*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- आठवा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 26 एप्रिल 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5
*विषय :- बळीराजा / शेतकरी / कष्टाची भाकर*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
01) "शेतकरी जगला तर देश टिकेल "
उपाशीपोटी राहून कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. पण भरलेली पोटं बेईमान झाली तर त्यासारखं दुर्दैवंही नाही. आता बेईमान म्हणन्याचा
अर्थ असा, की ज्यांच्या कष्टानं, मेहनतीनं आपल्या ताटात भाकरी आली त्या अन्नदात्याला विसरून आणि त्याची साधी जाणीवही आपणास राहिली नाही तर देशभक्ती आणि इतर गप्पा या निव्वळ पोकळ ठरल्या वाचून राहणार नाहीत. या भारत देशात कृषी हा एकमेव सर्वाधीक केला जाणारा व्यवसायआहे आणि म्हणूनच भारताला कृषी प्रधाण राष्ट्र म्हणून ओळखले जाते.. पण सरकार आणि निसर्ग यांच्या कचाट्यात सापडलेली शेती आणि शेतकरी मरणोत्सव साजरा करते आहे, अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्यांच्या आत्महत्याचे आम्हाला काहीच वाटत नाही.आमच्या संवेदना गोठून गेल्या आहेत. पण दाताच नसतो तिथे झोळी पसरली काय किंवा ओंजळ केली काय, ती रितीच राहणार आहे... म्हणून दात्याचे स्मरण असावे विस्मरण नसावे. शेतात पेरल्यालं पदरात पडे पर्यंत कशाचाच भरोसा नसतो.निसर्गाचं अवेळी बरसणं, कधी दुष्काळ तर कधी नको तेवढी रिपरिप तर कधी गारपीट अशा अनेक दिव्यातून शेतकरी वाट काढत पुढं जात असतो. पण त्याच्यासाठी ना कोणता वेतन आयोग ना कोणती जीवन फुलवणारी योजना. राबराब राबणारे हात, उन्हं झेलत कष्टणारे, पावसात बेणनी करणारे कष्टकरी,रक्ताला गोठवून आणि आठवून शेती पिकवणारा शेतकरी खऱ्या अर्थानं आजही दुर्लक्षित आहे. एसी. मध्ये राहून शेती तंत्र विकसीत करणारे असो वा ताटात आलेली भाकरी किती आणि कोणाच्या कष्टानं ओतपोत झालेली आहे. आणि त्यामागे कोणाची किती मेहनत आहे याची किंचितही जाण नसणारे हे देशभक्तीचे आणि सबुरीचे सल्ले देत असतात. पण कधी भेगाळलेल्या पायाला चिखलाचा मलम लावून, तर आग ओकणाऱ्या सूर्याला डोक्यावरील
मुंडास्याने रोखणाऱ्या कृषकाला शहरी झगमगाटात वावरणाऱ्या, डांबरी रस्त्यावरून धावणाऱ्या आणि पायाला घाण लागते म्हणून जेवतानाही चप्पल न काढणाऱ्या लोकांना वेदना आणि दुःख काय असते याची पुसटशी तरी जाणीव असेल काय...? महात्मा गांधीनी 'खेडयाकडे चला' नारा दिला, पण आज शहरीकरण आणि शहराचे आकर्षण वाढत आहे. तसेच वाढत्या औद्योगिकरणामुळे शेती क्षेत्र कमी होत आहे. सुखशाली जगण्याची जीवनशैली सर्वांना खुणावत आहे. त्यात निसर्गाची लहर आणि शासनाचा कहर याने कृषक पुरता खचून गेला आहे.तेव्हा खचलेली मनं आणि पिचलेली मनगटं उभारी येण्यास वेळ लागतो आहे. शेतकऱ्यांना फुकट कांही देण्यापेक्षा नियमित आणि सुरुळीत दयावे. शेतातील वारंवार जाणारी वीज उभ्या पिकाचा जीव घेते. योग्य दाबानं नियमित वीजपुरवठा शेतकऱ्याच्या पिकाला वाढवल्याशिवाय राहणार नाही.पिक पाणी जोमात असताना शेतकरी फुकट कांही मागणार नाही.पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळाला तर शेतकरी केलेले कष्ट विसरून नव्या जोमानं आणि उमेदीनं आपणास अन्न पुरवठा करेल यात शंका नाही.पण जे चित्र काल होते ,परवा होते तसेच कमी आधिक प्रमाणात आजही आहे. संत तुकारामांनी शेतकऱ्यांचे मांडलेले दुःख असो वा अलिकडे महात्मा ज्योतिराव फुले .यांनी मांडलेले दुःख असो , या दुःखात फारसा फरक झालेला दिसत नाही.. अक्षरशुन्य राहिलेल्या पिढीला त्या त्या काळातील स्वतःला ज्ञानी म्हणवून घेणाऱ्यानी
पिळून काढलं आर्थिक व शारीरिक बाबीत. पण शेतकरी हालापेष्टा झेलत उभा होता आणि उभा आहे. शेतकरी जगला पाहिजे असं आपणास वाटत असेल तर केंद्रीय पातळीवर व राज्यस्तरावरही शेतीला उदयोगाचा दर्जा दिला पाहिजे. या बाबत चर्चा होऊन अंमल झाला पाहिजे. औदयोगिक क्षेत्रात होणारे बदल आणि शासनाचा त्या बाजूने असणारा कल व त्याचा उद्योगपती घेत असणारा फायदा लक्षात घेता शेती हा उद्योग म्हणूनच मान्यता पावली पाहिजे. तर शेतकऱ्यास न्याय मिळाल्यासारखे होईल तो जगेल आणि देश टिकेल... !!
श्री. हणमंत पडवळ
मु.पो. उपळे (मा.)ता. जि. उस्मानाबाद.
hanamantpadwal8956@gmail
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
02) व्यथा शेतकऱ्यांची
"व्यथा शेतकऱ्याची ही
किती सांगू मी यातना
आत्महत्या करी बळी
देतो शासन सांत्वना"
भारत हा कृषिप्रधान देश आहे.सर्वाधिक जवळपास 60 टक्के जनता शेती व शेतीवर आधारित उदरनिर्वाह करीत असतात.शेतीत खूप राबराब राबतात त्यांना अजिबातच रिकामा वेळ मिळत नाही.काही ना काही काम करीतच असतो.जसं की गुढीपाडव्यापर्यत छोटे-मोठे शेतातील काम उरकत नाही तर त्याच दिवसापासून नव्याने शेतीचे काम करण्यास सुरुवात करतो.मी देखील शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सांगतो की,शेती करण्यासाठी शेतीची मशागत करावी लागते त्यासाठी नांगरणी, वखरणी प्रथमतः करावी लागते.ट्रॅक्टरने देखील आधुनिक पद्धतीने नांगरणी करता येते पण..खेड्यातील शेतकरी इतका सधन नाही की त्यांनी ट्रॅक्टर विकत घेऊन शेती करणे शक्य नाही त्याचसोबत किरायाने ट्रॅक्टर आणून करावं म्हटलं तर..चार दोन पैसे वाचेल याचा विचार करून स्वतःच बैलाच्या साहाय्याने उन्हातान्हात जमीन भुसभुशीत करण्यासाठी नांगरणी,वखरणी करीत असतो.नांगरणी झाल्यानंतर बी-बियाणे,खते विकत घेण्यासाठी पीककर्ज,सावकाराच्या घरी चकरा मारून विनवणी करून कर्ज काढतो नाहीतर बी-बियाणे,खते उधारीवर पीक झाल्यावर व्याजसहीत देण्याच्या अटीवर आणतो.या साऱ्या समस्येला शेतकरी दरवर्षी सामोरे जात असतो.
बळीराजा हा खूप मेहनती,आशावादी असतो.कुटुंबाचा भार पेलण्यासाठी वाटेल ते काम करून स्वाभिमानाने जगत असतो आणि एक म्हणजे मुलाला चांगले शिक्षण देऊन माणूस घडविण्याचा प्रयत्न करीत असतो.शेती करण्यासाठी पैसे नसले तरी कर्ज काढून शेती करत असतो.खरं तर शेती हा प्रकार एक जुगारच आहे.'पिकली तर शेती नाहीतर माती' असचं एक म्हण आहे ती शेतकऱ्यांसाठी तंतोतंत जुळत असते.शेतीचे पूर्ण कार्य झाल्यावर पावसाची आतुरतेने चातकाप्रमाणे वाट बघत असतो.कारण शेतीत मध्ये विहीर खोदून सिंचनाची सोय करण्याची स्थिती नसल्याने केवळ कोरडवाहू शेती करीत असतो.पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती करीत असतो त्यामुळे दरवर्षी अनुकूल पाऊस पडेलच असं होतं नाही त्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते.
असाच अल्पभूधारक शेतकरी रामा यांच्याकडे जेमतेम 7 एकर जमीन होती.त्यापैकी मुलाच्या शिक्षणासाठी 2 एकर जागा विकली.दरवर्षी कर्ज काढूनच शेती केल्या जात असे.मगिलवर्षीचीच गोष्ट आहे की,शेती करण्यासाठी सावकाराकडून व्याजाने वीस हजार रुपये घेतले ते पीक निघाल्यावर परत करण्याच्या अटीवर पण त्या वर्षी कोरडा दुष्काळ पडला आणि उत्पन्न अधिक होऊ शकलं नाही.जेवढे उत्पादन झाले ते विकल्यावर 25 हजार रुपये झाले तर सावकाराचे पैसे परत कसे करायचे???कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा??मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कोठून आणायचे??मुलीच्या लग्नाकरिता पैसे कोठून आणायचे???असे नाना प्रश्न त्यांच्या मनात घोंगावत होते पण थोड्या समस्याने कष्टाळू बळीराजा घाबरणार नाही.संयमी वृत्ती,जिद्द,चिकाटी,मेहनत करण्याची प्रबळ इच्छा असल्याने 'इच्छा तेथे मार्ग' सापडतो यानुसार त्यावर्षी सावकाराचे कर्ज देऊ शकले नाही पण पुढील वर्षी नक्कीच परत करू हा आशावाद ठेऊन रामा शेती करू लागला.अगोदरचीच रिढ रामाला ओढवावी लागली
यावर्षी पीक चांगले जोमात आले होते.सर्व कर्ज फिटल्या जाईल पण नशिबात काही वेगळंच होतं त्याच वर्षी चक्रीवादळाच फटका बसला नि सारं पिकाची नासधूस झाली आता मात्र रामाच्या जिवंत जीव नव्हता.आता त्यांच्या मनात द्वंद्व निर्माण झाला होता.करायचे तर काय???रामा निरुपाय होऊ लागला.त्याच्या डोळ्यासमोर सावकार,कुटूंब,मुले यांचेच विचार घोळू लागलेत.नैसर्गिक आपत्तीमुळे मिळालेली मदत देखील थोडकीच असते याची जाण जगाच्या पोशिंद्याला होतील.
अशाप्रकारे आपल्या कृषिप्रधान भारत देशात रामासारखे शेतकरी पुष्कळ आहेत.सत्ताधारी केवळ शेतकऱ्याला अश्वासनाशिवाय काहीही मिळत नाही म्हणून समस्येने ग्रासलेल्या रामाने अखेर शेतातील झाडाला अटकून फाशी घेतली.असे अनेक रामा आज हयातीत नाहीत म्हणून अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे शासनाने अधिक लक्ष देऊन शेतीच्या सोयीसुविधा करण्यात अधिक लक्ष द्यावे अन्यथा शेतकऱ्यांची अशीच व्यथा राहणार आहे.
'संकटांना तोंड देत
बळी जिवंत असतो
समस्येने ग्रासले की
आपोआप फाशी घेतो'
✒श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
dushantnimkar15@gmail.com
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
03) होय साहेब मी बळीराजाची पोर हाय.......
मी स्वतः एका साधारण शेतकरयाची पोर आहे. तो कसा जगतो हे मी जन्मल्या पासुन पाहतेय... तुम्हा मोठ्या लोकांना गाडी ,बंगला ,पैसा-अडका सगळं पाहीजे असतं.पण साहेब आम्हाला फक्त आमच्या कष्टाची भाकर जरी भेटली तरी लय झाल साहेब...!!! आन माझा माझ मला लहान पणी शाळेत जायला दप्तर आणायला सुद्धा पाई-पाई जोडून ठेवायचा... पर साहेब दुष्काळ आला की ते पैसे घर खर्चासाठी संपुण जायचे. मग आषाढ सुरू झाला की शाळा भरायच्या मग शाळेत जायला दप्तर नसायच मग आम्ही बाजारची पिशवी पाठीवर टाकुन उड्या मारत शाळेत जायचो. साहेब, अशीच असते शेतकरयाच्या घरची परिस्थिती... लेकरानी खाऊ साठी दोन रूपये मागितले तरी बाप काळजावर दगड ठेवून लेकराला हुसकावून लावतो... साहेब आम्ही कष्टाचेच खातो, इमानदारीन जगतो पण तरिही आम्हाला का कोण साथ देत नाही? साहेब, एक आम्हाला सरकार साथ देत नाही, सरकारने दिली तर निसर्ग साथ देत नाही , चुकुन दोघांनी दिली तर आरोग्याच्या झुंबडीत सापडतो शेतकरी... साहेब, आम्हाला लिलावात सुद्धा व्यापारी लय लुटतात हो... साहेब, ही शेतकरयाची पोर तुमच्या कडे न्याय मागतीय साहेब... माझा बाप अन्याय आणि संकटाच्या पारड्यात तोलला जातोय... साहेब, हे जग माझा बाप चालवतो..., साहेब, माझा बाप आहे तर तुम्ही आहात... साहेब, आम्हाला काय गर्व नाही पण आज आम्ही इतकं कष्ट करून सुद्धा आमच्या कष्टाला तुम्ही लोक कौडी मोल किंमत देतात.....
साहेब आम्ही कितीक तरी राती उपाशी झोपुन काढल्यात. विचार करा साहेब, आज सगळ्या जगाला भाकर देणारा माझा बाप उपाशी झोपतोय... कष्ट करतो आम्ही आणि फायदा माञ मधले दलाल घेतात... साहेब, आमच्या घामाला तरी योग्य किंमत द्या... आम्ही फुकट काही मागत नाही आणि भिक तर कदापि नाही... आम्ही आमचा हक्क मागतोय... साहेब माझा बाप झोपडीत राहुन जग चालवतो, फाटकी बनेल घालुन जगाला कपडा- लत्ता पुरवतो... साहेब हव तर आमचं फाटक पोट समजा जे कितीही भरलं तरी रिकामच आहे अस तुम्हाला वाटत... पर साहेब भुक लय वाईट हो!!! भुक लय वाईट!!! लेकरं उपाशी झोपवताना काय वाटत असल माझ्या बापाला...
साहेब, तुमची लेकरं मोठमोठ्या गाडीतुन फिरतात पण आमच्या लेकरांना कमीत कमी पोट भरून जेवून वावरातुन अनवानी फिरली तरी जग फिरल्या च सुख मिळतय....
आन साहेब, माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला आसल तर बिनधास्त माझ्या घरी येऊन तुम्ही जाब विचारू शकता कि, "आमच्याकडे बोट करणारी तु कोण....?" यावर माझे स्पष्ट उत्तर असेल कि,"साहेब, मी बळीराजाची पोर.....!!!" माझे उत्तर ऐकून तुम्ही जी सजा द्याल मी मान्य आहे साहेब............!!!!
कारण साहेब, मी बळीराजाची पोर हाय..... संकटाशी झुंजन परिस्थितीनेच शिकवलय आम्हाला........
कु-दिपाली राऊत
उस्मानाबाद
7498702706
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
04) शेतकरी : जगाचा पोशिंदा
आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. येथील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. सुमारे पन्नास साठ वर्षांपूर्वी जेंव्हा भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीमधून नुकतेच स्वातंत्र्य झाले होते त्यावेळी भारतातील जनता पूर्णपणे स्वयंपूर्ण होती. शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या देखील भरमसाठ होती. त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समजल्या जायचे. कामाच्या मोबदल्यात धान्य देण्याची त्या काळाची प्रथा सर्वाना सोईस्कर होती. म्हणूनच शेतीकाम करणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळत होता. आत्महत्या म्हणजे काय असते हे तेंव्हाच्या शेतकऱ्यांना मुळी ओळखीचे नव्हते. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की, किती चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना अच्छे दिन होते. मात्र हळू हळू काळ बदलत गेला. शेतकऱ्याच्या जीवनात कामाच्या बदल्यात धान्य ऐवजी पैसा आला आणि सर्व चित्र पलटत गेले. ही व्यापारी लोकांची चाल होती की अन्य कोणाची माहीत नाही मात्र देशात रुपया फुगू लागला तसा शेतकरी नागवू लागला. शेतकऱ्याला परावलंबी करून टाकले त्यामुळे आज शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गावर जात आहे. फार पूर्वी शेतात मिळालेले उत्पन्नातुन अस्सल धान्य ठेवून तेच बी म्हणून वापरत होते. गाई म्हशी आणि इतर जनावरांचे मलमूत्र खत म्हणून वापरत होते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळत होते मात्र दर्जेदार मिळत होते. आज भरमसाठ उत्पन्न मिळते मात्र त्यातून काही निष्पन्न होत नाही अशी स्थिती आहे. गावागावात बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती, ज्यामुळे प्रत्येक काम व्यवस्थितपणे पार पडत होते. शिक्षणाने आपल्या सर्वांचा विकास झाला मात्र शेती ओस पडू लागली. महात्मा गांधीजी खेड्याकडे चला असे म्हणाले यातून त्यांना असा संदेश द्यायचा होता की, खेड्यातील शेती टिकवा. पण ह्याकडे कुणी लक्ष दिले नाही. जो तो शिकून सवरून नोकरी करण्याच्या मागे धावू लागला. शेतकरी दरवर्षी लॉटरीचा खेळ खेळतो कधी त्यात त्याला यश मिळते तर बहुतांश वेळा त्यात अपयशच मिळते, तरी ही शेतकरी नाउमेद न होता दरवर्षी नव्या उत्साहात कामाला लागतो. यावर्षी तरी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा तो करीत असतो.
शेतकऱ्याने शेतात काम केले तरच देशातील इतर नागरिकांची भूक मिटू शकते, याची जाणीव सर्वप्रथम तयार होणे आवश्यक आहे. सर्व काही कारखान्यात तयार करता येईल मात्र अन्न म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे पदार्थ निर्मिती करण्यासाठी शेतातच जावे लागते त्याशिवाय पर्याय नाही. शासनाने या शेतकऱ्यांना स्वावलंबी जीवन जगता येईल असे मदत द्यायलाच हवे. कर्जमाफी करून कोणता शेतकरी स्वावलंबी होत नाही उलट तो आळशी बनतो त्यापेक्षा त्याला इतर जोड व्यवसाय कसे करता येतील याची माहिती गावोगावी देऊन शेतकऱ्यांना आज स्वतःच्या पायावर सक्षम उभे करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा आज जो मनोरथ ढासळलेला आहे त्यास कुठे तरी आधार मिळाला पाहिजे. साठ वर्षाच्या वरील वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची आपली योजना खरोखर त्यांना उभारी देईल आणि त्यांच्यात जगण्याची आस निर्माण करेल, अशी एक आशावाद निर्माण होत आहे. राजा शिवछत्रपतीच्या काळातील शेतकरी राजा पुन्हा एकदा तयार करण्यासाठी सर्वांनी त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते मात्र तोच पोशिंदा आज कुपोषित होत आहे. त्यास निसर्ग ही।साथ देत नाही आणि सरकार ही अश्या दुहेरी कोंडीत तो सापडतो. प्रत्येकजण त्यास लुबाडण्यासाठी सज्ज असतो. बियाणे वाले लुबाडतात, खत वाले लुबाडतात आणि व्यापारी देखील लुबाडतात. या अश्या परिस्थितीमुळे त्याची खूपच बिकट अवस्था होते. त्याच्या विषयी मनात कोणालाही कणव निर्माण होत नाही किंवा खंत वाटत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या देशातील शेतकरी हा एक महत्वपुर्ण व्यक्ती आहे. म्हणून प्रत्येकांनी त्याच्या कार्याला त्रिवार सलाम द्यायलाच हवे, त्याला समाजात सन्मान मिळायलाच हवे. म्हणूनच भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी नारा दिला होता, जय जवान जय किसान. कारण जवान म्हणजे सैनिक हा देशाचे संरक्षण करतो तर किसान हा देशातील लोकांचे पोषण करतो म्हणजेच शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. म्हणून हे दोन्ही देशाचे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत.
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769.
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
05) बळीराजा
___________________________
भारत हा कृषिप्रधान देश आहे असे म्हणतात . जर या देशातील ८०%लोक शेती करतात तर त्या देशाला कृषीप्रधान देश म्हणणे काही चुकीचे नाही . पण मग या देशाने कृषी विकासासाठी आजपर्यंत काही ठोस कार्यक्रम का आखला नाही . त्याची अंमलबजावणी का झाली नाही ? देशाच्या व राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी विविध विकास योजना जाहीर केल्या जातात मग त्या शेतकरयांना प्रथमतः पोहोचत का नाहीत ? शेतमालाला हमी भाव दिला जातो परंतू तो माल फेडरेशन लवकर घेत नाही व घेतला तरी त्याचे पैसे ६/६महिने शेतकऱ्यांना मिळत नाहीत मग त्याला बी बियाणे , खते , व किटकनाशके आणण्यासाठी पैसे कोठून मिळणार ? मुलांच्या शिक्षणासाठी , आई वडिलांच्या औषधपाण्यासाठी पैसे कोण देणार? बहिणीच्या लग्नाला पैसा कोण पुरवणार ?
खाजगी सावकाराकडून कर्ज काढल्याशिवाय त्याला पर्याय नसतो . जिवापाड जपलेल्या काळ्याआईच्या तुकड्याला गहाण टाकल्याशिवाय पर्याय नसतो . व्याजाची रक्कम फेडता फेडता त्याच्या नाकी नऊ येतात. गावातली पत गमाऊन बसलेला हा बळीराजा हवालदिल होतो आणि एक दिवस..... तो कासरा हातात घेतो .. शेतावरच्या बाभळीला टांगून घेतो .... बस्स. संपली कहाणी .
वर्षभर शेतात राब राब राबायच, हाडांची काड आणि रक्ताचे पाणी करायचं . आलेला माल व्यापार्याच्या आडतीवर न्यायचा . व्यापार्याने लिलाव करायचा . शेतकर्याच्या स्वप्नांचा लिलाव ! त्याच्या यातनांचा लिलाव . डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि मालाची आलेली तुटपुंजी रक्कम , याचा मेळ कसा घालायचा ? छोट्या चिंगी ने नवा फराक आणायला सांगीटला . कारभारणी चे विरलेल्या लुगड्याने लाज पण झाकता येईना , पिंटू चे दप्तार फाटून गेलय . हे सगळं कसं जमवणार तो बळीराजा ?
शासनाने "शेतकरी ते ग्राहक"ही संकल्पना प्रभावीपणाने राबविल्या शिवाय ही मधली दलाली बंद होणार नाही . शेतकर्याच्या तिप्पट पैसा हे दलाल त्याच्याच मालावर कमावतात . हे सर्वांनाच माहीत आहे पण इथेही राजकारण केले जाते . व्यापार्याशी हितसंबंध ठेवले तरच पक्षकार्यासाठी फंडींग मिळेल व शासनाला टॅक्स मिळेल . शेतकर्याकडून काय मिळणार आहे ?
कधी अतिवृष्टी , गारपीट तर कधी दुष्काळ ही अस्मानी संकटे तर कधी बॅंकांनी वसूली , जप्ती , खाजगी सावकारांची सुलतानी . या मुळे त्याच्याकडे पशुधन सुद्धा राहिले नाही . शेतीला पुरक व्यवसाय ही तो करु शकत नाही . दुधदुभत्याचा व्यवसाय ही बंद पडला ,
ईतके घडत आहे तरी शेतकरी बदलायचे नाव घेत नाही . आपली पारंपारिक पद्धतीची शेती सोडून "सेंद्रीय शेती " चा प्रयोग करून पाहिला पाहिजे . रासायनिक खतांची सेंद्रीय खतांचा वापर करावा . सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या
धान्याचे उत्पादन जरी कमी असले तरी भाव ही चांगला येतो . लिंबोणी , सिताफळ , पेरु यांच्या फळबागा , पपई , शेवगा यांच्यापासून ही कायम उत्पन्न मिळू शकते .
मंध्यतरी पुण्यात कोथिंबिरीची जुडी १००रुपयाला झाली तेव्हा हे सोशल मिडिया वाले तज्ञ , वर्तमानपत्रावाले , न्यूज चॅनल वाल्यांनी काय गोंधळ घातला , महागाईचा कहर , सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले . ईत्यादी .. बोंबा ठोकायला सुरुवात केली . अहो १००ची चपटी ३००रु. ला घेणारे मल्टीप्लेक्सला जाऊन हजार हजार रुपये उडवणारे सर्वसामान्य असतात का ? पेट्रोल १००रु झाले तर गुपचूप काढून देतात तिथे का बरं भाव करत नाहीत ?
शेतकर्यांनी देखिल आपल्या मधे बदल करायला पाहिजे . काळ बदलला आहे आपण ही बदलायला हवे.
लग्नात होणारा अनावश्यक खर्च , मानपान टाळायला हवा .
दारु , जुगार , मटका , ईत्यादी व्यसनापासून दूर राहायला हवे .
शेत जमीनीचे प्लाॅटिंग पाडून गुंठेवारी करून झटपट श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहू नका . आलेला पैसा गाडी बंगला व माडीवर उधळून पुन्हा कंगाल व्हायच्या वाटेवर चालू नका .
शेतकरी राजा तू जगाचा पोशिंदा आहेस हे लक्षात ठेव . तू जगलास तर जग जगेल . तेव्हा वेळीच सावध हो आणि खंबीर पणे आपल्या काळ्या आईची सेवा कर .
. अरविंद कुलकर्णी पिंपरखेडकर
. 9422613664
arkulkarni.1955@gmail.com
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
06) *ईडा पीडा टळू दे*
*बळीच राज्य येऊ दे*
माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा
कवी इंद्रजीत भालेराव यांच्या या काव्यपंक्ती शेतकऱ्यांच्या जीवनाची दशा वर्णन करतात.
अहोरात्र काळ्या आईची सेवा करून स्वतःबरोबरच जगाची काळजी वाहणारा, प्रचंड काबाडकष्ट करूनही समाधानी असलेला, स्वतःच्या मुखातील घास इतरांना देतांना आनंदित होणारा जर या पृथ्वीतलावर कोणी असेल तर तो म्हणजे शेतकरी.
या विश्वात सर्वात जास्त जोखीम सध्या शेतीच्या व्यवसायात आहे हे कदाचित न पटणारे आहे. पण हजारो रुपयांची बी- बियाणे निसर्गाच्या भरवशावर मातीत टाकायचे, त्यासाठी हजारो रुपयांची रासायनिक खते वापरायची , हजारो रुपयांची कीटकनाशके फवारायची आणि निसर्गाने उत्तम साथ दिलीच तर जमिनीतून अपेक्षित उत्पन्न येणार . जर का वरुणराजा रुसलाच किंवा नको तेव्हा अति कोसळला तर संपूर्ण पिकांची नासाडी ठरलेली. आणि हजारो लाखो रुपये मातीमोल होऊन सर्व स्वप्नांचा चक्काचूरही ठरलेला. कोणी मुलीचे लग्न योजिलेले असते तर कोणी घर बांधणार असतो. कोणाला बँकेच्या कर्जाची चिंता असते तर कोणी मुलाची फी भरणार असतो . अशा पध्दतीने स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर मग शेतकऱ्यांना सर्वत्र काळाकुट्ट अंधार दिसायला लागतो आणि मग होतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या . मुळातच फारच थोड्या शेतकऱ्यांचे स्वतःचे भांडवल नसते. सावकारशाहीच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. अव्वाच्या सव्वा व्याज भरून शेतकरी भांडवल उभे करतात आणि आशेवर जगतात. निसर्गाची उत्तम साथ मिळाली तर शेतकरी गुण्यागोविंदाने नांदतो . अन्यथा तो खड्ड्यात अधिकाधिक रुतत जातो आणि नको ते वास्तव त्याच्यासमोर येऊन ठेपते. ज्या देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात त्या देशाचे आम्ही नागरिक आहोत याची निश्चितच खंत आणि लाज वाटते.
शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाचीही परवडच असते. गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना Jबऱ्याचदा या मुलांना शाळेला दांडी मारून शेतीच्या कामाला जुंपले जाते. परिणामी अभ्यासाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. एका बाजूला हजारो रुपये फी भरून CBSC, ICSC अशा नामवंत बोर्डातून शिक्षण घेऊन लाखो रुपयांची कोचिंग लावणारे विद्यार्थी आणि दुसऱ्या बाजूला घरातील, शेतातील सर्व कामे सांभाळून उरलेल्या वेळेत शाळा करणारी शेतकऱ्यांची मुले यांची तुलनाच होऊ शकत नाही. मग शेतकरी समृद्ध होणार कसा ?
शासनदरबारी देखील शेतकरी विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम नाही . केवळ अनुदान आणि कर्जमुक्तीने शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाहीत. शेतकऱ्यांना सिंचनाच्या पुरेपूर सुविधा उपलब्ध करून द्या. पुरेशी आणि परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध करून द्यावीत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शक्यता त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. उच्च शिक्षणासाठी नामांकित कोचिंग क्लासमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवेश मिळावा व त्यांची फी शासनाने भरावी. त्यांना पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळावा. बाजार यंत्रणेतील दलाली, हमाली, बाजार फी असे इतर शुल्क हटवावे. वर्षानुवर्षे शेतात राबूनही शेतकऱ्यांच्या घरावरील कौले बदलली जात नाहीत आणि दलालांनी मात्र इमल्यावर इमले चढवले.
अशा माझ्या शेतकरी राजाला उद्याचा सुवर्णकाळ पाहू द्यायचा असेल तर आजचा वर्तमान अनुकल असावा लागेल .
तेव्हा लाल बहादूर शास्त्रींचे स्वप्न पूर्ण होईल आणि सर्वच उद्गारतील ,
'जय जवान जय किसन '.
सुधाकर रामदास पाटील
शहापूर, ठाणे
मो.7798963073
srp1672@gmail.com
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
07) एकच राजा : शेतकरी राजा
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी शासन कृषी व्यवसायासाठी ठोस पाऊले उचलतांना फारसं दिसत नाही. त्यामुळे शेती वर अवलंबून राहणारा शेतकरी यात नेहमीच भरडला जातो.
माझा बळी राजा पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकांना हमीभाव न मिळणे, नुकसान भरपाई वेळेवर न मिळणे या सारख्या बऱ्याच आसमानी व सुलतानी समस्यांना सामोरे जातांना दिसतो. वर्षानुवर्षे होत असलेल्या नुकसानीला कंटाळून हाच शेतकरीराजा आत्महत्येसारखा मार्ग निवडत असतो. आत्महत्या करून तो मुक्त होतो पण त्यात भरडल्या जाते त्याचे कुटुंब. त्यानंतरही त्याच्या समस्या या कायमच असतात.
भारतात पाऊस वेळेवर पडो अथवा न पडो घोषणांचा पाऊस मात्र इथे भरपूर असतो. प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या स्वार्थासाठी आश्वासने देतो परंतु दिलेली आश्वासने पूर्ण केलीच पाहिजे असं काही नसतं त्यामुळे जगाचा पोशिंदा नेहमीच सुख-सोयीपासून वंचित असल्याचे चित्र दिसते. तात्पुरती कर्जमाफी दिली की झालं. शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्यापेक्षा त्याला कर्ज घेण्याची गरजच पडू नये यासाठी शेतकऱ्याला सुजलाम-सुफलाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे ती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची.
कृषिआधारित अर्थव्यवस्था असून सुद्धा कृषी व्यवसाय करणारा शेतकरीच जर हाल-उपेक्षा सहन करत असेल तर याचा काय उपयोग.
इतर उद्योगांना जे अनुदान, सवलती दिले जातात त्या तुलनेत शेती व्यवसायावर नाही. त्यामुळे 'इंडिया विरूद्ध भारत’ हे द्वंद्व सध्या बघायला मिळत आहे.
कोणताही उद्योगपती आपले उत्पन्न उघड्यावर ठेवण्याची हिम्मत करू शकत नाही, तितकी जोखीम तो पत्करू शकत नाही पण माझा बळी राजा हा एकमेव उद्योगपती असा आहे की तो त्याला उत्पन्न देणारे सर्व पीक उघड्यावर ठेऊन सर्वात जास्त जोखीम पत्करत असतो. इतकी जोखीम पत्करून सुद्धा त्याला हमी भावासाठी, पिकविम्यासाठी, अनुदानासाठी, कर्जासाठी झगडावे लागते.
शेवटी इतकंच सांगावसं वाटेल की, साऱ्या जगाचा पोशिंदा जगला पाहिजे असं जर वाटत असेल तर त्यासाठी योग्य त्या कायमस्वरूपी उपाययोजना अमलात आणण्याची गरज आहे. इडा पीडा टळू दे... बळीचे राज्य येऊ दे...!
गणेश सोळुंके (जालना)
8390132085
gnsolunke0092@gmail.com
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
08) *शेतकरी संपावर गेला तर*
➖➖➖➖➖➖➖➖
आज सकाळीच बातमी वाचली शेतकरी संपावर म्हणुन.आणि विचाराचे चक्र फिरले.बर झाल शेतकरी दादा तुझ्या लक्षात आल तर.जा दादा तु खुशाल संपावर जा पण मागे हटु नको तुझ्या मागण्या पूर्ण होईपर्यत संप मिटवून घेवू नको.अजुन तुझ्या शेतकरी संघटना झाल्या नाहीत.नाहीतर हे संघटनावाले एव्हडे बेरकी असतात की स्वत:चा फायदा करुन घेवून संप मिटवतात.सरकारशी संगनमत करुन इतरांना तोंडघसी पाडतात.म्हणुन शेतकरी दादा जाच तु संपावर......
खरोखर विचार केला तर शेतकर्यांचा वाली कोणीच नाही.मानसाच्या मुलभुत गरजा अन्न,वस्र,निवारा या तीन्ही गरजा या शेतकर्यावर अवलंबुन आहेत. चार महिन्याचीच गोष्ट तुरडाळ दोनशे रु.किलो झाली होती.तेव्हा शेतकर्याकडे माल नव्हता.आणि आता त्यानं तुर पिकविली तर ती कवडीमोल भावात.हा कोणता न्याय?जेव्हा शेतकरी शेतात वर्षभर काबाडकष्ट करतो व आलेला माल विकून जर त्याचा खर्च निघत नसेल तर त्यान जगायचे कसे.शेतकर्याकडे कांदा पिकवला तेच,भाजीपाला पिकवला,धान्य पिकवले तरी त्याच्या मालाला कवडी किंमत.
अगोदरच दुष्काळ, अवर्षण,व लहरी पावसाच्या मुळे शेतकरी मेताकुटीला आलेला आहे.नापिकी,महागाई,भ्रष्टाचार या मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सावकाराचे कर्ज व नापिकी मुळे शेतकरी पूर्णपणे अडचणित आलेला आहे.शेतकरीआत्महत्या करत आहेत.घरात उपवर मुलगी झाली की त्याची चिंता वाढते आहे.परवा नाशिक येथे मुलीचे लग्न झाले व ती सासरी वाटे लावुन बापाने शेतात गळफास घेतला.हळदीच्या अंगानं मुलीने बापाला निरोप दिला.किती भयानक चित्र पहायला मिळते.मन हेलावुन जाते.सरकार खासदार,आमदार यांचे पगार वाढवतेय.पण शेतकर्यानं कष्टानं पिकवलेल्या मालाला योग्य भाव देवू शकत नाही.शेतकरी धान्य पिकवतो,त्या लेकराला सकस आहार नाही.तो कापूस पिकवतो लेकरांना चांगले कपडे नाहीत.ही शोकांतिकाच नाही का?
आपण सुशिक्षित माणसं हॉटेलमध्ये जेवायला जातो.न बोलता वेटर जे बील देईल ते कुरकुर न करता देतो.बाहेरचे पिझ्झा,बर्गर,आईस्क्रीम,कोलड्रीक्स,मिठाई भाव न करता मागतील ती रक्कम देवून घेवून येतो.पण भाजीमंडईमध्ये एखादा शेतकरी भाजीपाला घेवुन उन्हात एका कोपर्याला विकायला बसलेला असतो. कारण मुख्य जागेवर व्यापारी बसलेले असतात.आपण त्या उन्हात बसलेल्या शेतकर्याकडे अगोदर भाजी घ्यायला जातो.कारण आपल्याला माहित असते तो घरी जाण्याच्या घाईत आहे व बागवानापेक्षा आपण त्याची भाजी कमी पैशात घेतो. तो मजबुर असतो भाजीचे भलेमोठे गाठोडे घेवून येतो व मिळेल त्या भावात ती विकतो. व आलेल्या पैशातुन तेल,मिठ,साखर पत्ती,साबन ,सोडा त्याला घ्यायचे असते.घरी त्याची बायको बिनतेलाची भाजी कधीकधी करते लेकराची टाळु भरायला त्याच्याकडे तेल नसते.हा शेतकरी शेतात पिकलेली चांगली फळं कधी लेकरांसाठी ठेवत नाही कारण चार पैसे जास्त मिळतील ही आशा.घरी दुधदुभते असेल तर मुलाबाळांना काळा चहा पाजतील पण दुध ठेवत नाहीत.सगळे दुध विकायला घेवून जातील हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.शिक्षिका म्हणुन या गोष्टी ग्रामिण भागात नोकरी करतांना जेव्हा लक्षात आल्या तेव्हा महिला पालकांना मी शाळेत बोलावुन घेतले व मुलांना दुध देत जा अशी विनंती केली.तेव्हा भयान वास्तव समोर आले.ती माता भगिणी एव्हडच म्हटली बाई,सरकी,पेंड,वैरण एव्हड महाग झालय घरी दुध ठेवून परवडतच नाही हो...मग मी म्हणते शेतकर्याला जर या परिस्थितीला तोंड द्यावे लागत असेल तर मग हा प्रश्न फारच गंभिर आहे.आपण शहरवाशी अनेक वेळा जवळच्या खेड्यापाड्यातले लोक भाजीपाला,दहीदुध,विकायला घेवून घरोघर फिरतांना पहातो.त्यामध्ये काही थकलेले म्हातारे कोतारे असतात.अक्षर: ते लटपटत चालतात पण त्यांची भाजी विकत घेतांना तिथेआपण भाव करतो.किती लाजिरवाणी गोष्ट आहे.आपण जेव्हा दवाखाण्यात जातो,मेडीकलवर जातो,सौदर्यप्रसाधने खरेदी करतो कपडे खरेदी करतो,मॉलमध्ये जातो,सिनेमाला जातो,पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतो,एैशआरामाच्या वस्तु खरेदी करतो,मुलांची महागडी खेळणी खरेदी करतो,दागदागिणे खरेदी करतो तेव्हा कुठेही आणि कधीही भाव कमी करा असे म्हणत नाहीत.तिथे मात्र आपली इमेज,प्रतिष्ठा आपण जपतो.
म्हणुनच मला तर वाटते शेतकरीदादा संपावर जाच.तु तुझा भाजीपाला,निरसे दुध,चांगली फळ तुझ्या मुलाबाळांना बायकोला खाऊ घाल.तु पण खा.बघुयात भाजीपाला व दुधाशिवाय ही शहरातील पांढरपेशी लोक कशी जगतील तु तुझ्या शेतातील काहीच विकु नकोस नाहीतरी असेही तुला परवडत नाहीच.मग कशाला हा आटापिटा. आता वेळ आलेली आहे दाखवुन दे जगाला माझा नाद करायचा नाय.....म्हणाव बघ कसे सुतासारखे सरळ होतील .तुझ्या पिकाला हमीभाव देतील.तुझ्या सर्व मागण्या आठ दिवसात पूर्ण करतील.पण तुला ठाम रहावे लागेल बाबा.तुझ्या घरचा एकही दुधाचा थेंब किंवा भाजीपाला जर तु घराबाहेर नाही काढलास तरच हे शक्य होणार आहे.होवूदे शेतातच भाजीपाला सडू दे खत होईल.उरलेले दुध कुत्र्या मांजराला पाज ते आशिर्वाद देतील. पण एकदा मनातुन संपावर जा.तु तुझा आसुड एकदा वाजव व या गेंड्याच्या कातडीच्या लोकांना दाखवुन दे.लाचार होवून जगु नको.तु तर या जगाचा पोशिंदा आहेस हे विसरु नको.
*जय यवान जय किसान*
➖➖➖➖➖➖➖➖➖
सौ.सुभद्रा खेडकर बीड मो.न.9403593764
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
09) जगाचा पोशिंदा '' बळीराजा ''
भारत हा कृषिप्रधान देश आहे.एकविसाव्या शतकात भारतात अनेक मोठे-मोठे व्यवसाय,उद्योग धंदे उभारले गेले.यामध्ये तरुण आणि उच्चशिक्षित लोकांना काम मिळाले.उत्तम काम उत्तम दाम यामुळे आजचा तरुण याकडे ओढला गेला.भारताची आधुनिक तंत्रज्ञानाने व्यवसायात प्रगती केली.पण या स्पर्धेच्या जगात आजही माझ्या देशात शेती हा व्यवसाय त्याच तोला मोलाने टिकून आहे.अनेक नैसर्गिक,आर्थिक,राजकीय संकटांचा सामना करून शेती हा व्यवसाय माझा शेतकरी बांधव दरवर्षी करतो.बळीराजाला वंशपरंपरेने मिळालेला हा शेतीचा वारसा आनंदाने पुढे नेत आहे.बळीराजाला माहीत आहे.शेती पिकली तरच माझा देश जिवंत राहील.आज प्रत्येकाच्या मुखात अन्नाचा घास पडतो,तो बळीराजा मुळेच.तो जीवाचे रान करून कष्टाच्या घामाने दरवर्षी शेती फुलवितो.शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.दरवर्षी वाढत्या प्रदूषणामुळे,अतिप्रमाणात वृक्षतोड, जमिनीची धूप,वाढते तापमान आधी गोष्टीमुळे पाऊस पडण्यामध्ये अनियमितता दिसून येते.दरवर्षी पावसाची हुलकावणी बळीराजाच्या जीवावर बेतते.कधी पाऊस खूप कमी पडतो. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते.या दुष्काळ परिस्थितीचा सामना करून स्वतःच्या लेकराप्रमाणे शेतातील पिकाला जपावे लागते.तर कधी जास्त पाऊस पडून अतिवृष्टी,महापुराचा सामना करावा लागतो. डोळ्यादेखत शेतातील माल खराब होताना बघावा लागतो.कष्ट करून हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटामुळे हिसकावून घेतला जातो.कोणाच्या नावाने रडणार,कुणाला दोष देणार कारण हे सर्व काही दरवर्षीच ठरलेलं.रोज मरे त्याला कोण रडे म्हणीप्रमाणे या संकटांची आता बळीराजाला सवय झाली आहे.नैसर्गिक संकटं हे सूत्र ठरलेलंच आहे.हे लक्षात घेऊनच शेती व्यवसाय करावा लागतो.देशातील तरुण पिढी उच्च शिक्षण,विज्ञान तंत्रज्ञान, प्रगीतीचे वेड,अति महत्वकांक्षा यामुळे नोकरी,उद्योग, स्वतःचा व्यवसाय याकडे झुकलेला पाहायला मिळतो. आजच्या तरुणाला शेती करणे हे कमीपणाचे वाटते.तसेच शेती हा आर्थिक स्रोत नसून तो कष्टाचा डोंगर आहे.अति कष्ट,अति वेळ खर्च करून हातात मात्र पुरेसा पैसा येत नाही.आणि म्हणूनच तरुण पिढीला शेती हा व्यवसाय नकोसा वाटतोय.परंतु याउलट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास निश्चितच आर्थिक उत्पन्न मिळू शकते.शेती हा फक्त आर्थिक स्रोताचा व्यवसाय नाही.तर तो मानवाच्या मूलभूत गरजा भागवणारा व्यवसाय आहे. माणसाने दिवसभर कोणत्याही क्षेत्रात काम केले.कितीही पैसा मिळविला.तरी रात्री त्याला पोटभर अन्न मिळते.ते या शेती व्यवसायामुळेच.शेती हा फक्त आर्थिक स्वताचा व्यवसाय नसून तो मानव जातीला पोसणारा व्यवसाय आहे.
बळीराजा स्वतः उपाशीपोटी शेतात राबतो.स्वतःच्या कष्टाच्या घामाने मात्र प्रत्येकाच्या पोटात अन्नाचा घास घालतो.फुले,फळे,भाजीपाला,अन्नधान्य हे शेतीतूनच मिळते.या शेतीला,बळीराजाला चांगले दिवस यायचे असे वाटत असेल.तर निसर्गाबरोबरच सरकारची धोरणे सुद्धा शेतीच्या हिताची असली पाहिजे.शेतीच्या मालाला हमीभावा प्रमाणे किंमत मिळणे,दरवर्षी शेतीला विमाचे कवच असावे,शेतीसाठी शेतकऱ्यांना कर्ज व्यवस्था उपलब्ध असावी.तसेच मुबलक पाणी व मोफत विजेची सुविधा सरकारने करावी.शेतकऱ्यांना शेतातील माल विकण्यासाठी जवळच हक्काची बाजारपेठ असावी. शेतीविषयक धोरण चांगले असले तर शेतकऱ्याला स्वतःचा उदरनिर्वाह बरोबर दोन पैसेसुद्धा मिळतील.इतर व्यवसाय सारखाच शेती हा चांगला व्यवसाय आहे.अशी नवीन पिढीची धारणा होईल.देशात सर्वात मोठा व्यवसाय शेतीच आहे.शेतीवर देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया अवलंबून आहे. देशाची आर्थिक गतिमानता शेतीमुळेच तेजीत येते.सरकारने शेती विषयक धोरण जाहीर करावे.शेतीला उच्च व्यवसायाचा दर्जा मिळवून द्यावा.या काळ्या आईच्या कुशीतून निघणारा घास मानवाला जगवत असतो.हे कोणी विसरता कामा नये.सरकारने शेती व्यवसायाला चांगला दर्जा मिळवून दिला.तर जगात भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.देशाच्या प्रत्येक संकटाच्या वेळी देशाच्या पाठीशी भक्कम पणे बळीराजा उभा राहतो. त्याचप्रमाणे बळीराजाच्या संकटाच्या वेळी सर्व भारतीयांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. शेतकरी जगला तरच आपण जगू.शेतकरी हा या भूमीचा खरा पालनकर्ता आहे.त्याचा सन्मान व अभिमान सर्वांनी बाळगुया.व भारतभुमिच्या बळीराजासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करुया.
ईडा पिडा टळु दे, बळीचे राज्य येऊ दे.
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु.पो.किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा
जि.बुलढाणा
9823425852
rajendrashelje2018@gmail.com
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
10) शेतकरी राजा,उभ्या.जगाचा पोषक. .
" नाही म्हटलं तरी सर्व पेशाला वेळापत्रक आहे" परंतू माझ्या शेतकरी बापाला, भावाला , ते नाही हो म्हणजेच कसलाही सचोटी बधद पणा नाही हो करता या शेतकरी पणाला कारण माझ्या शेतकरी बंधूंच्या हातात फक्त मेहनत, कष्ट एवढंच.आहे हो बाकी सर्व पर हातात आहे ,एकतर निसर्ग लहरी झाला आहे , पाऊस कधीच वेळेवर पडत नाही, पडला तर कधी कमी तर कधी अतिवृष्टी , म्हणजेच सर्व गोष्टी या निसर्गावर अधारित झाल्या, इकडून तिकडून कसेबसे या सर्व गोष्टींचा मुकाबला करून थोडेफार उत्पन्न काढायचे आणि ते उत्पन्न विकण्याचा मोठा प्रश्न माझ्या शेतकरी भावाच्या पुढे उभा राहतो , एकतर बाजारपेठ जवळ नसते इकडून तिकडून माल बाजारात घेऊन गेल्यावर तो माल विकण्याचा आधिकार त्याला नाही, भाव ठरविण्यासाठी. चा आधिकार त्याचा हिरावून घेतला जातो तो हलका - भारी दुसरेच ठरवतात हे नाकारून चालणार नाही मग सांगा माझा हा राजा कधी स्वतंञ होणार ? त्याला हा अधिकार कोण देणार? जेव्हा -केव्हा त्याला आपला माल विकण्याचा आधिकार येईल तेंव्हा शेतकरी निश्चित बदलेल. आता आणखी आपण दुसरी बाजू पाहू या कारण मी.सुद्धा एक शेतकरी पोरंगाच आहे मी पूर्ण अनुभवलेलं आहे एक- एक दिवस भर उन्हात मोट , नांगर हाकलेला आहे काय दु: ख सांगवेत या कामाचे एकदा तर मोटाचे विहीरीवरील वडान मोडलं बैलासहीत आम्ही विहीरीत पडणार पण वाचलो अनर्थ टळला पुन्हा वडीलांनी माझी मोट हाणनं बंद केलं कदाचित या गोष्टी परिपूर्ण नविन मंडळीना पहावयास मिळाल्या नसतील असो कोणत्याही प्रकारचं शेतकरी काम घ्या दारे धरणं हेही सोपे काम नाही कित्येक वेळी सर्प पायी तुडविले गेले कधी सर्प भेटले पण काही नाही गुपचूप ते करावेच लागतं न करता सांगायचे कोणाला. एवढं करून हाती काहीच नाही .
पूर्वी उत्तम शेती ,हे तत्व होते आज त्याच्या उलटं झालं कनिष्ठ शेती हे तत्व आज पहावयास मिळतंय .हे कुठे तरी थांबायला पाहीजे कारण काही जरी असले तरी शेती मालाशिवाय कोणालाही जीवंत राहता येत नाही . मग शेतकरी बांधव जगात जीवंत राहीला पाहीजे ही मानसिकता सर्वच सामाजिक घटकांची झाली पाहीजे त्याला आर्थिक दृष्ट्या उज्वल बनविण्यासाठी शेतकरी कर्ज मुक्त झाला पाहिजे कर्ज माफी नको म्हणून त्याची पत निर्मान झाली पाहीजे तरच या गोष्टी घडतील . आज मी पाहतो आहे माझ्या शेतकरी भावाच्या मुला - मुलीच्या लग्ना सारख्या गोष्टीला शेती विकावी लागत आहे म्हणून उभ्या जगाला जेवण देणारा आज रडतो आहे ! रडतो आहे . गर्कल भागवत लक्ष्मण ( बीड )
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
11) भारतीय शेतकरी
भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी 2020 चाली भारत महासत्ता बनेल हे स्वप्न उराशी बाळगले होते हे सर्वश्रुतच आहे. त्यांनी हे स्वप्न पाहिले ते कशाच्या जोरावर बरे? युवक युवावर्ग ,तरुण वर्ग.कारण आजचा युवक हा भावी भारताचा नागरिक असणार आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात युवक वर्गाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. युवाशक्ती ही एक महान शक्ती आहे. मनात आणले तर काहीही असाध्य नाही. भारतीय शेतीमध्ये जर योगाने लक्ष घातले व आपल्या शक्तीचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला प्राधान्य दिले तर आपल्या कृषिप्रधान संस्कृती ला जगात तोड नसेल. पूर्वी शेती करत असताना शेतकरी शेतात विविध प्रकारची पिके घेत होता. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करत नव्हता. जे उत्पादन ये तसे ते कसदार होते. त्यालाच आजच्या काळात सेंद्रिय शेती हे नाव दिले गेले आहे. सेंद्रिय शेती हा काही नवीन प्रकार नाही. पूर्वीचा शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करत असते. जुने ते सोने या उक्तीप्रमाणे आजच्या युवकांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले तर येणाऱ्या पिढीला कसदार व चवदार अन्न मिळेल व ती भावी सक्षम, सशक्त नागरिक बनेल. सेंद्रीय शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषीविषयक योग्य ज्ञान व प्रशिक्षण घेऊन जर युवावर्ग लक्ष घालेल तर जीवनमान नक्कीच सुधारेल व जमिनीचा पोतही चांगला राहील. यादृष्टिने तामिळनाडू राज्यात जात आहे. करुर जिल्ह्यामध्ये विनोबाजी पूरम येथे विद्यार्थ्यांसाठी एक बायोडायनॅमिक शेतीशाळा 11 जुलै 2012 ला सुरू केली आहे. हा दोन वर्षांचा निवासी पदविका अभ्यासक्रम आहे पूर्णपणे निशुल्क आहे. 2014मध्ये ही मुले प्रशिक्षण घेऊन तयार झाली आहेत. येथे पुस्तकी ज्ञानाबरोबरच तांत्रिक व प्रात्यक्षिक करून घेतले जाते. वनशेती, पाणलोट क्षेत्र, जमिनीचा कस, बी बियाणे या संदर्भात ज्ञान दिले जाते. व्यवस्थे संदर्भात ही माहिती येथे प्राप्त होते. त्याचबरोबर अवजारा संबंधीचे कौशल्यपूर्ण ज्ञानही दिले जाते. असे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले युवक चांगले कृषी तज्ञ आदर्श शेतकरी तर बनतील शिवाय एक शिस्त बद्ध नागरिक ही बनतील.अशा प्रकारे योग्य प्रशिक्षण देऊन युवकांनी शेतीकडे लक्ष दिले पाहिजे . दहावी-बारावीनंतर सुद्धा बीएससी ऍग्री कोर्स करून अनेक युवक युवती बाहेर पडत आहेत. त्यांनाही शासकीय सेवेत योग्य संधी आहेत. गरज आहे ती फक्त समर्पणाची. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे समजले जाते. कारण शेतकरी जर शेतात धान्य पिकवला जात नाही तर लोकांना जगणे मुश्कील होईल. म्हणून युवावर्गाने आपल्या इतर कामामधून शेतीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देणे हा सध्याच्या काळात महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील शेतकरी दिवसरात्र आपल्या शेतात कष्ट करत असतो.आपल्या घरादाराची सारी जबाबदारी त्याच्यावर असते.आपण बाजारातून एखादी वस्तू विकत घेतो.त्यावेळी त्यापाठीमागील शेतकऱ्यांचे कष्ट आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे आपण त्या शेतमालाची किंमत खूप कमी करत असतो. मॉलमध्ये विचार न करता भरमसाठ खर्च करणारे आपण शेतकऱ्यांचा माल विकत घेताना किंमतीमध्ये कमालीची घासाघीस करतो. त्यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आगतिक, असहाय्य भाव आपल्याला का बरं दिसत नाहीत. आपला तो पोशिंदा आहे, तो जर काम करत नाही असे म्हणाला, जर संपावर गेला, किंवा जर त्याने बंड पुकारले सर्व समाजविरुद्ध तर.... काय होईल कल्पनाच करवत नाही. ज्याच्या जीवावर आपण जगतो त्यालाच आपण किंमत देत नाही. आजची परिस्थिती तर खूपच दयनीय आहे. कांद्याने तर शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. फायदा तर सोडाच पण घातलेले भांडवलाचे ,मजुरीचे पैसेही त्याच्या हाताला लागत नाहीत. यासारखे दुर्दैव कोणतेच,कुठल्याही देशात नसेल.सरकारची आश्वासन पुर्तीमधील कमालीची उदासीनता,मालाला हमीभाव मिळत नाही. कर्जमाफीचा फुसका बार ,सकस बीयानांचा अपुरा पुरवठा,अनियमित वीजपुरवठा, पाण्याची कमतरता,मजुरांचा अभाव अशा कीतीतरी समस्यांना आजचा शेतकरी तोंड देत आहे. आजचा शेतकरी या सर्व दुष्टचक्रात अडकला आहे.त्याच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली आहे. कुटुंबातील लोकांसाठी जगावे का कर्जाच्या बोझ्याखाली गुदमरुन आत्महत्या सारखा पर्याय निवडावा का फासावर जावे? त्याला कळेना झाले आहे. सावकारीचा अक्राळविक्राळ हात त्याच्या नरडीचा घोट घेत आहे. जनावरांची , बैलांची अवस्था ही दयनीय झाली आहे.अच्छे दिन कधी येणार ? का या फक्त घोषणाच राहणार. चालू सरकारने तर शेतकऱ्यांना जगणेच नकोसे केलयं. दिलेली आश्वासने फक्त मतं मिळवण्यासाठीच होती का? यक्ष प्रश्न आहे.आता कुणावर कीती व कसा विश्वास ठेवायचा हे कळेनासे झाले आहे. शेतकरी कीती दिवस हे सहन करणार? कुणी आहे का वाली? देता का कुणी न्याय या शेतकऱ्याला ?
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर,
9881862530
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
12) बळीराजा चा राज्य येवू दे
"झाडाविन ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेती विना समृद्धी गेली एवढी सारी अवकळा दुष्काळाने केली."
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, असे मानतात. त्यामुळेच आजही शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. दसऱ्याच्या दिवशी बळीराजाला कपटाने मारण्यात आले. वामनाने व त्याच्या सैन्याने या दिवशी बळीच्या प्रजेला प्रचंड लुटले. सोने, चांदी, धन-धान्य सर्वस्व लुटले. प्रजा हताश झाली. अशा वेळी बळीच्या शूर मुलाने बाणासुराने प्रजेला धीर देतांना सांगितले की, ‘आपला राजा मेला नाही. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे.’ दसऱ्यानंतर २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा. या दिवशी बळीराजा आपल्या दु:खी व कष्टी प्रजेला भेटायला येतो. प्रजा आपले सर्व दु:ख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते. नवे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते. घराघरात बलिपूजन केले जाते.
ग्रामीण भागात बलिप्रतिपदेला माता-बहिणी ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ म्हणून घरातील पुरूषांना ओवाळतात. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मरतड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम मंत्री होते, असे मानतात. बळीराजाचे राज्य नऊ खंडी होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला ‘खंडोबा’ म्हटले जात असे. आज जसे भारतातील प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे (जिल्हे) असायचे. अनेक सुभ्यांचा मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख महासुभेदार म्हणजे म्हसोबा होय. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा प्रमुख जोतीबा, मल्हार व मरतड हे सुरक्षा अधिकारी होत, अशी भावना आहे. बलिप्रतिपदेला केवळ बळीराजाचीच पूजा होते, असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीच्या राज्यात प्रजा किती सुखी व संपन्न होती, हे लक्षात येईल. अशा सुखी व संपन्न राज्यावर नेहमीच परकीय आक्रमक वाईट नजर ठेवत असत.
बाहेरून आलेल्या परकीयांनी कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकाविले. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्याचा सेनापती असलेल्या वामनाने बळीराजाला कपटाने मारले, असे म्हटले जाते. वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही कथा आपणास पुराणांमधून सांगितली जाते. परंतु बहुजनांच्या हिताची प्रत्येक गोष्ट गाडून टाकण्यात आली आहे. बहुजनांच्या फायद्याचे आयोग आजही दडपून टाकण्यात येत आहेत. बळीराजा असलेल्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करावी लागत आहे. देशात पसरलेले जातीभेद, स्त्री-पुरूष विषमता, आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल. म्हणून बलिप्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करण्याची गरज आहे.
इतिहासातील बळीराजा हा आक्रमकांविरोधात लढता लढता मेला. आजचा बळीराजा लढण्याऐवजी मरणेच पसंत करत आहे. लढाई सुरू होण्याआधीच तो पराभव मान्य करत आहे. त्याची लढण्याची प्रेरणा हरवली आहे. कारण त्याचा क्रांतिकारक लढय़ाचा इतिहास हरवला आहे. त्याची लढाऊ ‘आयडेंटी’च हरवली आहे. म्हणून आज बहुजन बुद्धिजीवींनी खरा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले पाहिजे. हा इतिहास बहुजनांच्या रुढी व परंपरांमध्ये शोधला पाहिजे. त्यावरील अंधश्रद्धांची पुटे खरवडून काढलीत तर अस्सल इतिहास आपल्याला सापडल्याशिवाय राहाणार नाही. बहुजनांच्या डोक्यातून अंधश्रद्धा नष्ट करावयाच्या असतील तर त्यांच्या देवांचा अभ्यास करून त्यामागील क्रािंतकारक इतिहास शोधून काढला पाहिजे.
प्राचीन काळापासूनच्या सर्व रुढी, परंपरा व दगडांच्या देवांच्या अभ्यासाची आज नितांत गरज आहे.
तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी बळीराजाचे जे प्रतिक दिले आहे, त्याच्या मुळाशी सांस्कृतिक संघर्षांची पाश्र्वभूमी आहे. परंतु या दृष्टीकोनातून बळीराजाचा अभ्यास अजून व्हावयाचा आहे. सर्व माहिती ताटात ठेवलेली असतानाही बहुजन बुद्धिजीवींना बळीराजाचे सांस्कृतिक संघर्षांतील महत्व कधीच लक्षात आले नाही. ग्रामीण भागातील बहुजन अडाण्यांना बळीराजाचे महत्व कळते, म्हणूनच पाच हजार वर्षांपासून ठराविक गटाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आजही बळीराजाचा इतिहास जिवंत ठेवला आहे. या लढय़ात अग्रभागी आहेत अडाणी ग्रामीण स्त्रिया. ज्या आजही इडा पीडा घालवण्यासाठी बळीच्या राज्याची आस जिवंत ठेवत आहेत.
लेखन
श्री सुंदरसिंग आर.साबळे
ता.गोरेगाव जि.गोंदिया
मो.9545254856
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
13) वेदना बळीराजाचा
'जय जवान जय किसान' ही घोषणा फक्त शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी घोषणाच राहिली आहे. भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जातच वाढतो आणि मृत्यूनंतरही आपल्या मुलाबाळांवर कर्जाचा बोझा ठेवून जातो.
अशा या माझ्या शेतकरी राजाच्या वेदना
किती दुःखदायक आहे. ग्रामीण भागातील जीवनात तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेती ही सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असल्यामुळे कधी बरे कधी वाईट दिवस पहावे लागतात. निसर्गावरच जीवन अवलंबून आहे.
"घणाचे घाव घालावे, गळावा घाम अंगाचा,
यशोदेवी तयासाठी करी घे हार पुष्पांचा"
या दोन ओळीतच श्रमाचे महत्त्व दडलेले आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी माझा शेतकरी राजा मेहनत करतो आहे. मुलं चांगली शिकावी, मोठी व्हावी, मुलांनी मोठी शेती घ्यावी आधुनिक उपकरणाचा वापर करावा त्यांना चांगली नोकरी लागावी असे स्वप्न उराशी बाळगतो आहे.आणि त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहते!!! ??
त्याच्या जीवनात अनेक अनेक अडचणी येतात हलाखीची परिस्थिती निर्माण होते. वेळेवर पाऊस पडत नाही पावसाची वाट बघावी लागते. एखाद्या वेळी पाऊस जास्त आला तर सारे वाहून जाते पाऊस नाही आला तर दुष्काळ पडतो. अशा अनेक परिस्थितीला तोंड द्यावे लागते.
अशा परिस्थितीत माझा शेतकरी राजा कष्ट करून सर्वांचे पोट भरतो.
धन्य धन्य ह्या उभ्या जगाचा पोशिंद्यास....
〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
14) मी राजा पण मी मात्र दुजा......
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
पोशिंदा साऱ्या जगाचा फिरतो अनवाणी पायानं,
साथीला त्याच्या दिसभर बैल मात्र नावानं.....
संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्याच्या जीवनाचं भयाण वास्तव या ओळींमध्ये एका कवीने रेखाटलं आहे. हे वास्तव आपल्यासह कोणालाच नाकारता येणार नाही. शेतकरी राजा ,बळीराजा अशा मोठाल्या देवत्वाच्या उपाध्या देऊन देव्हाऱ्यातल्या देवासारखी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.ज्या प्रकारे संकट काळात सर्वजण देव्हाऱ्यातील देवाकडे आशाळभूत नजरेने साकडं घालतात पण संकट निवारल्यानंतर मात्र पूजा सोडून त्याच्याकडे बघण्यास कोणालाही फारसा वेळ नसतो. तीच अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.आवश्यकता असेल तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा ठेवायची मात्र डॉक्टर वकील,दुकानदार ,मॉल मध्ये खरेदी करताना मागेल तेव्हढे पैसे गप गुमान देणारे आपल्या सारखे पांढरपेशी प्रत्येक्ष स्वतः शेतकरी एखादी वस्तू विक्री करायला बसल्यावर मात्र तोल मोलके भाव करीत बसतो....कितीही शोकांतिका!!
पूर्वीच्या काळी उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समजली जायची.परंतु आज चित्र संपूर्ण बदललेले दिसते आज क्रमवारीत कनिष्ठ शेती झालेली आहे....,हे परिवर्तन कशामुळे झाले,हे चक्र का बदलले याचं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.आजच्या घडीला जो अमाप कष्ट करून पिकवतो त्याच्या दुपटी-तिपटीने नफा विकणारा मिळवतो.म्हणजे जो ऊन ,वारा,पाऊस यांची तमा न बाळगता ,ज्याच्या जीवनात कष्ट, कष्ट आणि कष्टच लिहिलेले आहेत तो बळीराजा स्वतः पिकवणारा असूनही उपाशी आहे तर विकणारे व्यापारी आणि नोकरदार राजकारणी मात्र तुपाशी असे काहीसे भयाण वास्तव आपल्याला दिसत आहे.म्हणूनच आज बळीराजाने 'पिकवणारा होऊन विकणारा' होण्याची गरज आहे.
मुळातच पूर्णतः निसर्गावर आवलंबून असणारा शेतकरी राजाला ना विम्याचे कवच,ना हमीभावाचे कवच त्यामुळे तर तो अधिकच मेटाकुटीला आला आहे.आपण दुकानात किंवा मॉल मध्ये गेल्यानंतर प्रत्येक वस्तूची किंमत उत्पादकाने फिक्स करून ठेवलेली असते म्हणजे उत्पादक स्वतः त्या वस्तूची मूलभूत किंमत ठरवतो इकडे मात्र अतोनात अष्टोप्रहर कष्ट करूनही आमच्या शेतकऱ्याच्या वस्तूची किंमत किती ठेवायची याचा अधिकार माझ्या शेतकरी राजाला नाही....कितीही विसंगती!!
'जय जवान जय किसान 'असं माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री म्हणाले होते पण याच शेतकऱ्याची व्यथा पाहून आपले मन दु:खी झाल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या या पोशिंद्याला आज आत्महत्या करण्याची वेळ का आली असावी ? स्वतः दिवस रात्र शेतात राबणारा माझा शेतकरीराजा मनापासून संपूर्ण कष्ट एकवटून पिक घेतो. पण कधी दुष्काळ, कधी अतीवृष्टी, ही निसर्गनिर्मित संकटे त्याच्यापुढे कायम आ वासून उभे राहतात तरी माझा शेतकरी डगमगत नाही तो सह्याद्रीप्रमाणे कणखर उभा असतो, या संकटावर मात करून तो मायेने लावलेले, जपलेले पिक घेतो पण अजून त्याची परीक्षा संपलेली नसते. शाळेत शिकणाऱ्या मुलाला देखील वर्षातुन फक्त दोनदाच परीक्षेला सामोरे जावे लागते पण शेतकऱ्याला प्रत्येक क्षणाला परीक्षेला सामोरे जावे लागते. एक समस्या सुटली कि दुसरी त्याच्या समोर आ वासून उभी असते. शेतमालाला हमीभाव नाही. त्याने घेतलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. बरं शेतात जे लावलं आहे ते तितकेच पिकेल याची शाश्वती नाही.....आणि पिकलं तरीही कधी कोणता रोग डल्ला मारील किंवा कधी आस्मानी संकट उभे राहून उभे पीक हातचं जाईल याचा काहीही नेम नाही.आशा बिन भरावशाच्या व्यवसायात अनेक संकटे जर आली तर अशा अवस्थेत शेतकरी काय करणार?
खरे म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या लहान सहान बाबींकडे लक्ष देण्याची गरज असतानाच या कण्याच्या पाठीचा कणाच आज कर्ज बाजारीपणामुळे मोडला जाऊन त्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे.ना त्याच्या वृद्धापकाळाची जोखीम, ना त्याच्या मुला बाळांना चांगल्याप्रकारचे शिक्षण....थोडक्यात त्याच्या वर्तमानकाळा बरोबरच भविष्यकाळ देखील अंधकारमय झालेचे दिसून येत आहे.
'ज्याच्या जीवावर जगाचा डोलारा उभा
तोच झाला आहे आज अभागा' ही
परिस्थिती अत्यंत भीषण आणि भयावह आहे. कारण उभ्या जगाच्या पोशिंद्यांची जर ही अवस्था झाली तर भविष्यात पैसे असतील पण विकत घेण्यासाठी धान्य नसेल,घरात मोठं मोठी उपकरणे असतील पण त्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू नसतील,मोठ मोठे कारखाने असतील पण त्यासाठी लागणारा शेतीतील कच्चा माल नसेल,प्रत्येकाने जरा आठवून बघा सकाळी उठल्यापासून तर झोपे पर्यंत शेतकऱ्यांच्या रांगड्या हातानी तयार झालेल्या वस्तूंवाचून आपण जगू शकतो का??म्हणूनच प्रत्येकाने विचार केला पाहिजे शेतकरी जगला,तर देश जगेल !!केवळ देशावर नाही तर जगावर राज्य करणारा माझा शेतकरीराजा सगळ्यांसाठी दुजा न होता.....जिवाभावाचा होणे गरजेचे आहे तेव्हाच आपण अभिमानाने म्हणू शकू...
बळी राजाची आम्ही लेकरं
लगाव आम्हास मातीचा
मर्द रांगडा गडी मी
आभाळाच्या छातीचा
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
15) नव युगातील बळीराजा
➖➖➖➖➖➖➖
सायंकाळी चहाचा कप हातात घेऊन सोफ्यावर येऊन बसले. चहा घेत घेत सहज मोबाईल वर आलेले मेसेज पाहत बसले .
माझ्या मावस भाऊ विशाल चा मेसज पाहून खूप आनंद झाला त्यात लिहिले होते अभिनंदन ताई तू आत्त्या झालीस मला मुलगी झाली .
प्रणिता आणि बाळ सुखरूप आहे.
काळ कसा बदलत जातो. अजूनही विशालच्या लग्नातील आठवणी मनात तशात ताज्या आहेत. विशाल एक सुशिक्षित आणि हुशार शेतकरी. आधुनिक शेती करण्याकडे त्याचा जास्त भर आहे. बी.एस्सी अॅग्री ची डिग्री हातात होती एका चांगल्या बियाण्याच्या कंपनीत भर पगाराची नोकरी मिळाली होती .ती त्याने नाकारली त्याने शेती करायचे ठरविले. हळूहळू वडिलांकडून शेतीचे सर्व सुत्रे शिकून तो शेती करु लागला. जमीन आठ ते दहा हेक्टर असेल. तो शेतात आवडीने काम करु लागला. सुरुवातीला हवामानातील अवकाळी होत असणार्या बदलांमुळे तो निराश होऊन जात असे. तो सुशिक्षित होता. त्याने ठरवले आता पारंपारिक पद्धतीने शेती करुन चालणार नाही सतत हवामानात अचानक काही बदल होतात आणि शेतीचे व शेतमालाचे नेहमीच. नुकसान होते. आपल्याला आता शेती तज्ज्ञांचा सल्ला घेऊन च प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे. त्याने इंटरनेटवरुन कृषी विभागाच्या दोन-तीन ऍप्स डाऊन लोड करून ठेवल्या त्यात तो नेहमी कृषी तज्ज्ञांच्या संपर्कात राहत असे. त्याने आपल्या मातीचे परिक्षण करून घेतले. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याने कमी भांडवलात जास्त नफा देणारे विविध पिकांची पेरणी केली आणि आपल्या शेतात विविध फळबागा तयार केल्या त्या फळबागेत तो पोटपिक ही घेऊ लागला. त्याला मोत्यांच्या नवीन आणि आधुनिक शेती चे कुतुहल होते .
त्याने ठरवले मोत्यांच्या शेती साठी थोडी जागा राखून ठेवायची. मोत्यांच्या शेती चा त्याला दर महिन्याला लाखोंच्या घरात फायदा होत आहे. आज एखाद्या इंजिनिअर आणि डॉक्टरला ही लाजवेल एवढा त्याचा रुबाब आहे. जेव्हा त्याच्या साठी मुली पाहणे सुरु होते. तेव्हा त्याला मात्र प्रत्येक मुली कडून नकार येत होता . कारण फक्त एकच तो शेतकरी होता .
आजकालच्या मुलींच्या मनात एकच खुळ बसलय लग्नासाठी मुलगा नोकरी करणाराच हवा.
शेवटी दूरच्या नात्यातील मुलगी मिळाली .प्रणिता तशी कमी शिकलेली आणि गरीब घरातील होती .तीची ही इच्छा होती माझं लग्न एका चांगल्या डॉक्टर किंवा इंजिनिअरशी व्हावे. प्रणिता तशी दिसायला खूप सुंदर ह घरातील वडीलधारी मंडळींचा आदर करणारी मुलगी. जेव्हा आम्ही विशालच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो . तेव्हा कोणीतरी बोलून गेलं. प्रणिता थोडी नाराज आहे. मी हळूच विशालला सांगितले विशाल बघ , असं काही तरी कानावर पडलयं माझ्या कार्यक्रमाच्या आधी तु प्रणिता सोबत बोलून घे तिच्या मनातील नाराजगी चे कारण जाणून घे. मी तुमची भेट घडवून आणण्याची व्यवस्था करते. विशाल तसा देखणा आणि रुबाबदार आणि छान सूटाबुटात तर त्याचा रुबाब आणखीनच खुलून दिसत होता. मी तीला आणि विशालला भेटून बोलायचे आहे असे तिच्या वडीलांना सांगितले. त्यांनी तशी परवानगी दिली. त्यात त्या दोघांचे बोलणे झाले . तेव्हा त्याला समजले प्रणिताला शेतकरी मुला सोबत लग्न करायचे नाही आहे. विशाल खुप समजदार मुलगा आहे . त्याने तिला समजवून सांगितले ,बघं तुझा नकार असेल तर मी नाही बसणार पुजलेला, पण त्या आधी मी काय सांगतो ते ऐक आणि समजून घे . मी जरी शेतकरी असलो तरी मला अभिमान आहे त्याचा. मी फक्त स्वतःचेच कुटुंब पोसत नाही तर सार्या जगाला पोसतो. कोणी कितीही गडगंज पगारदार असू दे त्यांच्या घरातील डबे महिना अखेरीस खाली होतातच .
पण माझं धन धान्याचं गोदाम सदैव भरलेले असते. मला गर्व आहे मी शेतकरी आहे मी माझ्या शेतीचा राजा आहे . आणि जर तू माझ्याशी लग्न करशील तर तू राणी म्हणून राज्य करशील एका नोकरदाराची पत्नी म्हणून नाही तर राणी म्हणून राहशील.मी येतो निर्णय तुला घ्यायचा आहे . जर तुझी मनापासून तयारी असेल तर पाटावर पुजलेला बसशील नाही तर नाही.
असं म्हणून तो लगेच निघाला. त्याच्या वळलेल्या पाठमोऱ्या आकृती कडे प्रणिती पाहतच राहिली .
साखरपुड्याचा मुहूर्ताची वेळ आली. विशाल मांडवात बसलेला होता हळूच गालात हसू घेऊन प्रणिती तिच्या मैत्रिणींबरोबर बाहेर आली आणि पुजेसाठी पाटावर येऊन बसली .
विशाल तिला चोरट्या नजरेने न्याहाळत होता. प्रणिती चे रुप गुलाबी साडीत अगदी खुलून दिसत होते.
पुढे लवकरच दोघांचे लग्न धुमधडाक्यात झाले . दोघांच्या संसार वेलीवर आता छानस् फूल उमलले आहे . दोघ ही सुखात नांदत आहेत.
आज उन्हातान्हात राबणारा शेतकरी आहे म्हणून आपण तीन वेळा पोटभर जेवण करु शकतो . सध्याचा काळ लॉक डाऊन चा सुरू आहे . जगात सर्वत्र लॉकडाऊन ची घोषणा झाली तेव्हा सर्वांनीच आधी घरात खायला लागणारा किराणा भरून ठेवला आपण घराच्या बाहेर पडतो ते भाजीपाला घेण्यासाठी .आज प्रत्येकाला जाणीव झाली आहे शेतकरी राबतो आहे म्हणून आपण पोटभर खातो आहे . किती मोठे संकट आले तरी तो पुन्हा हिंमत करून नव्याने उभा राहतो पुन्हा हाती शिदोरी घेऊन शेता कडची वाट धरतो .
या साऱ्या विश्वाला त्याच्या मनाच्या श्रीमंती कडे झुकून नमस्कार करायला लावणार्या शेतकरी राजाला माझा सलाम.
🖋 सौ सुवर्णा सोनावणे चाळीसगाव
७७४४८८००८७
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
16) " शेतकरी - एक खरा भूमीभक्त "
आपला भारत देश प्राचिन संस्कृती व संस्कार यांची साक्षात खाणचं आहे . आपल्या देशात प्रत्येक मानवी मनात तीन ' म ' , हे सर्वश्रेष्ठ मानले जाते . ते म्हणजे :- " माय , मातृभूमी , मायबोली !! " यावर प्रत्येक मनुष्य हा जीवापाड प्रेम करीत असतो . तिच्या रक्षणासाठी प्रसंगी स्वतःचे प्राणही समर्पित करीत असतो . मायची काळजी तर वैयक्तिकरित्या प्रत्येक मनुष्यप्राणी घेत असतो . शिवाय मायबोलीही तो जपत आसतो. आता उरला प्रश्न तो म्हणजेभूमीवर मातृभूमीचा !! याची जबाबदारीची धूरा मात्र दोन वर्गावरचं दिसून येते . ती म्हणजे " शेतकरी व सैनिक " !! म्हणून तर माजी. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी या दोन्ही घटकांचे महत्त्व जाणूनच , " जय जवान , जय कीसान !! " हा नारा देऊन त्यांच्याप्रती आदर व सन्मान व्यक्त केला !
अफाट लोकसंख्या असलेल्या या विशाल व महाकाय देशात फक्त शेतकरी व सैनिक हे दोघेच खर्या अर्थाने 'भूमिभक्त ' आहेत . कारण सैनिक हा सिमेवर संरक्षणासाठी दिवसरात्र सज्ज असतो . तद्वतः शेतकरी हा आपल्या या काळ्या आईची दिवसरात्र अविरत सेवा करीत असतो .
" उन्हां - पावसात चाले
अविरत आमची भटकंती
भलेही नसे घरात धन
पण मनात असे श्रीमंती !!
मुक्या बैलजोडीचा
घेऊन सहारा
ओढीतो आम्ही या
जगाचाच पसारा !!
खरंच ! हा माझा शेतकरी राजा तिन्ही ऋतूत किती काबाडकष्ट घेत असतो . तळपत्या उन्हांच्या काहीलीत होरपळून निघततात पण काम कधीही थांबवत नाहीत . " घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत चालूच राहतात !! " अगदी शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत या मातीशी या शेतकऱ्यांची नाळ जुळलेली असते , ती या मातीच्या कुशीत विसावा घेतल्यानंतरच तुटते !! " अखेरच्या श्वासापर्यंत तो या काळ्या आईची सेवा करणारा एक भूमीभक्तचं असतो !
" असूनही हा जगपोशिंदा
राही सदैव उपाशी
भागवून सर्वांचीच तहान
कोरड मात्र त्याच्या घशाशी !! "
शेतकऱ्यांना आपल्या आयुष्यात कधीही पोटंभर अन्न व अंगभर कपडे मिळत नाही. कारण हा जगपोशिंदा आपल्या शेतातील माल हा कर्जे फेडण्यातच संपवून जातो. परिणामी सर्व जगाची तहान - भूक भागवणारा स्वतः आपल्या कुटुंबासह उपाशी - तापाशी असतो ! बाजारात मालाची किंमत कमी , शेतात उत्पन्न कमी , मातीची गुणवत्ता कमी , बँकेच्या कर्जाचा डोंगर , सावकारी कर्जे , मुलाबाळांचे शिक्षण , मुलीच्या लग्नाचा प्रश्न , वृद्ध आई - वडिलांची आजारपण , या एक नाही असंख्य समस्यांच्या " चक्रव्यूहात " हा शेतकरी अडकून हताश झालेला आहे ! त्यातून तो बाहेर जाण्याचा मार्ग शोधून शोधून संपून जात आहे ......
" सुकलेला हा चेहरा
होईल का पुन्हा ताजा
खरंच ! या जन्मी होईल का ?
सुखी - संपन्न हा शेतकरी राजा !! "
आपण सर्व भारतीय बांधवांनी या शेतकऱ्यांना सुखी - संपन्न करायला हवंय ! निदान एका वर्षाची एका शेतकरी पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला हवीच ! त्यांच्या शेतमालाची प्रत्यक्षात खरेदी करून व्यापारवर्गापेक्षा ह्या शेतकऱ्यांच्या खिशात पैसा जाण्याकडे लक्ष दिले पाहिजे ! मंदिरात दानधर्म न करता या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला पाहिजे ! त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून आपल्यातल्या जिवंत माणूसकीचे दर्शन दाखवून दिले पाहिजे !
ह्या भूमीभक्तांची विटंबना आपण सारे भारतीय मिळून दूर करूया ! त्यांच्या डोळ्यांतील रक्तांचे आसू पुसून मायेचा आधार देऊया ! नि या भूमीभक्ताला पुन्हा पुर्नजिवीत करून माणूसकीचा झरा खळखळ वाहत ठेवूया !!
" देऊन शेतकऱ्यांना
मदतीचा हात
ठेऊ माणूसकी जिवंत
मानवी अंर्तमनात !! "
देणार ना ! मदतीचा हात या शेतकरी भूमीपूत्रास , भूमीभक्तांस , जगाच्या पोशिंद्यास ! हो नक्कीच देणार कारण तुमच्या भूमीनिष्ठेवर व शेतकऱ्यांच्याप्रती असलेल्या निष्ठेवर माझा शंभर टक्के विश्वास आहे !!
अर्चना दिगांबर गरूड (स.शि.)
प्रा. शा. पांधरा ,
ता. किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552954415
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
17) बळीराजा
"दौलतीचा राजा शेतकरी माझा
मातीतून सोन काढतोय रं
समद्या जगाला पोसतोय रं"
समद्या जगाला पोसणारा हा बळीराजा काळ्या मातीत राबून अापले जीवन व्यतीत करतो.बिनभरवशाच्या पावसावर अाधारित शेतीमध्ये जुगार खेळतो.वारेमाप कर्ज काढून प्रामाणिकपणे या काळ्या मातीशी ईमान राखतो.अातड्याला पीळं देऊन उन्हातान्हातं अापल्या कारभारणीसंग तान्हूल्याचा झोका झाडाला बांधून अापल्या संसाराचा रांधा चालवतो.अनेक दुःख पदरात घेऊनच जणू काही याचा जन्म झाला अाहे असेच या बळीराज्याच्या जीवनाचं गमक असतं.कष्टाला तोड नाही अन सुखाला याच्या अंगणी यायला सवड नाही.सगळीकडून या शेतकर्याची दशा होताना दिसते.पण तरीही हा हार मानतच नाही.दिलदार मनाचा हा काळ्या मातीचा राजा, पसाभर दे म्हणलं तर ओंजळभर देणारा.
चार दोन एकर शेती असूनही चार लेकरांचा सांभाळ करताना त्याच्या जीवाची होणारी काहीली पाहता मनात दुःखाच्या उकळ्या फुटतात.नांगराचा फाळ पुढे चालत असतो सोबतीला त्याचा मैतर बैल औत ओढत असताना अातड्याला पीळ पडेपर्यंत बेंबीच्या देठापासून तो घाम गाळत असतो.कारण उरात लेकराच सुख दडलेले असतं.लेकराचं शिक्षण,मुलीच्या लग्नासाठी पै पै हुंडा जमवण्याचा ध्यास त्याला लागलेला असतो.याच कमनशिबी शेतकर्याला सर्वजण छळायला बसलेले असतात.नांगरलेले ढेकळाचं काळकुट्ट शिवार व हा बळीराजा निर्दयी अाभाळाकडे अाशेने बघत असतो.स्वप्न पाहत असतो.अवंदा तरी पाऊस बरा हुईल,अन माझ रिण चुकतं होईल.पावसाच्या रिमझिमत्या धारेमध्ये अर्धा मृग निघून गेल्यावर पेरणी होते .कोंब कुठे तरी अंकुरू लागले की पाऊस हुलकावणी देतो अाणि दुबार पेरणीचं संकट दतत्त म्हणून उभं राहत.परत अाशा ही "येईल पुन्हा अाभाळ भरून..जाईल माझ्या मागची सनी निघून" ही वेडी अाशा मनात धरून सावकाराचं कर्ज काढून हा शेतकरी बाप मातीत बियाणं पेरतो.मग कधी धान्य पिकतंही अन कधी नाही ही.तरी पण हा अापल्या चिल्ल्यापिल्यांची उपासमार होऊ देत नाही.त्यांना अापल्या गरिबीची ठिगळं दिसू देत नाही.
हाती तोंडी अालेला घास पुन्हा हा अवकाळी पाऊस हिरावून न्यायला येतो.तेंव्हाची धांदल पाहता अाभाळाचे डोळे भरून न येता या पाण्यात शेतकर्याची अासवे ओसंडून वाहतात हे कुणाला दिसतही नाही त्यासाठी शेतकरीचं व्हावं लागतं.हेच काय कमी तर शासन दरबारी ही या बिचार्याला न्याय कुठे मिळतो??
धान्य मळून घरी अाणलं की या बिचार्याच्या मालाला कवडीमोल भाव बाजारात मिळतो.व्यापार्याचा अमाप फायदा होतो कारण बळीराजा झोपडीत हे धान्य ठेवण्याईतपत जागा नाही मग व्यापारी भाव पाडून खरेदी करतात.शेतकरी बिचारी कर्जापायी व अापल्या अडचणीपायी धान्य विकून चारपैसे घेतो. पण या मागची त्याची मेहनत व बि बियाण व खताचा वाढता भाव,पावसाची हुलकवाणी,शासनाकडून अन्याय हे कुणालाच अजून कळला नाही..
अरे बाबानों या शैतकर्याचीं ही ईच्छा नसते की कर्जमाफी व्हावी.त्याची एकच इच्छा अाहे की बी बियाणाचे भाव योग्य व त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा .मग कुणाच्या भीकेवर जगणारा हा शेतकरी नाही.तो तर अख्या दुनियेला जगवणारा पोशिंदा अाहे. तो या भूमीचा स्वामी अाहे.काळ्या अाईचा प्रामाणिक लेक अाहे.
अाजच्या या वाईट काळात त्याच्याच धनधान्याने समस्त जनता घरात बंदिस्त असूनही शेतकरीचं माणसाला जगवू शकतो हे कुठेतरी मान्य कराव लागतं.
या सगळ्या वेदनेचं अाभाळ भरून अाल तरी हा शेतकरी भरून येणार्या अाभाळाकडे अजूनही अाशाच लावून राहतो.कारण तोच जगवू शकतो अन समाजाला जागवू शकतो..
अभिमान आहे मला माझ्या बापाचा
कष्ट करूनी उभा केला संसार जीवनाचा
श्रीम.रावते ज्योती
नांदेड
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
18) शेतकरी जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे. तो धरणीला मायेने नांगरूतो ,बी पेरतो आणि प्रत्येकाचा तोंडी अन्नाचा घास पडतो. मात्र हा शेतकरी आमचा अन्नदाताच *सुखी नाही किंबहुना हवालदिल झाला आहे* ह्या अन्नदाता वरच उपासमारीची वेळ आली आहे. आज होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण धक्कादायक आहे.
शेती फक्त बियाणे पेरून आणि पाणी देऊन नाही होत. ह्या अन्नपूर्णा धरेचे सिंचन शेतकऱ्यांच्या घामाने होते. अहोरात्र काळ्या मायेची सेवा करणारा, स्वतःबरोबरच जगाची काळजी वाहणारा, प्रचंड काबाडकष्ट करूनही समाधानी असलेला, स्वतःच्या मुखातील घास इतरांना देतांना आनंदित होणारा हा शेतकरी, आज ओला दुष्काळ , कोरडा दुष्काळ, अवकाळी येणाऱ्या पावसाच्या दुष्टचक्रात सापडला आहे . शेतीचे सर्व गणितच पार बिघडले आहे. त्यात रासायनिक खतांचा वापर , कीटकनाशकांची फवारणी ह्या सगळ्या गोष्टीने शेतीचा खर्च अमाप वाढला आहे, पण शेतमालाचे उत्पादन त्या अनुषंगाने वाढले नाही. वरुन अन्नाची,भाज्यांची फळांची चव नाहीशी झाली आहे. जमिनीची नापिकी वाढत चालली आहे. अन्नधान्यात आणि फळात कीटकनाशकाचे प्रमाण धोकादायक झाले आहेत.
ह्या दुष्टचक्रावर काय उपाय ? हा प्रश्न आवासुन उभा आहे. शेतीचे सर्वंकष नियोजन होणे आवश्यक आहे. खर्च कमी आणि दर्जेदार उत्पादन होणे आवश्यक आहे. ह्या करिता सेन्द्रिय शेतीचा पर्याय शिल्लक आहे. सिक्कीम मध्ये संर्पूण शेती सेंद्रीय आहे. ह्यात खर्च कमी येतो. सुरुवातीचे तीन वर्ष उत्पादन काही अंशी कमी होते पण नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या धान्य, भाज्यां,फळांना मागणी आहे. त्याला किंमत सुद्धा चागली मिळते. आम्ही नैसर्गिक रित्या पिकलेले धान्य दीडपट किंमतीत विकत घेतो. हळुहळू जमिनीचा पोत सुधारतो आणि पिक वाढीस लागते , आणि किंमत ही चांगलीच येते, ह्याचा विचार झाला पाहिजे.
सेंद्रीय शेती अगदी वैज्ञानिक पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्या करीता शासनाने नियोजनबद्ध रितीने योजना आखली पाहिजे. शेतकऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिले पाहिजे. पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजेत. ऋतुचक्राच्या बदलाचा वैज्ञानिक पातळीवर अभ्यास करून त्या प्रमाणे पिकाची योजना आखली पाहिजे. शेतकऱ्यांनी सुद्धा काळाच्या ओघात बदलले पाहिजे. खरेतर भारतीय शेतीत आमुलाग्र बदल घडणे आता अपरिहार्य झाले आहे . त्याकरिता तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. कुठल्याही राजकीय पक्षांच्या भुलाव्यात न येता ,आपले निश्चित ध्येय गाठले पाहिजे. या ठिकाणी लालबहादूर शास्त्रींच्या धोष वाक्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही. *जय जवान जय किसान*
*शेतकरी आहे अन्नदाता ,पोशिंदा जगाचा; विश्वाचा त्राता*.
*तो जगला तर जग जगेल* .
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
19) कष्टाचे मोल शेतीत कळते...!
जो दुस-यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टत गेला तोची भला असे समर्थ रामदासांनी म्हटलेले आहे. शेतक-यांबाबत हे म्हणणे अगदी खरे आहे.शेतक-यांचे जीवन हे अत्यंत खडतर आणि कष्टीक असते.हे आंम्ही अगदी लहान पणापासून ऐकत आणि अनुभवत आलेलो आहोत.पुर्वीची शेती ही बैलजोडी, नांगरवखर यावर आधारित होती.शेतीतील बैलजोडीचे महत्त्व एखाद्या कुटुंबातील सदस्यासारखे होते.म्हणुनच आजही आपल्याकडे आपण पोळा हा सण साजरा करून बैलाबद्दलची कृतज्ञता ही व्यक्त करीत असतो. शेतकरी, शेतक-यांचे कुटुंब आणि सालगडी मिळून शेतीचा भार सांभाळत होते.गावातील शेतमजुरांची साथ मिळत होती.शेतक-यांचे अंगण हे म्हशी, बक-या,कोंबड्या, बैलजोडी,गाय-वासरू यांनी भरलेले असे.संध्याकाळ झाली कि वासरांसाठी गायी,म्हशींच्या हंबरण्याचा आवाज हा कानी पडत होता.सकाळ झाली की परत गुर ढोरे हे जंगलात जाण्यासाठी आसुसलेले असत. गुराख्याचा आवाज ऐकून सैरावैरा पळत सुटत.गुरे सुटण्याची वेळ झाली कि रस्त्यावर जाणे हे अपघातास आमंत्रण देत असे. गुरांच्या पायाखाली येऊन केंव्हा जखमी होवू याची शाश्वती नसे.आजही खेड्यात, ग्रामीण भागात काहीअंशी हीच परिस्थिती पहायला मिळते आहे.
विज्ञानाने आज मानवाची प्रगती झालेली पहायला मिळते आहे.घनटोंका काम मिंटो में होणे शक्य झालेले आहे.हे सर्व यांत्रिकीकरणाने शक्य झालेले आहे. यामुळे मजुरा़ंशिवाय शेती करणे शक्य होत आहे.तर दुसरीकडे शेती कामांसाठी मजुर मिळणे कठीण जात आहे.यांत्रिकीकरण ही काळाची गरज बनली आहे.भारतीय शेती ही तुकड्या तुकड्यात वाटल्या गेलेली आहे.अल्प शेतकरी,अत्यल्प शेतकरी,भुमीहीन शेतकरी आणि मोठा शेतकरी असे प्रकार शेतीच्या आकारावरून पडलेले आहेत.आज जो स्वत: शेती कसेल त्याचीच शेती आहे असे म्हटले जाते.हे खरेही आहे.शेतीवर राबणारे हात कमी झाल्याने आणि औद्योगिक जगाचे वेड लागल्याने कमी कष्टात,घाम न गाळता पैसे मिळवण्यासाठी जो तो झटतो आहे. शेती करणे म्हणजे रक्ताचे पाणी शिंपून,मातीत पैसे ओतून आशाळभूतपणे निसर्गाकडे नजर टाकून चांगला पाऊस पडून पीक चांगले येईल या आशेवर जगणे होय.वर्षानुवर्षे हीच शेतीची रीत आपण अंगिकारत आलेलो आहेत.कोरडवाहू शेती करणे हा शुद्ध जुगार आहे.हे माहित असुनही शेतीशिवाय पर्याय शिल्लक नसल्याने अनेकजण शेतीत टिकून आहेत.तर ब-याच जणांनी शेतीच्या जाचाला कंटाळून शहराकडे स्थलांतर केल्याने शेती ओस पडत चाललेली आहे.शेतीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झालेले आहे.भौतिक सुखाची आस लागल्याने शेतीतील कष्ट त्रासदायक वाटायला लागले आहेत. गावाकडील पसारा गुंडाळून शहरात छोटीमोठी कामे करण्याकडे ग्रामीण भागातील लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.यामुळे खेडी ओस पडत चाललेली आहेत.तर शहरे लोकसंख्येनी फुलत चालली आहेत.यामुळे बेघर लोकांच्या संख्येत भर पडत चालली आहे.लोक जागेअभावी दाटीवाटीने शहरात रहात असल्याने आरोग्य समस्यांत भर पडते आहे. आता तर कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने मुंबई,पुणे,सांगली, सोलापुर, नागपूर सारखी शहरे गर्दीमुळे सपाटून कोरोनाच्या प्रभावाखाली येत आहे.यामुळे कोरोना संक्रमण हे वाढत आहे.आतातरी ग्रामीण भागाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिले गेले पाहिजे. भारताची खरी समुध्दी ही खेड्यात वसते आहे हे महात्मा गांधीजींनी जाणले होते.परंतु स्वातंत्र्यांनंतर खेडे विभागाकडे दुर्लक्ष करून आपणच आपल्या पायावर कु-हाड मारून घेतलेली आहे.
एका दान्याचे हजार दाने करणारी जमिन तुच्छ मानून त्याकडे दुर्लक्ष करणारे आपण सर्वजण करंटे ठरलेलो आहोत.शेतीत उगवणारे दाने हे कारखाण्यात तयार करता येत नाही हे माहित असूनही आपण शेतीकडे पर्यायाने शेतक-यांचे दुर्लक्ष करीत आहोत. शेतीचे विज्ञान विकसीत न करता, आधुनिक शेतीची कास न धरता जुन्या काळातील शेतीचे अनुकरण केल्याने शेतीचा विकास हा खुंटलेला पहायला मिळत आहे.शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय झालेला आहे.यावर मात करण्यासाठी तरूणाईने समोर आले पाहिजे. शेती उत्तम कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. उत्तम शेती,मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे तत्त्व परत पुनर्स्थापित केले गेले पाहिजे.कष्टाचे मोल जाणले गेले पाहिजेत.यासाठी प्राथमिक शिक्षणातूनच शेतीचे महत्त्व हे समजावून सांगितले पाहिजे.शालेय शिक्षणात शेती हा विषय अनिवार्य असला पाहिजे.कोणतेही काम कमी दर्जाचे नसते हे कोमल वयातील मुलांच्या ह्रदयावर कोरले गेले पाहिजे. शेतकरी जगेल तरच राष्ट्र जगेल हे सत्य नाकारून चालणार नाही.
* मिलिंद गड्डमवार, राजुरा
भ्र.क्र.९५११२१५२००
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
20) शेतकरी वर्ग
"काळ्या मातीत मातीत तिफन चालते
तिफन चालते"
किती छान आहे ना गाणे हे. डोळ्यासमोर सुंदर हिरवीगार शेते उभी राहतात. त्यातून ते मंजुळ वाहणारे पाणी. जणू काही काळ्या मातीने हिरवागार शालू नेसल्यासारखा. ते रमणीय दृश्य. मी छान तो देखावा चित्रात कैद करत होते आणि एकदम जाग आली. अगं बाई स्वप्न होतं. एक वेगळीच स्फुर्ती मिळाली काम करायला.सुरु झालं मग विचारांचं चक्र.
"कष्ट करून शेतात गाळतो घाम दुसरे कुठलेच सुचत नाही त्याला काम
कमवतो कष्टाची भाकर देण्यासाठी दुसऱ्यांना समाधानाची ढेकर" हो मी बोलते आपल्या शेतकरी मित्राबद्दल,ज्याचे जेवढे कौतुक करावे तितके कमी आहे. आज आपण करोनामुळे स्वतःला बंदिस्त करून घेतलं आहे. पण आपल्याला काही कमी पडू नये म्हणून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता तो राबराब राबतोयं आपल्यासाठी, आपल्या भाकरीसाठी.भय इथले संपत नाही असे आपण म्हणणारे. त्याचे भय कुठे पळून गेले आहे कोणास ठाऊक?
लग्न जमवताना मुलाला शेती किती असे विचारले जाते. पण शेतकरी नवरा कोणालाच नको असतो.
मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले पिकांचे आणि ह्यावर्षी ह्या करोनामुळे पिकवलेलं विकायची सोय नाही. आत्महत्या थांबतच नाहीत.कोणाला ऐकवणार आपलं गाऱ्हाणे. हातावरचे पोट. बाजारपेठेमध्ये त्याच्या भावाला योग्य तो भाव मिळतच नाही. वरुणराजाच्या वाटेकडे डोळे लावून बसतो तो आपला शेतकरी बंधु. सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीत काय होते त्याचे? शेवटी तो पत्करतो आत्महत्येचा पर्याय. बँकांकडून काढलेले कर्ज फेडीसाठी पण त्याच्याकडे कधी कधी तेवढी पुंजी जमा होत नाही. 'जय जवान, जय किसान' ही घोषणा सार्थ होण्यासाठी आपण प्रत्येकाने लक्ष देणे आवश्यक आहे.
"दिला आपण मदतीचा हात
तर मिळेल आयुष्यभराची साथ"
प्रिती दबडे,पुणे
9326822998
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
21) *शेतकऱ्यांची अवस्था*
वर्षानुवर्षे शेतात खपून, घाम गाळून शेतकरी धान्य पिकवतो. तरी तो सदैव नम्र आहे. "आपला हा देश कृषिप्रधान आहे. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोहोचल्या आहेत का, याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? त्यातच निसर्गाचा लहरीपणा, कधी अवर्षण तर कधी अतिवर्षाव..
"हल्ली खेडेगावांतून धनदांडग्यांचा, म्हणजेच सधन शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा वर्ग गिळंकृत करीत आहे. हेच लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सरकारी सोयीसुविधा मिळवतात, मानसन्मान पटकावतात आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहेत; तर गरीब शेतकरी हा अधिकच कंगाल जीवन जगत आहे. गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही. मग तो त्या च्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतो व कर्जबाजारी होतो. मग कर्जफेड कशी करणार? हप्त्यांचा तगादा लागतो. जेव्हा शेतकरी दुष्काळग्रस्त होतों तेव्हा् त्याच्यावरील संकट अधिकच मोठे होते. शेवटी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, कर्जबळी ठरतात.
"स्वतःचे शेत नसलेल्या मजुराचे हाल तर विचारूच नका. त्याला धड मजुरीदेखील दिली जात नाही. त्याला वेठबिगारासारखे राबवून घेतले जाते. पावसाळ्यात हे शेतमजूर कसे जगतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे? सारे राष्ट्र ज्यांच्या कष्टावर जगते तो गरीब शेतकरी उपाशी आहे, याची देशवासीयांना कल्पनाही नसेल.
"या सामान्य शेतकऱ्यांकडे व शेतमजुरांकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे. खरे भूमिपुत्र असलेले शेतकरी गरीब आहेत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगू दया. 'जय जवान, जय किसान' ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य किसानांना लाभू दया, एवढीच शेतकऱ्यांची मागणी आहे."
“आपला देश हा कृषिप्रधान देश आहे, असा थोरमंडळी वारंवार उल्लेख करीत असतात. स्वातंत्र्योत्तर काळात औदयोगिक क्षेत्रात देशाचा विकास करण्याचे योजनापूर्वक प्रयत्न झाले. त्याचवेळी शेतकऱ्यालाही काही सवलती देण्यात आल्या.
"काही वर्षांपासून आमचे महाराष्ट्र सरकार हरितक्रांती झाल्याचे आनंदाने जाहीर करीत आहे. पण ही हरितक्रांती आणि तिच्यातून आलेले वैभव कोणाकडे गेले?
*असे कोणते पान आहे ज्यावरी त्याचा लेख नाही*
*जो पोसतो जगाला त्याचा कुठेच उल्लेख नाही*
शेतकऱ्याला नेहमी समाजकारणात गुंतून त्यावर राजनीती करणारे लोक या समाजात आहेत.
एक काळ होता जेव्हा उच्चतम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असे सूत्र होते. पण आज त्याच्या उलट परिस्थिती आहे. आज हा क्रम पूर्णपणे बदलला गेला आहे. वर्तमान परिस्थिती अशी आहे की भारतासारख्या कृषिप्रधान देशात मात्र खेदाची बाब म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी हे ग्रामीण भागातील असूनही शेतीकडे लक्ष देत नाही. म्हणून आजच्या घडीला नवीन पिढीला सुध्दा शेतकरी म्हणून घ्यायला कमी पणा वाटतो.
आज वर्तमान समयी लाकडावून च्या काळात जीवन जगण्यासाठी आत्ता शेतीमालाची गरज आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाजाला मिळत आहे बाकी वस्तूंची एवढी गरज नाही. लोकांना जीवन जगण्यासाठी सर्वांच्या जीवनाचा पोशिंदा शेतकरी हा असतो आजच्या काळात शेतकऱ्याची अवस्था त्याला व्यवस्थित करण्यात सरकारच्या सोबत इतरांचं सुद्धा काम आहे.
_____________________
महेंद्र सोनेवाने
गोंदिया
मो. 9421802067
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
22) शेतकरी
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी
लसूण मिरची कोथिंबिरी
अवघा व्यापला माझा हरी
सावता माळ्याचे हा अभंग रेडीओवरून प्रसारित केला जात होता.नि माझ्या मन:पटलावर शेतकऱ्यांच्या कष्टाचे चित्र उमटलेले असते. मला वाटले शेतकरी हा अभंग रोजच अनुभवत असतो. शेतकऱ्याला रात्रंदिवस उन्हांतान्हांत शेतात, मळ्यात राबावे लागते. तेव्हाच निसर्गाचं हे धन त्याच्या शेतात घावतं. लोकांच्या पोटाला मिळतं. त्यातून शेतकऱ्याचं वर्षभर घर चालतं. नोकरदारांना जसा महिन्याला पगार असतो तसा शेतकऱ्यांना पगार नसतो. त्याची सर्व भिस्त निसर्गावरच.त्याचे जीवनच निसर्गावर,हवामानावर अवलंबून असते. पाऊस पाणी ठीक झालं तर त्यालाही उत्पन्न चांगले मिळते, पण पाऊस पाणी कमी झाले किंवा अतिवृष्टी झाली तर त्याच्या शेतीचे अमाप नुकसान होते आणि त्याची झळ शेतकऱ्याला भोगावी लागते.
सरकारने कितीही कर्जमाफी केली तरी सावकाराच्या कर्जाचा बोझा नेहमी त्याच्या डोक्यावर असतोच. त्यामुळे जगाचा हा पोशिंदा नेहमी कर्जाने दबलेला चिंबलेला असतो. शेतीसाठी आधुनिक सुख-सुविधा आजही आपल्या देशात प्राप्त झालेल्या नाहीत. पारंपारिक शेती करण्यातून उत्पन्न तितके मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला वर्षभर खपूनही हातामध्ये काहीच रहात नाही. आपल्या मुलांना इच्छा असूनही तो उच्चशिक्षण देऊ शकत नाही. हल्ली सरकार खतं, बी-बियाणं जरी पूरवत असले तरी निसर्गाची अवकृपा झाल्यावर कोणीतरी काय करणार! वडिलोपार्जित शेती नापीक झालेली असते. त्यामुळे त्यातून म्हणावे तसे उत्पन्न चांगले मिळत नाही. परंतु हल्ली सरकारनेही सोयी केलेल्या आहेत.हरेकाला शेती करण्याचे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मोबाईल वरून, टीव्हीवरून सल्ले दिले जातात. रेडिओवर शेती करण्याच्या पद्धती सांगितल्या जातात. परंतु पिकाची लावणी केल्यानंतर रोपे वर येईपर्यंत नेहमी शेतकऱ्याच्या जीवाला घोर असतो. आधुनिक अवजारे थोडीफार आता खात्याच्या मंडळींकडून मिळतात. पीक तयार झाले किड्यांपासून कसे वाचवायचे याची माहिती व त्याच्यासाठी औषधे सुद्धा आता खात्याकडून मिळतात. हल्ली शेतकऱ्यांना दिवस थोडे चांगले आले आहेत. आणि संकरित बी बियाणांमुळे उत्पन्नही बरे येते. परंतु काही ठिकाणी मात्र शेतकऱ्यांच्या डोक्यावर 'सेझचे' संकट ओढवले आहे. त्यामुळे चिंता वाटते शेतकरी किंवा बळीराजा याला साथ देणारे त्याचे सर्जा राजा नेहमी त्याच्या बरोबर असतात. परंतु त्यांना पोटभर खायला देण्यासाठी देखील शेतकऱ्याकडे तितका पुरेसा पैसा नसतो. त्यामुळे नाईलाजाने त्याला आपल्या सर्जा राजाला विकावे लागते. अशा या शेतकऱ्याला खूप गरीबीत दिवस काढावे लागतात. जगाचा पोशिंदा असणारा हा बळीराजा स्वतः मात्र अधुराच, अपुराच असतो.
सौ.भारती सावंत
मुंबई
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
23) भारतीय शेतकरी. ल भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात विविध प्रकारची पिके घेतली जातात.भारतात ७०/ लोकं शेती करतात. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असेही म्हणतात.भारताची शेती हंगामी शेती आहे .उन्हाळा,पावसाळा,हिवाळा या ऋतु नुसार शेती केली जाते .भारतात रबी व खरीप अशी हंगामी पिके घेतली जातात. खरीप म्हणजे .त्याच बरोबर सिंचनावर आधारित शेती केली जाते .भारताची शिती बहुतांशी निसर्गावर अवलंबून आहे.त्या मुळे निसर्ग दरवर्षी साथ देईलच याची काही शाश्वती नाही. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाची हनी केली आहे .त्या मुळे पावसाचे प्रमाण कमी झाले.दरवर्षी केवळ तीन ते चार दिवस पाऊस पडतो त्या मुळे निसर्गावर अवलंबून असलेली शेती पूर्ण वाळून जाते. त्यामुळे बियाणाचे खर्च निघत नाही . असे एक ते दोन वर्ष नपिकी झाली की बियाण्याच्या पैशावर व्याजावर व्याज बसतो त्या मुळे शेतकरी कर्ज बाजारी होतो .कुटुंब चालवणे ,मुलाचे शिक्षण ,मुला मुलींचे लग्न यामुळे शेतकरी अतिशय हतबल होतो.द्विधा मनस्थितीत सापडतो आणि शेवटी आत्महत्या करण्याची पाळी शेतकऱ्यावर येते.आत्महत्या हा काही पर्याय नव्हे हे शेतकऱ्याला न समजण्याचे कारण म्हणजे शेतकऱ्याची निरक्षरता होय.सिंचनावर अवलंबून असणारी शेती नियोजन बद्धकेल्यास शेती केल्यास शेतकरी आपल्या कुटुंबाचे पालन पोषण चांगल्या प्रकारे करू शकतात . भारतात विविध भागात विविध पीक घेतली जातात जर शेतकऱ्याने नियोजन बद्ध शेती केली आणि शेतकऱ्यांना सरकारने तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करण्याचे प्रशिक्षण दिले .आणि वेळोवेळी आर्थिक निधी पुरवठा केल्यास भारताचा शेतकरी भारतीय लोकांना पुरेल तेवढे पीक तर पिकावातीलाच पण अख्या जगाला पोसण्या एवढे पीक भारतीय शेतकरी पीक पिकाऊ शकतात .जगावर आलेला ही संकट भारतीय शेतकरी सोडऊ शकतात.त्या साठी फक्त गरज आहे शेतकऱ्याला मार्गदर्शनाची.वाढती लोकसंख्या व वाढती महागाई लक्षात घेता शासनाने व तरुणांनी योग्य मार्ग काढायला हवा. लालबहदूर शास्त्री यांनी दिलेला जय जवान जय किसान नारा अवगत करून शेतकरी स्वावलंबी बनायला हवा....
जीवन खसावात. भंडारा. 9545246027
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
24) शेतकरी
शेतकरी हा शब्द ऐकला कि डोक्याला कापड बांधून घामाने थबथबलेला चेहरा , उन्हाने गर्द झालेली असहाय करूण आकृती नजरेसमोर उभी राहते. पण त्या आकृतीला आपण किती समजू शकतो? ज्या देशाची ओळख "कृषिप्रधान" म्हणून आहे, त्याच देशात कृषक किती समजून घेतला जातो? सहानुभूती मात्र खूप दिली जाते. पण काय खरंच सहानुभूतीने एखाद्याच आयुष्य बदलू शकतं? शेतकऱ्यांविषयी खूप आपुलकी आणि सहानुभूती दाखवून मोठमोठाले अधिकारी आणि मंत्री स्वतःचा मोठेपणा मिरवतात. चिमूटभर कर्जमाफी आणि एखादी सरकारी योजना यांच्या जोरावर राजकारण चालवतात. आणि ज्या शेतकऱ्याच्या भरवश्यावर आपण सगळेच विलासी जीवन जगत आहोत त्यालाच आमच्यामुळे शेतकऱयांना मदत झाली असा तोरा दाखवतात. शेतकरी खरंच इतका लाचार आहे का? कि जी यंत्रणा एखादी योजना त्याच्यासाठी आणून स्वतःची झोळी भरून घेऊन नंतर चिमूटभर दान त्याच्या वाट्याला उपकार केल्यासारखं टाकते ती लाचार आहे?
युगानुयुगे शेतकरी राबतो आहे, कष्ट करतो आहे, काळ्या मातीतून संपूर्ण देश नव्हे इतर देशांनाही पुरेल अश्या धान्याची आणि जीवनावश्यक बाबींची निर्मिती करतो आहे. आज त्याचे राहणीमान तेवढे बदलले असले, तरी त्याचे काम, कामावरील निष्ठा, आणि काळ्या आईप्रतीचं प्रेम अजूनही कायम आहे. आणि कायम आहे त्याच्या बद्दलचा संपूर्ण जगाचा दृष्टिकोन, 'शेतकरी म्हणजे केवळ एक लाचार, घामाने भिजणारा, आणि जगाच्या सहानुभीतीची भूक असणारा करुण' चेहरा बस एवढंच.
जो शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे. जो शेतकरी संपावर गेला तर त्याच्यावर दया दाखवणारे पांढरपेशे लोकच उपाशी मरतील, तो शेतकरी दुबळा कसा ठरवू शकतं कोणी? तो दुबळा नाहीय, त्याला दुबळा बनवलं जातंय. निसर्गाच्या हुलकावण्यांना तोंड देऊन जो शेतकरी प्रत्येकाच्या तोंडी घास भरवतो त्याच्याच मालाला बेभाव खरेदी करताना कुठे जाते त्याच्याबद्दल वाटणारी सहानुभूती? आजही शेतकऱ्याची मुलं मातीशी घट्ट नाळ जुळली असल्याने विविध प्रकारचे अत्याधुनिक कृषीविषयक तंत्रज्ञान शिकून आपल्या मातीतच राबतात, तिच्यासाठीच झटतात. पण खरंच या सुशिक्षित आणि आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तरी न्याय मिळतो का? शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणारी खते, किटकनाशके, बी- बियाणे यांच्या किमती किती वाजवी आहेत? त्या मोबदल्यात त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळतो का? ज्या शेतकऱ्याला दुबळं समजून त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली जाते, तो शेतकरी आता जागा झाला आहे, त्याला स्वतःच्या हक्काची जाणीव झालेली आहे. आज तो स्वतःच्या हक्कासाठी लढू शकतो, ज्यावेळी त्याचा आवाज उठतो त्यावेळी, " शेतकरी स्वतःच्या व्यवहारासाठी शेती करतो, तो अन्नधान्य पिकवतो आणि बाजारपेठ त्याला त्याचा मोबदला देते, हा केवळ एक व्यवहार आहे " असं फटकळ मत व्यक्त केलं जातं. तेव्हा या कृषिप्रधान देशाचा कणा असलेला हा बळीराजा कुणीच नसतो का? तेव्हा कुठे असते सहानुभूतीचा ससेमिरा?
माझे एक जून प्राचार्य होते, त्यांचं स्पष्ट मत ते नेहमी मांडत असत आणि म्हणत, " I hate farmers. They are very cheap. Because I have seen farmers always in depths. They take the loan more than their ability. And afterwards, when it seems that they are unable to refund it, they choose to suicide. " जेव्हा मी त्यांचं वक्त्यव्य ऐकायचे, माझा संताप अनावर व्हायचा. एकदा मी सगळ्यांसमोर त्यांना या निरर्थक गोष्टीचा जाब विचारला. त्यांना म्हटले, सर, मी तुमच्या मताचा आदर करते, पण आताच तुम्ही जे बोललात ते कस योग्य आहे, हे मला पटवून द्या. ते गोंधळले. त्यांना मी विचारले सर तुम्ही किती दिवस शेतकऱ्याचं जीवन जगलात? उत्तर नव्हतं त्यांच्याकडे. नंतर त्यांना विचारलं, " सर कोणताही व्यवसाय करताना, ज्या व्यवसायात होणारा नफा किंवा तोटा याची सर्वस्वी जबाबदारी निसर्गावर असताना तुम्ही त्या व्यवसायासाठी कर्ज काढण्याची हिम्मत करू शकले असते का? स्वतःच्या जीवाचं रान करून, ओल्या, कोरड्या दुष्काळांना सामोरं जाऊन, मध्येच गारपीट अकाळी पाऊस, महापूर यासारख्या समस्यांवर पाय रोवून काबाडकष्टाने जो मौल्यवान घास तो पिकवतो त्याला ना धड बाजारभाव मिळत, न त्याच्या मालाला बाजारात जागा मिळत, अशांत, उद्विग्न मानाने तो घरी जाऊन भुकेल्या निरागस बायकोपिल्लाना बघत असेल तेव्हा त्याच्या काळजावर पडणारे चरे तुम्ही बघितलेत का सर? मला शेतकरी आत्महत्येचं समर्थन वगैरे करायचं नाहीय...... पण एक प्रश्न मात्र नक्कीच हैराण करून सोडतो मला..... का? जगाच्या पोशिंद्यावर ही वेळ का यावी? "
श्वेता रमेशपंत अंबाडकर
कविठा बु !!
जिल्हा अमरावती
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
25) जगाचा पोशिंदा
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आमची अर्थव्यवस्था च मुळी शेतीवर अवलंबून आहे. एवढे सर्वांना माहीत असुन देखील या भारतातील शेतकऱ्यांनची स्थिती फारच दैयनिय आहे.हरीत क्रांती नंतर भारतीय शेतकरी जरा सावरला त्या आदि देशात नेहमीच अन्नधान्याची टंचाई निर्माण होत असे.पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे नविन नविन शेतिला लागणारे उपकरणे, अवजारे यांचा उपयोग करून शेतीउत्पादनाचा वेग वाढला. आणि काही प्रमाणात जास्त शेती असणारा शेतकरी समृद्ध बनला.हे एकीकडे दिसते तर दुसरीकडे अल्पभूधारक मात्र फारच अडचनित जिवन जगताना दिसतात. कारण आमचं आपले पर्यावरण इतके खराब करून टाकले. की आता हवामान खात्याला व शेतकऱ्यांना देखील हवामानाचा अंदाज घेता येने शक्य राहिले नाही. त्यामुळे दिवस न दिवस शेतमालाचे खुप नुकसान होत आहे.जुन महिना आला की शेतकरी पेरनी करतो आणि नेमकी पेरनी झाली की अगदि पंधरा दिवस पाऊस पडत नाही. आणि मग पुन्हा पेरनी करायची वेळ येते आणि तो तिथुनच कर्जबाजारी होऊन लागतो. मजुरांची मजुरी देता देता तो बेजार होतो. आणि जेव्हा पिक हातात येण्याच्या वेळेस निसर्ग त्याला धोका देतो तोंडाजवळ आलेला घास जमिनीवर गळुन पडतो.आणि मग हिम्मत मारून आत्महत्येचा मार्ग अवलंबला जातो.कधी कधी निराशेपोटी व्यसनाधीनता वाढते. पण माझ्यामते देशात कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी देशातील सर्व विषयाला दुय्यम स्थान देऊन प्रथम स्थान हे शेतिलाच दिले पाहिजे. कारण मानव चंद्रावरहि तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा त्याच्या पोटात अन्न असेल तर. म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा हया त्याच्या प्राथमिक गरजा आहे. आज देश कोरोना चर्या संकटात सापडला आहे. श्रीमंत लोकांजवळ भरपूर सोने,प्लाट,ऐशोआरामाच्या वंस्तु घरात भरून आहे . आजच्या परिस्थितीत जर ते विकतो म्हटले तरी कोनी घ्यायला तयार नाही. कारण कोरोना च्या संकटात लोकांना फक्त पोटभरण्याकरीता धान्य च घेने योग्य वाटत आहे. आणि ते योग्य ही आहे.देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाने सर्व प्रथम शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा,माल साठवायला गोडाऊन ची व्यवस्था करण्यात यावी,जेनेकरुन त्यांचा माल खराब होणार नाही. शेतकऱ्यांना विविध वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय करावी.पारंपरिक पिका शिवाय नविन नविन पिके घेण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावे.आणि सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा म्हणजे. शेतकऱ्यांनी हि रासायनिक खतांचा वापर कमी करून शेणखताचा वापर जास्त केला तर नक्कीच त्यांच्या फळ,भाज्या, धान्य जास्त दिवस टिकेल .मा. लालबहादूर शास्त्रीजिंचा नारा होता.जय जवान जय किसान. देशाला समृद्ध बनवायचे असेल तर आधी जगाच्या पोशिंदयाला म्हणजे शेतकऱ्याला समृद्ध बनला.आणि त्या अर्थव्यवस्थेतेतुन इतर गरजांना प्राधान्य द्यावे. जय किसान.
सौ.मेघा विनोद हिंगमिरे.शिक्षिका भारत विघालय वेळा. त.हिंगणघाट जि.वर्धा.७७९८१५९८२८
∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆
सर्व लेख वाचन केल्याबद्दल आभारी आहे.
Comment मध्ये तुम्हांला आवडलेल्या तीन लेखकांची नावे पोस्ट करावे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें