जीवनात निगडित नसल्या तरी पण आजही मला त्या आठवणी मुळे फार दुःख होतं आणि त्यांना आठवलं की रडायला येतो की एखाद्याच्या आयुष्यात इतकं दुःख का बर येत असेल?
आज त्याला जाऊन तेरा वर्षे झाली पण आजही त्या घटनांना आठवून वेदिका स्वतःला दोष देत असते की मी जर त्या दिवशी त्याच्यासोबत गेले असते  तर आज तो जिवंत राहिला असता.
      आज माझ्या मित्राकडे त्याच्या  घरी सगळे आनंदात होते कारण उद्या लग्न होणार होता त्याच्या बहिणीचा. त्याच्याकडे एक मंगल कार्य होणार होते त्यांच्या दोन आत्म्याचा मीलन होणार होता आणि लग्न म्हटलं तर एक मोठा उत्सव होणार होता सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं लग्नाची तारीख जशी जवळ यायची  तशी घरचे कामे पण बाकी होती आणि तेवढ्यात, आम्हाला एक तार आली. ज्या मुलाबरोबर वेदिकेच लग्न होणार होते त्या मुलाचा अपघात झाला होता आणि तो त्या ठिकाणी जागीच ठार झाला होता. हे ऐकून सर्वांना धक्काच बसला. आणि वेदिका खूप वेदनेने रडायला लागली. घरी असणारे सर्व जण काही क्षणाकरिता स्तब्धचं झालेत. 
त्या दिवशी वेदिका कुणासोबतही बोलली नव्हती. पण तिचे दुःख सर्व लोक समजत होते. आई बाबा व आजी तिला धीर देऊन समजावन्याचा प्रयत्न करीत होते.
तरी वेदिका काहीच बोलत नव्हती. तिला यापुढे खूप लोकांच्या चुकीच्या भावनांना सामोरे जावे लागणार होते. वेदिका आणि संजय हे दोन्ही सोबतच इंजिनिअरच्या वर्गाला शिकत होते. फार चांगले मित्र होते व ते एक दुसऱ्या ला पसंत करत होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर संजय ला पुण्यात एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. नंतर दोघांच्या परवानगीने त्यांचं लग्न जमलं होतं आणि ते दोघेही फार खुश होते. 
संजय आपल्या लग्नाच्या पत्रिका स्वतः वाटत होता. आणि पत्रिका वाटून परत येतांना त्याचा एका ट्रक शी त्याच्या बाईक सोबत अपघात झाला होता.
या दुःखातून वेदिकेला सावरायला खूप वर्षे लागली. हळूहळू आई बाबानी  तिला समजावल की बाळ आता आम्ही तुझा दुसऱ्या मुलाशी लग्न करून देतो. पण वेदिका तयार होत नव्हती म्हणून तिला नोकरी करण्याचा सल्ला दिला. की तू कामात व्यस्त राहशील तर तुझं मन लागेल. शिकलेली मुलगी होती ती तयार झाली आणि तिला तिच्या संजय ज्या कंपनीत काम करीत होता त्याच ठिकाणी तिला ही नोकरी मिळाली. 
हळूहळू दिवस सरकत गेले व संजय च्या आठवणी पुसट होत गेल्या. दोन तीन वर्षांनी बाबांनी तिला पुन्हा लग्न करायला बोलले तेव्हा तिने होकार दिला. त्याच कंपनीत तिच्या सोबत काम करणारा एक इंजिनिअर मुलगा तिला आवडायला लागला होता त्याच्याबद्दल वेदिका ने बाबांना सांगितलं. बाबांनी विचार केला की मुलगी आपल्या आयुष्यात खूश राहिली पाहिजे असे त्यांचे विचार, म्हणून त्यांनी वेदीकाचे लग्न पुण्यातच लावून दिले.
    सुखा समाधानान वेदिका व वीरेंद्र आपले आयुष्य जगत होते. दोन वर्षात त्यांनी पुण्याला घर विकत घेतला आणि त्यांना एक गोंडस मुलगा सुद्धा झाला. वेदिकाचा परिवार सुखात नांदत होता. दोघेही नोकरी करून कमवत होते पैशाची चणचण नव्हती. मुलगा मोठा झाला होता तो शाळेत जाऊ लागला होता. 
एक दिवस अचानक वीरेंद्र ची प्रकृती बिघडली. त्याला घेऊन वेदिका डॉक्टर कडे गेली. तपासणी केल्यावर डॉक्टर ने सांगितले की वीरेंद्र ला डोक्याचा कँसर आहे आणि तो फक्त दोन तीन महिनेच जगणार.  पुन्हा वेदिकेच्या डोक्यावर खूप मोठा डोंगर कोसळल्यासारखं झालं. वीरेंद्र चा चांगल्यात चांगल्या दवाखान्यात वेदिका उपचार करत होती. विरेंद्र च्या उपचारासाठी तिच्या जवळ असलेला पैसा संपलेला होता. बाबांना सांगून गावाकडची जमीन विकून तो ही पैसा वीरेंद्र च्या उपचारासाठी लावला पण तो एक दिवस वेदिकेला सोळून नेहमी साठी फार दूर निघून गेला होता.
पुन्हा वेदिकेच्या नशिबी दुःख आले होते व उरले सुरले पैसे ही सर्व खर्च झाले होते. वेदिका आपल्या मुलाला घेऊन खुप रडायची.
 वेदिका आता जीव गमवावा असे अनेक वेळा विचार करत होती. जगण्यात तिचे काहीच रस नव्हते पण मुलगा होता त्याकडे पाहून स्वतः सावरण्याचा प्रयत्न करीत होती. पण देवाला का मंजूर होते.  की तिच्या नशिबात फक्त दुःख चं भोगण्याचे होते. एक दिवस मुलगा शाळेतून घरी येत असतांना त्याच्या शाळेच्या बस चे अपघात झाले. व त्या दिवशी त्या बस मधले वीस मुलं देवास मुकली व त्यात एक वेदिकेचा मुलगा होता. तिच्या जीवनातला शेवटचा दिवा तो ही विझला होता. वेदिकेच्या दुःखाचा विचार न केलेला बरा. त्या वेळी वेदिका दोन महिने कोमात राहिली. डॉक्टरांच्या खुप प्रयत्नानंतर आज वेदिका जिवंत तर आहे. पण फक्त तिचे शरीर...
कधी विचार करावा लागतो की देव सुध्दा किती कठोर आहे. वेदिकेने कोणते पाप केले असेल? तिला तिच्या जीवनात एका नंतर एक दुःखाचे डोंगर कोसळत होते.
–-------------------------------
महेंद्र सोनेवाने, गोन्दिया
तह जिल्हा- गोन्दिया
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
05) नशीब  / दैव. .                    मानवी जीवन विविध पैलूंवर अवलंबून असते . त्यामध्ये मानवी जीवनातील चांगुलपणा दडलेला असतो . माणूस आपल्या कर्तृत्वाने बनतो , ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने जो तो घडतो , मोठा होतो . सुभाषित म्हणतेच ना " नर करनी करे ! तो नर का नारायण बन जाये ! " या प्रमाणे माणसाने आपल्याला नेमून दिलेले काम केलेच पाहिजे . म्हणतात ना कर्तृत्वा धर्म मानावे ! मनोभावे तेचि करावे ! जर कर्तृत्व केले तरच प्रत्येकाला फल प्राप्त होते विना कर्तृत्व फल मागण्याचा तसा अधिकार प्राप्त होत नाही . कारण विना काम कोणाला ही काही प्राप्त होत नाही . हा निसर्ग नियमच आहे . " दे रे हरी ! पलंगावरी !! अशाने काही प्राप्त होत नाही .                   आता प्रश्न येतो नियमित काम करणाराचा तो झटतो, मेहनत घेऊन श्रम करतो पण आपण जे काही करतो , ते योग्य किंवा बरोबर असेल का ? असे मानन्याचा पण त्याचा नियमित पणा , सातत्य हे त्याला एक ना एक दिवस ध्येया पर्यन्त घेऊन जाणारच. यात त्याच्या नशीबाचा ही भाग आहे .                            काम न करता एखाद्याला परमोच्य शिखरावर नशीबाने नेलं असं आणखी इतिहासात उदाहरण नाही .                           प्रत्येकाला नशीब उज्वल बनविण्यासाठी हातपाय हालवावे लागतील . नुसती नशीब-नशीब म्हणून नशीबाला दोष देत राहणं किंवा गुणगान गात राहणं ही केवळ आणि केवळ अंधश्रद्धा ठरेल .                                        म्हणजे थोडक्यात नशीब आपल्याला आपल्या स्वत: च्या कर्तृत्वाने बदलता येते " रंकाचा राजा , आणि राजाचा रंक " होणं हे नशीबाचं उदा. होईल.                 आता आणखी आपण थोडा दैव चा विचार करूयात दैवात आणि नशीबात फरक आहे दैव हे कोणत्याही प्रकारे आपल्या हातात नाही आपल्याला भारतात ( भारत मातेच्या पोटी ) जन्म घेण्याचे थोर भाग्य लाभलं हे आपलं दैव आहे .                            दैव हे ज्याच्या त्याच्या पूर्व संचितावर अवलंबून असते . जसे आपले उत्तर आयुष्य हे आपल्या अगोदरच्या आयुष्यावर अवलंबून असते थोडक्यात म्हणजे जुन्या काळात राजे महाराजे असत , एक राजा निधन पावला कि त्याच्या गादीवर त्याचा मुलगा ( युवराज) गादीवर बसवून त्याला लगेच राजा बनविण्यात यायचे हा नविन राजा दैवाने राजाच्या पोटी आलेला असतो , तो तसाच दैव गतीनेच राजा झालेला असतो यात नशीबाचा संबंध नाही .               जसे आता राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही राजवट आली आणि ज्याचे नशीब उज्वल तो देशाचा राजा बनतो . अशा प्रकारे.नशीब आणि दैव यात फरक आहे .                                 दैव हे बदललच जात नाही आणि नशीब हे कधीही बदलत , नशीब हे जीवनातील चढ - उतार आहे म्हणून आपलं नशीब आपण बदलले पाहिजे .
दैव , भाग्य , कर्म हे जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत नशीब त्याच्या थोडा जवळचा शब्द आहे .             ..                        मी आपणाला एक पौराणिक उदाहरण देईन अर्थात हे उदाहरण फक्त आपला मुद्दा पटवण्यासाठी असेल त्याच्या खर्या खोट्याशी आपला संबंध नाही बघा दैवाने सैन्याच्या लंकेचा राजा रावन असतो ( तो खूप हुशार होता, पंडित होता थोर शिवभक्त ही होता ) अर्थात हे सर्व दैवाने.प्राप्त त्याला झालेलं होतं , पण त्याचा अंत माञ नशीबाने वाईट केला याला नशीब म्हणावे अशा प्रकारे दैव आणि नशीब यांच्या तील भेद आणि साम्य होय ठिक धन्यवाद !

भागवत .लक्ष्मण गर्कळ
(बीड)
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
06) " नशीब - एक ऊन - सावलीचा खेळ "

     मानवी जीवन हे अनेक गुढ व चमत्कारिक गोष्टींनी बनलेला एक रहस्यमयी अद्भुत खजीनाच आहे . कारण आपल्या जीवनात कधी कोणत्या चमत्कारिक व आश्चर्यकारक गोष्टींची अनुभूती मिळेल हे आपल्यालाही माहिती नसते . जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अचानक काही सुवर्ण काळ येतो नि त्याचे जीवनचित्रचं पार बदलून टाकले जाते . त्या व्यक्तीला अत्यानंद होऊन ती सुखाची अनुभूती अनुभवत असते . हा " सुवर्ण काळ "  म्हणजेच दुसरे - तिसरे काही नसून ते एक  " नशीब " किंवा " दैव " होय ! जो आपल्या आयुष्यात अचानकच प्रवेश करून आपल्याला खूपच आनंदी व उत्साही बनवतो . 
     नाण्याच्या दोन्ही बाजूप्रमाणेच हे ' नशीब ' , देखील आपल्या दोन्हीही बाजूंचे दर्शन आपल्याला घडवीतो बरं का ! नशीबाचे एक रूप आनंददायक तर दुसरे रूप मात्र क्लेशदायक असते . असोत , आपल्याला या दोन्ही रूपात दर्शन घ्यावे लागणार . ते काही चुकणारी वा टळणारी बाब थोडीच आहे ! 
     खरंच ! हे ' नशिब ' आपल्या आयुष्यात कोणता खेळ खेळल याचा काही नेम नसतो . तो रस्त्यावरील भिक्षूकाला राजा बनवितो व एखाद्या राजाला भिक्षूक ! हे आपण महाभारत , रामायण आदी ग्रंथातून सर्वज्ञात आहेच . आत्ताचे आपल्या देशाची धुरा सांभाळणारे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचेही उदाहरण हे या नशीबासंदर्भात आवर्जून सांगावे वाटते . एक चहाविक्रेता मोठेपणी एवढ्या मोठ्या पदावर केवळ नशीबनेच जाऊ शकतो ....
     " नशीब म्हणजेच एक प्रकारचा आत्मविश्वास ! " 
" नशीब म्हणजे एक स्वतःला सिद्ध करून दाखवून देण्याची एक सुवर्ण संधी ! " 
" नशीब एक ऊन - सावलीचा खेळ ! "
     मी नववीत असताना आम्ही खेडेगावी रहायला आलो होतो . आता खेडे म्हटलं की बालविवाह ह्या पद्धती आल्याच ! बाबा नोकरी करीत असल्यामुळे आम्हांला गावोगाव भ्रमंती करीत शिक्षण घ्यावे लागत होते . पण म्हणतात ना , " संगत गुण की सोबत गुण ! " बाबांना आपल्या या गावी आल्यावर जुन्या व्यसनी मित्रांमुळे जुगार व दारू ह्या व्यसनांचा नाद लागला . ते एवढे आहारी गेले होते की सर्व पगार या व्यसनावर उधळायचे ! माझ्या पाठचा एक भाऊ सातवीत तर दुसरा पाचवीत शिकत होता . आई शेतीकाम करीत एक म्हैसही चारत असे , सोबत दोन - तीन शेळ्याही चारवत असे . अशा नाजूक आर्थिक परिस्थितीत आम्ही कसेबसे दिवस काढत होतो . दोन्ही भावात फक्त एकच शाळेचा गणवेश होता ! शाळा शिफ्टमध्ये असल्यामुळे बाथरूममध्ये जाऊन ते दोघे कपडे बदलून घ्यायचे . सकाळी एक भाऊ हॉटेलात दूध घेऊन विकायचा . पण लहान मुलांना आडून भाव देत असत . तेव्हा तो किनवटमध्ये गल्लो - गल्लीत जाऊन दूध विकायचा . त्या मिळणाऱ्या पैशांवरच आमची शैक्षणिक गरज भागवायचो ! अशातच आईच्या आईने म्हणजे आजीने माझ्यासाठी एक विवाहस्थळ आणले . मला त्या आजीच्या निर्णयाचा खूपच राग आला . मी खूप - खूप रडले . मी दोन दिवस उपवासही केला . पण त्यांच्या निर्णयात काडीमात्र फरक पडला नव्हता . या अशावेळी फक्त माझे व्यसनी बाबांना माझी किव येत होती . तेही रडत म्हणाले , " माझी पोरगी काय एवढी जड झालीय का ? तुम्ही तिचे कोवळ्यापणीच लग्न का लावता ? तिला शिकू द्या ! खूप मोठी होऊ द्या !! " हे बाबांचे वाक्य ऐकून मला माझं हे  " खडतर नशीब " बदलण्याची नवी आशा निर्माण झाली . एक आशेचा किरण दिसू लागला ! आणि मी उद्गवीत होऊन या अन्यायाविरूद्ध पेटून ऊठले . एक  प्रकारची वीजच जणू अंगात संचारली होती . मी एक रणरागिनी बनून आई व आजीवर शाब्दिक तलवार व संविधानाची ढाल घेऊन नशीबाशी युद्ध करण्यास सज्ज झाले .
     मी आई नि आजीला खणकावून सांगितले की , " हे पहा ! मी अजून नाबालक आहे . लग्नासाठी मी काय अठरा वर्ष पूर्ण केले नाही . तुम्ही जर माझ्या लग्नाच्या गोष्टी केल्या तर मी पोलीसांकडे तुम्हां दोघीही विरूद्ध तक्रार करून तुमच्या हातात हातकड्या अडकवून दाखवीन ! " हा माझा असला आक्रमक अवतार पाहून दोघेही घाबरल्या . आजी म्हणू लागली , " माझ्या पांढऱ्या केसाला असा काळा डाग लावू नको ग बाई ! " नि आईलाही वाटू लागले , असे मनाविरूद्ध लग्न करून दिल्यावर जीवाच काहीबाही केले तर लोक काय म्हणतील ? एकूलती एक पोरगी गमावून बसू का ? आणि अशा पद्धतीने मी माझ्या आयुष्यात बालविवाहाच्या स्वरूपात येणारे खडतर जीवन मी अशा दुर्गम व दृढ इच्छाशक्तीने पालटू शकले . त्यावेळी केलेल्या संघर्षामुळेच आज मी स्वतःच्या पायावर आत्मनिर्भरतेने उभी आहे ! हेही एक नशीबाचाच भाग म्हणूनच .....
     म्हणून  " नशीब हा एक जादूगारच " होय ! ते एक सुख - दुःख देणारा एक ऊन - सावलीचाच खेळ होय ! हा खेळ प्रत्येक मानवाने आत्मविश्वासाने खेळून आज ना उद्या जिंकून जगायचं !!

अर्चना दिगांबर गरूड (स.शि.)
मु. पो. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र . 9552954415
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
07) नसिब/दैव 
        जे काही होते ते नसिबामुळे झाले. असे म्हणतो. नसिब म्हणजे काय तर एखादी हवी असलेली गोष्ट झाली नाही तर नसिबामुळेच मिळाले नाही असे म्हणतो. याचे कारण तो आपले दोष आपल्यावर घेत नाही तर नसिबाला देतो व चांगले काम झाले की,स्वतःला श्रेय देतो.  यावरून मानवी स्वभावाचे दर्शन होतो. मानव हा कधीही अपयशाचे खापर इतरावर फोडतो किंवा नसिबावर .
      नसिब म्हणजे निसर्गाने/दैव शक्तीने उपलब्ध करून दिलेली संधी होय. काही व्यक्ती खुप प्रयत्न करतात पण त्यांना यश भेटत नाही तेव्हा म्हणतात आपल्या नसिबातच नाही.  नसिबाची ही एक दुसरी बाजु आहे. एखादा व्यक्ती मोठ्या अपघातातून वाचतो आपण कल्पना ही करू शकत नाही. यालाच म्हणतात दैव शक्ती. नशिब अशी एक बाजू आहे की, मनुष्य प्राणी हा अंबानी यांच्या घरी जन्माला यावे की एखाद्या गरीब झोपडीत.तोंडात सोन्याचा चमचा किंवा स्टीलचा चमचा हे नसिबावरच आहे.  
          बोईनवाड गुणवंत किशनराव 
                 नांदेड
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
08) नशीब

नशिब, दैव, भाग्य, किस्मत, तकदीर, प्रारब्ध, मुकद्दर, लक शब्द वेगळे असले तरी अर्थ मात्र एकच.
मनुष्याच्या चांगली किंवा वाईट कोणतीही घटना घडली की लगेच त्याचा संबंध नाशीबाशी जोडला जातो. जसं देव खरंच आहे की नाही हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. तसेच भाग्य-दुर्भाग्य हा सुद्धा प्रत्येकाचा वैचारिक प्रश्न आहे.
एखाद्याच्या आयुष्यात चांगली घटना घडली की आपण लगेच म्हणतो "किती नशीबवान आहे हा", एखादी वाईट घटना घडली की "किती खराब नशीब आहे याचं". 
थोडक्यात काय तर मनुष्याच्या जडण-घडणीत त्याच्या यश-अपायशामध्ये श्रम, मेहनत, इच्छाशक्ती, आत्मविश्वास या बाबी जश्या कारणीभूत असतात तसंच त्याचे नशीब सुद्धा काही अंशी कारणीभूत असतं हे एका उदाहरणाद्वारे सांगू इच्छितो.
एका व्यक्तीने रस्त्यावर पडलेले दोन दगडं उचलून घरी नेले. त्यातल्या एका दगडाला चांगला आकार देऊन त्याची देवाची मूर्ती तयार केली आणि दुसरा दगड बाहेरच पडू दिला. याठिकाणी दोन्ही दगडांचे कर्तृत्व शून्यच होते परंतु एकाच्या नशिबी हारं-फुलं आले तर दुसऱ्याच्या नशिबात नारळाचे दणकेच आले.
म्हणजे सगळंच नशिबावर सोडून मोकळं व्हावं असाही याचा अर्थ काढू नये. बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या कर्तृत्वाने आणि मेहनतीनेच प्राप्त कराव्या लागतात. त्या मेहनतीला जर नशिबाची साथ मिळाली तर मात्र सोन्याहून पिवळे...!

गणेश सोळुंके (जालना)
8390132085
gnsolunke0092@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
09) खेळ कुणाला दैवाचा कळला ?*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
'खेळ कुणाला दैवाचा कळला ? दैव लेख न कधी कुणा टळला ....'
हे त्रिवार सत्य आहे ...! , 
दैवाचा लेख आजवर कुणाला ही टळलेला नाही . आजवर दैव लेख कुणीही वेळेआधी वाचू शकलं नाही . याला देव सुध्दा अपवाद नाहीत , आपण तर साधारण मनुष्यच आहोत . 
रामायणात एकीकडे श्री रामाच्या राज्यभिषेकाची तयारी तर दुसरीकडे रामाला वनवासात पाठविण्याचा डाव त्यांच्या सावत्र आई ने रचला . आणि लगेच रामाला  वनवासात जावे लागले ..
दैवाचा लेख देवताही बदलू शकले नाही .
प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक रहस्यमय चित्रपट .. आपापल्या चित्रपटाचा प्रत्येक जण मुख्य कलाकार असतो . प्रत्येकजण आपापल्या  जीवनात येणाऱ्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो . जीवनात एक कोडे सोडवत नाही तोपर्यंत दूसरे तयारच असते .. असा रहस्यमय चित्रपटासारखे प्रत्येकाचे आयुष्य असते ..
'पडद्यावरील चित्रपटातील नायक नायिकेला चित्रपटाची कहाणी माहित असते.' पण प्रत्यक्ष जीवनातील भूमिका करणार्या नायक नायिकेला आपल्या जीवनाची कहाणी वेळेआधी माहित नसते .
मनुष्य जन्माला यायच्या आधीच तर
त्याचं जीवनरुपी रहस्यमय पुस्तकात दैव लेख लिहून ठेवले असतात . त्यातील काही लेख सुखाचे , काही दुःखाचे, काही आनंदाचे तर काही लेख संघर्षाचे असतात . त्यातील प्रत्येक भाग म्हणजे हिशोब असतो आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचा आणि ऋणानुबंध असतो  नात्यांचा ..  कर्माचे फळ आणि नात्यातील ऋणानुबंध कोणालाही चुकत नाही ... मग ते नाते कोणतेही असो ...
प्रत्येकाच्या आयुष्याच्या पुस्तकातील पाठ निरनिराळे असतात ... आणि त्यानुसार प्रत्येकाच्या परीक्षा वेगवेगळ्या असतात . म्हणून तिथं कोणी कोणाचीही नक्कल करून शकत नाही .. ज्याची त्याची परिक्षा ज्याला त्यालाच द्यावी लागते.
एकाच आईच्या कुशीतून एकाच वेळी जन्मलेले दोन जुळ्या बालकांचे भाग्य निरनिराळे असते .. 
प्रत्येकाचे कर्म बंधन निरनिराळे असतात . कुणाच्या दैवामध्ये  दुःखाचे क्षण जास्त तर कोणाच्या दैवामध्ये सुखाचे क्षण जास्त ! 
आपण सर्वत्र पाहतो एकाच घरातील भावंडे एक इंजिनिअर, एक वकील, एक शिक्षक तर एक शेतकरी . सर्वच आई-वडील आपल्या सर्वच पाल्यांना सारखेच संस्कार आणि सारखेच पालनपोषण करतात . पण प्रत्येकाला आपापले कर्मफळ खेचत असते .जिथे आपले ऋणानुबंध कर्मफळानुसार लिहलेले असतात . तिकडेच आपला कार्यभाग नेमलेला असतो .
प्रत्येक मूल त्याच्या दैव लेखाप्रमाणे घडत असते .
कुठं दैव साथ देत तर कुठं दैव पाठ फिरवतं ... कुणाला सर्वच गोष्टी सहज प्राप्त होतात तर कुणाच्या हातात येऊन निसटून जातात ..
एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षा असते दैवा कडून परिक्षेत ८० टक्के मार्क मिळतील , आणि त्याला ९० टक्के मार्क पडतात .. आणि एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षा असते ९० टक्के मार्क मिळतील पण त्याला पडतात ८० टक्केच ! यातील एक जण खुश होतो आणि एक जण दैवाला दोष देत रहातो .
"कुणी दैवावर खुश असतं तर कुणी दैवाला आयुष्यभर दोष देत राहतं .."
   तसं पाहिलं तर सुखदुःख हा खेळ असतो आपल्या मनातील विचारांचा .. दैवावर आणि एकमेकांवर ठेवलेल्या अपेक्षांचा ...
आयुष्यातील घडणाऱ्या घटनांना आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर आपलं सुखदुःख अवलंबून असते . कुठल्याही घटने कडे अथवा परिस्थिती कडे आपण जर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला दुःख होईल आणि जर आयुष्यात प्रत्येक घटने कडे पहायचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर आपण दुःखी न होता त्यातून सहज मार्ग काढू शकतो ..
गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले आहे "जे होते ते चांगल्यासाठीच "! 
अपेक्षा ठेवायच्या असतील तर फक्त आपल्या मेहनतीवर आणि विश्र्वास ठेवायचा तो आपल्या कर्मांवर ! 
प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ आपला दैव लेख लिहीत असते ..
भगवंताचे गीतेमधले बोल आहेत "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सग्डोऽस्त्वकर्माणि।।
➖➖➖➖➖➖➖
✍🏻 सौ सुवर्णा सोनावणे 
चाळीसगाव
७७४४८८००८७
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
10) नशीब

मनुष्य हा स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे असं म्हणतात. आपल्या नशिबाला
योग्य आकार देणे हे कार्य मानवाच्या शक्ती बाहेरचे नाही.  जर मनुष्याने ठरवले तर तो  करू शकतो. जर नाही ठरवले तर तो निष्क्रिय राहू शकतो, अथवा काहीच करू शकत नाही. मानवाला स्वतःचे भाग्य स्वतः उज्वल करायचे असेल तर त्याने आपल्या चारित्र्याचा, वर्तनाचा आपल्या हातून घडून येत असलेल्या कार्याचा आधार घ्यावा, नशिबाचा नवे. असं म्हणतात माणसाच्या मनगटातील ताकद संपली की तो नशिबाला दोष देत बसतो.   परंतु हे योग्य नाही. मनुष्य हा स्वतःच्या भाग्याचा स्वतः शिल्पकार आहे. मग नशिबाला दोष का बर द्यावे?
एखादा मनुष्य अडचणीत असला किंवा संकटात असला तर त्या मनुष्याला साथ देण्याचे धाडस अपवादात्मक सोडून इतर कोणी करत नाही. अंधारात त्याची पडछाया सुद्धा त्याची साथ सोडून देते, त्याचप्रमाणे एखादा माणूस दूर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या मनुष्याचे पण त्याचे आप्तेष्टपण साथ सोडून देतात. आपले दैव हे समुद्राप्रमाणे खोल आणि विस्तृत आहे, पण आपल्या कर्तबगारीची  भांडीच लहान आहेत.  माणसाची कर्तबगारी अपुरी असली तर तर त्याचा उपयोग होत नाही. आपलं नशीब आपल्या सोबत हवं असेल तर आपली कर्तबगारी मोठी असायला हवी. कारण आपलं नशीब कर्तबगारीने वाढत असते, महानता प्राप्त होते. नशीब रज:कणाचा पर्वत बिंदूचा सिंधू बनवू शकतो. असे महान कन्फ्युशिअसने म्हटले आहे. याचा अर्थ असा की एखादा रज: कण सुद्धा पर्वताच्या छोट्याशा बिंदूच्या सिंधूत रूपांतर करू शकतो. कारण मनुष्य ठरवेल तर सर्व काही होत असते. आपणच आपल्या स्वतःच्या भाग्याचे शिल्पकार व्हायचे असेल तर आपल्या कर्मातील दोष जाणुन घेणे आवश्यक आहे. संकटात , अडचणीत सापडलेला   मनुष्य आपल्या दैवाला दोष देतो; परंतु स्वतःच्या कर्माचे दोष तो  जाणून घेत नाही. आपले दोष आपल्यातील उणीवा आपणच शोधून काढल्या पाहिजे व ते दूर केले पाहिजे. तरच आपण आपल्या  भाग्याचे शिल्पकार होऊ. आपल्याला स्वतःला जिंकायचे असेल तर या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे तरच आपण स्वतःला जिंकू शकतो. मग आपल्या सारखा दुसरा नशीबवान कोणी नाही असं समजायला हरकत नाही. माणसाच्या अंगी भेकडपणा असू नये. माणूस हा दैवावर विश्वास ठेवून राहतो. म्हणजे हा केवळ भेकडपणा आहे.माणसाच्या अंगी  धाडशी प्रवृत्ती असणे आवश्यक आहे. कारण धाडसी लोकांना नशीब साथ देत असते. असे म्हणायला वावगे होणार नाही. 
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
11) नशीब नावाची गोष्ट....
  
     डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
 
  जीवन एक रणसंग्राम आहे....अनेक सुख दुःखाच्या प्रसंगांना यात सामोरे जावे लागते.कोणत्याही प्रसंगात तोंडातून सहज शब्द बाहेर पडतो...'शेवटी नशीब'
    अगदी भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनीही 'नशीब से ज्यादा और समय से पेहेले किसीं को कुछ नही मिलता...।' असा उल्लेख केलेला पाहायला मिळतो.खरे तर कोणतीही व्यक्ती आस्तिक असो वा नास्तिक सगळ्यांच्या तोंडी 'नशीब'हा शब्द ऐकायला मिळतोच....!!मग कुणी त्याला 'दैव',कुणी भाग्य तर कोणी 'सटवाई'ची रेषा म्हणतं...
  मी लहान असताना कुणाच्या तरी पाचवीला जात असताना आईने सांगितलं होतं...'पाचवीच्या दिवशी पाटा पूजल्यानंतर रात्री सटवाई येऊन त्या लहान बाळाचं नशीब लिहून जाते'ते ऐकल्यानंतर मला खूप नवल वाटे...!मी त्या रात्री हमखास खूप वेळ जागे राहून सटवाई कुठं दिसते का त्याचा कानोसा घेत असे....कुठं थोडं 'खुट्ट' जरी झालं तरी 'सटवाई'आली असं वाटायचं..! सकाळी आईला विचारल्यावर आई म्हणायची ...'देव-देवता'कुठं दिसतात होय...' माझ्या मनात असे अनेक प्रश्न पडायचे..
   पुढे थोडं मोठं झाल्यावर नशिबाचा खरा अर्थ समजायला लागला!!पुढे वाचन व्यासंग वाढला आणि 'माणसाचं नशिब त्याच्या मनगटात असतं' हे कळायला लागलं...!! तरी सुद्धा जेव्हा सर्व प्रयत्न करून आपण हात टेकतो आणि सहजच तोंडातून शब्द बाहेर पडतो....'आता सारं काही दैवाच्या हाती..'
    खरोखर जीवनात असे अनेक प्रसंग येतात की ,एखादी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट,महत प्रयास करून थकून आशा सोडलेली असते आणि अचानक अशी काही दैव गती येते आणि ती अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडून जाते....किंवा कधी कधी आता 'ही'गोष्ट प्राप्त होणार असं वाटत असतानाच एखाद्या अवखळ फुलपाखरा प्रमाणे ती हाता तोंडाशी आलेली गोष्ट क्षणात दूर निघून जाते....मला वाटतं अशा 'दैवाचा'प्रत्येकाने कधी न कधी तरी अनुभूती घेतलीच असेल....कदाचित प्रत्येक जण याला वेगवेगळ्या नावाने जरी हाक मारीत असला तरी 'नशीब...नशीब'! म्हणजे ते हेच असावं!!
  'जो दैवावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला..'हे वाक्य जरी खरे असले तरीही कोणत्याही प्रयत्नांना जर दैवाची साथ नसली तर ये कार्य पूर्णत्वास जाईलच याची खात्री नसते.तसे पाहिले तर 99.99टक्के प्रयत्न आणि 0.01 टक्के दैवाचा भाग हा प्रत्येक कृतीत आणि प्रसंगात दिसून येतोच.... मला तर वाटते 99.99टक्के प्रयत्नांना 0.01भाग बऱ्याचदा भारी पडतो.नाहीतर एखाद्या भीषण अपघात गाडीचा चक्काचुर होतो पण आतील प्रवाशांना साधं 'खरचटलं' देखील जात नाही ....डॉक्टरांसह सर्वांनीच आशा सोडलेली व्यक्ती खणखणीत बरी होऊन घरी परतून आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत करायला लागून पुढे अनेक वर्षे आरोग्यमय जीवन जगते ...ह्या साऱ्या गोष्टी 'दैव' किंवा नशिबाचाच भाग नाही का???
    आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे.प्रत्येक गोष्ट आपण बुद्धीच्या कसोटीवर घासून,सुलाखून तपासून पाहूनच विश्वास ठेवायला हवा हे जरी खरे असली तरी...प्रयत्नांच्या जोडीला दैवाची साथ नसेल तर केलेली मेहनत वाया जायलाही वेळ लागत नाही.'याची देही याची डोळा ,पाही मुक्तीचा सोहळा'असं संत वचन  आहे.त्याच प्रमाणे 'राजाचा रंक ,आणि रंकाचा राजा....'झालेली अनेक उदाहरणं पहिली की सहजच तोंडातून शब्द बाहेर पडतात..... सारा काही 'नशिबाचा खेळ आहे'!!
*शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा  इतकं प्रसन्न जगलं तर ...?* कदाचित

खेळ कुणाला दैवाचा कळला?
दैवलेख ना कधी कुणा टळला!
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो!!' असं म्हणण्याची वेळ येणार नाही..!!

      डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
12) नशीब  लागत
     आयुष्यात प्रेम मिळायला
           नशीब  लागत
    जगात माणसं कमवायला 
         नशीबच  तुम्हाला 
    मातीतून उचलून राजा बनवते,
         नशीबच भल्या भल्यांना,
     धनाढ्यांना धुळीत मिळवते.

     नशीब, भाग्य ,प्राक्तन, दैव असे किती अगणित नावे , आज आपण एका अगोचर आणि अगम्य विषयावर भाष्य करणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्यात काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. कधी कधी तर ही उत्सुकता इतकी शिगेला पोहोचते की माणूस त्याच्या करीता भरपूर खर्च ही करतो. काही लोक तर कित्येक वेगवेगळ्या ज्योतिषाचे उंबरठे झिजवत असतात. काही लोकांना प्रत्येक समस्येचे उत्तर ज्योतिषशास्त्रातच शोधायची सवय असते.
        असे का? माणसा भवितव्य जाणून घेण्याची एवढी धडपड का?  त्याचे सर्वात महत्वाचे मनोवैज्ञानिक कारण म्हणजे . माणसाच्या मनात असलेली अनामिक भिती. माणसाला अनिश्चिततेची, अनामिक गोष्टींची आत्यंतिक भिती वाटते. विशेषतः जेव्हा नशिबाचे फासे उलटे पडत असतात तेव्हा सकारात्मक भविष्य त्यांना मानसिक आधार देते म्हणून त्यांना आपले भवितव्य जाणून घ्यायचे असते. एवढेच नव्हे तर काहींना खात्री करून हवी असते म्हणून ते वेग वेगळ्या ज्योतिषाला भेटत असतात. काहीजण  शॉर्टकट म्हणुन  नशीबाचा आधार घेतात.

        एकाधा व्यक्तीला सतत यश मिळाले, सर्व काही मना सारखे घडून आले तर त्याला  भाग्यशाली अहे, पुर्वजन्माची पुण्याई आहे, नशिबाची साथ आहे असेही म्हणतात. तसेच उभे आयुष्य नुसत्या दुःख यातना सोसणाऱ्याना कमनशिबी म्हटले जाते .
  आमचे एक स्नेही होते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा दांडगा अभ्यास होता. ते सरकारी अधिकारी होते. पण त्याचे वर्तविलेली कित्येक भविष्यवाणी सत्य ठरायची.   पण मी आश्चर्यचकीत झाले जेव्हा त्यांची स्वतःच्या आजारा विषयीची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. त्याना पोटाचा  केंसर चवथ्या स्टेज असताना,निदान झाले , डाॅक्टरांच्या मते सहा ते आठ महिनाच्या वर आयुष्य नाही. मी त्यांना किमोथेरपी शुरू केली . त्यानी मला अगदी छाती ठोकपणे सांगितले माझा मृत्यू केंसरने होणार नाही. मी काही बोलले नाही  सहा महिन्याच्या किमोथेरपी नंतर त्याचा केंसर पूर्ण बरा झाला  आणि तब्बल चौदा वर्ष ते जगले.
    मला मात्र प्रारब्ध की पुरुषार्थ ह्याचे कोडे पडायचे. वर्तमान  जीवनात घडणाऱ्या घटना पुर्वजन्माचे कर्मफळ आहेत ,तर  आपल्या प्रयत्न, कर्तबगारीला काहीच अर्थ नाही. आता मात्र हे कोडे काही अंशी सुटले,आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचण, घटना ,दुर्घटनेने गांगरून न जाता त्याचा सर्व शक्तीने सामना करायचा असतो त्यातून बोधपाठ घ्यायचा असतो. त्या चुका परत होणार नाही याची दक्षता घ्यायची असते. मी नशिबाला मानतच नाही असे नव्हे,  ज्योतिषशास्त्र एक शास्त्र जरी असले तरी आजच्या गल्लाभरू ज्योतिषाच्या ज्ञाना विषयी कसलीच खात्री देता येत नाही. त्यावर विसंबून राहणे मला पटत नाही. गाईडलाईन म्हणून त्याचा कडे पाहणे जास्त योग्य असे माझे मत आहे.
डाॅ.वर्षा सगदेव
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
13) नशीब 
"खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो, तू असो, हा असो, कुणी असो"
 गाणं आठवलं मला एकदम. खरंच आपल्या हाती काही नाही. पुढच्या क्षणी काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. फक्त नशीब बलवत्तर असून चालत नाही. प्रयत्नांची पराकाष्टा पण करावी लागते त्याला. 
खूप यश मिळाले की आपण सहज म्हणतो नशीबवान आहे हा. तर दुसऱ्या बाजूला एखाद्याचं लवकर लग्न जमत नसेल किंवा काही वाईट झालं तर आपण कम नशिब्याचं लेबल लावून रिकामं होतो. असं जरी असलं तरी जसं होईल तसं होईल असं म्हणण्याला काहीच अर्थ नसतो. माझ्या नशिबात हे नाही कदाचित असं म्हणून एखाद्या गोष्टीची आस सोडून देऊन प्रयत्न करणे सोडून देणे हे चुकीचे आहे. म्हणतात ना 'प्रयत्नांती परमेश्वर'. नशिबाची साथ असावी लागते हे जरी बरोबर असले तरी फक्त नशिबावर अवलंबून राहणे नको. पूर्वीच्या काळी नव्हे आजही काही भागांमध्ये एखाद्या कुटुंबात मुलगी जन्मली की पांढऱ्या पायाची म्हणजेच कम नशिबी असं म्हटलं जातं स्त्रीला. हे तिच्या हातात थोडंच असतं. पुढे काय होणार, कसं होणार हे आधीच माहिती असतं तर काय मजाच नसती जगण्यामध्ये. एखाद्याचं चांगलं होणं म्हणजे खूप नशीबवान असे नाही. त्यामागे अतोनात कष्ट असतात. समजा एखाद्याचा अपघात झाला आणि तो थोडक्यात वाचला. तर तोही नशीबवानच नाही का? नशिबाची व्याख्या प्रत्येक जण आपल्या परीने करतो. हाताची पाचही बोटं सारखी नसतात. तसेच एकाच माईच्या लेकरांचे नशीब सुद्धा सारखे नसते. कोण खूप हुशार असूनही थोड्या पगारावर आयुष्यभर काम करतो आणि कोणाचे नशीब कधी एकदम अल्लादिन च्या जादुई दिव्याच्या जादू प्रमाणे फळफळेल काही सांगता येत नाही.कधी राजा होईल आणि कधी भिकारी होईल  तो काही सांगता येत नाही. 
शेजारची रमा कंपनीत बरीच वर्षें खूप मोठ्या पोस्टवर  होती. सगळेजण तिची वाहवा करत होते. पण काही वर्षांनी काय झाले कोणास ठाऊक कंपनीने तिला घरचा रस्ता दाखवला आता यात दोष कुणाचा? नशिबाचा....????

प्रिती दबडे,पुणे
9326822998
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
14) नशीब
    आजचा विषय खंरच खुप छान आहे.पण विषय हि खूप खोल आहे. मी नशिबावर विश्वास ठेवते.पण त्या सोबतच कर्मावर जास्त विश्वास ‌आहे माझा . काही प्रमानामध्ये नशिब हे कर्मावरही अवलंबून असते. असं म्हनतात एखाद्या व्यक्तीने या जन्मात चांगले कर्म केले तरी त्याला दुंख का? तर संचित, प्रारब्ध आणि क्रियमान या तत्त्वावर मानुस जिवन जगत असतो.जरी आपण या जन्मात चांगले कर्म केले तरीसुद्धा मागच्या जन्माचे भोग आपल्या वाट्याला येतात आणि ते भोगुन द्यावे लागतात. हे जरी बरोबर असले तरी आपल्या हातातही बरेच काही आहे. परीक्षेत नापास झाल्यावर जर आपण म्हटले की माझ्या नशिबात च पास होने नव्हते तर हे चूक होईल कारनं आपण अभ्यासात कुठेतरी कमी पडलो आणि त्याचे फळ मिळायचे ते मिळाले. पण जेव्हा दोन विद्यार्थ्यांन मध्ये एक, दोन गुणांची स्पर्धा होते तेव्हा मात्र जो पुढे जातो त्याचे नशिबच म्हणावे लागेल.खुप अश्या गोष्टी आहे की त्या बरेचदा आपल्या हातात नसतात. दवाखान्यात डॉ बरेच प्रयत्न करतो पेशेंटला वाचवायचे पण शेवटी तो हि देवा वर व नशिबावर सोडून देतो. बरेचदा दारू पिऊन गाडी चालवताना माणसं मरतात आणि लोक म्हणतात त्याच मरण आलं  तो मेला. पण हे चूकीचे आहे. आध्यात्मा मध्ये मृत्यू चे तीन प्रकार सांगितले आहे. एक आध्यात्मिक मृत्यू , दुसरा आदिदैविक आणि तिसरा आधिभौतिक. पहिल्या मृत्यू हा कशानेच टळत नाही उदा.कृष्णासमक्ष अभिमन्यू रणांगणावर मृत्यू मुखी पडला पण कृष्ण नाही वाचु शकला,आता दुसरा प्रकार बघा हा आहे आदिदैविक उदा.जर एखादा व्यक्ती मरणाच्या दारात असेल आणि त्याच्या साठी श्रध्देने नवस केला असेल तर तो वाचू शकतो पण तितकी ताकद त्या श्रध्देत असावि लागते. आता तिसरा प्रकार बघा.हा आधिभौतिक आहे या मध्ये कुपथ्यांने  मनुष्य मरनाच्या दारात‌उभा राहतो जर त्याने आजारात कुठले पथ्यच पाळने नाही तर रोगी दगावतो पण इथे औषध देनारा वैद्य जर तज्ञ असेल तर रोगी या संकटातून बाहेर पडतो.म्हणजे आम्हाला या सगळ्या गोष्टी वर डोळसपणे विचार करावा लागेल. नशीबाच्या पुढे माणसाला काहीच करता येत नाही . एकदा माझ्या एका मैत्रिने मला मोठ्या दिमाखात म्हटले बघ हिंगमिरे मी इतकी संपत्ती जमा करून ठेवली की तीन पिढ्या घरी बसून खाऊ शकेल . मी शांतपणे हसली आणि ती संपत्ती गोळा करने तुझ्या हातात आहे पण पिढी तयार करने त्या परमेश्वराच्या हातात आहे ती जरा कचरली. मित्रांनो शेतकरी शेत नांगरतो ,बि बियाणे आणतो पण पाणि पाडने त्या परमेश्वराच्या हातात आहे. उन्हाळ्यात जमिनी उताण्या पडतात पण जेव्हा पाऊस पडतो तेंव्हा शेतकरी  आपले कर्तुत्व दाखवू शकतो. म्हणजे नशिब हे महत्त्वाचे आहे. परमेश्र्वराच्या कृपेने निव्वळ खडकास झरे फुटतात. याला नशिब नाही तर काय  म्हणायचे?


सौ मेघा विनोद हिंगमिरे.शिक्षिका भारत विघालय वेळा. त हिंगणघाट जि.वर्धा.
7798159828
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
15) नशीब

अहो ऐकल का शेजारच्या वसुधा आणि शशांकने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर  स्विफ्ट कार आणली 
सगळ्यांना पेढे वाटत आहेत.सहा महिन्यापूर्वीच आलेत रहायला शेजारी नवीन बंगल्यात  काय बाई लक्ष्मी पाणी भरते आहे त्यांच्या घरी नशीबवान आहेत
दोघेही असे म्हणत सुमन अशोकला नाश्त्याला वाढत होती,
अशोक ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होता आज अशोकला त्याच्या प्रमोशनची बातमी कळणार होती नाष्टा करता करता अशोक म्हणाला अग त्यांना काहीआपल्यासारख्या
जबाबदाऱ्या नाहीत आपल्या दोन्ही मुलांची शिक्षण झाली, घराचे कर्ज अजून फेडतोय
मला ना आई वडिलांची प्रॉपर्टी ना लग्नात हुंडा मिळाला ना कमावती बायको मी तर कमनशिबी आहे, हे ऐकल्याबरोबर सुमन संतापली
अहो लग्नाआधी नोकरीला होते मी म्हणूनच तुम्ही लग्नाला होकार दिला होता विसरलात का तुमची आई आजारी होती वडील थकलेले म्हणून चांगली नोकरी सोडावी लागली मला त्यांच्या सेवेसाठी कमनशिबी तर मी आहे असलं घर मिळालं मला नुसतं राब राब राबते पण कदर नाही तुम्हाला.दोघांचा आवाज ऐकून अशोकचे वडील पेपरची घडी घालत बोलू लागले अरे कोणकोण आहे कमनशिबी या घरात .अरे मी तर नशीबवान आहे कर्तृत्ववान मुलगा आहे, कर्तव्यदक्ष सून आहे, आयुष्यभर न कुरकुरता साथ देणारी माझी म्हातारी बायको आहे आणी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी नात आणि नातू आहेत आणखी कोणी आहे का नशीबवान माझ्यासारखा? तेवढ्यात अशोकची आई म्हणाली मीदेखील नशीबवान आहे बर का
निर्व्यसनी मुलगा आहे,खंबीरपणे घर सांभाळणारी सून आहे. अभ्यासात  सदैव पुढे असणारी नातवंड आहेत माझ्या नशिबाचा तर कुणालाही हेवा वाटेल .हे सर्व ऐकून अशोक आणि सुमन विरघळले अशोक आई बाबांचे दर्शन घेऊन ऑफिसला निघाला
सुमनने सासू सासऱ्यांना नाष्टा वाढला व स्वतःला ही वाढून घेतले.
अशा प्रकारचे संवाद आपण आपल्या शेजारी ,घरात,  कामाच्या ठिकाणी नेहमीच ऐकतो
कुणाला मनासारखे शिक्षण घेता येत नाही कुणाला स्वतःचे घर घेता येत नाही कुणाला अनाथ म्हणून आई वडिलांचे प्रेम मिळत नाही कुणाला मुले असून वृद्धाश्रमात रहावे लागते आणि यासाठी सर्व आपल्या किंवा दुसऱ्यांच्या नशिबाला दोष देतात.
एडिसन या शारत्रज्ञाने हजार वेळा प्रयत्न केले आणि बल्पचा शोध लागला नशिबाला दोष देत बसला असता तर हे संशोधन करू शकला असता का? सिंधताई सपकाळ या नशिबाला दोष देत बसल्या असत्या तर आज शेकडो अनाथांच्या आई त्या झाल्या असत्या का?अनाथाश्रमला उत्पन्नाचे कोणते साधन असते सांगा पण न डगमगता मी आई आहे या अनाथ लेकराची  जबाबदरी आहे या सर्वांची माझ्यावर असे म्हणत ठिकठिकाणी जाऊन आपल्या वाणीच्या  सामर्थ्याने आणि मुलांसाठी मला जगायचे आहे या विश्वासावर माई जगभरातून मदत गोळा करते आहे आणि मुलांना सांभाळत आहे.
काय आहे नशीब ?नशीबाने कर्तबगारी ठरते का ?यश अपयश नशिबावर आहे का ?ज्योतिषी हात पाहुन नशिबाचे वार्तांकन करतात ते खरेच असते का
मनुष्याच्या श्रमाला कर्तव्यनिष्ठेला मग काहीच अर्थ नाही का?
निसर्गात ज्या वस्तूची निर्मिती होते तिचा अंतही होतो,  प्राणी वनस्पती ,पशु यांचे प्रत्येकाचे आयुर्मान ठराविक असतेच,पेराल तसे उगवते जसे कष्ट तसे फळ
जसे विचार तसे आचरण घडते 
काम, क्रोध, मद, मोह,मत्सर यामुळे मनुश्याकडून काही  सतकर्मे तर काही दुषकर्मे
घडतात त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात ज्याचा स्वतःच्या सत्कर्मा वर विश्वास आहे तो नशिबाला दोषही देत नाही आणि श्रेयही देत नाही .ज्यांचा स्वतःच्या
सत्कर्मावर विश्वास नाही तेच नशिबाला दोष देण्यात व्यर्थ आयुष्य घालवतात.
एखाद्या व्यक्तीस यश मिळाले तर तो त्याचे श्रेय त्याच्या प्रयत्नांनां
देतो आणि अपयशी ठरला तर पुन्हा प्रयत्न करतो आपल्या अपयशाचे खापर इतरांवर किंवा नशिबावर फोडत नाही याचाच अर्थ विवेकबुद्धी जागृत आहे.
अशाच व्यक्ती इतिहास घडवतात
याचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.आज त्यांचे विचार व आयुष्य आपणासाठी प्रेरणादायी आहे.नशिबावर विश्वास ठेऊन कोणतेही निर्णय त्यांनी घेतले नाहीत अथवा बदलले नाही. 
तुम्हालाही यशस्वी व्हायचंय ,आंनदी जीवन जगायचंय मग विश्वास ठेवा सत्य,सेवा, कर्तव्य ,प्रामाणिकपणा, खडतर श्रम यावर मग नाही तुम्ही विसंबुन राहणार नशिबावर. 

सविता वि साळुंके
salunkesavita42@gmail.com
श्रीरामपूर
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
16) नशीब:मेहनतीच्या झाडाला आलेली फळं...

  "पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांच्या,
 नशिबात असते सर्व काही..
जोड हवी मेहनतीची,
अन्यथा फळ नाही"

     मनुष्य जन्मतःच विशिष्ट गुण, कलाकौशल्य घेऊन येत असतो यात काहीही शंका नाही पण उज्वल नशीबच घेऊन येतो या बाबीवर अजिबात विश्वास नाही.आज जगात हातावरच्या रेषा बघून कार्य करणारे भरपूर आहेत.ज्यांना हात नाही अशा ही लोकांचे 'नशीब' असतेच की,म्हणजेच आपण एखाद्याविषयी बोलतांना सर्रास बोलून जातो की,त्याचं नशीबचं चांगलं होतं म्हणून तो एवढ्या मोठ्या हुद्द्यावर जाऊन पोहचला.नशीब हे प्रयत्नवादी व दैववादी असे त्याचे प्रकार बघावयास मिळते.'प्रयत्नांती परमेश्वर' म्हणजे सतत नदीच्या पाण्याच्या प्रवाहासारखे प्रयत्न करीत राहणाऱ्या व्यक्तीचे नशीब नक्कीच उजळून निघते कारण त्याच्या प्रयत्नाला,मेहनतीला विश्वासाची जोड असते म्हणून केवळ नशीब माझे उज्वल आहे म्हणून काहीही करत नसेल तर नशीब साथ कसे देईल???हे एक न उलघडणारे कोडंच आहे ना!!!

       समाजातील,गावातील,शहरातील,चित्रपट,औद्योगिक,राजकारण या सर्व क्षेत्रातील एखादी दिग्गज किंवा सामान्य व्यक्तीचे देखील निधन झाले तर म्हणतो की,त्याचे नशीबच ठेवढं होतं.. जन्माला आल्याक्षणी नशीब घेऊन जन्माला येत नाही तर त्याच्या कर्तृत्वाला खूप महत्व आहे.मागील दोन दिवसात चित्रपट क्षेत्रातील दोन तारे निखळले त्यांचे नशीबच तेवढं होतं असं आपण म्हणतो पण त्यांच्या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही.अभिनेता स्व.इरफान खान दुर्धर कॅन्सर सारख्या रोगाशी दोन वर्षांपासून लढा देत होते.आज सकाळी-सकाळी वाईट बातमी कानी ऐकू आली की,ऋषी कपूर देखील काळाच्या पडद्याआड गेले आहेत.याबाबतीत मला असं वाटतं की,मृत्यू आणि नशीब यांचा काहीही संबंध नसतो.आज भारतासह जगात नशिबाला दोष देतात.माझं नशीबच फुटकं आहे.एखादी दुःखद गोष्ट जीवनात आली की त्याचा थेट संबंध जोडण्याची क्रिया आपण करीत असतो.

      भरपूर जण बोलतात की,त्याच्या नशिबाच्या रेषा खूप उज्वल आहे तर तोच व्यक्ती परीक्षा न देता पास होऊ शकतो का?? नाही ना!! त्याला परीक्षा द्यावीच लागते.परीक्षा देण्यासाठी मेहनत करावी लागते.'देगा हरी पलंगावरी, मी नाही जात कोणाच्या घरी' असं म्हटल्याने त्याला नशीब साथ देणार आहे का??नाही ना!!त्यासाठी कठोर मेहनत आवश्यक आहे तेव्हाच आपलं नशीब उजळू शकते अन्यथा जसे आहेत तसेच राहावं लागेल.आपल्या कार्याने,कर्तृत्वाने,मेहनतीने आपले नशीब उजळून टाकू शकतो हा उदात्त आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.'मेहनतीशिवाय फळ नाही' हेच सिद्ध होते.

         आज आपल्या अवतीभोवती ज्योतिषावर विश्वास ठेवणारे दैववादी भरपूर आहेत.काही भोंदूबाबा खोटे-नाटे सांगून लुबाळून जातात.तुमच्या आयुष्यात राहू,केतू,शनी आहे त्यामुळे मनुष्य प्राणी खूप भित्रा आहे त्यांचं सांगितलेलं योग्य असेल म्हणून लगेच विश्वास ठेवतो नि सांगितलेले प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो.हातात अंगठ्या,गळ्यात ताईत, अंगारा घेणे,तीर्थयात्रा करणे यासारख्या अनेक बाबी करून नशीब उजळविण्याचा प्रयत्न करीत असतो पण जर या सर्व बाबीला मेहनतीची जोड नसेल तर 'पालथ्या घागरीवर पाणीच' आहे. कधी कधी तुम्ही गावात जिलेबी वाटा मग तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल अशा अनेक व्यक्ती नशीबाची साथ मिळण्याकरिता करीत असतो पण या सर्व गोष्टी दैववादी आहेत.श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.केवळ नशीब नशीब म्हणत कपाळावर हात ठेवून राहणे म्हणजे स्वतःच स्वतःच्या अधोगतीला सामोरे जाणे होय.

       मनुष्य जीवन जगत असतांना विविध समस्येला तोंड देत जगावे लागते त्यावेळी आपसूकच आपल्या तोंडातून शब्द फुटतो की,माझं नशीब मला साथ देत नाही.आज वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व त्यांच्या नशीबामुळे उभे नाहीत तर त्यांच्या मेहनतीच्या बळावर,विचार कौशल्यावर,संघटन वृत्तीवर,स्वभावावर अवलंबून आहे.उदा.अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कृष्णवर्णीय असून देखील त्या पदापर्यत पोहचले त्यांचे नशीब नसून मेहनतीचे फळ आहे,अनेक वर्षाची साधना आहे तसेच आपल्या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चहा विक्रेते यांचे सुपुत्र असून नशिबाने उच्च पदावर नाही तर कठोर मेहनतीच्या बळावर सर्वोच्च स्थानी पोहचू शकतो हे सिद्ध करून दाखविले आहे. कोणाच्याही नशिबात अगोदरच विधिलिखित नसते अचानक एखाद्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की त्याचं पाण्यात बुडून मरण्याचेच नशीब होतं असं म्हटल्या जाते पण योग्य नाहीच.यश मिळणे म्हणजे नशीब नव्हेच तर त्याच्या मागे मेहनतीचे अपार कष्ट आहे हे विसरता कामा नये.नशीब हे मेहनतीच्या झाडाला लागलेले फळ आहे असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही.

"हातावरच्या रेषा बघणारे नकोत तर हाताच्या रेषा मेहनतीने बदलविणारेच जीवनात यशस्वी होतात."

✒श्री दुशांत बाबुराव निमकर
      चक फुटाणा, चंद्रपूर
ई-मेल:dushantnimkar15@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
17)         दैव : प्रयत्नांती परमेश्वर


       ' नशिबात जे असेल ते होईल. आता देवावर हवाला.' असे मी माझ्या आजारी वडिलांजवळ बसून म्हंटले. होती तेवढी सगळी ट्रीटमेंट देऊन झाली होती. पण परिणाम शून्य होता. ही परिस्थिती बदलणे शक्य नव्हते. मग कुठेतरी आपण हतबल होतो. आणि दैववादी बनून शांत बसून राहतो.

        त्या दिवशी माझा भाऊ माझ्याकडे येणार होता. कामाच्या व्यापामुळे त्याला येणे जमत नसे. एकटाच येणार म्हणून तो एस.टी.ने येणार होता. मी त्याची अगदी आतुरतेने वाट बघत होते. घड्याळाचे काटे लवकर हालत नव्हते, असे मला वाटत होते. वेळ जात नसल्यामुळे मी टीव्ही लावला. मराठी न्यूज चॅनल लावला. संवादक शिरा ताणून ताणून बोलत होता. तो एका नुकत्याच घडलेल्या एस.टी.च्या अपघाताबद्दल सांगत होता. माझे कान टवकारले गेले. तो सांगत असलेली वेळ, कुठे जाणारी गाडी, मार्ग सगळे अगदी तंतोतंत माझा भाऊ ज्या एस.टी.ने येणार होता त्याच्याशी जुळत होते. आणि माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. एस.टी. दरीत कोसळल्यामुळे त्यातून कोणीही  वाचण्याची शक्यता नव्हती.  माझा तोंडाला कोरड पडली होती. हात पाय कापत होते. तसाच मी भावाला फोन लावला. फोन वर त्याचा आवाज ऐकून माझ्या जीवात जीव आला. तो म्हणत होता, "अगं, 'नशीब बलवत्तर' म्हणूनच आज माझी बस चुकली. नाही तर, खरे मी त्या बसमध्ये असायचो. आज घड्याळाचा गजर न झाल्यामुळे मी उशिरा उठलो. त्यामुळे बस चुकली. आता ह्याला दैव नाही तर काय म्हणायचे?

         सीतेचे वडील मिथिला पती जनक, तेही राजघराणे. अयोध्येचा राजा दशरथ त्याचा पुत्र राम व सून सीता . यांच्या राज्याभिषेकाची वेळ येऊन ठेपली होती. पण कैकयीच्या एका वराने ती वेळ चौदा वर्षे आलीच नाही. दोघांच्या आयुष्यात राजोपभोग सोडून वनवास आला. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मग ग. दि. माडगुळकर म्हणतात , 

 दैव  जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा 

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा 

दोष ना कुणाचा.

           कुश आणि लव खरेतर इंग्लिश मध्ये म्हणतात तसे , ' Born with silver spoon'.  पण त्यांचा जन्म वाल्मीकींच्या कुटीरात, वनात झाला. तेव्हा सीतेला  कुटीरात लागणारे कष्ट करावे लागत होते.  तसेच कुश आणि  लव यांनाही करावे लागले. म्हणूनच म्हटले आहे, 'दैव जाणिले कुणी? 

लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी 

दैव जाणिले कुणी?

          ह्या सर्व गोष्टी एका दृष्टीने पाहिले तर पटतात हि. पण त्यास दुसरी बाजू ही आहे. आपल्या आयुष्यात काय घडणार, काय घडणार नाही, हे आधी ठरवणारी कुठलीही शक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे ललाट लेख लिहिणे आणि त्यात बदल करण्याची शक्यताही अस्तित्वात नाही, हेही तितकेच खरे.

        प्रत्येकवेळी दैवावर हवाला ठेवून निष्क्रिय बनायचे का? योग्य तो निर्णय घेऊन तो अमलात आणायचा, किंवा नवीन निर्णय घ्यायचा हे आपल्याला समजणे फार इष्ट असते. ही सजगता अतिशय आवश्यक आहे. काहीतरी हातपाय हलवायलाच पाहिजेत हे कळणेहि इष्ट च असते.

       'नशीब' याचा अर्थ दोन प्रकारे सांगता येईल. एक म्हणजे जे अजिबात बदलता येत नाही ते. म्हणजे आपण स्त्री किंवा पुरुष असणे. कोणत्या घरात आपला जन्म होतो ते. आपले आई-वडील इत्यादी. दुसरा अर्थ 'प्रयत्न' आपण आपल्याला बदलवून परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. ही गोष्ट त्या मानाने सोपी आणि आनंददायी. पण समोरची परिस्थिती बदलणे अवघड असते.

          आमचे आजोबा 'नशीब काढण्यासाठी' कोकणातून मुंबईला आले. म्हणजे त्यांनी आपल्या 

समोरची -आजूबाजूची परिस्थिती बदलली. जिथे नोकऱ्या चांगल्या मिळतात तेथे आले. पैसा कमावला. असे 'नशीब काढले'. येथे प्रयत्न कामाला आले.

        आपली मुले परदेशात जातात. तिथे खूप कष्ट करून शिक्षण घेतात आणि मग डॉलर्समध्ये कमावता. असे ते 'नशीब कमावतात' ही.

          भरपूर अभ्यास करून शेखरला बारावी थोडेसे म्हणजे 89 टक्के मार्क पडले म्हणून त्याने लगेच नशिबाला बोल लावला. आमचे 'नशीब खोटे.' माझे प्रयत्न, माझ्या अभ्यासाचा रियाज कमी पडला, असे त्याच्या मनातही आले नाही.इथेच सारेच चुकते. प्रयत्न आणि नशीब याची योग्य सांगड घालता येणे महत्त्वाचे.

         काहीवेळा यशाचे दरवाजे अगदी सहज उघडतात. कधी आटोकाट प्रयत्न करूनही उघडत नाही. पण अशावेळी थांबायचे का? स्कूटर चालू होत नसेल तर एका पाठोपाठ एक किक आपण मारतोच ना? पुढच्या किकला  स्कूटर सुरू होईल असे वाटते म्हणून . ही आशा असते.  आणि खरच 50 नंतर 51 व्या किकला स्कूटर सुरू होते. आपल्याला आनंद होतो. मला वाटते प्रयत्ना पाठोपाठ नशीब पण आपोआपच येते.

       चालताना वाटेत येणारा दगड हा अडथळा आहे की पायरी हे आपणच ठरवायला हवे. ज्यांना ती पायरी वाटते, ते आनंदात असतात. ज्यांना ती अडथळा वाटते ते म्हणतात, "माझे 'नशीबच खडूस,' " ते स्वतःला दोष देत दुःखाला आमंत्रण देतात.

        बरेचदा आयुष्यातील सुख दु:खांना आपणच जबाबदार असतो. बरेचदा नशीब आपले दार ठोठवायला येते. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. किंवा 'तो' आतला आवाज आपल्याला ऐकू येत नाही.  मग 'नशीब पाठ फिरवून निघून जाते'. नशीब किंवा संधी एकदाच  दार ठोठावते. गेलेली वेळ परत येत नाही.

        मला वाटते प्रयत्न आणि दैव किंवा नशीब यात जास्त महत्त्व प्रयत्नाला आहे. कारण ते आपल्या हातात असतं. नशिबाने साथ दिली तर उत्तम. 94 टक्के मार्क मिळणारा आणि 96 टक्के मार्क मिळवणारा दोघांची बुद्धी एक सारखीच असते. पण आपल्याला हवा तिथे प्रवेशासाठी 96 टक्क्या ला लगेच प्रवेश मिळतो .पण 94 वाल्याला मिळतोच असे नाही. येथे मला वाटते प्रयत्नांना नशिबाची साथ लागते. अशी नशिबाने साथ दिली तर उत्तम. नाहीतर ती मिळेपर्यंत उत्साहाने लढायचे. कदाचित प्रयत्नच आपले 'नशीब पालटवू' शकेल. म्हणूनच म्हटले आहे, 

God help those who help themselves 

प्रयत्नांती परमेश्वर.

           
शुभदा दीक्षित 
पुणे
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
18) कोरोना व्हायरस;नशिबाला दोष देवू नका

          कोरोना व्हायरस आला आहे आणि या ना त्या प्रकारे सत्यानाश करुन राहिला असून आपल्याला सावध राहाणे गरजेचे आहे.हा व्हायरस वूहानसारख्या शहरातून शेकडो किमीचा प्रवास करुन भारतात आला आहे.या व्हायरसची दहशतच माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.
            जागतिक क्रमवारीचा विचार केल्यास लोकं पाखरासारखे मरत आहेत.लोकांना सावरायलाही जागा नाही.कारण या व्हायरसवर निदान करण्यासाठी लस अजूनही प्राप्त झाली नाही.
         त्रेतायुगात रामाला ज्यावेळी कैकयीने वनवास दिला.त्यावेळी लक्ष्मण कैकेयीला दोष देत होता.पण रामानं म्हटलं,
          "हे लक्ष्मणा,माता कैकेयीला दोष देवू नकोस.कारण वनवास होणं हे विधीलिखीत होतं.तो वनवास आपल्या नशिबात होता."
           द्वापरयुगात द्यूत खेळल्यानंतर व द्रोपदीही हरल्यावर याच प्रकारच्या द्रोपदीच्या प्रश्नाला उत्तर देतांना युधीष्ठीर तेच म्हणतो,
         "द्रोपदी दुर्योधन हा आपला अनुज असून हा वनवास व अज्ञातवास विधीलिखीत आहे अर्थात आपल्या नशिबात आहे."
          असे असतांना या कलियुगात एखाद्या द्रोपदी किंवा एखाद्या लक्ष्मणाने जर कोरोना का आला? असा प्रश्न केल्यास कोणीतरी म्हणतात की हा कोरोना येणे विधिलिखित होते.तो आपल्या नशिबात होता.मी बरेचदा काही लोकांच्या तोंडून हेच ऐकलंय.
           अडाणी मत.देव चमत्कार करतो.या सगळ्या अंधश्रद्धा भरलेल्या.त्या चमत्कारापुढं माणुसकी हरलेली असून कोरोना जगातील कित्येक राक्षसासारखे  माणसे मारत सुटलेला आहे.तरी आजही आमचे डोळे उघडलेले नाहीत.आज आमचा देव कुलूपात बंद आहे.तरीही आमचे डोळे उघडलेले नाहीत.आम्ही आजही दिव्य चमत्कारावर विश्वास करतो.कोणी होम हवन करायला सांगतात तर कोणी गाईचं मुत्र प्यायला सांगतात.तुपही लावायला सांगतात.कोणी टाळ्या वाजवायला सांगतात.तर कोणी घंट्या वाजवायला,मेणबत्ती जाळायलाही सांगतात.
        टाळी वाजवणे ठीक आहे.कारण त्यातून हातात उर्जा निर्माण होवून हातावरील जंतू मारले जातात.तसेच पंतप्रधानाने लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच एकत्रीकरण करण्यासाठी मेणबत्ती,टाळीचा वापर केला.काहीतरी करण्यासाठी काहीतरी माध्यम हवं.पण होमहवन करणं हे माध्यम नाही.ते मोदी साहेबांनी सांगीतलेलं नाही.तूप किंवा गाईचं गोमुत्र कोरोना हटविण्याचं माध्यम नाही.तसंच कोरोना काही विधीलिखीत नाही.तो नशिबाचाही खेळ नाही.त्यामुळं तो येणे नशिबात होता.विधिलिखित होता.असे म्हणणे धांदात खोटे आहे.अशा अफवांना कोणीही बळी पडू नये व त्यावर विश्वास करुन वावरु नये.
          मात्र आजही अडाणी मत असंच सांगत असून परिसरातील लोकं म्हणतात,
          "कोरोना नशिबाचा खेळ हाये जी,तो येणार होता.म्हून आला.त्याले का घाबराचं एवळं.ज्याच्या नशिबात मरणं असन,तो मरणच.मरण चुकणार तरी आहे का?"
            होय,ज्याच्या नशिबात मरण असेल,तो मरेल.मरण चुकणार नाही.पण थोडी काळजी घेतल्यास मरण काही काळ तर पुढं ढकलता येईल नं तुमचं.तुम्ही जर हाच विचार करुन बिनधास्तपणे वावरत राहिल्या,तर कोरोनाचे वाहक बनणार नाही का?कोरोना तुम्हालाही लागेल व तुमच्या घरातील लोकांनाही आणि तुमच्या परीसरातील लोकांपाठोपाठ तुमच्या देशालाही.कोरोनाची लागण तुम्हाला होणे हे काही तुमच्या नशिबात लिहिलेलं नाही.ज्या मनूस्मृतीत माणसानं कसं वागावं हे कित्येक पिढ्यांपुर्वी लिहिलं होतं.त्या कित्येक पिढ्यांपासून तशाच प्रकारे माणसं वागत होती.कोणी विरोध करीत नसत.ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेबांनी एका झटक्यात जाळून टाकली.वेळ लावला नाही.नशीब माणसालाच घडवता येतं.कोणी चमत्कार करीत नाही वा कोणाला घडवता येत नाही.
           आपण केवळ नशिबाला हवाला देवून डॉक्टरकडे गेलो नाही.तर आपण उद्या मरायचे ते आजच मरु.नव्हे तर कित्येकांना मारुन मरु मानवी बाँब बनून.ठीक आहे,तुम्हाला मरायचे आहे तर खुशाल मरा.पण ज्यांना मरायचे नाही.त्यांना मारु नका जबरदस्तीनं नशिबाच्या नावावर.कारण तुमच्यासारखंच नशिब सर्वांचंच लिहिलेलं नाही.नशीब बदलता येतं.कोरोना वाहक बनून नाही तर घरातल्या घरात बसून.हातपाय स्वच्छ ठेवून.त्यामुळं नशिबाला दोष देवू नका.नशीब घडविण्याची ताकद याक्षणी तरी तुमच्याजवळ आहे.तुम्ही घरातच बसल्यास वा स्वच्छता बाळगल्यास या कोरोनावर मात करुन वागलात काही दिवस तर काहीतरी नक्कीच करु शकाल.नशीबही तुम्हाला तुमच्या मनानुसार घडवता येईल.यात काही दुमत नाही.फक्त त्यासाठी नशीबावर अवलंबून राहू नका.अन् नशीबावर विश्वासून बाहेर पडू नका.नाहकच कोरोना वाढवून डॉक्टर,नातेवाईक,पोलिस आणि आपले सरकार यांना त्रास देवू नका.

        अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
19) लेख

नशीब

" माझं नशिबचं फुटकं , कयम मी अशीच चडफडत राहणार." " नाही रे , माझं ना नशिबच बेकार आहे,मी असाच राहणार कायम ", " मी कीतीही अभ्यास केला ना तरीही मला पेपर अवघडचं जातो,माझं नशिबच असलं आहे "अशी अनेक वाक्ये आपण समाजात नेहमी ऐकत असतो.यावर मी नेहमी विचार करत असते.हे खरं असेलं का? माझ्यामते ही एक पळवाट आहे.

जीवन जगताना रोज सगळे चांगलच होईल ही अपेक्षा आपण गृहीत धरून कृती करत असतो.कोणत्याही गोष्टीचा शेवट हा चांगला की वाईट हे कशावरून ठरते? आपल्या कृतीवर ते अवलंबून असते.आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर यश निश्चितच मिळते.काम करत असताना ध्येय न ठरवता जर जनावरांसारखे फक्त राबतच राहिलो तर दिशाहीन तारुसारखी आपली अवस्था होते व आपण भरकटतच राहतो.व शेवटी अपयशाला सामोरे जावे लागते.व आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो.नशिबाला दोष देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे स्वतःची सुटका करुन घेणे होय.स्वतःचा नाकर्तेपणा झाकून टाकायचा असेल तर नशिबाचा हवाला देणे होय.

काही लोकं नशीब म्हणजे त्यांचे पूर्वजन्मातील पाप-पुण्य समजतात.नशीब घडवायचे असेल तर ते आपल्या हातात आहे असे मला वाटते.आपले नशीब आपण कसे काय घडवू शकतो? असे तुम्हाला वाटेल.पण ते खरेच आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मन,मनगट,व मेंदूवर विश्वास हवा.तरच कोणतीही जबाबदारी आपण लिलया पेलू शकतो.अपयश आले तर आपले प्रयत्न कुठे कमी पडले हे लगेच आपल्या लक्षात येते व पुढच्या वेळी ती चुक सुधारुन आपण यशस्वी होतो.

विद्यार्थ्यांनी जर वेळच्यावेळी लक्षपूर्वक अभ्यास पूर्ण केला तर साहजिकच त्यांना परीक्षेत धवल यश संपादन होते.यात कुठेही नशिबाचा, दैवाचा भाग येत नाही." कर नाही त्याला डर कशाला " अशी गत प्रयत्नशील व्यक्तीची होते." प्रयत्नांती परमेश्वर" हे ही तेवढेच खरे आहे." प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे " या उक्तीप्रमाणे दैवाचा,नशिबाचा भाग येथे गौणच आहे.म्हणून सर्वांनी नशिब , नशिब न म्हणता प्रयत्न, प्रयत्न म्हटले पाहिजे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एका एका सेंकदासाठी आपले नंबर गमवावे लागतात.प्रयत्न थोडेसेच कमी पडलेले असतात.हे सकारात्मक विचार करणारा खेळाडूच स्विकारु शकतो. नाहीतर बाकीचे नशिब म्हणत बसतात.

एखादी व्यक्ती आयुष्यात सफल होते.एखाद्या बाईचा संसार सुखाचा होतो.कुणाला वाईट अनुभव येतात.कुणी अयशस्वी होते.अशावेळी आपण यशस्वी लोकांना भेटून त्यांचे जीवन जवळून पाहिले तर आपल्याला ही आशेचा कीरण दिसतो.तेंव्हा कधीही निराश होऊ नका.प्रयत्न करा व यश मिळवा.सर्व संतानीही आपल्याला हेच सांगितले आहे.सर्व शास्त्रज्ञ जर नशिब, दैव करत बसले असते तर इतके शोध लागले नसते.अश्मयुगातच मानव खितपत पडला असता.वेळेचा सदुपयोग करुन घ्या.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
20) नशीब
   नशीब म्हणजे प्राक्तन.जे नशिबात लिहिलेले आहे तेच घडणार.असे आपण नेहमी ऐकतो.कित्येकदा तर त्याचा अनुभव पण घेतलेला आहे.अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या मनासारख्या घडाव्याशा वाटतात पण घडण नाहीत.अनेकदा एखादी सुवर्णसंधी आपल्याला मिळते परंतु ती सफल होईलच असे नाही.आपण कितीही म्हटलं की नशीब वगैरे काही नसते पण जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा त्यावर विश्वास ठेवावा लागतो.परंतु याचा अर्थ असा असा नाही की नशीबात आहे तेच घडणार म्हणून आपण ते घडण्याची वाट बघत बसायची.याउलट आपण आलेल्या संधीचा फायदा घेऊन त्याचे सोने करण्याचा प्रयत्न करायचा.यश मिळेलच याची मनाशी खात्री बाळगायची.
          फक्त हातावर हात ठेवून बसल्याने नशीबात सगळं चांगलं होईलच असे नाही.प्रयत्न करता करता जरी अपयश आले तरी त्याने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करत राहणे हे महत्त्वाचे असते.त्यामुळे माझे नशीबच फुटके आहे किंवा खराब आहे असा दोष देऊ निष्क्रिय जीवन जगणे चुकीचे आहे.
       शेवटी प्रयत्नाने ,कष्टाने आपण आपले आयुष्य घडवायचे असते.

©सौ.गौरी ए.शिरसाट
   मुंबई
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
सर्व लेख वाचन केल्याबद्दल आभारी आहे. 
संयोजक :- नासा येवतीकर

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...