*श्रद्धांजली*
मालती मंदिराच्या आवारात ऊभी होती .सायली तिची मुलगी, तिला घ्यायला येणार होती. अचानक कुठून कसा एक वेडा धावून आला, तो ओरडला 'दार बंद कर' ,दार बंद कर , ऐकू येत नाही का तुला'! असा ओरडत तो तिच्या अंगावर धावून आला. मालती घाबरली,जागच्या जागीच थिजली. तिच्या अंगाचा थरकाप उडाला. वीस वर्षानी तिनी तो आवाज परत ऐकला होता. तीच जरब, तोच आवेश, हो तिला सुतराम शंका नव्हती, तो आवाज तिच्या नवर्याचा
होता. तिने समोर पाहिले, एक काळा कभिन्न भयावह चेहरा , वाढलेली दाढी, विस्कटलेले केस,अंगावर लटकणारी लक्तरे. ती मागे सरकायला गेली, तेवढ्यात सायलीने तिला मागुन आधार दिला, दोधी घरी आल्या. मालती अजून ही सावरली नव्हती.
तिच्या डोळ्या समोरुन भूतकाळाचा सारीपाट सरकत होता. मालती खूप देखणी होती. विसाव्या वर्षीच आकोल्याच्या इंजिनिअर मुलाशी मालती चे लग्न झाले. लग्न झाल्यावर चवथ्या दिवशीच तो ऑफिस मधून आला तेंव्ह त्यांचा फ्लॅटचे दार ऊघडे होते'दार का उघडे होते? मी तुला दार बंद ठेवायला सांगितले होते ना.' तो तिच्या वर ओरडला, अहो रमाकाकू आल्या होत्या मालती ने सांगितले. त्याने तिचे काहीच ऐकून घेतले नाही. दुसऱ्या दिवशी
ऑफिसला जाताना तो दाराला बाहेरून कुलुप लावून गेला. जवळ जवळ आठ ते दहा तास ती अशी एकटी भुता सारखी घरात असायची. दोन आठवडय़ात कुलदेवीच्या दर्शनाला जायचा प्रोग्राम ठरला. मालतीला आनंद झाला चला थोडा बदल. बस मघे बसले .आजुबाजुचा निसर्ग बघुन मालती आनंदी झाली. तिचा आनंद तिच्या चेहर्यावर ओसंडत होता. मानेवर एक रट्टा बसला, ती कळवळली." तिकडे कुठे बघत होतीस? कोणा कडे बघत होतीस?" तिचा नवरा ओरडला. "सरळ बघ." मालती हिरमुसली आणि सरळ बघत बसली. तिची मान अवघडली, दुखायला लागली, त्यावर त्याने तिला परत दरडावले 'नखरे करु नकोस,बाईला दुःख सहन करता आले पाहिजे. मुर्ख कुठली.'मालती ला रडू कोसळले, त्यावर त्याने तिचा हात जोरात पीरगळला, आणि म्हणाला तमाशा करु नकोस ,लोक बघत आहेत.तो कधी कधी अतिशय चांगला वागे तर कधी हिंस्रपणे तिला मारझोड करायचा. त्याच्या मानगुटीवर वर बसलेला संशयीपिशाच त्याचा पिच्छा सोडत नव्हता आणि मालतीची ससेहोलपट काही थांबत नव्हती.
तिला दिवस गेले. तिने सासुबाई ना बोलावून घेतले. दोधी जणीं आनंदात होत्या. जेवणात शिरा केला नंतर सासुबाई ने मुलाला गोड बातमी दिली, समजावून सांगितले अरे आता तू बाप होणार आहे , तुझी जवाबदारी वाढणार आहे. तुला मालतीला जास्तच जपायला पाहिजे. झाले! तो जोरात कडाडला, काय ! तुला कोणी सांगितले?मालतीनेच मला सांगितले, सासुबाई म्हणाल्या.
एखाद्या हिंस्रश्वापदा सारखा तो तिच्या अंगावर धावून गेला. लाथा बुक्क्यांनी तो तिला तुडवत होता. बोल कुठे शेण खाल्लस? कोणाचे पाप माझ्या माथी मारती आहेस ! मालती अगदी स्तब्ध झाली, तीचा जणू दगड झाला होता. त्याने हात धरून दाराच्या बाहेर ढकलून दिले ,एवढ्या आवाजामुळे शेजारी गोळा झाले होते,रमाकाकू अगदी पुढे आल्या ,तिचा हात धरून ओढत ओढत स्वतःच्या घरी घेऊन गेल्या. तिला पाणी दिले. दोन घास भरवले, मालती रमाकाकूंच्या खांद्यावर वर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडायला लागली, माझे काय चुकले हो? रमाकाकू तिला थोपटत राहिल्या. सकाळी मालतीला घ्यायला तिच्या सासुबाई आल्या. एव्हाना मालती सावरली होती. तिने घरी जायला सपशेल नकार दिला. मी सगळे सहन केले पण माझ्या चारित्र्यावर त्यानी जे लांछन लावले ते मी कदापि सहन करणार नाही .आता मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही ती ठामपणे म्हणाली. ती माहेरी गेली भावाने साथ दिली , भरतकाम शिवणकाम विणकाम करून ती तिचा चरितार्थ चालवत होती. तिची मुलगी सायली मोठी होत होती. सायलीचा ओरडण्याचा आवाजाने ती भानावर आली. 'अग हे काय अजून जेवली नाहीस'? मग तिनेच पानं घेतली. तिच्या लक्षात आले की आईचे काहीतरी बिनसले आहे. मालतीने तिला मामाला फोन करुन बोलवायला सांगितले. मालतीने त्याला सकाळचा प्रकार सांगितला, पूढे म्हणाली तो अशोक होता. मालती ठाम होती. भाऊ म्हणाला उद्या आपण याची खात्री करुन घेऊ. दुसर्या दिवशी सकाळी तो मंदिराच्या आवारात गेला तेव्हा तिथे खूप गर्दी होती. चौकशी केल्यावर कळले कालचा तो वेडा बस अपघातात ठार झाला. पोलिसांना पंचनाम्यात त्याचे परिचय पत्र सापडले. तो अशोकच होता.पोलीसांनी खात्री करून घ्यावी म्हणून, त्याचे डी.एन .ए सायलीच्या डी. एन .ए.शी मॅच करुन घेतले. तो अशोकच होता.
मालतीचा रडण्याचा आणि सायलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता.आज मी तुझे अजिबात ऐकणार नाही सायली चिडून म्हणाली, अग बेटा असे काय करते?तो तुझा जन्मदाता आहे. बापाला असे बेवारस सोडू नको, मालती अगदी हुंदके देत म्हणाली.तावातावाने सायली म्हणाली. मी तुझ्या पोटात असताना,त्याने नव्हते का, आपल्याला अर्ध्या रात्री असेच बेवारस सोडले त्याने आपल्या गरोदर बायकोला. तो बाप तर सोड, माणूस म्हणायच्या लायकीचा सुद्धा नाही.शेजारच्या रमाकाकूनी तुला आसरा दिला नसता तर आपण दोघी जिवंत तरी राहिलोअसतो का'? मालतीने रमाकाकूनां फोन करून सगळी परिस्थिती कळवली. रमाकाकू लगेच यायला निघाली. तेवढ्यात मालतीचा भाऊ पण आला. त्याने सांगितलेली माहिती धक्कादायक होती. अशोकच्या कागदा पत्रात मनोरुग्णालयाचे कार्ड होते, त्यानुसार तो पॅरेनोइड स्किझोफ्रेनियाचा रुग्ण होता आणि त्याचा आजार खूपच वाढला होता.
रमाकाकू म्हणाल्या अशोक 20 वर्षाचा असतांनाच त्याच्या समुपदेशकाने त्याला मनोविकारतज्ञा कडे पाठवले होते. पण अशोकचे बाबा खूप चिडले माझा मुलगा काय वेडा आहे का? अशोकच्या रोगाचे निदान झालेच नाही, आणि अर्थातच औषधोपचार पण झाला नाही. जो पर्यंत आई जिवंत होती ती त्याची काळजी घ्यायची.आई गेली, अशोकचा आजार बळावला. तो नौकरी वर पण जायचा नाही. दिवसोन दिवस घरात पडून राहायचा .कधी बाहेर गेला तर त्याचा यायचा पत्ता नसे . घरी खाऊ घालयला कोणी नाही. कधी भूकेला असताना ऊकीरड्या वरुन वेचून खायचा.मग मी रोज दोन पोळ्या करुन त्याचा दाराशी ठेवायची . शेवटी त्याचा आजार खूपच वाढला तो खूप आरडा ओरडा करायचा, वायलेंट व्हायचा. सोसायटीच्या सदस्यांनी त्याला मेंटल हॉस्पीटल मधे दाखल केले. तिथे त्यांची तबियत सुधारली. पण आठवड्यापूर्वी तो तिथून पळाला असे कळले. आज काय तर तो ह्या जगातच नाही. अतिशय दुर्दैवी होता तो. वेळेवर ऊपचार झाले असते तर तो कदाचित बरा ही झाला असता.
आता सायलीचा राग सुद्धा निवळला. तिच्या लक्षात आले की तिच्या बाबाला नियतीनेच छळले होते .ती त्याला मुखाग्नि द्यायला तयार झाली. स्मशानात मुखाग्नि देताना तिला आठवले लहानपणी ती बाबाला भेटायचा किती हट्ट करायची,तिला बाबा भेटला पण कुठे! तर अगदी सरणावर, आणि तिला हुंदका आवरला नाही .
अशोक सरकारी नोकरीत होता त्याच्या फंडाचे सगळे पैसे मालतीला मिळाले. ते पैसे आणि अशोकचा फ्लॅट विकून भरपुर रक्कम आली. मालती आणि सायलीने त्याचा वरदान नावाचा ट्रस्ट केला सायली सायकोलोजिस्ट झाली.तिचा नवरा सचिन सायक्येट्रीस्ट होता. दोघं मिळून ट्रस्टचे काम संभाळायचे.
सायली स्टेजवर उभी होती तिच्या सेवाभावी कार्याच्या गौरव झाला होता . तिच्या वरदान संस्थेला सर्वोत्तम सेवाभावी संस्था म्हणून गौरविण्यात आले होते. सचिन तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला आता तुझ्या बाबाचा आत्म्याला आज शांती मिळाली असेल. तू तुझ्या बाबांच्या वेदनांचे वरदानात रुपांतर केले. रस्त्यावर एकटे भटकत असलेल्या असंख्य मनोरुग्णानां बरे करून माणसात आणले. त्यांची नातेवाईकांशी भेट घालून दिली आणि त्यांना त्यांचे घर परत मिळवून दिले.ही तुझ्या बाबांना तू दिलेली खरी '*श्रद्धांजली*' आहे.
डाॅ. वर्षा सगदेव नागपूर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें