बोधकथा....
लेखक.. प्रदीप मनोहर पाटील...
माझे आजोबा कै. वेडू आण्णासो.. लहानपणी मला नियमित गोष्टी सांगत त्यातील आठवणीतील एक गोष्ट...
गाव होते लहान काळ नवं युगास सुरवातीचा. सारे बाराबलुतेदार गुण्यागोविंदात आप आपली कामं करत. हेवेदावे, द्धेष, मत्सर कधीच कोणाला शिवत नसे एकोपा सर्वांच्या ठायी भरलेला. विभिन्न कामं करून कुठंही जातीभेद लवलेश न्हवता.गावात एकमेकांना मान सन्मान योग्य ठेवत. एकीत सारे कामे करत.
गावात पाटील यांचा दरारा भलामोठा वाडा सुख समृद्धी तेथे नांदत होती छोट्याश्या किल्या प्रमाणेच त्यांचा वाडा होता. वाड्यात नोकरचाकर यांचा राबता असे. पाटलांनी हिशोब लिहण्या साठी मुनीमजी ठेवला होता. त्यातूनच त्यांच्या संपत्तीचा अंदाज येई.. पाटलांच कुटुंब तसं लहानच ते दोघे आणि त्यांना एकच मुलगा त्याच नुकतंच काही दिवसा पूर्वी लग्न झाले होते. संध्याकाळची वेळ होती दिवे लागणीची पाटील ओसरी वर बसलेले असतात. नेमकं त्याच वेळी गावात काही शिक्षण प्रेमी गावात शाळा उभारणी करत असतात ती चार पाच जण शाळेच्या साठी वर्गणी मागण्यासाठी पाटला कडे येतात. पाटील सर्वांना नमस्कार करतात साऱ्यांना बसण्यास सांगतात. नोकर गुळ पाणी आणून देतात. पाटील काय येणं केलं त्यांना येण्याचं प्रयोजन विचारतात. गावकरी येण्याचं कारण सांगतात... नेमकं त्याच वेळी पाटलांची नवोदित सुनबाई दिवे लावत असते. वाडा मोठा तर दिवे पण खूपच लावावे लागतं वाड्यात. सुनबाई प्रत्येक ठिकाणी जाऊन दिव्यात तेल टाके आगगाडी पेटवे दिवा लावे असा क्रम तिचा सुरु असतो. त्या कडे त्याच वेळी पाटलांचे तिकडे लक्ष गेले.. सुंनबाईंना आवाज दिला ओरडले सुनबाई अहो हे काय करतात आपण? प्रत्येक दिव्या जवळ जाऊन आगगाडी पेटवत आहात. पहिला दिव्या वरून सारे दिवे पेटवायचे सोडून असं कराल तर रोजच एक आगपेटी लागेल.. मला या पुढे असं चालणार नाही लक्षात ठेवा.. समज देतात... समोर बसलेले गावकरी आवाक होऊन पाहतच राहतात..मनोमन विचार करू लागतात पाटील काय कंजूस माणूस दिसतोय आपण उगाच आलोय.. येथे काही आपल्याला वर्गणी मिळणार नाही... दहा पैश्याच्या आगपेटी साठी पण सुनबाई ला रागावले... तेवढ्यात पाटलांच्या लक्षात येते समोर गावकरी बसलेत.. ते गावकर्यांना सांगतात उदया या आपण सकाळी पाहू आपणास काय दयायचे ते आता संध्याकाळ झाली ... गावकरी उठतात निराश मनाने वाड्यावरून खाली उतरतात... दुसरा दिवस उजाळतो काही जण सांगतात आता पाटला कडे जायचं नाही तेथे काही आपल्याला एक धेला हि मिळणार नाही!. दुसरा उदगारतो अहो बोलवलं तर जाऊन पाहू बघु काय म्हणतात ते. जायला काय हरकत !असं हो नाही करत सारे सकाळी सकाळी वाड्यावर जातात... सकाळ ची वेळ वाड्यावर सर्व घरातील मंडळी नोकर चाकर कामात गुंग असतात पाटील बैठकीत बसलेले असतात. मुनीम आपलं लिहण्यात व्यस्त असतात. त्याच वेळी गावकरी येतात. पाटील सर्वांचे स्वागत करतात या आपलीच वाट पाहत होतो. सर्वांना बसवतात आणि नोकरास गावकऱ्यांना पाणी सोबत नास्ता देण्यास सांगतात. .. मुनीम यास हाक मारून चेकबुक आणण्यास सांगतात. मुनीम चेक आणून देतो पाटील त्यावर सही करतात आणि गावकऱ्यांच्या हाती चेक देतात... गावकरी चेक घेतात बघतात तर चेक वर सही आहे पण रक्कम भरलेली नाही.. विचारात पडतात यांच्या कडून चुकून रक्कम लिहली गेली नसेल! पाटलांना विचारतात रक्कम लिहली नाही आपण?... तस पाटील सांगतात. नाही !आपणास जी रक्कम लागेल ती भरा जेवढे पैसे शाळेच्या कामास हवेत तेवढे सारे पैसे भरा आपणास पाहिजे तितके.. सारेच बुचकळ्यात पडतात अरे आपण काय विचार करत होतो आणि काय दिसतंय. न राहवून एक गावकरी धाडस करून विचारतो. पाटील आम्हाला खात्री न्हवती आपण पैसे देणार अशी संध्याकाळी सुनबाई यांना दहा पैश्याच्या आगपेटी साठी बोलत होतात आणि आम्हाला कोरा चेक देतात असं का? त्यावर पाटील सांगतात माणसाने काटकसर करावी जीवनात पण कंजूस पणा करू नये ! योग्य ठिकाणी पैसा असला तर सत्कारणी लावावा ! गावाचे काम आहे गावचा पाटील या नात्याने गावातील सारे गावकरी कुटूंबच की त्यात गावात शाळा होणार ज्ञानदान सारख्या चांगल्या कार्यास सुरवात होतेय तर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, सारे शिक्षित व्हावेत. गावाचे नाव उंचवावे म्हणून जमलेल्या पैश्यातून योग्य खर्च करतोय ....
तात्पर्य...
1) काटकसर करावी कंजूसपणा करू नये..
2)"थेंब थेंब पाणी साचे " या म्हणी प्रमाणे..लहान लहान गोष्टी विचारात घेऊ तेव्हाच श्रीमंती येते...
3)चांगल्या कार्या साठी संपत्ती खर्च करावी....
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
मोबाईल. 9922239055©️®️
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें