बुधवार, 22 अप्रैल 2020

रोज एक लेख :- चौथा दिवस वसुंधरा

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- चौथा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 22 एप्रिल 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5

*आजचा विषय :- वसुंधरा किंवा निसर्ग*
आपल्या लेखास शीर्षक देण्यात यावे

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
01) निसर्गाच्या मुळावर उठलाय मानव....! ! ! 

      आज सरकार निसर्ग वाचवण्यासाठी खटाटोप करत आहे. पण मानव माञ आजही निसर्गाला गिळायलाच बघतोय...निसर्ग नष्ट होईल तर भविष्यात काय होईल याचा विचार करणं सुद्धा गरजेचे आहे.
              मी लहान असताना सगळे किती छान होतं.  त्या दारात बिनधास्त पणे येणार्या चिमण्या, तो पाऊस,ती हिरवळ, तो वातावरणातला प्रसन्नपणा, ती झाडे,ते प्राणी,  ते जीवन ..... आता हे सगळं आढळून सुद्धा येत नाही.  कुठे हरवले हे निसर्गातले भाग..... शहर वसली जंगले तोडली,  माणसाला पैशाची हाव आली कि माणुसच निसर्गाच्या मुळावर उठतोय.  कारखाने उघडायचे म्हणलं की , निसर्गाच्या गळ्याला सुरी लावली जातेय. दुषित पाणी, गटारी, शिकार, जंगलतोड,विविछ तंत्रज्ञानाची निर्मिती....  या गोष्टी करताना मला माणसाला दानवच पुढे दिसतोय... मी आज सतरा वर्षाची आहे आणि मी जेव्हा 6 वर्षांची होते  तेव्हाच्या  निसर्गाचे वर्णन सुद्धा मी करू शकत नाही.  आज ते दिवस आठवले कि पोटात आतड्यांचे गोळाच होतो.  
          एखादा मुका जीव गळ्याला सुरी लाऊन जसा मारला जातोय तसाच आज निसर्ग सुद्धा मारला जातोय. कित्येक वर्षांपासून निसर्ग वाचवारची काहींची खटाटोप चालुय. पण आपण त्यांना साथ देतो का ? हा जरा स्वतः लाच प्रश्न विचारा कदाचित स्वतः च्या नजरेत स्वतः गुन्हेगार ठरू आपण... मी सुद्धा.....  विचार करा मी 6 वर्षाची असताना निसर्ग ओसंडून वाहत होता आणि आज मी 17 वर्षाची आहे तर मानवाने अवघ्या 10-11वर्षात इतका निसर्ग लुप्त केला. मग तुम्हीच भविष्याचा विचार करा...मला तर वाटायला लागलय की आता निसर्ग सुद्धा ऑनलाईन डिजिटल होतोय का काय? 
       या माणसांच्या हावे पोटी आज शेतकरयाचा बळी पडतोय.  झाडे तोडली लोकांनी आणि दुष्काळ माञ आमच्या नशीबी..... शेतकरयाचे सुद्धा जगणं हराम झालं.  आज देशाची प्रगती दिसतेय, पण तुम्हाला नाही का वाटत आजची ही प्रगती पोखर प्रगती आहे... आज वाटतय आपण आदी मानव होऊन जरी राहीलो असतो तर खुप छान झाले असते... ही स्वार्थाची दुनिया उगाच थाटली गेली... 
      आज तर मला खरच भिती वाटायला लागलेय की,' मानव या पृथ्वीला, वसुंधरेला गिळून तर नाही ना टाकणार......
मानवच निसर्गाच्या मुळावर उठतोय.....

कु. दिपाली शिवाजी राऊत 
उस्मानाबाद 
7498702706
( निसर्ग वाचवा दोस्तहो!!! निसर्ग नाही तर आपण नाही )
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
 02) आपली पृथ्वी...

बेलगाम धावणारी दुनिया कोणत्या ना कोणत्या कारणाने थोडी थांबली आहे. पृथ्वीवरती वावरणारे पक्षी प्राणी एक वेगळीच अनुभूती घेताना आज दिसत आहेत. खरं पाहिलं तर पृथ्वी ही आपल्याला पूर्वजांकडून वारसाहक्काने मिळालेली धनदौलत नाही. तर ती येणाऱ्या पिढीकडून आपण उसनी घेतलेली आहे हे माणसाने लक्षात घेऊन तिची जोपासना करणे कर्तव्य आहे. इतर प्राण्यापेक्षा माणसाला बुद्धी जास्त आहे याचा अर्थ असा नाही की ही पृथ्वी केवळ माणसाची आणि माणसाचीच आहे. बेलगाम धावत सुटलेली माणसं कुठल्याही परिस्थितीत इतरांचा विचार न करता बेभान झालेली होती. कोरोना सारखा विषाणू आला आणि या धावणाऱ्या गतीला थोडासा ब्रेक लागला. सर्व माणसे घरात बसली आणि पशुपक्षी प्राणी यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपभोग घेता येऊ लागला. मांजरे उंदीर कुत्रे आणि असे किती तरी कीटक हे काय माणसाचे अन्न होऊ शकते. तरीही माणूस असे अन्न खाऊन अन्नसाखळीत बाधा आणू पाहत होता. त्याचाच परिणाम हा भयंकर असा विषाणू सर्वत्र पसरलेला आहे खरं पाहिलं तर माणसाला थोडासा विचार करायला लावण्यासाठी तर हा विषाणू आला नसेल ना..? जंगल तोड वन्यप्राण्यांच्या वसाहतीत घुसून आपली वसाहत निर्माण करणे, अकलेच्या जोरावरती या प्राण्यांचा छळ करणे. ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण ही तर वेगळीच बाब आहे. अशा विविध संकटांनी पृथ्वी वेढून गेली आहे. भूक न भागणारे अतृप्त माणसाचे जीवन पृथ्वीला नष्ट करायला निघालेले आहे. आणि त्यामुळेच पृथ्वीवरती अंदागोंदी आणि अराजकता माजत आहे.कोरोना ही इष्टापत्ती समजून आपण आताच सावध व्हायला पाहिजे. आणि माणूस हा ही एक प्राणीच आहे हे ओळखून आपण जगायला पाहिजे. पृथ्वीवरती जेवढा आपला हक्क आहे तेवढा इतर प्राण्यांचा देखील हक्क आहे. हे विसरुन जाता कामा नये,आणि या चालु परिस्थितीमधून माणूस नक्कीच काहीतरी शिकला असेल.अशी आशा धरायला हरकत नाही. धावत सुटलेल्या माणसाला किती हाव आहे,आणि ती हाव आपल्याला कुठल्या मार्गावर नेऊन ठेवते.हे आजपर्यंत आपण अनुभवलेले असेलच. घरात बसून आपण आता आत्मचिंतन केले आहे आणि आता यापुढे आपण धावण्याच्या शर्यती मध्ये सहभागी न होता आपल्या गरजा किती सीमित आहेत आणि आपण किती मोठ्या गरजा निर्माण करून ठेवल्या होत्या हे ओळखले देखील असेल. तेव्हा पृथ्वी वाचवण्यासाठी आणि पृथ्वीला सुंदर बनवण्यासाठी आपण या पृथ्वीतलावर जन्मलो आहोत हा विचार मनाशी बाळगून यापुढे या पृथ्वीवरती नांदणारे सर्वच आपण या पृथ्वीची लेकरे आहोत या भावनेने वागूया पृथ्वी सुंदर आणि हिरवी ठेवण्यासाठी संकल्प करून एक तरी झाड लावू सांभाळू आणि वाढवू या.आणि पृथ्वीला स्वर्ग बनवूया.
       हणमंत पडवळ
       उस्मानाबाद.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
03) वसुंधरेची काळजी घेऊ

  मानवी  जीवन सुंदर आहे. आयुष्य हे नक्कीच सुंदर आहे.पण ते सुंदर राहण्याची जबाबदारी पण आपलीच आहे. प्रत्येक सजीवांची जिवंत राहण्यासाठी धडपड चाललेली असते.त्यालाच आपण जगणं किंवा जीवन म्हणतो.
     हवा ,पाणी ,अन्न या सर्व सजीवांच्या मुलभूत गरजा आहेत .ह्या गरजा भागविण्याची नैसर्गिक यंत्रणा आजच्या घडीला तरी फक्त पृथ्वीवरच आहे.म्हणूनच आज तरी सजीवांचे एकमेव माहेरघर पृथ्वी हेच आहे.पृथ्वीवरील सजीव पोषक वातावरणामुळे हजारो वर्षाच्या कालखंडात पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती ,सूक्ष्मजीव,महाकाय प्राणी तयार झाले, काळाच्या प्रवाहात काही जीव जाती नष्टही झाल्या .माणूस नावाचा सजीव हे पृथ्वीचं लाडकं अपत्य.सजीव सृष्टीचे सातत्य व पर्यायाने संपूर्ण पृथ्वी ग्रहाचे अस्तित्व टिकण्यासाठी निसर्गाकडून प्रत्येकाची जीवन पद्धती ठरलेली आहे.आहार,विहार,जन्म मृत्यू ,प्रजनन हे सर्व निसर्गाकडून नियंत्रित केले जात असते.इतर सजीवांनी  जीवसृष्टीने दिलेल्या नैसर्गिक जीवन पद्धतीत बदल केला नाही. परंतु मानवाने जीवन सुखी व समृध व्हावे या उद्देशाने निसर्ग विरोधी जगण्याचा सिद्धांत विकसित केला.सुखाच्या कल्पनांची अंमलबजावणी करण्यासाठी मानवाने निसर्गातील शक्तींना आपला गुलाम बनवले.हवा ,पाणी,अन्न ,निवारा या चढत्या क्रमाने आपल्या जीवनावश्यक गरजा आहेत .निसर्गाकडून मिळालेले आयुष्य टिकविण्यासाठी  या गरजांची भूक भागविणे ही प्रत्येक सजीवाची नैसर्गिक गरज आहे. पृथ्वी आपली भूक भागविण्यास सक्षम आहे.पण मानवाने या हव्यासापोटी नको तेव्हढी पृथ्वीवर छेडछाड केली. सुख ,चैन ,आराम ,विलास,मानसन्मान,मनाच्या कल्पित सुखासीन कल्पना  अशा अनैसर्गिक गरजांच्या भुकेचा हव्यास वाढला व या हव्यासाच्या पूर्तीसाठी मानवाने पृथ्वीवरच्या  नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट केली.वाढती लोकसंख्या,जागतिक औद्योगीकरण ,दळणवळणासाठी वापरले जाणारे अमर्याद इंधन ,जंगल तोड या व अशा अनेक कारणांमुळे मानवी जीवन तर धोक्यात आलेच आहे पण आपण आपलीच जीवनदात्री पृथ्वी मातेचे अब्जावधी वर्षाचे आयुष्य संकटात ढकलले आहे.
   आज जागतिक वसुंधरा दिन.मानवाच्या हव्यासाने पृथ्वीच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम आज आपण भोगत आहोत. दुष्काळ, अवर्षण, भुकंप, महामारी अशा संकटाला सामोरे जातांना आपण हे ही विसरुन गेलो की, या सर्व संहाराला माणुस हाच प्राणी जबाबदार आहे.....  22 एप्रिल हा दिवस जागतिक स्तरावर वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
पृथ्वीचे व आपले पर्यावरणीय आरोग्य चांगले राहण्यासाठी 33% भूभाग वनांनी आच्छादित असला पाहिजे.पण मानवाने झपाटयाने वनराई नष्ट केली आहे.आपल्याकडे तर विकासाचा महामार्ग डोंगराला सपाट व झाडांना भूईसपाटच करुन जातो.गर्द वनराई हे पृथ्वीचे सौंदर्य आहे .त्या सौंदर्याला कात्री लावून पृथ्वीला बकाल करुन माणूसही मानसिक दृष्टीने वाळवंट बनत चालला आहे.सृष्टीचे असली सौंदर्य नष्ट करुन आपण सिमेंटचे जंगल वाढवले व त्यातच आपले सुख शोधत बसलोय. अन्न, वक्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी माणुस सृष्टीच्या नाशाला कारणीभूत ठरला अतिलोभ व अतिहव्यास माणसाला नडला. कुठलाही भविष्याचा विचार न करता जंगलतोड, नदीचा प्रवाह बदलणे या अनैसर्गिक कृत्य केल्यामुळे माणुस मोठ्या संकटात सापडला आहे. 
पृथ्वी मातेचे आरोग्य टिकण्यासाठी आपण दर वाढदिवशी कमीतकमी एक झाड तरी लावावे व त्याचे संवर्धन करावे.प्रदूषण टाळण्यासाठी फक्त  झाड लावुन उपयोग होत नाही तर ते टिकविणे, वाढविणे महत्वाचे आहे.कागद,फर्निचर ,कमी संख्येने कपडे,विद्युत साधने,इत्यादी गोष्टींचा वापर मर्यादित करावा.अनावश्यक गोष्टींचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या गरजा लक्षात घेऊन वस्तु खा. कराव्यात. सामाजिक विषमता तर एव्हढी आहे की, काही लोकांना ठेवायला जागा नाही व काही लोकांची चूल दोन दोन दिवस पेटत नाही.
आपल्याला अशा परिस्थितीत जाणिव असली पाहिजे. ग्रहमालेत दगडगोट्याचे जीणं घेऊन बाकी ग्रह सूर्याभोवती फिरत आपापला दिनक्रम ढकलत आहेत.एकमेव पृथ्वी सजीवांचे जीवन, पोटात व पोटाबाहेर प्रचंड मोठा जलसाठा ,भूगर्भात अनेक मौल्यवान धातू असलेली पृथ्वी आपल्याला लाभली आहे म्हणून तिचे जतन व संवर्धन आपणच केले पाहिजे. पृथ्वीवरील सर्वात बुध्दीवान प्राणी माणुस हिच आहे. तो आपल्या बुध्दीच्या जोरावर, विज्ञानाच्या कसोटीवर काहीही करु पहातोय यामध्ये अनेक प्रकारच्या भूमिका चांगल्या असतील परंतु काही गोष्टी या निश्चितच चांगल्या नाहित. त्यातच आता पृथ्वीवर कोरोणा नावाच्या विषाणू ने थैमान घातले आहे. तो मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक   परंतु नुकसान तर माणसाचे आहे ना? लॉकडाऊनच्या काळात चारचाकी वाहने ,रेल्वे ,विमाने,उद्योगधंदे   थांबले आहेत.लोक म्हणतात जग थांबलं आहे.पण हे विधान फक्त मानवाच्या दृष्टीने बरोबर आहे.जग थांबलंय याचा समस्त जीव सृष्टीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सृष्टीवर फक्त एकटा  माणुस थांबला आहे बाकी सर्व सृष्टी सुखनैव चालू आहे.मानव घरात अडकल्यापासून पक्षांचा किलबिलाट वाढला आहे.त्यांचा आपल्या भोवतालचा वावर वाढला आहे.झाडेवेली छान फुलली आहेत.करोडो रूपये खर्चून माणुस मोठमोठ्या  नदीचं प्रदूषण रोखू शकला नाही ,त्या नदी माणसाला घरात कोंडल्यापासून ब-याचअंशी प्रदूषणमुक्त झाल्या आहेत.माणुस वगळता इतर जीवांचा व्यवहार बिनबोभाट व निर्धोक सुरू आहे.याचाच अर्थ असा होतो की मानवानं एकट्या मानवाच्या जगण्याच्या हव्यासापायी इतरांचा कोंडमारा केला होता.सृष्टीने हे ही सिद्ध केलं की जगण्यासाठी मानवनिर्मित कारखाने कामी येत नाहीत तर शेतीच कामी येते.पृथ्वीवरील स्वयंघोषित हुशार जीव असलेल्या मानवावरचा सृष्टी नाशास कारणीभूत असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.म्हणूनच मानवाच्या  सामुदायिक चुकीचे उत्तरदायित्व आपण प्रायश्चित्ताने निभावले नाही तर लाडक्या लेकानेच आई मारली हा ठपका समस्त मानवजातीवर येईल.
   म्हणुनच आता तरी सावध व्हा हि एक संधी समजा व यातुन जर वाचलंत, सावरलोत तर पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया. ती आपली आई आहे नक्कीच लेकरांचे अपराध पोटात घेईल.आपण आपल्या सुखासाठी  पृथ्वीच्या नैसर्गिक बाबींची छेडछाड न करता सुखी जीवन जगुया. झाडे लावू झाडे वाढवू हिच याप्रसंगी संदेश. 

     सौ. खेडकर सुभद्रा 
       मुख्याध्यापिका बीड
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
 04) आपले वसतिस्थान वसुंधरा............

        खरे म्हणजे कोठेतरी, केव्हातरी कशामुळेही का होईना,हे ब्रह्मांड अस्तित्वातआले.अस्तित्वात आले...हे ग्रह तारे अनेकानेक खगोल,सोबतच इवलीशी पृथ्वी.हो इवलीशीच कारण या विश्वातील अगणित ग्रहगोलांशी तुलना करता क्षुल्लक आकारमान असणारी.एका सूर्याच्या आतमध्ये 13 लाख पृथ्वी मावतात.आणि सुर्यापेक्षा कितीतरी मोठे खगोल वास्तवात आहेत.या इवल्याशा पृथ्वीवर आधिपत्यासाठी कितीतरी लढाया लढल्या गेल्यात.हीच आपली वसुंधरा.विश्वाच्या पसाऱ्यात कितीही लहान असली तरी आम्हा सजीवांसाठी एकमेव वसतिस्थान.हे आम्हाला कळले पण वळले नाही.काय नाही दिले या वसुंधरेने?आम्हाला आसरा दिला.आज या वसुंधरेच्या पोटातील कितीतरी खनिजांच्या सहाय्यानेच आम्ही या संगणकिय युगात येऊन पोहोचलो.येथील निसर्गसौंदर्य आणि आपण याचा विचार केला तर हे सर्व काही आपल्यासाठीच तर होतं.होय होतं......अशीच वेळ आज आपण आणलीय.अन आम्ही काय दिले या वसुंधरेला.निळं पाणी,आकाश हिरवी वनराई असलेल्या वसुंधरेची आम्ही आज काय अवस्था करून टाकली.वसुंधरा,भूमी,पृथ्वी, माता,धरती कितीतरी नाव आहेत.कधी ती हिरवळीचा शालू नेसते तर कधी शुष्क होते.कोठे बर्फाची दुलई पांघरते तर कुठे निळ्या पाण्याआड लपते.कोठे उंचच उंच झालाआड प्रकाश लपाछपी खेळतो तर कुठे जमिनीला शिवायला बघतो.कितीतरी मनमोहक छटा या पृथ्वीच्या आहेत.आणि आम्ही काय करतोय? जमिनीला अगणित छिद्रे पाडलीत.फक्त आता पृथ्वीच्या आरपार रस्ता तयार करावयाचा राहिला.आकाशाला सुद्धा भगदाडं आम्हीच पाडली.कितीतरी प्राणीपक्षी यांच्या प्रजाती आज नष्ट झाल्यात हेच आमचे कर्तृत्व.आपण आपल्या घराचा पायाच ढिला करत आहो हे आम्हाला समजत का नाही आहे?हे सर्व कशासाठी तर "कोण्या तरी एका व्यक्तीला सर्वशक्तिमान व्हायचे आहे" "कुण्या तरी एका राष्ट्राला महाशक्ती व्हायचे आहे"आणि कोण्या तरी "एका समूहाला चंद्रावर सुद्धा उत्खनन करायचे आहे".पण कशाला हा सगळा उपद्व्याप.एक दिवस हा सगळा उपद्व्याप आपल्याला अंताकडे घेऊन जाईल.ज्या वसुंधरेने आपल्याला आश्रय दिला तीच एक दिवस अनाथ होऊन जाईल.
                            
हेमंत साहेबराव पापळे, कारंजा लाड जिल्हा वाशीम 9422762278
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
05) निसर्ग आणि सजीव  
                        
होय ! होय!! तुमचा अंदाज बरोबरच आहे कारण पृथ्वीचे आरोग्य बरोबर राहीले नाही कि पर्यावरण संतुलित राहीले नाहीच, ना ! आज आपण सभोवताली पाहतो आहोत कि जगात एकही ठिकाण.अस राहीले नाही जेथे माणसाचा पाय लागला नाही ! माणसाने अगदी ग्रह , तारे सुध्दा सोडले नाहीत तर मग इतरांची काय कथा. हे असो जाऊद्या आज आपणाला जीवन जगत असताना अशा संकटाना तोंड देण्याची कारणेच मुख्य ही आहेत. पूर्वी समुद्र, पर्वत, नद्या यांच्या सीमा ठरलेल्या होत्या ती एकमेकांवर अतिक्रमण करत नव्हती , पर्वत , डोंगर उजाड नव्हती , शहरीकरणाचा एवढा विस्फ़ोट झालेला नव्हता सिमेंट डोंगर तर नव्हतीच. इंधन स्फोट तर पहा, किती इंधन दिवसाला जाते याचा विचार न केलेला बरा या कारणाने मग सांगा निसर्ग कसा अबाधित राहिल आणखी कितीही कारण देता येतील. थोडक्यात प्रत्येक गोष्टीचा बेसुमार वापर हा पर्यावरणाला मारकच ठरतो वेगवेगळ्या पिक फवारणी सुद्धा पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याचे काम करते  जर पर्यावरण टिकून राहिलं तरच पृथ्वीवरील मानवा सहीत इतर प्रजाती आपले अस्तित्व अबाधित टिकून ठेऊ शकतात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज उगाच  नाही म्हटले " वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ! वनचरे !!                                      एकंदर आज मानवाला समृद्ध जीवन जगायचे असेल तर नैसर्गिक ठेवा जतन करावाच लागेल कारण मानवाने नियम संभाळला कि इतर प्राणी बिचारे ते निरपराध आहेत , इतर बरोबर टिकतील म्हणून मानवाने निसर्गाचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे असे वाटते. 

भागवत ल गर्लक
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
06) निसर्ग संवर्धन काळाची गरज

पृथ्वीवर सजीव आणि निर्जीव वास्तवात आहे.पूर्वीच्या काळापासून सजीव हे निसर्गावर अवलंबून आहे. सजीवातील सर्वात बुद्धिमान मानवजात तर निसर्गाच्या कुशीतच जन्म घेते.व निसर्गाच्या कुशीतच अंतिम श्वास सोडते.मानवाला अन्न,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा याच निसर्गातून मिळतात.मानव पूर्वी काळापासून आपल्या गरजा भागवत आहे.पुढे मात्र विज्ञानाने प्रगती केली. मानव शिक्षण घेऊन स्वतःला विद्वान समजू लागला.त्याने त्याच्या गरजाचा विस्तार वाढवला.स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो हळूहळू या निसर्गाच्या जीवावर उठला.निसर्गातल्या अनेक गोष्टीचा मर्यादेपेक्षा जास्त उपभोग घेऊ लागला.त्यामुळे निसर्गाची परिस्थिती बिघडली.अाजची परिस्थिती पाहता निसर्गाला दुष्परिणाम करणारे घटक प्रचंड प्रमाणात वाढत आहे.यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण,वाढते तापमान, पाणीटंचाई,औषधी वनस्पती नष्ट होणे, वाढती जंगलतोड,नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर या गोष्टीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.ह्या सर्व गोष्टी मानवाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.याचे परिणाम निश्चितच येणाऱ्या काळात मानवाला भोगावे लागेल.आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या प्रगतीने माणूस फार अंहकारी झाला आहे.तो स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाच्या जीवावर उठलाय आहे.वाढते उद्योग धंदे, दळणवळणासाठी रस्ते, शहरीकरणामध्ये वाढत्या वसाहती यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे.झाडे लावणाऱ्या पेक्षा झाडे तोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज सरकारला झाडे लावण्याची सर्वसामान्यांमध्ये जागृती करावी लागत आहे.यापेक्षा दुर्दैवी गोष्टी दुसरी कोणती.दरवर्षी धो धो पडणारा पाऊस उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचे सावट बनतो.कारण पडणाऱ्या पावसाचे नियोजन होत नाही.पाणी आडवा पाणी जिरवा ही म्हण सगळे विसरून चालेले आहे.जो तो पाण्यासाठी पृथ्वीच्या पोटात नवीन छिद्र पाडण्यास दंग झाला आहे.ते थांबवायला मात्र कुणीही पुढे येत नाही.दरवर्षी तापमान नवीन उच्चांक गाठत आहे.या वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत चाललेले आहे.जंगलामध्ये आग लागत आहे.अनेक वृक्ष जळून खाक होत आहे.अनेक वृक्षांच्या जाती नष्ट होत आहे.असे म्हटले जाते की स्वतःवर बेतल्या शिवाय कोणत्याही गोष्टीचे महत्त्व कळत नाही.तसे निसर्गाचे कोपणे मानवाला कळायला वेळ लागणार नाही.वेळीच निसर्गाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.वृक्षतोड थांबवून वृक्षलागवड करणे गरजेचे आहे.दरवर्षी प्रत्येकाने नवीन झाडे लावली पाहिजे.वाढदिवस,आनंदाचे क्षण झाड लावुन साजरे केले पाहिजे. तो आनंदाचा क्षण झाडाच्या रूपाने टिकवून ठेवता येईल.नुसते झाडे लावून चालत नाही तर त्याचे संगोपन सुद्धा झाले पाहिजे.दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवले पाहिजे.जमिनीमध्ये जिरवले पाहिजे. यासाठी मोकळ्या जागेत खड्डे करून पाणी आडवा.हवेचे प्रदुषण होणाऱ्या साधनांचा अतिवापर वापर टाळावा.ही  पृथ्वी,निसर्ग प्रत्येकाचा आहे.त्याचे संगोपन व संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.हे वेळीच ओळखले पाहिजे.नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर जपुन केला पाहिजे.नैसर्गिक साधन संपत्ती दीर्घकाळ टिकली पाहिजे. निसर्ग संवर्धन काळाची गरज आहे हे वेळीच ओळखून सर्वजण प्रयत्न करूया व निसर्गाचे सौंदर्य अबाधित राहू या.

राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा जि बुलडाणा
9823425852
rajendrashelke2018@gmail.com
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
07) व्यथित वसुंधरा*

     *वराहाच्या  दाता वर टेकली*,
      *त्याच दातांनी उकरू उकरू* ,
     *केल्या  किती खोल जखमा* ,
      *ह्या धरणीच्या  काळज्यावर*

     पंचमहाभूताची काया जिची, अशी बहुरत्ना, रत्नगर्भा वसुंधरा आज व्यथित आहे. मानवाने तिची काय अवस्था केली आहे, ह्याची जाणीव करून घेणे अतिशय आवश्यक आहे.   ही हरीत-वसना घरणी उजाड झाली आहे. विकासाच्या नावाखाली महाकाय तरु धाराशाई झाले आहे. विकासाच्या वावटळीत अखीच्या अखी जंगले कापल्या जात आहे. रानोवनी वणवे पेटले आहेत, त्यात किती मानव निर्मित आहे आणि किती नैसर्गिक हे समजायला मार्ग नाही. ह्या दावानला मुळे संपूर्ण जगाचे तापमान वाढत आहे. हिमाच्छादित ग्लेशियर वितळत आहेत. सागराच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. साऱ्या जगातिल कित्येक महानगरे बुडणार आहे, पण मानवाला जाग नाही. बेसुमार जंगलतोड चालुच आहे.
      ऋतुचक्र बदलत आहे. कधी भर उन्हाळ्यात गारपीट होत आहे. उभ्या पिकाची नासाडी होत आहे. तर कधी अति वृष्टी मुळे महापूर येताहेत. गावची गाव बुडाल्या मुळे जान मालाची प्रचंड हानी होती आहे. तर कधी उन्हाळ्याचे तापमान उच्चांक गाठत आहे.आणि सारी मानव जात  त्रस्त   आहे .तृषार्त-क्षुधित ही अवघी प्राणी जात
    सिमेंट काँक्रीटच्या ह्या जंगलात, पाऊस भरकटला आहे वाट चुकला आहे. कधी होते अतिवृष्टी तर कधी पडतो दुष्काळ त्याचे परीणाम समस्त मानवजातीला भोगावे लागतात. एकी कडे पाण्याचे दुर्भिक्ष झाले आहे तर दुसरीकडे  पाण्याचा अतिरेकी वापर किंबहुना गैरवापर सुरु आहे. 
        पाणी म्हणजे जीवन, पाणी अनमोल आहे. कारण पाण्याचे र्निमाण अशक्य आहे. पाण्याचे स्रोत्र प्रदुषित होत आहेत, संपुष्टात येत आहे.आईच्या मायेने पाण्याचे जतन करण्यासाठी आपण कटीबद्ध व्हायला हवे. पावसाचा प्रत्येक थेंब साठवायला हवा. 
     आज ही, कोरोनाची विभिषिका तर नद्यांना निर्मळ नितळ करती आहे. गंगा-यमुना कशा खळाळून हासत आहे.
   *रत्नगर्भा  बहुरत्ना ही वसुंधरा* ,
     *ह्या वसुधेचे जतन कर मानवा ही तुला कधीच काही कमी पडू देणार नाही*.

डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
08) निसर्गाच्या मनातले

भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे 
दावित सतत रूप आगळे 
वसंत वनात जनात हासे 
सृष्टी देवी जणू नाचे उल्हासे

      शांताराम आठवले यांची ही सुंदर रचना. प्रत्येक ऋतूत सृष्टी देवी म्हणजे अर्थात निसर्ग, आपल्या वेगवेगळ्या रूपात सौंदर्याची उधळण करतो. वसंत आला की तो आनंदाची उधळण करतो. त्यामुळे जणू सृष्टी देवी उल्हासून नाचते. असा हा निसर्ग वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेला आहे. कुठे हिरवे गार रान असते. तर कुठे वसुंधरेवर सावली धरत मोठे वृक्ष स्थितप्रज्ञ ऋषीं सारखे उभे असतात. कुठे खळाळत नदी अधीर होऊन धावत असते, आपल्या मीलनासाठी. समुद्रही धीरगंभीर पणे गाज देत नदीला कवेत घेण्यासाठी हात पसरून उभा असतो. डोंगराच्या कड्यावरून खाली गर्जत  वसुंधरेला भेटायला धबधबाही उतावीळ असतो. कुठल्यातरी वाटिकेत, रानात सुंदर फुला-फळांच्या साज सांभाळत लाजत मुरकत बहरत झाडे उभी असतात. खरतर सूर्य रोज उगवतो, रोज मावळतो. पण रसिक माणसाच्या दृष्टीला रोज त्याच सूर्योदयात आणि सूर्यास्तात  वेगळेच सौंदर्य दिसते. निळ्या आकाशात वेगवेगळ्या रंगांचे फटकारे त्याला दिसतात.
         पृथ्वी हा असा एकच ग्रह आहे जिथे मनुष्यजीवन आहे. पृथ्वीवर जीवन बहरते ते केवळ निसर्गा मुळे. त्यामुळे मानव आणि निसर्ग यांचे घनिष्ठ असे नाते आहे.
        पाणी, पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश ह्या पंचतत्वांनी बनलेली सृष्टी म्हणजे निसर्ग. मनुष्याचा जन्मही ह्याच पंचतत्त्वातून झाला आहे. आपण त्या निसर्गात जन्म घेतो, वाढतो आणि विलीनही होतो.
         माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी 
         तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी

हे वसुंधरेचे बोल जाता जाता माणसाची कानउघाडणी करून जातात .
         निसर्ग इतका दानशूर आहे, तो इतके मनुष्याला देतो की, त्याची परिस्थिती 'घेशील किती करांनी' अशी होते. परत त्या बदल्यात मनुष्याकडून काहीच मागत नाही.
         निसर्ग जगण्यासाठी लागणारी शुद्ध हवा देतो. फुले, फळे, भाज्या, धान्य, लाकूड अशा कित्येक गोष्टी देतो. जगायला लागणाऱ्या सर्वच गोष्टी तोच देतो.
        माणूस सुरुवातीला अगदी निसर्गाच्या कुशीत नांदत होता. निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळत तो प्रगत होऊ लागला. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने अवजारे बनवली. दगडावर दगड घासून आगीचा शोध लावला. चाकाचा शोध लावला. त्यामुळे माणसाचे आयुष्यच बदलून गेले. मनुष्य सहजपणे शिकार करू लागला. आणि अग्नीच्या साहाय्याने शिकार शिजवून खाऊ लागला. असेच नवीन शोध लागत गेले. माणसाचे जीवन सुधारू लागले. औषधांच्या शोधामुळे त्याचे आयुष्य वाढू लागले. मोठ्या इमारतींची जंगले उभारली गेली. कारण लोकसंख्या वाढली होती. त्याने विजेचा शोध लावला. रस्ते बांधले. नौका बांधल्या. विमाने आली. पण या सगळ्या कल्पना, प्रेरणा मिळाली ती मात्र निसर्गाकडून.
          झाडापासून माणसाला विविध वस्तू मिळू लागल्या. झाड हा निसर्गाचा महत्त्वाचा सदस्य. पण आपल्या स्वार्थासाठी मानव झाडे तोडू लागला. माणूस निसर्गापासून दूर जाऊ लागला. तो आता आपल्या सुख- सुविधांसाठी, ऐषा - आरामासाठी निसर्गाचा ऱ्हास करू लागला. वृक्षतोड, ओझोनचे प्रमाण, वाढती लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, अस्वच्छ नद्या, अशासारख्या समस्या माणसाला भेडसावू लागल्या. सगळीच माणसं हरवून बसली आपल्या जीवनात दरवळणाऱ्या फुलांचा गोड सुगंध. माणसात आता अहंकाराचा अग्नि पेटत होता. तो निसर्गावर अतिक्रमण करत होता. 'अती झालं अन् हसू आलं'. तसे निसर्गाचा क्रोध मग माणसाला जोरदार तडाखे द्यायला लागला. कधी भूकंप, कधी सुनामी, तर कधी चक्रीवादळ, कधी ढगफुटी, तर कधी दुष्काळ. अशा रूपात तो माणसाला जागे करण्याचा प्रयत्न करतो. निसर्ग बोलत नाही फक्त कृती करतो. जो निसर्ग माणसाला जन्म देतो तो त्याला आवरून ही शकतोच. 
          निसर्ग आयुष्यभराचा माणसाचा सोबती आहे. त्याच्या हातात हात घालूनच चालले पाहिजे. निसर्ग धीरोदात्त असतो. त्याचा समतोल ढळू न देण्याची काळजी घेतली पाहिजे. 22 एप्रिल हा वसुंधरा दिन त्यासाठी पाळला जातो. त्यादिवशी निसर्गा बाबतची जबाबदारीची जाणीव प्रत्येक माणसाला करून दिली जाते. पण असे कशासाठी? रोजच वसुंधरा दिन पाळला गेला पाहिजे. निसर्गाचे संगोपन, संरक्षण केले पाहिजे. वसुंधरा ही आपली माता. वसुंधरेवर- निसर्गावर प्रेम करीत राहिलो तर तो हि माणसाला इतके देईल, आणि मग 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी,' असे म्हणण्याची वेळ माणसावर येईल, हीच प्रार्थना.

शुभदा दीक्षित
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
09) निसर्ग हाच गुरु-बंधू-सखा, तोच माय-बाप

मानवाला कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी एक तर ती कुणाकडे मागावी लागते नाहीतर ती मिळवण्यासाठी कष्ट तरी करावे लागतात. मात्र निसर्ग हा एकमेव आहे जो आपण न मागताच आपल्याला बरेच काही देऊन जातो. आपण जे काही आहोत ते या निसर्गामुळेच आहोत. 
ज्या निसर्गामुळे आपण जगात आहोत. त्याच निसर्गाचे उपकार आपण विसरत आहोत. आपल्या सुख-सुविधांसाठी त्याचा ऱ्हास करत आहोत. त्यामुळे प्रदूषण, दुष्काळ, ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. 
मनुष्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या भरवशावर भलेही बरीच प्रगती केली असेल. पण तो निसर्गावर कधीच वर्चस्व निर्माण करू शकत नाही ही बाब त्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. 
निसर्ग हा आपला आयुष्यभराचा सोबती आहे. निसर्ग हाच आपल्यासाठी माता, पिता, बंधू, सखा, सोयरा, गुरु इतकेच नव्हे तर साक्षात ईश्वर आहे. त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे तरच तो आपली काळजी घेईल.

निसर्ग हाच गुरु-बंधू-सखा, तोच माय-बाप,
त्याच्या कुशीमध्ये दूर होई सारे दुःख आपोआप...!

गणेश सोळुंके जि. जालना
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

10) निसर्ग माझा सखा

मित्रांनो, आपला निसर्ग म्हणजे पंच तत्वातिल सौंदर्य असेच म्हनावे लागेल.
कारण पृथ्वी, आकाश, वायू, जल आणि अग्णी या पाच तत्वापासुन
निसर्ग बनला आहे.आणि त्याच बरोबर मानव देखील या पाच तत्वा पासुन च जन्माला आला आणि म्हणूनच निसर्गाच्या प्रत्येक हालचालीचे मानवा वर परीनाम होतो. आज वसुंधरा दिवस आहे. आपण भाग्यवान आहोत की आज वसुंधरेची महती सांगण्याची आपल्याला संधी मिळाली. विज्ञानाचा शोध लागला तो एक प्रकारे मानवाच्या सूखासाठीच लागला. पण आपण सुखाच्या इतकं आहारी गेलो की आपणच आपले शत्रु बनलो. नको त्यापेक्षा जास्त कार, मोटर,स्कुटर चा वापर कारखान्याच्या धुर प्रमानापेक्षा हवेत मिसळला आणि सुंदर शुद्ध वाहणारी हवा आम्ही प्रदुषित करून आमचेच श्र्वसनाचे आजार वाढवून घेतले एवढेच नव्हे तर सगळी हिरवी गार जनु शालु घालून नटलेली वसुंधरा आम्ही बोडखी करून ठेवली. इथेच आम्ही थांबलो नाही तर पाणी सुध्दा अश्याच प्रकारे दुषित केले. हिमालयातुन वाहणाऱ्या सुंदर नद्या आमची तहान भागवण्यासाठी, शेतात पिक उत्पादन करण्यासाठी,जलचरांना  संचार करण्यासाठी या धर्तीवर आली आणि आम्ही आमची सगळी दैनंदिन जीवनातील निघालेली घान त्या नदीच्या पात्रात सोडली. आज दुषित पाणी आपणच आपल्या साठी तयार केले. त्याच प्रमाने यंत्रांचा व लाऊड स्पिकरचा आवाजाचे प्रमान ही वाढले की त्यामुळे ध्वनि प्रदूषण वाढले व विविध कानाचे आजार भेडसावत आहे.विविध रंगांची फुले ,फळे बरयाच प्रमाणात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आयुर्वेद आमच्या जिवनासाठी वरदानच आहे पण  औषधियुक्त वनस्पती प्रदुषनाच्या  विळख्यात सापडलेल्या आहे. या तीस वर्षात आपण इतकं भौतिक सुविधा व वस्तुंच्या आहारी गेलो की आपल्या भानच नाही राहिले की आपण या धावपळीत वसुंधरेचे हालहाल करून टाकले. आणि आता खूप उशिरा डोळे उघडले ‌आणि बघतो तर आपलं सगळं वैभव नाहीस होत असताना उघडल्या डोळ्यांनी बघितले. पण मित्रांनो मी माघेच शपथ घेतली की आता वसुंधरेला त्रास द्यायचा नाही. माझे उपक्रम मी आपणा समोर ठेवत आहे. मी वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करते, नित्यनेमाने पंक्षांसाठी मातीच्या भांड्यात पाणी भरून ठेवते, त्यांच्या साठी खास तांदळाची दाने टाकते,देवाला फुले वाहिली की निर्माल्य नदीत न टाकता त्याचे खत तयार करणे, घरात प्लास्टिकचा वापर बंद केला असून दुधाला स्टिलची  केटली व भाजीला कापडी पिशव्यांचा उपयोग करते. कुठल्याही नदिला भेट देतांना फक्त हातात नदिचे पाणि घेऊन तिला नमस्कार करून नदिला भरायची ओटी एखाद्या गरीब महिलेला दान करायची. पण आता किहीही झाले तरी हा खारीचा वाटा उचलुन वसुंधरेचे रक्षण करायचेच.
आपणा सर्वांना आज वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सौ.मेघा वि. हिंगमिरे. शिक्षिका. 
भारत विघालय वेळा. 
त.हिंगणघाट .जि. वर्धा.  ७७९८१५९८२८.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
11) निसर्ग आणि वसुंधरा  

निसर्ग म्हणजे सृष्टी, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचतत्त्वांनी बनलेली सृष्टी. या निसर्गाचे व मनुष्याचे नातं अगदी त्याच्या जन्मापासूनचे असते. मनुष्याचा जन्म याच निसर्गाच्या पंच तत्त्वातून होतो. व त्याच पंचतत्त्वात विलीन होतो. तेव्हा निसर्गाशी आपल नातं अतूट नाही का आहे? म्हणूनच या निसर्गाचं जतन करणं, पोषण करणं  व त्याची वृद्धी करणे हे आपले कर्तव्य आहे. 
 निसर्ग मानवा करिता खूप मोठे वरदान आहे. मानवाच्या मूलभूत गरजा या निसर्गाकडून पूर्ण केल्या जातात. निसर्गाच्या सोबतीत  मनुष्यास खूप काही शिकायला मिळते, म्हणूनच काय तर नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्गातून शिक्षण मिळावे या करिता 'शांतिनिकेतन' नावाची शिक्षण संस्था सुरू केली. फुल काट्यात राहूनही फुलते, झाड नेहमी खंबीर उभे राहून मदत करते हे सर्व मानवास शिकवणच आहे. निसर्ग मानवास सातत्याने देतच असतो मग या निसर्गाला सुद्धा मानवाने काहीतरी दिले पाहिजे ना! 
  "जेथे दिव्यत्वाची प्रचिती 
    तेथेच कर माझे जुळती "
"निसर्गाची करणी आणि नारळात पाणी." निसर्ग जर सुंदर आणि स्वच्छ ठेवलात तर सगळे अबाधित राहते. आणि निसर्ग आणि पृथ्वी जर कोपली तर संपूर्ण विध्वंस निश्चितच होतो. हे सगळे मानवी प्रवृत्तीवर अवलंबून असते. वरील दोन्ही म्हणीनुसार  जेथे जेथे मानवाला दिव्यत्वाची प्रचिती येते तेथेच त्याचे कर अपोआप जुळतात. "निसर्ग, ही मानवाला मिळालेली एक देणगीच आहे." पण मानवी प्रवृत्तीनुसार विनामूल्य मिळालेल्या देणगीचा नेहमी मनुष्य गैरवापरच करत आलेला आहे. कारण ते मानवाला विनामूल्य मिळालेले असते ना? पण त्याचे फळ मात्र हे शेवटी मानवालाच भोगावे लागणार आणि आजच्या पार्श्वभूमीवर हे सगळे चित्र स्पष्ट होताना दिसतेच आहे. 
     मानवाला जर विनामूल्य सगळेच मिळत गेले तर त्याला त्या गोष्टीची किंमत नसते. आणि परमेश्वर सुद्धा असंख्य वेळेस मानवाला सुधारण्याची संधी देतो पण त्याला जर पायावर दगड पडल्याशिवाय कळतच नाही तर त्याला ईश्वर तरी काय करणार ? सुंदर निसर्ग आणि वसुंधरा मिळूनही मानवाने संपूर्ण सृष्टीचा विनाश करायला मानवच कारणीभूत आहे. त्याची असंख्य उदाहरणे खालीलप्रमाणे -
   प्लास्टिकच्या अतिवापरामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश होतोय . आणि प्लास्टिक हे जमिनीत मिसळत नाही. म्हणजेच त्याचे विघटन सुद्धा होत नाही. असा  किती तरी टन कचरा पृथ्वीवर खचून भरला आहे. त्याचे दुष्परिणाम आपण बघतच आहोत.
   विविध कारखान्यांचे दुषित पाणी नद्यांमध्ये मिसळल्यामुळे त्या दूषित होत आहेत. मानवाच्या अतिरिक्त वृक्षतोडीमुळे संपूर्ण सृष्टी विनाशाकडे जाऊ लागली आहे. वृक्ष तोडून त्या जागी सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. वृक्षतोडीमुळे सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे पृथ्वीवर ओझोनच्या कवचाला  छिद्र पडले आहेत. सूर्याचे अतिनील किरण या छिद्रांमधून  पृथ्वीवर प्रवेश करतात व पृथ्वीवरील तापमान वाढवतात. वायू प्रदूषणामुळे माणसाला श्वास घेणेही आता कठीण झालं आहे. मानवाच्या आहारावर देखील बंधन नाही राहिले.   मानव विनाशाकडे झुकतो आहे. 
   आजच्या स्थितीत कोरोनाचे  संकट प्रत्येक राष्ट्रावर ओढावले आहे, बोलायचे झाल्यास कोरोना या महाभयंकर रोगाने मानवाच्या सर्व अतिरेकावर बंधन घातले. व आता निसर्ग आणि वसुंधरा स्वत:ला नव्याने सुधारित आहेत. 
    वाढत्या आधुनिकीकरणामुळे, प्रदूषणामुळे, निसर्गाचे सौंदर्य दिवसेंदिवस कमी होत आहे. वृक्षतोडी झाल्यामुळे पाऊस कमी पडत आहे. आणि यामुळे निसर्गाचे भयंकर रूपाचे दर्शन आपणास घडत आहे. निसर्गा च्या  समतोल बिघडल्यामुळे विविध प्रकारचे विषाणूजन्य आजारांचा मानवाला सामोरे  जावे लागत आहे. त्यात कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचे थैमान हे जगभर सुरू आहे. याचा अनुभव संपूर्ण मानव जातीला येत आहे. मानव घरात राहात असल्यामुळे कदाचित पुन्हा निसर्गाचे उत्तम स्वरूप आपणा सर्वांना अनुभवास येत आहे. तेव्हा आपले हे कर्तव्य आहे की निसर्गाचे संतुलन ठेवले पाहिजे कारण मनुष्याचे व निसर्गाचे अतूट नाते आहे.
   तुकाराम महाराजांनी आपल्याला कितीतरी शतकांपूर्वी सांगितले "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।
पक्षीही सुस्वरे आळविती॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष अंगा येती ॥"
 
सौ.  योगिता नागमोती, नाशिक
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
12) 🌹 *जागतिक वसुंधरा दिन*🌹

फक्त पृथ्वी ग्रहावर पाण्याची व्यवस्था असल्याने येथे सजीव जगू शकतात आणि त्याची वाढ होऊ शकते. सजीव म्हणजे त्यात सूक्ष्मजीवापासून महाकाय प्राण्यापर्यंत सारेच आले. पृथ्वीवर असलेल्या हवा, पाणी, जंगल आणि अन्य जीव यांचे संरक्षण होणे अत्यंत महत्वाचे आहे.  याबाबत अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी सर्वप्रथम संकल्पना मांडली. सन १९७० सालापासून 22 एप्रिल हा दिवस  ‘अर्थ डे’ अर्थात जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभर साजरा केला जात आहे. पृथ्वीचे संरक्षण करण्यात प्रत्येकाची जबाबदारीचे आठवण करून देणे हे त्याचे मुख्य उदिद्ष्ट आहे.
निसर्गात मानव हा एकमेव बुद्धिमान प्राणी आहे. म्हणून तो आपल्या बुद्धीच्या बळावर आपल्या सर्व गरजा पूर्ण करत गेला. गरजा पूर्ण करतांना निसर्गाचे संतुलन बिघडणार नाही याकडे मात्र दुर्लक्ष केला. त्यामूळे आज वसुंधरा अडचणीत सापडली आहे. जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण एवढं वाढलं आहे की, त्यामुळे माणसाला अनेक रोगाला बळी पडावे लागत आहे. तरी त्यात म्हणावे तेवढी सुधारणा होतांना दिसून येत नाही. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले आहे की, ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू शकते पण प्रत्येकाची हाव नाही.' त्यांनी अगदी सत्य बोलले आहे. कारण अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत आणि ते सहज पूर्ण होऊ शकतात. मात्र माणसाची हाव किंवा ईच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. एक मिळाले की दुसरी ईच्छा जन्म घेत राहते. निसर्गाला वाचवायचे असेल सर्वप्रथम मानवाने आपल्या गरजा सीमित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निसर्गाचे जे चक्र आहे, ज्यात प्रत्येकजण एकमेकांवर अवलंबून असतात ते विस्कळीत होणार नाही याची काळजी देखील घेतली पाहिजे. पाण्यावाचून कोणतेही सजीव जिवंत राहू शकत नाही म्हणून सर्वप्रथम पाण्याचे महत्व सर्वांनी ओळखून घेतले पाहिजे. आपल्या वागण्यामुळेच पावसाचे पाणी बेभरवशाचे झाले आहे तर भूगर्भातील पाण्याचे बेसुमार उपसा करून जमिनीतील पाणी देखील संपण्याच्या मार्गावर आहे. ज्यादिवशी पाणी मिळणार नाही तो दिवस कसा असेल ? याची साधी कल्पना जरी केली तरी अंगावर काटा उभा राहतो. पाणी म्हणजे जीवन आहे म्हणून त्याचे अपव्यय करणे टाळावे. पृथ्वीवरील दुसरे महत्वाचे म्हणजे हवा. आज वाढत्या कार्बनडायऑक्सईडमुळे माणसाला शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. ऑक्सिजन तयार करण्याचे काम वृक्ष करतात त्यामुळे त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात ' वृक्षवल्ली आम्हां सोयरे ' अर्थात वृक्षांना त्यांनी सोयरे, नातलगांची भूमिका दिलेली आहे. मोठमोठ्या शहरातील माणसांना शुद्ध हवा मिळविण्यासाठी सकाळी सकाळी घराबाहेर पडावे लागते. यावरून आपण विचार करू शकता आज वायूचे किती प्रदूषण वाढले आहे. पाणी आणि हवा यासोबत जंगल हे देखील खूप महत्वाचे आहे. कारण यामुळे अनेक सूक्ष्मजीव, कीडे, कीटक आणि प्राणी यांना संरक्षित जीवन मिळत असते. वसुंधरेला वाचविण्यासाठी कुणी एकजण प्रयत्न करून चालणार नाही तर प्रत्येकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून कर्तव्यदक्ष भावनेतून जीवन जगणे आवश्यक आहे. शेवटी एकच सांगावेसे वाटते की, निसर्ग असेल तरच आपण आहोत, अन्यथा आपल्या जवळ असलेल्या धन, संपत्ती, घर, पैसा याला काहीच किंमत नाही. म्हणून वेळीच जागे व्हा आणि या वसुंधरेला वाचवू या. 

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769
💐🌹🌱🌳🌱🌹💐
13) चला निसर्ग वाचऊया

          हवा,वारा,पाणी ,पशुपक्षी,प्राणी,नदी-नाले, झाडे-झुडपे या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन एक छानस दृश्य तयार होत ते म्हणजेच निसर्ग. ते आज काल आपल्याला मोबाईल च्या वॉलपेपर वर पाहायला मिळत. याला एकमेव कारण म्हणजेच मनुष्य.
                     मनुष्याने स्वतःच्या हव्यासापोटी स्वतःच व निसर्गाच खूप मोठ नुकसान केल. निसर्गामध्ये वावरणाऱ्या प्राणी पक्षाना बंदीस्त केल. टू-व्हीलर, फोर-व्हीलर सारखे वाहने रस्त्यावर आणून हवा प्रदूषण केली, मोठं मोठी उद्योग धंदे व कारखान्यातील दूषित पाणी नदी नाल्यां मध्ये सोडुन नदी प्रदूषित केली, तर मोठ मोठे इमारती व हॉटेल्स बांधण्यासाठी झाडांची कत्तल केली. या सगळ्या गोष्टीमध्ये कारणीभूत हा मनुष्यच दिसतो. या सगळ्याच्या परिणामामुळे आज मनुष्याला वेगवेगळ्या साथीच्या रोगाला, कँन्सर, शुगर सारख्या आजाराला सामोरे जाऊन मनुष्य आपल जिवन धोक्यामध्ये टाकत आहे.
                     मनुष्याला साथीच्या रोगापासून व इतर आजारापासून बाहेर पडायचे असेल व आपल्या पुढच्या पिढीला निसर्ग दाखवायच असेल तर आज मनुष्याने झाडे लावून त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजेल, नदी-नाले स्वच्छ ठेऊन हवा प्रदूषित होणार नाही याची पुरेपूर काळजी करावी तर आणी तरच आपण निसर्ग वाचवू शकतो, चला मग आपण सर्वानीच निसर्ग वाचवूया.

*लेखन : प्रतिक विजय उकले*
  *इचलकरंजी, जिल्हा - कोल्हापूर*
*मो.नं. 8624872409*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳               14) निसर्ग आणि वसुंधरा

        विश्व हे अनंत अशा आकाश गंगेपासून बनले आहे. या विश्वात कुठे तरी स्वर्ग आहे. तो स्वर्ग म्हणजे पृथ्वी वर आहे. पृथ्वी वर या निसर्ग,वसुंधरा मुळे स्वर्ग तयार झाले आहे. 
    निसर्ग म्हणजे जेथे पशू, पक्षी,वृक्ष, व यात बुध्दी जीव मानव असे अनेक जीव आहेत. या निसर्ग निर्माण करणारा हा तो साखळी सारखे व्यवस्थित असा निसर्ग निर्माण केला आहे. यात आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. 
       तुकाराम महाराज म्हणतात की, *वृक्ष वल्ली आम्हा सोयरी ,वनचरे* ह्या निसर्गाशी आपले प्रेमाचे संबंध आहेत. निसर्ग आपणास खुप काही देतो, निसर्गाशिवाय आपण जगू शकत नाही. 
     मानवाने खुप विज्ञान मध्ये प्रगती केली आहे. तो आकाश, पाणी, भूमी यावर विजय पावला आहे. अंतराळात जाऊन अनेक शोध मंगळावर गेला. पण माणूस पणा विसरला.  *अति तेथे माती* या म्हणी प्रमाणे निसर्ग हा त्याला जागा दाखवतो. याचीच प्रचीती म्हणजे *करोना व्हायरसचा जन्म हा माणूसपणाचा लोप पावलेल्या गुणाचा हा फळ आहे* 
    म्हणून म्हणतो मानवा या सुंदर अशा *वसुंधराची* रक्षण कर. निसर्गाने घालून दिलेले नियम पाळ. जिवन हे सुंदर आहे. नाही तरी करोना सारखा महाराक्षस जन्माला येवून संपूर्ण मानव जातीचा संहार करेल.  म्हणून आजचा दिवस 22एप्रिल हा *जागतीक वसुंधरा दिन* म्हणून साजरा करू या. 

     *   *बोईनवाड गुणवंत किशनराव*
        जि.प.हायस्कूल कुंडलवाडी 
(विषय शिक्षक)                        (होटाळकर)नांदेड

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
15) निसर्ग जपूया वसुंधरा वाचवूया*
     
       *डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर*
         शहापूर ,(ठाणे)9226435827

  
  निसर्ग हा आपला खरा मित्र आहे.खऱ्या अर्थाने केवळ पालनहारच नव्हे तर सच्चा ज्ञान दाता आहे.म्हणूनच कदाचित तुकाराम महाराजांनी  *'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती'* असे म्हणून वृक्षवेलींना आपले खरे सगे सोयरे अर्थात नातेवाईक मानले असावे.निसर्गाच्या प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला काहीतरी शिकवणच मिळत असते. *विविध हिरवीगार पर्ण लतिका पाहून निसर्ग आपल्या मनाला सदैव उल्हसित राहण्याचा मंत्र देतो,सदैव झुळ झुळ वाहणारी नदी आपल्याला नेहमी कितीही अडचण आली तरी कार्यरत राहण्याचा मंत्र देते.आकाशात स्वछंदपणे विहार करणारे पक्षी आपल्याला मुक्त मनाची शिकवण देतात.इतकंच कशाला निसर्गातील ऋतू चक्र माणसाला शिस्ती चे धडे शिकवतात. आपल्यासाठी मुक्तपणे फळे ,फुले देणारी वनराई आपल्याला दातृत्व शिकवते!!तर विस्तीर्ण होऊन जगावं कसं याचं ज्ञान दर्या सागर देत असतो.तसेच उच्च ध्येयाने प्रेरित होऊनही आपल्या मातीशी इमानी राहण्याची शिकवण हिमालयासारखी उंच शिखरे आपल्याला देत असतात.* खरे तर निसर्गाच्या प्रत्येक घटनेत *मनुष्याला काहीतरी मौलिक धडाच मिळत असतो.* फक्त आपण सर्वांनी या निसर्गातील घडामोडींकडे अगदी बारकाईने निरीक्षण करून त्यात हस्तक्षेप न करता  आपले जीवन जगले पाहिजे.
   निसर्ग नेहमीच आपल्यावर विविध प्रकारची मुक्तपणे उधळण करून मानवी जीवन समृद्ध करीत असतानाच *मानवाची असूरी हाव* निसर्ग चक्र बदलवण्याचा प्रयत्न करीत आहे.अनेक ठिकाणी भराव टाकून, जंगल तोड करून,अधिकाधिक खनिजे मिळविण्यासाठी खाण काम करून मानव निसर्गाचे मूळ अस्तित्वच बदलू पाहत आहे.खरे तर प्रत्येकाने *'निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो... हाव नाही'* ही बाब लक्षात ठेवून वागल्यास निसर्गाचंच  नव्हे तर सपूर्ण जीव सृष्टीचं अस्तित्व आपण टिकवून ठेऊ शकू आणि *'जीवन जीवस्य जीवनम्'* या निसर्ग शक्तीचं खऱ्या अर्थाने रक्षण करू शकू!
 *'वसुधैव कुटुंबकम'* म्हणजेच ही पृथ्वी हेच एक कुटुंब आहे हे सूत्र शिकविणारी आपली भारतीय संस्कृती.या पृथ्वीतलावर  असणारे सर्वच सजीव निर्जीव यांच्या साखळीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता आपल्या कुटुंबात जसे आपण सर्व जण गुण्या गोविंदाने नांदत असतो तशाच प्रकारे पृथ्वीतलावर निर्माण झालेले प्राणी पक्षी ,वनस्पती, सर्व सजीव व निर्जीव या सर्वांना समवेत घेऊन या पृथ्वीचं असित्व आपल्याला टिकवायचे आहे.या पंचमहाभुतांनी निर्माण झालेली सृष्टी अबाधित ठेवण्यासाठी आपण आपल्या गरजांवर नियंत्रण ठेऊन या वसुंधरेला सर्व प्रकारच्या प्रदूषणा पासून वाचवायला हवं. जाता जाता इतकंच म्हणावेसे वाटते
*हा नाश थांबवा हा विनाश थांबवा! या वसुंधरेचे तनमन जळते आहे ! ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे!* 
         *डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर*
         शहापूर ,(ठाणे)9226435827
        harilbhoir74@gmail.com
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳16) निसर्ग आपला सखा 

           सर्व सजीव प्राणी मात्रांना जगण्यासाठी मुबलक अन्न, हवा, पाणी, सूर्यप्रकाश उपलब्ध असलेला एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी होय. इथल्या काळ्या मातीत पिकणारे मोती हे मानवाची उपजीविका भागविणारा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.   वनस्पतींच संगोपन करणारी माती वेळप्रसंगी प्राण्यांची विष्ठा, वनस्पतींचा पालापाचोळा एकंदरीत टाकाऊ पदार्थ आपल्या उदरात सामावून घेते. कालांतराने त्यापासून पुन्हा वनस्पतींची निर्मिती होते.यातूनच निसर्गाचे औदार्य रूप दिसून येते.    
             मन उल्हासीत करणारा सूर्योदय,वसंत ऋतूत झाडांना फुटणारी पालवी, रंगबिरंगी फुलांनी सजलेला परिसर, त्या फुलमधून मध गोळा करण्यासाठी भुंग्याची धडपड, झाडांच्या सावलीत पक्षांच्या किलबिलाट, फुलपाखरांची पकडा पकडी, सायंकाळी हिरव्या, पिवळ्या वसुंधरेवर केशर पिंपडून खडकाच्या मागे होणारा तो सूर्यास्त. हे सर्व विलोभनीय दृश्य नेत्रसुख देणारं असलं तरी सहजासहजी पाहायला  मिळणे कठीणच. त्याला कष्टाची जोड असावी लागते तेव्हा वसुंधरेसारखी अप्सरा जगी दुसरी कुणी नाही हे आपल्या ज्ञानात येईल.
                    वाढत्या लोकसंख्येमुळे राहण्यासाठी जागेचा प्रश्न उद्भवतो. एका घरात 2 भाऊ असतील तर एकाला राहत्या घरापासून वेगळं स्वतःच सिमेंटच स्वतंत्र घर हवं असतं. हक्काच्या जागेवर कसंही चिरफाड करून, वर्चस्व  गाजवून आपण त्या जमिनीचे लॉकडाऊन करत आहोत हे आपल्या गावी ही नसते. मी थोड्या अधिक प्रमाणात निसर्गाची हानी केली  आहे हे मानायला माणूस कधीच तयार नसतो. तेव्हा खऱ्या अर्थाने तो माणूस हिंस्त्र, क्रूर आणि स्वार्थी बनलेला असतो.  
                  ज्या निसर्गामुळे मानवाचे जीवन बहरले त्याच्याच जीवावर उठलेली आजची पिढी म्हणजे पृथ्वीवर झालेल्या अफाट गर्दीचाच भार आहे असे म्हणायला हरकत नाही. देणाऱ्या जवळ हिरावून घेण्याचीही ताकद असते असे म्हणतात. जेव्हा ही ताकद निसर्ग दाखवायला लागेल तेव्हा मानवी जीवन अवघड होईल. जीवनावश्यक पंचमहाभुते मिळवितांना मानवाच्या नाकी नऊ येतील आणि मानवी जीवन धोक्यात येईल. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. मित्र, बंधू, सखा, मायबाप, परमेश्वर यांची भूमिका बजाविणाऱ्या प्राणप्रिय निसर्गाला जापुया. 
"निस्वार्थ निसर्ग प्राणप्रिय सखा आपला
जीवनातील रस सर्व निसर्गात सामावला"


नम्रता दिलीपराव उभाळे 
रा.तिवसा (अमरावती) 
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳17) वसुंधरा समृद्ध करा

  सुधाकर रामदास पाटील
          शहापूर, ठाणे
     7798963063
    

आज 22 एप्रिल! जागतिक वसुंधरा दिवस. आजपर्यंत कोणालाही पुर्णतः आकलन झाली नाही अशा दृश्य अदृश्य चमत्कारांची जननी म्हणजे वसुंधरा! 
सर्व जगाची खऱ्या अर्थाने पोशिंदी असल्यानेच तिला धरणी माता असे म्हटले जाते. 
तमाम मानव जातील मधुर फळे, सुवासिक फुले, पोटभर अन्न, मनमुराद हवा, गारेगार सावली, निर्मळ पाणी, हिरवीगार पाने असे अमूल्य दान देणारी भूमाता म्हणजे एक गूढ रहस्य आहे. 
 उंच उंच डोंगर, खोल खोल दऱ्या, मंजुळ गाणारे पक्षी, झुळझुळ वाहणारे झरे, महाकाय प्राणी, विशाल जलाशय हा सारा निसर्गाचा अनमोल असा ठेवा आहे.
  एक मात्र नक्की निसर्गातील प्रत्येक घटक एकमेकांना हवे ते आदानप्रदान करीत असतात. भूमातेच्या वैरणावर जगणारे चतुष्पाद प्राणी आपल्या मलमूत्राने वसुंधरेला समृद्धी देतात. फळे खाऊन उदरनिर्वाह करणारे पक्षी बीजप्रसार करून अधिकाधिक वृक्ष निर्माण भूमातेला सौंदर्य प्रदान करतात. रानातील वन्यजीव निसर्ग सौंदर्याचे रक्षण करतात. जलाशय उष्ण होऊन वाफेच्या रूपाने वर जाऊन ढग बनून बरसतात आणि भुजलपातळी वाढवतात. झाडांचा पालापाचोळा मातीत मिसळला की त्याचे नैसर्गिक खत तयार होऊन माती सुपीक होते. प्रत्येक जीव आपल्या परीने योगदान देऊन या वसुंधरेला अधिकाधिक बळ देण्याचे प्रयत्न करीत असतात.
एकमेव मानवरूपी हावरट जीव जन्माला घालून मोठी चूक केली की काय असा प्रश्न वसुंधरेला पडणे स्वाभाविक आहे.
   स्वतःच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्यासाठी भरमसाठ वृक्षतोड करून पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास मानव कारणीभूत ठरत आहे. उद्योगांची मालिका निर्माण होत असताना प्रदूषण नावाचा भस्मासुर जन्माला घातला जात आहे. धरणांची निर्मिती, मोठमोठ्या महामार्गांची निर्मिती यातून प्रगतीची चाके जरी वेगाने फिरत असली तरी वसुंधरेची चाके मात्र विनाशाकडे नेताहेत याचे भान मानवाला राहिलेले नाही.
  म्हणूनच धरणी माता तिच्या लेकरांना हाक मारीत आहे,

विनविते धरणीमाता
ऐक माझ्या लेका
उजाड होतेय आई तुझी 
सांग हे बरे का
फळे फुले देते तुला
नाही केली कमी
निर्मळ जीवनाची
मीच देते हमी
विचार माझा सोड वेड्या
तुझे होईल काय
काळ्याकुट्ट भविष्याकडे
 चालले तुझे पाय 

वेळीच आपण जर सावध झालो नाहीत तर विनाशाचा काळ जवळ आलेला आहे.  
 वसुंधरेच्या समृद्धीसाठी पर्यावरणाची कास धरूया. नैसर्गिक खतांचा वापर करून रासायनिक खते टाळूया. भूजल पातळी वाढवूया आणि भरपूर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करून झाडांची अमानुष कत्तल थांबवूया आणि ही वसुंधरा म्हणजे आपली आई पुन्हा एकदा स्वर्गासारखी सुंदर बनवूया .
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳18) निसर्गाशी मैत्री - माझी वसुंधरा
〰️〰️〰️〰️〰️〰️

*“ वाहील वारा हसेल आभाळ*
  *झाडा-फुलांचा करू सांभाळ*
*ढग देतील पाणीच पाणी*
*पक्षी गातील सुरेल गाणी "*
निसर्ग हा मानवाचे प्रेरणास्थान आहे.
निसर्गाचे व मानवाचे अतूट नाते आहे. निसर्ग हा मानव व इतर सजीव सृष्टी करता आणि सजीव सृष्टी निसर्ग करिता, दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही.
' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. माणूस हा निसर्गाचे लेकरू ना! 
निसर्गाच्या रम्य वातावरणात माणूस आश्रयस्थान घेतो. निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे. निसर्ग मानवाची भूक भागवतो तहान शमवितो, मंद मधुर वायू लहरींनी श्रमाचा परिहार करतो, सुगंधी फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो. 
पण सध्या या यंत्रयुगाच्या आणि विज्ञान युगाच्या जाळ्यात माणूस इतका अडकला आहे की, निसर्गाकडे तो दुर्लक्ष करत आहे.  माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या तात्पुरत्या सुखासाठी निसर्गाचा गैरवापर करत आहे. पर्यावरणाला काळीमा फासण्याचे कार्य बुद्धिमान समजला जाणारा सृष्टीवरील मानव   करत आहे. प्रदूषण निर्मिती करून आज जिकड पहावेे तिकडे प्रदूषण फोफावत चाललेले आहे. या प्रदूषणाचा पर्यावरणावर म्हणजेच निसर्गावर परिणाम होऊन या निसर्गाचा,  पर्यावरणाचा तोल ढासळला जाऊ लागला आहे. पर्यायाने संतुलन बिघडलेले आहे. ही प्रदूषणाची गंभीर समस्या होऊन बसलेली आहे. तरीदेखील मानवाला आपली वनश्री आपले वैभव आहे हे त्याला समजून नाही राहिले. या सर्वाचा विपरीत परिणाम मानव प्राण्यावर होत आहे. हिरवेगार डोंगर लुटण्याचा लोभ माणसाला आवरेना, डोंगर उघडा बोडका करून माणूस  आता अश्रू ढाळू लागला. पण या उघड्या डोंगराचा माथा झाकण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे हवीत. जमिनीची धूप थांबविण्यासाठी आणि भरपूर पाऊस पडावा यासाठी झाडांची आवश्यकता आहे. निसर्ग म्हणतो, ' अरे मित्रा मी तुझ्याच साठी जगत होतो ना! तुझ्यासाठी मरत होतो ना! निसर्ग माणसाला पावलोपावली शिकवत असतो आणि माणूस चुकला तर त्याला सजाही देतो. पण ही सजा तात्पुरती असते. माणसाला गर्व झाला की निसर्ग त्याला धडा शिकवतो. माणसाचे डोळे उघडताच पुन्हा तो आपल्या निसर्ग मिञाची  सोबत घेऊन त्याचा पुन्हा जीवनसाथी बनतो. असे हे निसर्गाचे मानवाशी अतूट नाते आहे. निसर्ग हा माणसाचा महान गुरू, सखासोबती आहे. या प्रेरणेचे निसर्ग स्थान असलेल्या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे. आपली सृष्टी हिरवीगार शाल पांघरून सजलेली, नटलेली असावी, दिसावी यासाठी आपण आपल्या निसर्गाला जपले पाहिजे.
तेव्हा  सर्वत्र झाडे न कापता ते अधिक प्रमाणात लावून जगवले पाहिजे.पाण्याची स्वच्छता राखली पाहिजे.वृक्ष वेलींवर पुञवत प्रेम केले पाहिजे.तेव्हा पर्यावरणाचा समतोल राखता येईल. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हे उगाच नाही म्हटले संत तुकाराम महाराजांनी. 'आपली वनश्री आपण जपूया, वैभव तिचे राखूया'
हाच मंत्र आपण जपला पाहिजे आणि कृतीत उतरवला पाहिजे.

" लावू रोपटे होईल झाड
  पक्षी गातील पानाआड l
येतील फळे बहरतील फुले
झाडाखाली मग खेळतील मुले
ताजी शुद्ध मिळेल हवा
सुगंध फुलांचा घेऊन नवा.

चला तर मग
वसुंधरेच्या पोटी रुजवण 
बियांची करूया, 
निसर्गाशी घट्ट  नाते 
आपले जुळवू या....
म्हणूनच म्हणावस वाटत 
'इथे कर  माझे जुळती, जिथे निसर्ग आहे माझा सोबती'
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती  प्रमिलाताई सेनकुडे. 
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳19) वसुंधरा 

 दिनांक २२  एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन पाळण्यात येतो .  बेसुमार वृक्षतोड ,  रात्रंदिवस चाललेला वाळूउपसा , सिमेंटची उभी राहात असलेली अवाढव्य जंगले . डोंगरमाथ्याचे होत असलेले सपाटीकरण , कारखाने व वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण .  नदी मधे सोडले जाणारे शहरांमधील मैलायुक्त पाणि,   आणि आपली बदललेली जीवनशैली या मुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे . याचे दुष्परिणाम मानवांना भोगावे लागत आहेत .
 माणसे झाडे तर तोडतात पण वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होत नाही .   घर बांधताना प्रथम बोअर मारला जातो . बोअर मुळे पृथ्वीची अक्षरशः चाळण होत आहे .
   झाडेच नाहिशी झाली तर पशूपक्षांनी घरटे बांधायचे कुठे ? बेसुमार जंगलतोडीमुळे जंगली जनावरांचा वावर शहरात होऊ लागला आहे . पाण्याच्या शोधात ते गावाजवळ येवू लागले आहेत . कधी कधी आक्रमक होऊन माणसावर हल्ले करु लागले आहेत.
       देशात एकाच वेळी कुठे अवर्षण तर कुठे  अतिवृष्टी  चे संकट आपल्यावर येत आहे . हे सर्व टाळायचे असेल तर  निसर्गावर मात करणे सोडून निसर्गाची साथ करायला शिकले पाहिजे  .  
 काले वर्षतू पर्जन्य पृथ्वी सश्यशालीनी ! हे जर अनुभवायचे असेल तर  व्क्षारोपण व वृक्षसंवर्धन करायला पाहिजे .  पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून  बोअर व विहिरींचे पुनर्भरण केले पाहिजे 
   स्वयंचलीत वाहनांचा वापर कमी केला पाहिजे व वायूप्रदूषणास आळा घातला पाहिजे . प्लॅस्टीक च्या अति वापरामुळे व त्याची विल्हेवाट निट न लावणार्या मुळे शहरात थोड्या पावसाने ही रस्ते तुंबले जात आहेत . त्यामुळे अनेक जीव जात आहेत  .   हे सर्व टाळावयाचे असेल तर आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे . परमेश्वराने मुक्तहस्ते उधळण केलेलं हे निसर्गाचं दान आपल्यासाठी आहे व ते टिकवणही आपल्याच हातात आहे .

             अरविंद कुलकर्णी पुणे
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
 20) निसर्गाचा असमतोल आणि शेतकरी

आज जागतिक वसुंधरा दिन निसर्ग याच निसर्गावर आपल्या मानवाचं अवघ्या मानव जातीचा आयुष्य अवलंबून आहे.मानवा सोबतच ईतर  प्राणी या निसर्गाचा अविभाज्य घटक यात येणारे डोंगर-दऱ्या, झाडे, पर्वत, नदी  सर्वांच  एक निसर्ग हा प्रकार तयार होतो एके ठिकाणी खूप छान वाचनात आले आहे की,      यह सृष्टी इतनी सुंदर  है तो इसका रचियता कितना सुंदर होगा खरंच सृष्टी बनवणारा किती सुंदर असेल असो पण आज काल जे निसर्गाचा असमतोल ढासळलेला आहे यास कारणीभूत अखंड मानव जात असेल पण याचे परिणाम  माझ्या शेतकऱ्याला भोगावे लागतात * तिन्ही ऋतूत बिघडलेले वातावरण हे शेतीला आणि शेतकऱ्याच्या परिस्थितीला मारक ठरत आहे उन्हाळ्यामध्ये येणारा अवकाळी पाऊस त्यामुळे पिके होणारी खराब   अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडतो त्यावेळेस आणि ज्या वेळेस नको  त्या वेळेस पाऊस पडून पिकाची नासाडी करतो अशा अनेक गोष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे शेतात उभे असणारे पिकावर त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न अवलंबून असतो आणि अशातच भल्यापहाटे निसर्गाच्या असमतोलामुळे धुके संपूर्ण परिसर व्यापून टाकते  आणि फुलोऱ्यात असणारे पिक  पिक पूर्णतः नष्ट होते  
निसर्गाचा असमतोल वाढवण्यास कारणीभूत फक्त शेतकरीच नाही तर कारखानदार ,शहरात राहणारे लोक यास कारणीभूत आहे पण याचे परिणाम बहुतांशी शेतकऱ्यालाच भरावे लागतात त्याच्याच जीवन हे  पूर्णतः शेतीवर आणि शेती माती वरच अवलंबून असते हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस हिरावला जातो शेतकरी पूर्णतः नष्ट होतो उदाहरणच द्यायचं झाल्यास फेब्रुवारी मार्च हा शेती पिके काढण्याचा कालावधी असतो गहू ,कांदा, कांद्याचे बी अशा विविध पिके काढणीस आलेले असतानाच जर थोडा पाऊस झाला तरीही शेतकऱ्याची पूर्ण वर्षाची मेहनत वाया जाते त्याच प्रकारे ज्यावेळेस डिसेंबर मध्ये गव्हाच्या पिकाला थंडीची आवश्यकता असते त्याच वेळेस जर आकाशात आभाळ येऊन दमट वातावरण तयार झाले तेव्हाही पूर्णतः नष्ट होते म्हणजेच काय तर शेतकऱ्याला शासन-प्रशासन, व्यापारी, दलाल यांच्यासोबतच निसर्गाशी तोंड द्यावे लागते सर्वांशी तोंड देता देता शेतकरी हतबल होतो आणि त्याच शेतकऱ्याला ज्याला जगाचा पोशिंदा म्हटल्या जातं त्याला स्वतःच्या मुलाबाळांचा पोट भरण्याची अशक्‍य होतं

 *आला भरून आभाळ 
थंडीच्या या दिवसात 
पिक फुलाले रानात
बाप झुरतोया मनात
मिरुगाता कुठे होता 
नव्हता त्याचा तपास 
आता  का छेळतोय 
माझ्या शेतकरी बापास

अशाप्रकारे या निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम मान शेतकऱ्याला भोगावा लागतो.

✒संदिप नानासाहेब वाकडे
       रा.खेडा ता.कन्नड
        जी.औरंगाबाद 
      📲9766992776

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 21) जागतिक वसुंधरा दिन

 पर्यावरण आणि मानव यांच्यातील संबंध अतूट आहेत.  "जिथे आपण राहतो त्या ठिकाणचे संपूर्ण वातावरण किंवा पर्यावरण" याला सजीव जैविक आणि निर्जीव, अजैविक घटक असे म्हणतात. या दोघांमध्ये परस्पर संवाद नेहमीच होत असतो.ही नेहमीच चालू असलेली निरंतर अशी प्रक्रिया आहे.वातावरणात स्थित खनिज आणि इतर साधन संपत्तीच्या मदतीने मानव आज विकासाच्या उच्च स्तरावर बसला आहे. स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मानवाने निसर्गात अनेक प्रकारचे बदल करून नवनवीन शोध लावले आहेत.
 प्राचीन काळातील गुरुकुल व्यवस्थेमुळे पर्यावरणाला स्वतंत्रपणे ओळखण्याची गरज नव्हती.  20 व्या शतकात, गुरु रविंद्रनाथ टागोर यांनी नैसर्गिक, पर्यावरणीय दृष्टीने "शांतिनिकेतन" ची स्थापना केली.  ज्यामुळे धरतघ मातेबद्दल कृतज्ञतेचे स्वरूप मनामध्येच तयार होत होते.सर्वांनी प्रत्यक्षपणे निसर्ग हाताळला.निसर्गाच्या सानिध्यात राहून शिक्षण घेतले व निसर्गाची सेवा केली.परंतु आजकाल आपण पहात आहोत, मानल सर्व प्रकारे निसर्गाचे नुकसानच करत आहे.मानव पर्यावरणाला प्रदूषित करीत आहे.आजची मानवाची स्थिती शेखचिल्लीसारखी बनली आहे.ज्या वातावरणात आपण आपल्या मदतीने राहत आहोत त्याच वातावरणाचे आपण मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहोत आणि आपण स्वत: च्या पायावर स्वतः च कुऱ्हाड मारुन घेत  आहोत.शहरीकरण, रस्ते विस्ताराच्या नावाखाली अगणित झाडे आपण तोडली आहेत.व तेथे सिमेंटचे जंगल बांधत आहोत.धरणाच्या नावाखाली बरीच एकर जमीन गायब होत आहे.त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येचा परिणामही पर्यावरणावरही होत आहे.या सर्वांचा परिणाम पर्यावरणीय असंतुलन होण्यावर होत आहे.
 मानवनिर्मित आणि निसर्ग निर्मित असे दोन प्रकार वातावरणात दिसून येतात.धर्म, संस्कृती, वाढती लोकसंख्या, सामाजिक आणि आर्थिक सर्व मानवनिर्मित वातावरणात येतात.  निसर्गाचे सजीव, निर्जीव घटक हे पर्यावरणाचे अंगभूत घटक आहेत.सजीव, वनस्पती आणि सूक्ष्म जीव या जिवंत घटकांमधे येतात, तर निर्जीव घटक म्हणजे माती, पाणी, पर्यावरण.परंतु या सर्वांना मानवाच्या चुकीच्या जगण्याच्या मार्गामुळे मानवांबरोबर व इतर सजीवांच्या अस्तित्वाचा धोका उत्पन्न झाला आहे.त्यामुळे मानवाला आपल्या गरजा यख कमी केल्या पाहिजेत. आज या कोरोनामुळे मानव स्वतःला बंदिस्त करुन जगतो आहे.आता त्याला आपल्या गरजख कीती कमी आहेत याची जाणीव झाली असेल.आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी या धरतीला कीती ओरबाडत होतो,कीती नुकसान करत होतो हे लक्षात आलेच असेल.जर आपण निस्वार्थीपणाने जगलो तरच पृथ्वीवरील आनंद व धरतीचा समाधानाचा आवाज आपल्याला ऐकू येईल आणि आपण कसे विनाशाकडे जात आहोत हेही कळेल.असे होणार नाही याची काळजघ मानवाने घेतली पाहिजे. ओझोनला पडत असलेल्या कींवा वाढत असलेल्या छिद्रामुळे वातावरणाच्या पातळीत वाढ झाल्यामुळे सूर्याच्या किरणे थेट पृथ्वीवर आदळत आहेत.त्याचप्रमाणे आजकाल ग्रीनहाऊसमधील सीएफसी वायू, क्लोरोफ्लोरोकार्बन  या कार्बनमुळे ओझोनच्या स्तराला नुकसान करीत आहोत ज्यामुळे मानवाला त्वचेचा कर्करोग यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
 यासाठी आपण काय करावे?  आम्हाला धरणीवरील  पर्यावरणाचे विविध घटक हाताळावे लागतील आपल्या परिसरामध्ये पाण्याचे साठे शुद्ध ठेवावे लागतील, जमीन, पाणी व जंगलाचे संरक्षण, संवर्धन झाले पाहिजे.आपण पर्यावरणपूरक राहिले पाहिजे.आपण ग्रामीण किंवा शहरी कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करायचे नाही. झाडे मोठ्या प्रमाणात लावावीत.  आधुनिक विज्ञान वापरुन जनजागृती,केली पाहिजे. वाहतुकीच्या साधनांचा आवाज कमी येईल असे नियोजन केले पाहिजे.
 सरकार तर प्रयत्न करीतच आहे,त्याचबरोबरीने वातावरणाचे रक्षण करणे हे आपलेही कर्तव्य आहे याची जाणीव देखील ठेवायला हवी. निसर्ग आपल्याला विपुल प्रमाणात निस्वार्थीपणे सर्व काही देतो.तेही हात न आखडता,कोणताही दुजाभाव न करता.मग आपणच का बर असं राक्षसासारखे वागायचे? मानव आहोत.मानवासारखे जगून आपण स्वतः चे रक्षण तर करुयाच पण.बाकी या धरतीचे,या धरतीवर राहणाऱ्या सर्व प्राणीमात्रांचे त्याचबरोबरीने जैविक व अजैविक सर्वांचेच रक्षण करुया.
  हिरवीगार झाडे डोलती रानी
  जीवनात नवीन आशा जागवण्यासाठी
  मानवा आता जागा हो तू खरंच 
  घे शपथ वृक्षसंवर्धन,वसुंधरा रक्षणासाठी

 लेखिका
 श्रीमती माणिक नागावे
 कुरुंदवाड, ता.  शिरोळ
 जिल्हा  कोल्हापूर
 9881862530
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
22) निसर्ग

        निसर्ग म्हटले की डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते म्हणजे डोंगर-दऱ्या,सरिता-सागर,हिरवीगार झाडे, सुर्योदय- सुर्यास्त ,पक्षांचे मधुर आवाज त्यांचे नृत्य, पशुंचे ओरडणे या सर्वांनामिळून निसर्ग म्हटले जाते. निसर्गाच्या सहवासात आपण लहानाचे मोठे होतो निसर्गातील काऊचिऊशी आपली ओळख करून देते ती आपली आई. मग ओळख होते ती  चांदोमामाशी. त्यांच्या सहवासात आपलं बालपण कधी सरतं ते कळतच नाही. निसर्ग म्हंटला की बालकवींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.’गवतफुला'शी असलेले बालकाचे नाते मनाला वेड लावते.रोज सुर्योदय पाहतो रोज त्याची नवी नवी रूपे बघायला मिळतात. रोज नवी उमेद, नवी चेतना तो देतो. अविरत कर्मयोग समजावतो. त्याला बघितले की सहज हात जोडले जातात आणि शब्द फुटतात ‘सूर्य नारायणा तुला हात जोडते आरती,उष्मा देई सकलांना तोषवी ही धरती.” निसर्गातील वृक्ष म्हणजे आपले सगेसोयरे .जन्मापासून ते मृत्युनंतर देखील हे सोबत करणारे. मानव, पशू पक्षी यांच्या मूलभूत गरजा भागवणारे .मानवाचा अविभाज्य भाग असणारे, प्राणवायूचा पुरवठा करणारे, पक्षांची उत्पत्ती स्थिती लय ज्याठिकाणी होतात ते वृक्ष.त्याचप्रमाणे नद्या देखील त्याचा जवळ गेले असता मनाची मरगळ  मालिन्य दूर होते.मनाला चैतन्य मिळते. मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना पार करून माणसाने आपले ध्येय गाठायला हवे आणि आपलं मन निर्मळ असायला हवं असंच जणू नदी सांगते.माणसाने आपली बौद्धिक उंची वाढवली पाहिजे. कितीही संकटे आली तरी स्थिर असायला हवे असा संदेश देणारे डोंगर. परकीय आक्रमणापासून त्या प्रदेशाचं रक्षण करतात .समुद्राकडे बघितले की त्याचे अथांग ,निळेशार स्वरूप पाहून स्वतःच्या मनाच्या खुजेपणाची लाज वाटते. समुद्राची गाज माणसाला बेधुंद करते .समुद्रातील भरती आहोटी म्हणजे जणूकाही मानवाच्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखाच प्रतिक.
             निसर्गातील पशू-पक्षी, झाडे-वेली माणसाला आनंद देतात. त्यांच्या जवळ गेल्यावर माणसाचे नैराश्य  निघून जाते. मनावरील ताण कमी होतो. निसर्गातील पानांची सळसळ ,रिमझिमणारा पाऊस वाऱ्याची झुळूक, पौर्णिमेचा चंद्र,शरदांचं चांदण मानवाच्या वेदनांवर ,दुःखावर फुंकर घालून त्या वेदना ते दुःख विसरायला लावतात. जगण्याची नवी उर्मी, चेतना देतात. निसर्गातील फुलपाखरे मनाला मोहिनी घालतात .कमलीनी भोवती गुंजारव करणारा भुंगा वेगळाच नाद निर्माण करतो. वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे आवाज मनाला. भूल पाडतात.मधमाशांची गुंणगुण तिची चिकाटी तिचे पोळे बनवण्याचे कौशल्य बघून आपण अवाक् होतो. सुगरणीचा खोपा बघितला की वाटतं कोणी दिलं असेल यांना स्थापत्यशास्त्राचं ज्ञान. गाईचं वासरू जन्मल्याजन्मल्या पायावर उभे राहतं, मानवाच्या बाळाला स्वत:च्या पायावर उभं रहायला  15 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो. घरट्यातील पक्षीण आपल्या पिल्लांना दाना भरवते ते पाहतानांच  दृश्य किती विलोभनीय असते .सुंदर रंगीबिरंगी फुलं, त्यांचा सुवास, पानांच्या हिरव्या रंगातील विविधता, पानांच्या आकारातील विविधता प्रत्येकाचे असणारे वेगवेगळे उपयोग आणि महत्त्व. निसर्ग मानवाला भरभरून देत असतो. तो कधी भेदभाव करत नाही सर्वांनाच समदृष्टीने पाहतो दगड मारणा-यालाही  फळ देतो घाव घालणा-यालाही छाया आणि माया देतो . देणा-याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे असेच जणू सुचवत असतो. निसर्ग हा मोठा जादूगार आहे. काय जादू करतो कळत नाही त्याच्या जवळ केले आहे की माणूस हरखून जातो.
    निसर्गातील मोहविवणाऱ्या घाटातल्या वाटा,मार्गात येणारे खाच-खळगे, काटे देखील आढळतात. जणू वेगाला मर्यादा घालण्यास  सांगतात. निसर्गचक्र हे अविरत सुरुच असते. रात्री मागून दिवस ,दिवसामागून रात्र,ऋतू मागूनी ऋतू येत जात असतात.जीवन देखील सुखदुःख, मान-अपमान, यश-अपयश अशा चक्रात अडकलेले आहे .एकापाठोपाठ हे अविरत येत असतात. त्यांना घाबरून न जाता धैर्याने वाटचाल करून मानवाने ध्येय गाठले पाहिजे असा संदेश निसर्गचक्र देत रहाते.’ये भी दिन जायेंगे' असा निसर्ग संदेश देत असतो.यामुळे संकटात धीर मिळतो तर चांगल्या परिस्थितीत माणूस गर्वाने फुगत नाही. कोणत्याही परिस्थितीत तो खंबीरपणे उभा राहतो
    पण मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला ओरबाडले. वृक्षतोड करून पर्यावरणाचे संतुलन बिघडवले. स्वतःच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करून धरेची सुपीकता कमी केली. डोंगर फोडून ते भुईसपाट केले. नद्यांचे प्रवाह अडवून बांध घातले. निसर्गावर अतिक्रमण केले. निसर्गामध्ये मानवाने हस्तक्षेप केल्याने निसर्गाचे संतुलन बिघडले .पृथ्वीवरील तापमानात त्यामुळे वाढ होऊन पृथ्वीवरील बर्फाळ प्रदेश वितळू लागलेत. त्याचा परिणाम काही भागात महापूर ,काही भागात दुष्काळ, कुठे भूकंप तर कुठे चक्रीवादळे निर्माण होऊ लागलेत. त्याचा परिणाम साथीच्या आजारांनी थैमान घालण्यास सुरुवात केली. पर्जन्याचे प्रमाण कमी झाले.मागील दशकातील लोकसंख्या प्रस्फोटामुळे अन्नधान्य, स्वच्छ पाणी,भूमी, शुद्ध हवा यांची कमतरता भासू लागली.वायूप्रदूषण,जल प्रदूषण,भूमीप्रदूषण,ध्वनीप्रदूषण यासारखे विविध प्रदुषणांमध्ये वाढ झाल्याने मानवी जीवन, निसर्गातील जैवविविधता धोक्यात आली. अन्नसाखळी वर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.
          मानवाने यावर नियंत्रण घालायला हवे. मोठ्या प्रमाणात झाडे लावून ती जगवायला हवीत. जनजागृती करून प्रत्येकाने किमान एक झाड लावायला हवे.मंगलप्रसंगी एक रोप शुभेच्छा स्वरुपात भेट द्यावे.उजाड माळरानावर,टेकड्यांवर पावसाळ्यापूर्वी बीया टाकाव्यात.रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावायला हवी. डोंगरांचे देखील संरक्षण करायला हवे. बांधकामावर आळा घालून सर्व प्रकारच्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले पाहिजेत. निसर्ग मानवाचा मित्र आहे त्याला जपलेच पाहिजेत,कारण त्याच्यावरच आपले अस्तित्व अवलंबून आहे. केवळ मानवाचेच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाचे रक्षण ,संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
       - सौ.आरती डिंगोरे, नाशिक.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳23) लेणं वसुंधरेचं

"सृष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे 
ओठावर झेलू या थेंब पावसाचे "
अनादिकालापासून आपली सृष्टी ,वसुंधरा आपल्याला भरभरून देत आलेलीआहे .पावसाची रिमझिम ,नद्यांचे खळाळणारे पाणी ,पक्षांचा मधुर आवाज ,मधुर फळे अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी ,असंख्य जीव या सर्व घटकांच्या द्वारे वसुंधरेने मानवाचे जीवन समृद्ध केलेले आहे .
"जिओ जीवस्य जीवनम् " याचा अर्थ सृष्टीचा प्रत्येक घटक महत्वपूर्ण आहे. प्रत्येक घटक दुसऱ्या घटकांवर अवलंबून आहे आणि म्हणुनच सृष्टीचे हे चक्र अखंडपणे सुरू आहे .आज वसुंधरा दिवस .सृष्टी सोबत असलेल्या मानवाच्या नात्याची वीण अधिक घट्ट व बळकट करण्याचा दिवस. तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून तिचे संवर्धन करण्याचा दिवस .हो आज मानवाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देण्याची गरज निर्माण झालेली आहे .कारण मानव वसुंधरेचे लेणंच हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहे. आधुनिकतेच्या नावाखाली प्रचंड जंगलतोड करून सिमेंटचे जंगल उभं केलं आहे मानवाने .अर्थात आपणच .आपण हे विसरूनच गेलो की या वसुंधरेच्या नानाविध घटकांपैकी असलेला एक छोटासा घटक म्हणजे मानव .ह्या वसुंधरेचे प्रेम मिळण्याचा जेवढा अधिकार मानवाला आहे तेवढाच अधिकार पशु-पक्षी, कीटक ,वृक्षवेली ,नद्या ,पर्वत या सर्वांना आहे. या सर्व घटकांचे जतन-संवर्धन केले तरच पर्यायाने आपलेही जीवन सुखी व समाधानी होणार आहे .मात्र संपत्ती जमविण्याच्या मोहात मानव ह्या वसुंधरेचे सुंदर रूप विद्रूप करू लागला .प्लास्टिकचा अतिवापर ,वाहनांची प्रचंड गर्दी ,इलेक्ट्रॉनिक कचरा ,फर्टिलायझर्सचा अतिवापर या सर्वांमुळे जल प्रदूषण ,वायू प्रदूषण ,माती प्रदूषण ,ध्वनी प्रदूषण होत आहे .शासनाने अनेक कठोर कायदे ,नियम करूनही हे प्रदूषण कमी झाले नाही. प्रदूषणाचे वाईट परिणाम आपण भोगत आहोतच . त्याचप्रमाणे सृष्टीमध्ये मानवाचा वाढता हस्तक्षेप दिसून येत आहे. उत्तराखंडमधील महाप्रलय ,कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढते प्रमाण अशाप्रकारे दुष्परिणाम आपण बघत आहोतच .आपल्या पुढच्या पिढीला सृष्टीचे व निसर्गाचे वर्णन केवळ पुस्तकात वाचायला मिळेल का ?कारण एक घास चिऊचा ,एक घास काऊचा हे सांगण्यासाठी चिऊ-काऊ तर जिवंत राहिली पाहिजे ना! त्यांना तर आपण मोबाईलच्या टॉवरमधून निघणाऱ्या लहरींनी अक्षरश: नष्ट करतोय .पण अजूनही वेळ गेलेली नाही आपण वसुंधरेला सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न करू शकतो .ज्याप्रमाणे  रामसेतू बांधतांना खारीनेही सहभाग घेतला होता त्याप्रमाणे आपणही खारीचा वाटा घेऊ शकतो .अगदी छोट्या छोट्या कृतींमधून हे शक्य आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे ,ओला कचरा ,सुका कचरा वेगळा ठेवणे ,परिसर स्वच्छ ठेवणे ,निर्माल्य, निर्माल्य कलशात टाकणे ,प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न घेता मातीच्या मूर्तीचे पूजन करणे ,जवळपास जायचे असल्यास वाहन टाळणे ,वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे अशा प्रकारे विविध उपाय करून आपण वसुंधरा सुंदर बनवू शकतो. या काळात आज एका विषाणूमुळे चिंतेचे भयाचे वातावरण तयार झाले आहे आणि आपल्याला त्या विषाणूने 'दे माय धरणी ठाय '
करून सोडले आहे .आपण आपल्याच पिंजर्‍यात कैद झालो आहोत .पण या काळात नद्यांचे पाणी स्वच्छ झालेले दिसून येत आहे .प्राण्यांचा मुक्तविहार, संचार वाढला .वायुप्रदूषण कमी झाले .यावरून आपल्या लक्षात येते की आपण अजूनही वसुंधरेला सुंदर बनविण्याचा प्रयत्न करू शकतो आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. मग ही सृष्टी, ही वसुंधरा खरोखर हिरवा शालू पांघरलेली नववधु वाटेल. तिचं लेणं अबाधित राहील आणि बालकवींनी वर्णन केल्याप्रमाणे वेल रुपी हिरव्या हिरव्या गार गार गालिच्यावर सुंदर फुलराण्या खेळतील यात शंकाच नाही .

प्राध्यापिका सुनीता आवंडकर बारी ,      नाशिक
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳24) आणि वसुंधरा क्षणभर हसली ....... 

     आज जगभर ज्या कोरोना नामक मानवभक्षी , यमदेवीने थैमान माजवले त्याची कसर काढणे , भरपाई करणे मानवाला फारच अवघड जाणार आहे . ह्या महामारीपासून जीव वाचवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणून मानवाने स्वतःला लॉकडाऊन करून घेतले . त्यामुळे सर्व रस्ते , शहरे , गाव , वाडी - वस्त्या अगदी निर्मनूष्य झाली . कोणत्याही वाहनांचा आवाज नाही की धूरही नाही . त्यामुळे फक्त एकच फायदा झाला तो म्हणजे या ' वसुंधरेचा ' ! 
     जी या स्वार्थप्रिय मानवप्राण्याने आपल्या तिक्ष्ण व धारदार नखांनी या सुंदर , सुकुमार , सौंदर्यवती वसुंधरेला ओरबाडून तिची लक्तरे काढून तिला विद्रूप व जखमी करून ठेवले . ती वसुंधरा या मानवी अत्याचार व संहाराने अर्धमेली झाली होती ! तिच्या चेहऱ्यावरील हास्य तर पार अदृश्यचं झालं होत . पण मानवाच्या लॉकडाऊनमुळे जणू तिचे पुनर्जीवन झाले . आणि ती जणू ओठांनी पुटपुटत होती - 
     " आता मेल्या मरणाला 
         जिती पालवी फुटेल 
         सुकलेल्या आसवांंना 
         पंख नविन येतील !! "
     
     आणि पाहता - पाहता सर्व पृथ्वीवरील मरगळ व धूळ झटकल्या गेली . नदी - नाले स्वच्छ व निर्मळ दिसू लागली . आभाळ आपले सुंदर निळे रंग दाखवू लागले . पशू - पक्षी मनसोक्त विहार करू लागले . आणि या सर्वांच्या परिणामस्वरूप वसुंधरेच्या चेहऱ्यावर हरवलेले हसू परत आले . ही वसुंधरा हसायला लागली ..... 
     आपले गमावलेले सौंदर्य व आपला परिवार तिला पुन्हा मिळाला . ती आनंदी व उल्हासित झाली . अशा या वसुंधरेचा आज जागतिक दिन म्हणून गौरव दिन साजरा केला जातो . अमेरिकन सीनेटर जेराल्ड नेल्सन यांनी 1970 मध्ये ही संकल्पना उदयास आणली . जी आज देशभरात 190 पेक्षा अधिक देशात हा वसुंधरा दिन साजरा केला जातो .
     असे म्हटले जाते की , ऋतू बदलण्याचे अनुमान माणसापेक्षा पशू - पक्ष्यांनाच फार लवकर लागतात . ज्या वर्षी पाऊस जास्त येणार असेल तर असे म्हणतात की कावळे उंचावर घरटी बांधतात. आपण जर थोडे जागरूक होऊन आसपास निरीक्षण केले तर पहाटे - पहाटे पक्ष्यांचं चिवाचिवाट सुरू होतं . एखाद्या कवीची लेखनी उल्हासित होऊन लिहू लागते . हवेच्या चादरीत गुरफटलेल्या तरूवेलींची आकृती त्याला खुणाऊ लागतात . ओळखीच्या वाटाही अनोळखी होऊ लागतात .
     प्रत्येक ऋतू अनुभवाचा असेल तर या सिमेंटच्या जंगलात अनुभवता येणार नाही . त्यासाठी गर्द रानाच्या गच्च जंगलात हिरव्यागार रानावनात हा ऋतू आपल्याला अनुभवायला त्याच्या पूर्ण परिवेशात मिळतो . वर्षाऋतूत ज्याप्रमाणे असंख्य फुलं फुलतात त्याचप्रमाणे वैशाख ऋतूतसुध्दा सुगंधाचा परिवेश वेगळा असतो . फक्त हा सोहळा पाहायला आपल्याला घाटामध्ये जावं लागत . ही फुलांची आरास पाहण्यासाठी मनांची दारसुद्धा उघडी ठेवावी लागतात . 
     ऋतूचे हे बदल साहित्यिकांच्या जिवंत मनाला स्पर्श करून त्यातून अनेक साहित्याची निर्मिती होते . ह्या सृष्टीला एक कलाकार , चित्रकारही म्हटले जाते . कारण एवढं अप्रतिम रंग - रूप एखादी अवनीच , वसुंधराचं रेखाटन करू शकते . हे सौंदर्य अबाधित ठेवणे फक्त नि फक्त आपल्या मानवांच्याच हातात आहे ! अजूनही वेळ गेलेली नाही ! आता तरी आपल्याला आपले मन परिवर्तन करून ह्या वसुंधरेला असेच सुंदर व हसरी ठेवू या! 
     चला तर मग आजच्या या शुभ दिनी वसुंधरेला वाचवण्याचा व तिला सुंदर ठेवाण्याचा संकल्प करूया .
       " वनवन भटकत राहशी
         मानवा तू रानावनात 
         परि न भेटणार तुला 
         शुद्ध श्वास या जीवनात ! "
  
        ही वेळ आपल्यावर यायला फारसा वेळ लागणार नाही !
 
✍️ अर्चना गरूड , किनवट ,
        जि. नांदेड .
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
25) ऋण फेडू  धरणी मातेचे 
➖➖➖➖➖➖➖
'आभाळाची आम्ही लेकरे 
काळी माती आई '
हे गीत कानावर पडले  मनात सहज विचार येऊन गेला. ह्या धरतीच्या कुशीत आपण वाढलो लहानाचे मोठे झालो. निसर्ग आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचे दान सतत देत राहीला. अजूनही देतच आहे. हवा ,पाणी , अग्नी , जागा , आकाश ह्या सर्व पाच तत्त्वांशी बनलेला निसर्ग. 
तो युगानुयुगे मानवाच्या सर्व गरजा पुर्ण करत आला आहे. वैज्ञानिक ‌प्रगतीच्या जोरावर त्याच्या सुखाची कल्पना बदलली आहे .
आपल्या स्वार्थासाठी त्याने डोंगर फोडणे , झाडे तोडणे , नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमाप वापर करुन स्वतःच्या च पायावर दगड पाडून घेतला आहे . निसर्ग आपल्याला फक्त आपल्याला देतच राहिला आणि आपण त्याने केलेल्या उपकाराची जाण न ठेवता आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्हास करतच राहिलो . आज निसर्ग कोपला आहे , वाढते भूकंप , अवकाळी पाऊस, दुष्काळ  कुठे नद्यांना पूर तर कुठे कुठे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.  ग्लोबल वॉर्मिग मुळे वाढते कार्बनडाय ऑक्साइड चे वाढते प्रमाणामुळे आज सर्वजण चिंतेत आहे. मानवीय स्वार्थापोटी पृथ्वी वरील वाढते वृक्षतोडीचे प्रमाण याला प्रमूख कारण आहे. आपण सर्वांनी मिळून ठरवले तर आपण प्रत्येक जण किमान एक तरी झाड लावून आणि त्यांचे संगोपन करून पृथ्वी वरील कार्बनडाय ऑक्साइड चे प्रमाण कमी करू शकतो. एक लहान रोपटे ५ की. कार्बनडाय ऑक्साइड कमी करते तर एक मोठे झाड २१ की. कार्बनडाय ऑक्साइड कमी करते . म्हणूनच भारतात पूर्वी प्रत्येक दारात कडूनिंब आणि पिंपळाचे झाड  लावत असे. झाड जितके मोठे तितके आॅक्सिजन चे प्रमाण जास्त . निसर्गाच्या कुशीत वाढलेले आपण सर्वांनी किमान एक तरी झाड लावून धरती मातेचे ऋण फेडले पाहिजे. मला इथे सांगताना आनंद होत आहे आमच्या तालुक्यात  आम्ही 'वृक्षसंर्वधन आणि संगोपन' या गट समूहाच्या माध्यमातून २००० झाडे लावण्याचे ध्येय साध्य केले . मित्रपरीवाराच्या वाढदिवसाला भेट म्हणून आम्ही एक रोपटे दिले आणि त्याच्या  संगोपनाची जबाबदारी चे वचन त्यांच्या कडून घेऊन त्यांच्या हाताने ते झाड लावून घेतले .  आम्ही एका वर्षात २००० झाडे लावली. हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
एका कुटूंबात जर चार लोक असतील तर किमान दोन झाडे लावली तर त्या कुटुंबाला पुरेल एवढा आॅक्सिजन निर्माण होऊ शकतो. चला तर मग प्रत्येकाने एक तरी झाड लावून धरती माते चे ऋण फेडण्यासाठी हातभार लावू .
➖➖➖➖➖➖➖
🖋वृक्षमित्र प्रताप देशमुख 
चाळीसगाव.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
26) निसर्ग आणि ती
     
     पावसाळ्याचे दिवस होते.मी गावाला गेलो होतो .अचानक जोराचा वारा आला ,आता आपण भिजणार हे मात्र पक्के ,कारण ढग गडगडू लागले ,तुफान  वारा आणि मी नेमका कामानिमित्त साखर कारखान्यात आलो होतो,घरी परतत असताना निसर्गाचे रौद्र रूप पहावयास मिळणार हाच विचार करून मी निघालो होतो  
       जोराचा पाऊस चालू झाला ,कोणीच दिसेना ,मी पूर्ण भिजलो होतो . आता तर थंडी पण जाणवू लागली .आणि मग रस्त्याला जाताना एक वस्ती लागली. वस्तीवर तुरळक घरे  एका आजीने मला हाक मारली ,ये पोरा कुठं निघाला ,एवढ्या पावसात ? आणि मागून एक आवाज आला ,आजी घे ना ग  त्यांना घरात ,किती भिजलेत .आणि अचानक वीज चमकली ,आजीच्या अंधाऱ्या खोलीत जिथून आवाज आला होता ,विजेच्या   चमकण्याने मला तो दिसला, अतिशय सुंदर निरागस अस तिचे रूप ,आणि आवाज तर खूपच गोड होता,पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो.
     ती थोडीशी लाजरी ,काहीच न बोलता आत निघून गेली,पण मी मात्र माझ मन हरवून बसलो .आठवतो मला अजूनही तो पाऊस ,तो वारा, ते ढग ,ती चमचमणारी वीज 
कारण ती मला पुन्हा कधीच दिसली नाही ,अजूनही मी तिची वाट पाहतोय ,पाऊस आला की मला ती आठवते.
  खरच किती हा निसर्ग अदभूत ना! या निसर्गाने फळे ,फुले,निवारा तर दिलाच पण माणसाला प्रेम करायला पण शिकवले  

निलम गायकवाड, पुणे
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

          27) *वसुंधरा दिन*

    ‘अर्थ डे’ अर्थात ‘वसुंधरा दिवस’.. नावच किती अर्थपूर्ण आहे! सजीव सृष्टी ज्या पृथ्वीवर अवतरली आहे तिचा हा दिवस! तिचे ऋण व्यक्त करण्या साठी चा  दिवस  ! का बरे साजरा करायचा हा दिवस? निसर्ग-पर्यावरण आणि मानव यांच्यातले नाते अधोरेखित करण्यासाठी आपण दोन प्रकारचे उत्सव साजरे करतो. पहिल्या प्रकारात एखाद्या प्राणी, वनस्पती, पक्षी यांचे अस्तित्व अधोरेखित करणारे दिवस; तर दुसऱ्या प्रकारात विशिष्ट पर्यावरणीय समस्येबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता विशद करणारे दिवस. पण ‘वसुंधरा दिन’ हा आगळावेगळा आहे; कारण तो वरील दोन्ही प्रकारांत मोडणारा आहे. पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात १९७० साली अमेरिकेत झाली. वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली .त्यांनी अमेरिकेतील दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना पर्यावरणाच्या समस्येबाबत जागृत केले,प्रदूषण आणि वन्यजीवांचा नाश  या मुद्द्यावर  तेथील सर्वच स्तरावरील लोकांनी आवाज उठवला. पहिला वसुधंरा दिन तिथे तब्बल २० लाख लोकांनी साजरा केला. शहराशहरांत लोकांनी एकत्रितपणे पर्यावरणीय हानीकडे धोरणकर्त्यांचे लक्ष वेधले. या कृतीमुळे तिथे नागरी पर्यावरणवादी चळवळीला आकार आला. या रेटय़ामुळे लवकरच अमेरिकेत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने काही आवश्यक कायदे करणे सरकारला भाग पडले. पर्यावरणरक्षण यंत्रणासुद्धा स्थापन करण्यात आली. पुढे १९९० च्या दशकापासून जवळपास जगभर हा दिवस दरवर्षी साजरा होत आहे. २०१६ साली जगातील १२० हून अधिक देशांनी एकत्र येत याच दिवशी हवामान बदलविषयक ‘पॅरिस कृती करार’ केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवसाचे संचालन ‘अर्थ डे नेटवर्क’ ही संघटना करते. यंदा या संघटनेने वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी दिलेले संकल्पसूत्र आहे- ‘क्लायमेट अ‍ॅक्शन’!
           हवामान बदलाचे परिणाम आपण गेल्या काही वर्षांपासून ठळकपणे पाहत आहोत. त्याची झळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आता आपल्याला बसू लागली आहे, हेही आपण अनुभवत आहोत. यावर उपाय म्हणजे निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन! आजच्या ५० व्या वसुंधरा दिनानिमित्ताने त्या दृष्टीने आपण काय करू शकतो?
       सध्या करोना संकटातील टाळेबंदीमुळे आजचा वसुंधरा दिन साजरा करताना सामूहिक कृतीला मर्यादा आहेत. पण त्यामुळे मिळालेला मोकळा वेळ म्हणजे वसुंधरेचा, निसर्गाचा विचार करण्याची संधी आहे. या काळात प्रदूषणात झालेली घट आणि त्याचे सुपरिणाम आपण अनुभवत असालच! ते अनुभवताना हवामान बदलाचे परिणामही समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. नैसर्गिक संसाधनांचा संयत वापर, सार्वजनिक वाहनांचा वापर, वृक्षलागवड अशी काही पावले येत्या काळात उचलता येतील. याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर थांबवणे आणि रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे अशा घातक कृतींना थारा न देणे या गोष्टीही आवश्यक आहेत. एकुणात, प्रत्येक दिवस हा वसुंधरा दिनच आहे ही भावना मनात कायम ठेवायला हवी!
 पृथ्वीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे.याचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे उद्दिष्ट आहे .
उचलून भार तुमचा, थकली वसुंधरा!
भारे प्रदूषणाचे, आता पुरे करा!!
जल,वायु भ्रष्ट झाले , अतिरेक आवरा!
दिनी आजच्या तरी रे, संकल्प  करा!!
झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा
प्लास्टिकचा वापर कमी करूया,
सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्त करुया,
सार्वजनिक वाहनांचा वापर करूया,
वाढते प्रदूषण कमी करूया,
सगळे मिळून शपथ घेऊया,
पृथ्वी स्वच्छ आणि सुंदर करूया 
वसुंधरेला वाचवा! जीवन आनंदी बनवा!! 
जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
      श्रीमती मेघा अनिल पाटील
     उपशिक्षिका
 श्रीमती पी ए सोधा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार                            
मोबाईल नंबर 9665189977.                  Email patilmeghaa@gmail.com
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
28) " वसुंधरा : एक नव यौवना "

    "वसुंधरा माय माऊली
    दडला अमृतपान्हा पोटी;
    धनधान्य बरकत मोठी
    रास हिऱ्या मोत्यांची ओटी"

  वसुंधरा ऽऽ ! विधात्याची एक सुंदर कलाकृती ! वसुंधरा हे आहे एका स्रीचे नाव . तर आपल्या या पृथ्वीला ही आपण वसुंधरा म्हणतो. कारण ती ही जणू काही स्रीच असल्यामुळे तिच्याही स्री सुलभ भावना कल्पून तिची नानाविध रूपं , पदन्यास हा एखाद्या लावण्यवती स्रीला लाजवेल असाच असेल , नाही का ?
     " निळ्या नभाचा डोई पदर
     शृंगारानं नववधू सजली"
       तिच्या जन्मापासूनच पाहिले तरी ती आज भर यौवनात असून तिने दिलेले भरघोस अन्नधान्य, औषधी वनस्पती, शुद्ध हवा, पाणी अन विशेष म्हणजे आईसारखीच केलेली मायेची पखरण ! तिच्या भौगोलिक परिस्थितीनुरुप आढळणारी धनधान्यातील विविधता हा एक चमत्कारच ! वसुंधरा ही मानवी संस्कृतीचे वैभव अन वैराग्य दाखविणारे सुंदर प्रतिक ! 
   निसर्गाचा रंग निळा , समुद्र ही निळा, 
तसेच अवकाशातून पाहिले असता या वसुंधरेने निळा शालू नेसल्यासारखे वाटते.कल्पनाविलास केला तर तिचे दोन प्रियकर भासतात.एक म्हणजे सूर्य  जो सहस्र किरणांनी तिच्यावर प्रेमाची उधळण करीत असतो.म्हणून तीही त्याच प्रेम मिळावं , त्याचं आपल्याकडेच लक्ष राहावं म्हणूनच तर सतत त्याच्याभोवती फिरत असते. स्री सौंदर्याचे रूपक म्हणजे तिचे उरोज म्हणजेच पर्वत. अन अंगाखांद्यावर खेळणाऱ्या नद्या हे जणू तिचे अलंकार! स्रीला न नटण्या मुरडण्याची मुळातच आवड म्हणूनच की काय सहा ऋतू तिच्या शृंगारात भरच घालतात. वसंतात तर तिच्या अंगावर नववधूचे तेज येते.नववधूच्या हातांवर जशी मेहंदी खुलते तद्वतच वसंतात ती नवनवीन पालवींची हिरवीगार मेहंदी काढते.ग्रीष्मात सूर्य जवळ म्हणून नववधूचे पिवळेधम्मक तेज. अंगाखांद्यावर मिरवते.सोनसळी पित शालूवर पळस फुलांची व गुलमोहराची खडी चढवते. 

   " रथ किरणांचे वसुंधरेवर धुंद उतरले
    पहाटपारी सोनफुलांचे रंग विखुरले !"

    मग तिचा दुसरा प्रियकर सहस्र धारांनी विरहात तळमळणाऱ्या तिला शांत व तृप्त करून गर्भिणीचे रूप देतो.ही हिरमुसलेली राणी नव चैतन्यानं सळसळते.शुचिर्भूत होऊन अन्नब्रह्माच्या पुजेस बसते. अशावेळी हेमंत या गर्भार अवनीचे डोहाळे पुरवीत असतो.तिच्या प्रसव वेदना सुसह्य करण्या  शिशिर येतो.
   भूमी ही स्रीरूप असून सासुरवाशिणीची सोशिकता, ऊन , वारा, पाऊस,वादळ, वावटळ कितीही त्रास झाला तरी आपला चेहरा हसराच ठेवते.
कधी कधी अगदीच असह्य झाले तर भूकंप , त्सुनामी,ज्वालामुखीद्वारे आपला राग व्यक्त करते.
      ही अवनी म्हणजे दिनकराची प्रियतमा ! ती आपल्या प्रियकरासाठी आपल्या हजारों हातांनी , सप्तरंगांची , सप्तसूरांची अन सप्ततालांची उधळण जणू काही आपली अपत्ये सप्तखंड सप्त समुद्र अन सप्त नद्यांद्वारे करत असते.म्हणजे हे सर्व नैसर्गिक तालवृंदच होत. 
    पक्ष्यांचा किलबिलाट , नद्यांची खळखळ , पानांची सळसळ , झऱ्यांची झुळझुळ , वेळूच्या बनातील शीळ , पावरीचा आवाज , प्रपातांची धून हे सारे लयबद्ध ताल किती बरं मनाला मोहवितात. हे सूर राधेला अन गोपगोपींना भुलवणाऱ्या कान्ह्याच्या बासरीपेक्षा कमी नाहीत. 
   या अवनीवरील सर्वांत लहान कण म्हणजे अणू !  इलेक्ट्राॅन , न्यूट्रान व गाॅड पार्टिकल्स हे ही एक स्पंदनच आहे.विजेचा प्रवाह , ध्वनीलहरी , रेडिओ लहरी या सर्व एकाच लयीत होणारे संगीतच होय.अन आपली मराठी भाषा तर एवढी गोड अन मार्मिक शब्दांनी युक्त आहे. उदा. खळखळ झुळझुळ हे शब्द एक ठराविक नाद अनुभवायला देतात. तर अशी आपली समृद्ध वसुंधरा जणू काही रडतेय. टाहो फोडतेय.जंगलं संपत चाललीय. नद्या , विहिरी आटत चालल्या आहेत. सिमेंटच्या जंगलांनी तिचा श्वास गुदमरतोय. सहनशीलतेचा ही कधी कधी अंत होतोच ना ! स्वार्थी अन अप्पलपोटी माणसानं आपल्या हव्यासापायी नैसर्गिक साधनसंपत्तीची वारेमाप लूट चालवलीय.अन्नसाखळ्या तोडल्या आहेत.

" जीवाची घुसमट , घालमेल , अन तापमान काहिली
मानवानं धरा , पर्यावरणाची 'आब' नाही राखली.
पक्षी जीवन घटत चालले , रवी तळपतो माथ्यावर
वृक्षवल्ली , घनदाट झाडी, कुऱ्हाड चालवली त्यांच्यावर !"

   थोडक्यात ही वसुंधरा ," जीवो जीवस्य जीवनम् " या साखळीद्वारे संतुलन राखते.पृथ्वीवरील जीव , प्राणी , जलचर , मानव ही सारी तिचीच अपत्ये ! पण मानवरूपी अपत्य आता तिच्याच जीवावर उठलाय. तिचे नको एवढे शोषण करून तिला ओरबाडत  , ओकंबोकं करतोय. तिच्या हिरव्या शालूचा रंग पूर्णपणे उडालाय ; म्हणूनच की काय ,त्याचीच करणी कोरोना रूपात त्यालाच संपवायला निघालीय.

   " कोरोनासारखा घातक विषाणू
    पसरला अवघ्या चराचरांवर
    हे मानवा , जागा हो, काळजी घे स्वत:ची
   जगायचेय ना तुला या वसुंधरेवर !"

सौ. सरोज सुरेश गाजरे
भाईंदर , ठाणे
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
29) "वसुंधरा :-जागतिक पृथ्वी दिवस

वैश्विक पातळीवर पर्यावरणाचे रक्षण व्हावे,"अति तिथे माती"या उक्तीनुसार ह्या सुंदर धरतीचे मानवच विध्वंस करेल ही भीती काही पर्यावरणप्रेमी "मानवांना"वाटू लागली नि मग जागतिक पृथ्वी दिवस साजरा करण्याची गरज निर्माण झाली. जेणेकरून एक दिवस तरी आपण राहत असलेल्या ह्या सुंदर पृथ्वीच्या ऋणातून उतराई होऊ,चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या निसर्गविरोधी कारवाया रोखल्या जाव्यात हा निकोप दृष्टिकोन  ह्या दिवस साजरा करण्यामागे लक्षात घेतला गेला.पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हे एकमात्र उद्दिष्ट हा दिवस साजरा करण्यामागे आहे. 
        आता सद्यस्थितीत तरी लॉक डाउन असल्याने अनेक सजीव मुक्तपणे वावरत आहेत.अनेक पशु-पक्षी मुक्तपणे विहरत आहेत.हिमालय दूर अंतरातून दिसू लागला आहे नि गंगा नितळ निळाई घेऊन खळाळत आहे,ओझोनचा थरही व्यवस्थित होऊ पाहतोय.सार कस "मानवप्राणी"चिडीचूप झाल्यामुळे होतंय हेही तितकच औपरोधीक म्हणावे लागेल.
"तूच तुझ्या जीवनाचा विध्वंसकारक....!"अशी म्हणण्याची वेळ ठेपली आहे.....नि तरीही निसर्गाने पुन्हा एक संधी मानवाला दिली आहे,घरात रहा नि विचार कर....!!असेच बहुदा निसर्ग म्हणत असेल न?
         त्यातही आज माझ्या मनाला सुखावणारी गोष्ट घडली,"पृथ्वी दिवसाच्या पूर्वसंध्येला माझी बालपणीची मैत्रीण तेजश्री घोरपडे-शिंदे हीच व्हाट्सअप्प च स्टेट्स पाहण्यात आलं.तिची ५वर्षांची छोटी कन्या "आदीश्री"आणि तिच्या भाऊची(अभि दादाची कन्या,)"मुग्धा"ह्या उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांना खाऊ-पाणी मिळावे म्हणून जमिनीत छोटा खड्डा करून,त्यात प्लास्टिक अंथरून वर विटा ठेवून छोटीशी पाण्याची विहीर केली,विटांवर तांदळाचे दाणे ठेवून दिलेत......आणि हे कोणत्याही मोठ्या व्यक्तीने न सांगता,मार्गदर्शन न घेता सार काही स्वयंस्फूर्तीने केलं गेलं आहे.हा सारा खेळ पाहून तेजश्री ने ते क्षण कॅमेऱ्यात बद्ध केलेत.तिलाही एक आई म्हणून त्या क्षणी निश्चित पणे आभाळ ठेंगणे झाले असेल.....आम्ही जेव्हा आदीश्री च्या वयाचे होतो,तेव्हा समृद्ध निसर्गाच्या सानिध्यात बागडलो, शाळेचं नावही"शेतकरी हायस्कूल"निसर्गाच्या, शेतीच्या जवळ नेणारे....तेव्हा आम्ही बिया संकलन, विविध प्रकारच्या भाज्या,झाडे लावत असू.....पण,आजच्या पिढीइतकी सजगता,भान आम्हाला तेव्हा नव्हते.
          पर्यावरण वगैरे शद्ब विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अभ्यासले इतकेच...!आजची मुलं खरच खूप मनस्वी नि तितकीच संवेदनशील आहेत हेही तितकेच खरे..!!फार लवकर उमगत त्यांना जगण्याच" मर्म" नि काय करावे "कर्म"!!आदीश्री नि तिच्या मामेबहिणीची ही छोटीशी धडपड, पक्षी-निसर्ग-पर्यावरण ह्या अजूनही कोसो दूर असलेल्या संकल्पना न समजताही निव्वळ,संवेदनशील मन,बालसुलभ जिज्ञासा यामुळे त्यांनी जी निसर्ग-पक्षी यांच्या बाबतीत भूतदया, जाणीव दाखवली आहे ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.
       एक छोटासा प्रयत्न, एक छोटीशी क्लुप्ती,एक छोटासा मदतीचा हात...खूप काही सकारात्मक बदल घडवू शकतो हेही तितकेच खरे आहे. त्या अजाण बालिकांना  अजून फारसं काही समजत नसेल पर्यावरण वगैरे पण जशी आपल्याला तहान-भूक लागते ना तशीच त्या मुक्या प्राण्यांनाही लागत असेल मग त्यासाठी काय करावे ह्या इवलुश्या विचारांत खूप मोठं सत्कर्म ,उद्याच सुंदर विश्व,सजगतेने वागण्याचे भान,भूतदया दडली आहे हेही नसे थोडके...!!
     एक छोटा प्रयत्न निश्चितपणे खूप मोठा बदल घडवेल हे निश्चित आहे...!!आजच्या पिढीला काही कळत नाही, संस्कार नाही ....समाजभान नाही....हेही निखालस खोटं ठरवणारी ही घटना....मला फार मोठा आनंद देऊन गेली...!!
   
शुभांगी विलास पवार 
(कंदी पेढा),नागठाणे, सातारा
शिक्षण सेवक,zpps, पाल-बेघरवस्ती, ता.कराड,जि.सातारा
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
सर्व लेख वाचन केल्याबद्दल धन्यवाद

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...